Showing posts with label Seeker. Show all posts
Showing posts with label Seeker. Show all posts

Tuesday, September 9, 2025

साधकाचा पुरुषार्थ | Prime Effort Of A Seeker

 



मुमुक्षूने, साधकाने कोणता पुरुषार्थ करावा ?  देवर्षि नारद सांगतात माहात्म्यांचा सत्संग करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी साधकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा.  नव्हे, सर्व साधना करावी.  म्हणून शास्त्रामध्ये जी साधने सांगितलेली आहेत - पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य, उपवास, उपासना, यज्ञ, याग, भजन, कीर्तन वगैरेदि सर्व निःस्वार्थपणे सातत्याने करावीत.  त्या सर्वांचा परिपाक म्हणजे महात्माप्राप्ति होय.  हेच सर्व साधनेचे फळ आहे.  महात्मा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वरपूजा, सेवा, ईश्वरउपासना, श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नियमित करावी, त्याचे फळ म्हणजे आपले मन हळूहळू शुद्ध होते.  अंतर्मुख होते आणि योग्य वेळी आपल्या आयुष्यात महात्मा येतो.  नव्हे महात्मा आहे हे आपल्याला समजते.

 

शास्त्रकार म्हणतात आपण महात्म्याला शोधावयास जाण्याची गरज नाही तर महात्मा आपोआप जीवनात येतो.  त्यासाठी ततपूर्वी आपली योग्य तयारी असली पाहिजे नाहीतर तो आला तरी समजण्याची पात्रता असणार नाही.  म्हणून जेव्हा तयारी होते तेव्हा महात्मा भेटतो.  हृदयाला हृदय भिडते.  शिष्याला गुरु आणि गुरूंना शिष्य भेटतो.  त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की, "हे परमेश्वरा !  मला सद्बुद्धि दे.  मला ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, काहीही नको.  फक्त महात्म्यांचा सत्संग होऊ दे.  माझ्याकडून त्यांची सेवा घडू दे.  माझी श्रद्धा, निष्ठा, भक्ति त्यांच्यामध्ये राहू दे.  त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींचा मला विसर पडू दे.  माझे लक्ष त्यांच्यातच राहू दे.  त्यांनी दिलेला उपदेश माझ्या मनावर ठासून आत्मसात होऊ दे."

 

भगवान म्हणतात -

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ||                         (गीता अ. ४-३४)

साधूंना अनन्य भावाने शरण जावे.  त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करावे.  संतुष्ट करावे.  म्हणजेच परमेश्वरही संतुष्ट होतो.  त्यामुळे कृपा होऊन आमच्या अंतःकरणात परमेश्वराचे अनन्य प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा उदय होईल.  त्यांच्या कृपेनेच आमच्या जीवनात अंतरिक शांति, समाधान येईल.  जीवनाला पूर्णता येईल.  म्हणून साधुसंग मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.  साधना करावी.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, June 18, 2024

साधकाची पुनर्जन्म गति | Seeker’s Progress Upon Rebirth

 



साधकाचा किंवा त्याने केलेल्या साधनेचा कधीही नाश होत नाही.  प्रारब्धक्षयाने वर्तमान शरीराचा जरी मृत्यु झाला तरी तो पुण्यात्मा जीव साधनेचे सर्व संस्कार घेऊन पुढच्या योनीमध्ये प्रवेश करतो.  तो कधीही दुर्गतीला जात नाही किंवा त्याचे अधःपतनही होत नाही.  साधनेच्या संस्कारांच्या प्रभावाने पुढच्या जन्मी सुद्धा त्याचे मन सत्त्वगुणप्रधानच होते.  कदाचित काही वेळेला एखाद्या पापकर्माच्या प्रभावाने त्याला अधोयोनी मिळाली म्हणजेच पशुपक्ष्यांचे शरीर मिळाले तरी चांगले संस्कार नष्ट होत नाहीत.

 

मागच्या जन्मी जर सत्त्वगुणांचे अनेक संस्कार झाले असतील तर या जन्मी कुत्र्याची अधोयोनी मिळाली तरीही तो कुत्रा अत्यंत सात्त्विक वातावरणामध्ये वाढेल.  एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये त्याला सत्संग मिळेल.  जिथे वेदघोष चालतील, जिथे प्रवचन, कीर्तन, भजन, सत्संग चालू आहे, अशा महात्म्यांच्या सान्निध्यात त्याला राहायला मिळेल.  त्यामुळे त्या योनीमध्ये सुद्धा जीवाचे अधःपतन होणार नाही हे सिद्ध होते.  कर्माचे भोग भोगले की, त्या जीवाला पुन्हा पुढची योनी मिळेल.

 

समजा, एखादा साधक साधना करीत असताना मृत झाला व त्याच्या अंतःकरणामध्ये काही विषयांच्या कामना असतील तर तो पुढच्या जन्मी अत्यंत चारित्र्यसंपन्न, शुद्ध, पवित्र व श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  त्यामुळे त्याच्या कामना सहजच पूर्ण होतील व त्या पूर्ण झाल्या की, लगेचच त्याचे पूर्वजन्मींचे संस्कार जागृत होऊन तो सर्वसंगपरित्याग करेल व पुन्हा साधनेत प्रवृत्त होईल.

 

किंवा याउलट एखादा साधक प्रखर वैराग्यसंपन्न असेल, मनामध्ये कोणतीही कामना नसेल व त्याचा साधना करता-करता मृत्यु झाला तर पुढच्या जन्मी तो सदाचारसंपन्न, मात्र अत्यंत गरीब परंतु भक्तिसंपन्न आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  काही काळ घरामध्ये राहील आणि अत्यंत लहान वयामध्ये त्याच्या अंतःकरणात पूर्वजन्मीचे साधनेचे संस्कार जागृत झाले की, तो घरादाराचा त्याग करून साधनेमध्ये प्रवृत्त होईल.  तो पुन्हा अत्यंत जोमाने व उत्साहाने तीव्र गतीने साधना करेल व मोक्षाची प्राप्ति करून घेईल.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, March 19, 2024

साधकाने कधीही दुःखी होऊ नये | Seeker Should Never Grieve

 



जो मनुष्य प्रामाणिकपणे शास्त्र श्रवण करतो, त्याच्याच अंतःकरणात ज्ञान उदयाला येते.  त्यावेळी हे विश्व काय आहे?  कोणाचे आहे?  कोठून निर्माण झाले?  उत्पत्ति व नाश कोणाचा होतो?  वर्धन कोण पावते?  याप्रकारच्या सर्व शंकांचा निरास होतो.

 

हे सर्व प्रश्न आत्म्याव्यतिरिक्त असणाऱ्या अनात्म्याविषयी आहेत.  वस्तुतः या प्रश्नांच्यामध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत.  प्रश्नांच्यामधून त्या प्रश्नांचाच निरास केला आहे.  विश्वाबद्दल प्रश्न विचारणे म्हणजे विश्वाचा निरास करण्यासारखे आहे.  कारण जे दृश्य आहे, त्याबद्दलच प्रश्न विचारता येतात आणि जे दृश्य आहे ते तर नियमाप्रमाणे नश्वर आहे.  यद् दृश्यं तत् नष्टं इति |  म्हणून ज्याबद्दल प्रश्न विचारले जातात, ते विश्वच मुळी दृश्य व नश्वर असल्यामुळे स्वप्नवत् अतिशय मिथ्या आहे.  परंतु मिथ्या असूनही जर आपल्या सर्वांना विश्व अनुभवायला येत असेल, डोळ्यांना दिसत असेल तर आपोआपच सिद्ध होते की, या भासमान विश्वाच्या मागे असणारे अधिष्ठान - परब्रह्मतत्त्व हेच एकमात्र सत्य आहे.  कारण अधिष्ठानाशिवाय भासमान वास्तूचा भास होऊ शकत नाही.

 

जसे - रज्जुसर्पवत् इति |  आपल्याला अंधुक प्रकाशात दोरीच्या अधिष्ठानावर सापाचा भास होतो.  सापाचा भास होण्यासाठी दोरीची सत्ता अत्यंत आवश्यक आहे.  दोरीशिवाय सापाचा भास होऊ शकत नाही.  अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तु अनुभवायला येत नाही.  हाच सिद्धांत आहे.  दोरीवर निर्माण झालेला साप सत्य वाटतो.  मग त्या सापापासून भीति वाटते.  परंतु तो साप, भीति हे सर्वच मिथ्या व कल्पित आहेत.  तसेच, हा संसारही त्या सापाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे संसारामधून निर्माण होणारी दुःखेही मिथ्याच आहेत.  संसार हा भातुकलीच्या खेळाप्रमाणे दोन घडीचा, विकारयुक्त, नाशवान, स्वप्नवत् मिथ्या आहे.  यामध्ये अनुभवायला येणारी सर्व सुख-दुःखे, प्रसंग हेही मिथ्या आहेत.  म्हणून खरे तर शास्त्र श्रवण करणाऱ्या साधकाने कधीही दुःखी होऊ नये.

 

इतकेच नव्हे, तर साधकाने "मी संसारमुक्त झालो" असे म्हणणेही व्यर्थ आहे.  दोरीवर दिसणाऱ्या सापाला "मी मारले" असे म्हणण्यासारखे ते हास्यास्पद आहे.  जो साप उत्पन्नच झाला नाही, त्याचा नाश तरी कसा करणार!  पण दिसत असेल तर तो साप उत्पन्न कसा झाला?  तसेच, ज्या संसाराची उत्पत्तीच झाली नाही, त्या संसाराचा नाश कसा करणार?  परंतु तरी सुद्धा संसार अनुभवायला येत असेल तर तो निर्माण झाला तरी कसा?  आणि कोठून?  शास्त्राच्या साहाय्याने याचा विचार होणे आवश्यक आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ




Wednesday, January 26, 2022

पुरुषप्रयत्न | Dutiful Effort

 



साधुसंतांनी मार्गदर्शन केलेल्या मार्गाने काया-वाचा-मनाने जे कर्म केले जाते तेच खऱ्या अर्थाने पुरुषप्रयत्न असून त्याचेच योग्य फळ आपणास मिळते.  त्याव्यतिरिक्त उन्मत्तपणे केलेले कर्म निष्फळ, व्यर्थ ठरते.

 

वसिष्ठ मुनि पुरुषप्रयत्नांची आणखी एक सुंदर व्याख्या करतात.  प्रयत्न म्हणजे केवळ आपले मन मानेल तसे कर्म करणे नव्हे.  कर्म करतानाही कोणते कर्म करावे व कोणते करू नये, याचे सुद्धा शास्त्र आहे.  साधु-संतांनी उपदिष्ट केलेल्या कर्माचेच अनुसरण करावे.  आपल्या जीवनामध्ये सत्संगाला अतिशय महत्त्व आहे.  जीवनात एक वेळ पैसा, संपत्ति अन्य सर्वकाही मिळेल, परंतु सत्संग मात्र दुर्मिळ आहे.  सत्संगामुळे आपल्या विचारांना आणि जीवनाला योग्य दिशा मिळते.  म्हणून मनाने सत्संगामध्ये, संतांच्या संगामध्ये जावे.  संत याचा अर्थच - सन्मार्गस्थः संतः |  जो स्वतः काया-वाचा-मनसा सन्मार्गाचा, सदाचाराचे, श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन करतो, तो साधु पुरुष असून तोच अन्य लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो.  त्यामुळे अशा सत्संगानेच आपल्या जीवनामध्ये अंतर्बाहय बदल होतो.

 

आदि शंकराचार्य सांगतात - नेयं सज्जनसंगे चित्तम् |  साधूंच्या संगामध्ये गेल्यावर आपोआपच त्याच्या उपदेशाचे संस्कार मनावर होतात.  त्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल होतात आणि विचार बदलले की आपले आचरणही बदलते.  याप्रकारे सत्संगामुळे आचार, विचार, उच्चार उदात्त होऊन साधक सत्कर्मनिष्ठ होऊन धर्मपरायण होतो.  अशा वेळी आपल्या हातून चांगलेच कर्म घडते.  अशा सदाचारालाच खऱ्या अर्थाने 'प्रयत्न' असे म्हटले जाते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, July 13, 2021

खऱ्या शिष्याची प्रतिक्षा | Anticipation of True Seeker

 



प्रत्येक गुरु खऱ्या शिष्याची वाट पाहत असतात.  गुरूंच्याकडे तसे अनेक शिष्य येतात, थोडीफार सेवा करतात, स्वतःच्या शरीराचे-मनाचे सर्व लाड पुरवून जमेल तशी साधना करतात.  थोडे श्रवण करून शाब्दिक ज्ञान गोळा करतात.  एवढे झाले की, वेश बदलतात.  चारदोन लोकांनी पायावर डोके ठेवले की, आपण कोणी मोठे गुरु आहोत, या आविर्भावात स्वतःच्याच मनामध्ये स्वतःचे एक वेगळे गुरुपदवीने भूषित असणारे काल्पनिक अस्तित्व निर्माण करतात.  त्यासाठी स्वतःभोवती संसार निर्माण करतात.  एका आश्रमातून दुसरा आश्रम अशी यात्रा चालू ठेवतात.

 

असे अध्यात्ममार्गामध्ये येणारे व जाणारे भरपूर असतात.  परंतु खरोखरच बाह्य सर्व प्रलोभनांना झुगारून देऊन ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणारे, गुरूंच्याजवळ आत्मानुभूतीची याचना करणारे, ज्ञानप्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करणारे;  नव्हे करणारा, एखादाच दुर्मिळ शिष्य असतो.

 

महाराष्ट्रामध्ये अत्यंत थोर तपस्वी, सिद्ध पुरुष परमपूज्य श्री गुळवणी महाराज दर पौर्णिमेला दत्तक्षेत्र वाडी येथे जात असत.  हजारो भक्त आपल्या नाना प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे जात असत.  श्री गुळवणी महाराजांनी आपल्या जवळच्या शिष्याला आपले मनोगत सांगितले.  वर्षानुवर्षे आपल्याकडे हजारो लोक येतात.  स्वतःच्या समस्या सांगतात.  पैसा संपत्ति वगैरे सर्व बाह्य गोष्टी मागतात;  परंतु त्यांच्यामध्ये असा एकही मनुष्य मला मिळाला नाही की, ज्याने माझ्याकडील खरे ज्ञान, अनुभव, मागितला.  अशा एखाद्या शिष्याची मी प्रतीक्षा करतोय.

 

गुरु असा योग्य, अधिकारी शिष्य शोधीत असतात.  आपल्या खंद्यावरील ही ज्ञानगंगा केव्हा एकदा शिष्याच्या अंतःकरणात प्रवाहीत करतोय, असे त्यांना होऊन जाते.  सर्वच गुरूंना असा शिष्य मिळत नाही.  शिष्य अनेक मिळतात, परंतु ते त्या प्रतीचे नसतात.

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ




Wednesday, April 24, 2019

निष्काम साधक | Desire-less Seekers




विश्वामध्ये सकाम लोकांच्या व्यतिरिक्त असणारे काही निष्काम साधक आहेत.  ज्यांच्या अंतःकरणामधून सर्व ऐहिक व पारलौकिक भोगांच्या इच्छा गळून पडलेल्या आहेत, त्यांना निष्काम साधक असे म्हणतात.  निष्काम साधक सर्व श्रौत-स्मार्त, वेदविहित, नित्य-नैमित्तिक कर्म तसेच अनेक प्रकारच्या देवता-उपासना सुद्धा करतात.  त्यामागे त्यांची कोणतीही कामना नसते.  तो साधक विवेकाने, सदसद्विवेकबुद्धीच्या साहाय्याने विषयांच्या, भोगांच्या मर्यादा जाणतो.  त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते.  

खरोखरच हे विश्व काय आहे ?  विश्वाचे, विषयांचे स्वरूप काय आहे ?  सर्व दृश्य विषय काळाच्या ओघात नाश पावतात, हे तो पाहतो.  रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो.  याप्रमाणे विचार करीत गेले तर त्याला समजते की, सर्वच दृश्य प्रपंच नाशवान आहे.  मग त्याला प्रश्न पडतो की, सत्य काय आहे ?  तो सत्याचा शोधक होतो.  

बाह्य विश्वाप्रमाणेच तो स्वतःच्या जीवनाचाही विचार करू लागतो.  मी कोण ?  मी जन्माला का आलो ?  माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे ?  माझ्या जीवनाचे साध्य काय ?  केवळ पैसा मिळविणे, मोठमोठ्या इमारती बांधणे, जगात नाव-प्रसिद्धि कमविणे, शाब्दिक ज्ञानाच्या पदव्या मिळविणे, प्रजोत्पादन करणे, प्रजेचे संगोपन करणे, येथेच्छ उपभोग घेणे हेच साध्य आहे की, यापेक्षा काही वेगळे साध्य आहे ?  

विचार करता-करता त्याला उत्तरही सापडते.  मनुष्याला फक्त सुख, शांति हवी आहे.  निरतिशय आनंदाची प्राप्ति करणे व सर्व दुःखांचा निरास करणे, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य आहे.  याची त्याला अंतरंगामधून तीव्र जाणीव होते.  तेव्हाच तो ‘साधक’ या संज्ञेस पात्र होतो.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


Tuesday, July 18, 2017

प्रारब्ध आणि जिज्ञासु | Fate and The Seeker


शास्त्रकार म्हणतात -  तथा च अभाविनः यत्नेन अपि लाभ असम्भवात् भाविनः च यत्नेन निवारयितुं अशक्यत्वात् च यत्नः निष्फलः इति |  

एखादी गोष्ट जीवनात मिळणार नसेल, तर लाखो प्रयत्न करूनही ती मिळणारच नाही.  तसेच कर्मवशात एखादी गोष्ट मिळणार असेल, मग ती चांगली असो वा वाईट असो, जीवाचा आटापिटा करूनही ती गोष्ट टाळता येणार नाही.  हा स्वतःच्या कर्माचा दोष आहे.  याबाबत कुणालाही दोष देता येणार नाही.  याच दृष्टीने जीवनात मनुष्याचे प्रयत्न निष्फळ आहेत.  प्रत्येकाला जेवढे, जेव्हा व जे मिळावयाचे आहे तेवढेच मिळणार.  ते कमी नाही, जास्तही नाही, आधीही नाही व नंतरही नाही.  

म्हणून जिज्ञासु साधकाने वेळ व शक्ति खर्च करून अन्न मिळवू नये.  त्यासाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत, कारण साधक हा वेदाध्ययनासाठी येतो, तेव्हा आपला सगळा भार ईश्वरावर टाकतो.  भगवन्ताने अशा साधकाला पूर्ण आश्वासन दिले आहे व निश्चिंत राहण्यास सांगितले आहे.  म्हणून भगवान गीतेत म्हणतात, ‘योगक्षेमं वहाम्यहम् |’  मी तुझा चरितार्थ चालवितो.  आवश्यक, योग्य ते सर्व पुरवितो, कारण मी परमेश्वर सर्वशक्तिमान, सर्व विश्वाचा पोषणकर्ता आहे.  

प्रत्यक्ष परमेश्वर मातापित्याप्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनाची काळजी घेणारा असल्याने, साधकाने जीवनातील बहुमोल वेळ फक्त साधनेत घालवावा.  परमेश्वराच्या कृपेने प्रारब्धवशात् सर्व काही व्यवस्थित होत रहाते.  अशा प्रकारे साधकाने साधनेतील जास्तीत जास्त प्रतिबंध काढून टाकावेत आणि तमोगुण व रजोगुण कमी करून सत्त्वगुणाचे संवर्धन करावे.  कालानुक्रमे मन अधिकाधिक शुद्ध करावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ