Tuesday, December 31, 2024

ईश्वराचे कृपामय स्वरूप | Generous Nature Of God

 



ईश्वराचे स्वरूप कृपामय आहे.  तो सर्व प्राणिमात्रांच्यावर कृपाच करतो.  मग तो महान असो किंवा यःकश्चित जीव असो.  तो सर्वांच्यावर सारखीच कृपा करीत असतो.  मग तो चांगला आनंदवर्धन करणारा प्रसंग असो, किंवा अनपेक्षित संकट, प्रतिकूल परिस्थिति आणि दुःख देणारा प्रसंग असो, निंदा, नालस्ती, अवहेलना असेल किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, जीवनामध्ये उत्कर्षाचे दिवस असतील किंवा विनाशाचे असतील.  त्या सर्व प्रसंगांच्यामध्ये परमेश्वराची कृपा ही आहेच.  सूर्याचे किरण हे सर्व विश्वाला भेदभाव न करता प्रकाशमान करतात. त्या प्रकाशाचा कोण, कसा उपयोग करेल हे माहीत नाही.  एखादा विधायक काम करेल तर दुसरा विघातक काम करेल.  एखादा धर्माचे रक्षण करेल दुसरा धर्मनाशाचा विचार करेल.  त्याच प्रकाशात एखादा माणसाचे जीवन वाचवील तर दुसरा जीव घेईल.  मग हा दोष कोणाचा ?  सूर्याच्या प्रकाशाचा की मनुष्याचा ?  सूर्याचे किरण सर्वांनाच एकसारखा प्रकाश देणारे, मार्गस्थ करणारे आहेत.  त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही.

 

परमेश्वराने आपल्याला काय दिले नाही ?  सर्व विश्व फक्त मनुष्याच्या तैनातीलाच निर्माण झाले आहे असे म्हटले पाहिजे.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला भावना आणि विचार करण्याची बुद्धि दिलेली आहे.  विश्वामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या तीन शक्ति - ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति - मनुष्याला दिलेल्या आहेत.  यांच्या साहाय्याने नानाविध विश्वाचे निरीक्षण करून अनेक विषयांचे ज्ञान संपादन करून तो ज्ञानसमृद्ध होतो.  ऐहिक उत्कर्षासाठी संकल्पशक्तीने भविष्याच्या इच्छा निर्माण करून त्या पूर्ण करण्यासाठी असामान्य कर्तृत्वशक्ति मनुष्याला दिलेली आहे.  थोडक्यात जीवनाचा सर्वांगीण विकास करावा, विश्व आणि विषयांच्या साहाय्याने मोहक, सुंदर जीवन तयार करावे, जीवनातील ऐहिक आनंद लुटावा.

 

याच्याही पलीकडे जाऊन विश्वाच्या मागे, जीवनाच्या मागे काही तत्त्व आहे का ?  याचा बुद्धीने शोध घ्यावा.  सर्व विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तसेच अदृश्य, अव्यक्त गूढ तत्त्वाचा शोध किंवा जीवनाचे गूढ रहस्य शोधून काढण्याचे सामर्थ्य मानवाला दिलेले आहे.  त्या तत्त्वाच्या अनुभूतीने मनुष्य मन आणि मनाच्या विकारांच्यावर विजय मिळवून जीवनाची पूर्णता, कृतकृत्यता मिळवू शकेल.  थोडक्यात परमेश्वराने मनुष्याला सर्व काही दिले आहे.  ही त्याची अनंत अपार कृपा आहे.  खरे पाहाता - अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ।  अशी स्थिति आहे.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, December 24, 2024

उदारबुद्धि | Generous Intellect

 



हे उदारबुद्धि रामा !  ज्ञानी पुरुष अनेक युक्तींच्या साहाय्याने जे ज्ञान देतात, त्याची अवहेलना करणे अयोग्य आहे.  युक्तिवादाचा अनादर करून जे लोक युक्तिरहित गोष्टींचा आग्रह धरतात, त्यांना ज्ञाते लोक अज्ञानी समजतात.  याठिकाणी श्रीवसिष्ठ मुनि श्रीरामांना 'उदारबुद्धे' असे संबोधन वापरतात.  "हे रामा ! तुझी बुद्धि निश्चितच संकुचित नसून उदार आहे."

 

केवळ तर्कट बुद्धीने युक्तिवाद ऐकता येत नाही.  कारण अशा वेळी तर्कट बुद्धीमुळे युक्तिवादाचे रूपांतर कुतर्कामध्ये होऊ शकते.  म्हणून ज्ञानी पुरुषांच्याकडून युक्तिवाद ऐकावयाचा असेल तर आपली बुद्धि उदार व शुद्ध पाहिजे.  शास्त्रामध्ये, पुराणांच्यामध्ये सांगितलेल्या सर्व कथा आणि आख्याने ही युक्तियुक्त आहेत.  ज्या कथांच्यामध्ये काही युक्ती, सार, तथ्य असते, त्याच गोष्टी ऐकायला आपल्याला बरे वाटते.  अन्यथा युक्तिरहित असणाऱ्या गोष्टी केवळ भाकडकथा ठरतात.  म्हणून ज्या गोष्टींमध्ये शास्त्र नाही,  युक्ति नाही, श्रुति-स्मृति प्रमाण नाही, केवळ श्रोत्यांना हसवायचे म्हणून किंवा रडवायचे म्हणून लालित्यपूर्ण पद्धतीने कथा रंगविल्या जातात, अशा गोष्टी व्यर्थ आहेत.

 

म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे सांगतात की, श्रुतिसंमत युक्तिवादाचा अनादर करू नये.  साधकाने दुस्तर्कापासून, दुराग्रहापासून मात्र दूर राहावे.  थोडक्यात, ज्ञान घेताना केवळ भावनावश होऊन अंधतेने ज्ञान घेऊ नये.  अथवा खूप तर्कट बुद्धीने ज्ञान घेऊ नये.  तर श्रुतीला, वेदांना शास्त्राला संमत असणाऱ्या तर्काचे ग्रहण करावे, असाच येथे अभिप्राय आहे.

 

म्हणून येथे श्रीवशिष्ठ मुनि सांगतात की, "रामा !  आता यापुढे मी तुला युक्तियुक्त असणारी सुंदर आख्याने-उपाख्याने सांगेन आणि त्यामधून सिद्ध करेन की, हे सर्व दृश्य विश्व भासमान आहे.  रामा !  तुला आता मी पोकळ कोरडे शाब्दिक ज्ञान न देता अतिशय रसाळ वाणीने कथा सांगेन.  त्यामधून गुह्य ज्ञान उलगडून दाखवेन.  ते तू मनापासून श्रवण करावेस."

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, December 17, 2024

अभ्यास योगाची साधना | Means of “Abhyas Yog”

 




प्रत्येक साधक हा धार्मिक, श्रद्धावान, आध्यात्मिक असेल तरीही त्याचे मन परमेश्वरामध्ये लगेचच एकाग्र होत नाही.  याचे कारण आज मनामध्ये अनेक विषयांच्याच वृत्ति आहेत.  अजुनही मनामध्ये विषयांच्याबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.  विषयांचे महत्व आहे.  यामुळे विषयांच्यामध्ये सत्यत्वबुद्धि निर्माण होऊन मनामध्ये कामना निर्माण होतात.  पुन्हा पुन्हा ते मन विषयांच्यामध्ये रुळते, रममाण होते.  यामुळे परमेश्वरामध्ये मन एकाग्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये अनेक प्रतिबंध निर्माण होतात.  यासाठीच भगवान या श्लोकात ‘अभ्यासयोगाची’ साधना देतात.

 

मग अभ्यासयोग म्हणजे काय ?  आचार्य सांगतात –

विपरीतप्रत्ययान्तिरस्कृत्य सजातीयप्रत्ययावृत्तिरभ्यासः |  सर्व विपरीत - विजातीय वृत्तींचा निरास करून जाणीवपूर्वक, सातत्याने, अखंडपणे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  भगवान म्हणतात -

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् |

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ||                    (गीता अ. ६-२६)

जसजसे मन विषयांच्याकडे जाईल तसतसे त्यावर नियंत्रण करावे.  केवळ मन दाबून, ओढून एकाग्र होत नाही.  तर त्यासाठी विवेकाने विषयदोषदर्शन करावे.  म्हणजेच विषयांच्या अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं, मिथ्यात्वं या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषयांचे खरे स्वरूप पाहावे.  यामुळे मन आपोआपच त्यांच्यापासून निवृत्त होईल.  त्या त्या प्रमाणात विषयांचे संस्कार कमी होतील.

 

या संस्कारांचा प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराच्या उपासनेचा संस्कार वाढवावा.  जाणीवपूर्वक, सावधानतेने, मनाला विषयासक्तीमधून निवृत्त करून उपासना करावी.  परमेश्वराची वृत्ति पुन्हा-पुन्हा निर्माण करावी.  सुरुवातीला खूप अवघड वाटेल.  यामध्ये विषयांच्या वृत्ति आल्यामुळे विरल चिंतन होईल.  परंतु सातत्याने दीर्घकाळ उपासना केल्यानंतर सरलचिंतन होऊन परमेश्वराचीच वृत्ति म्हणजे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण होईल.  यालाच ‘अभ्यास’ असे म्हटले आहे.  या अभ्यासयोगामुळे क्रमाने चित्तशुद्धि होऊन ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Monday, December 9, 2024

संतुष्ट मनुष्याची व्याख्या | Definition of Satisfied Man

 



मनुष्याला आयुष्यात बहिरंगाने काही मिळो किंवा न मिळो, परंतु त्याच्या आत समाधान असेल तर झोपडीतला माणूस सुद्धा सुखाने राहतो.  म्हणून तृप्ति ही बाहेर नसून ती अंतरंगाची वृत्ति आहे.  अगदी गरीब परंतु प्रामाणिक मनुष्य दिवसभर कष्ट करतो.  दिवसाच्या शेवटी जे काही रुपये मिळतात त्यामधून उदरनिर्वाह करतो आणि सुखाने झोपतो.  त्याचे मन जे मिळाले त्याच्यामध्ये तृप्त असते.  याउलट एखादा श्रीमंत मनुष्य भरपूर धन कमावतो.  त्याला पुढच्या सात पिढ्यांचीही भ्रांत नसते.  तरीही त्याचे मन तृप्त नसल्यामुळे तो दुःखीच असतो.  म्हणून सुख हे बाह्य विषयांच्यावर अवलंबून नसून मनाच्या समाधानी वृत्तीवर अवलंबून आहे.

 

असे सांगून वसिष्ठ मुनि येथे संतुष्ट मनुष्याची व्याख्या करतात.  अप्राप्त वस्तूंच्या इच्छांचा जो त्याग करतो आणि जे मिळाले आहे त्यामध्ये समभावाने राहतो, जो खेद आणि अखेदरहित म्हणजेच हर्षविषादरहित झाला आहे, त्याला 'संतुष्ट' असे म्हणतात.  सामान्य मनुष्याच्या मनामध्ये सतत न मिळालेल्या - अप्राप्त वस्तूची इच्छा असते.  जे मला आजपर्यंत मिळाले नाही ते प्रयत्नाने मिळवावे असे त्याला वाटते.  तसेच जे मिळाले आहे त्याचे रक्षण करण्याचा तो प्रयत्न करतो.  यालाच संस्कृतमध्ये 'योग' व 'क्षेम' असे म्हणतात.  अप्राप्तस्य प्रापणं योगः |  प्राप्तस्य रक्षणं क्षेमः |  अप्राप्त वस्तूंची प्राप्ति म्हणजे 'योग' आणि प्राप्त वस्तूंचे रक्षण म्हणजे 'क्षेम' होय.

 

या दोन वृत्तींच्यामुळे अविवेकी मनुष्याच्या मनामध्ये अनेक कामना उत्पन्न होतात.  परंतु याउलट जो विवेकी ज्ञानी पुरुष आहे, जो पूर्णतः संतुष्ट, तृप्त झाला आहे, त्याच्यामध्ये योगक्षेमवृत्तीचा अभाव होतो.  असा मनुष्य अप्राप्त वस्तूची इच्छा करीत नाही आणि प्राप्त वस्तूने हर्षितही होत नाही.  याचे कारण त्याला विचाराने निश्चितपणे समजलेले असते की, कर्म-कर्मफळाच्या नियमाप्रमाणे आपल्याला जे मिळणार, जितके मिळणार, जेव्हा मिळणार ते मिळणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  म्हणून ज्ञानी पुरुष आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जीवन जगतो.  तो खेदाखेदरहित होतो.  तो सुखदुःखादि द्वंद्वांच्यामध्ये सम राहतो.  तोच खऱ्या अर्थाने संतुष्ट पुरुष आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, December 3, 2024

मतमतांचा गलबला | Obfuscation Due To Opinions

 



आचार्य म्हणतात की आम्ही सांख्यांचे खंडन करण्याचे कारणच नाही.  कारण अन्य तार्किक लोकांच्याकडूनच त्यांची मते खंडन होतात.  तार्किक लोक सांख्यांचे, व सांख्य लोक अन्य तार्किकांचे खंडन करतात, कारण सर्वजण परस्परविरुद्ध अर्थाच्या कल्पना निर्माण करतात.  ज्याप्रमाणे मासाचा तुकडा मिळविण्यासाठी प्राणी एकमेकांशी भांडतात, एकमेकांच्या अंगावर ओरडतात, त्याचप्रमाणे सांख्यवादी लोक व अन्य तार्किक लोक एकमेकांच्या मतांचे खंडन करून आपलेच मत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.  परंतु ते सर्वजण परस्परविरुद्ध अर्थ सांगत असल्यामुळे ते सर्वजण पारमार्थिक तत्त्वापासून दूर जातात.

 

त्यामुळे कोणत्या मताचा आदर करावा ?  कोणत्या मतांचा त्याग करावा ?  हे साधकाला समजणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हा सर्व मतमतांचा गलबला आहे.  यासाठीच येथे आर्चार्य सांगतात की साधकांनी योग्य माताचाच आधार व आश्रय घ्यावा.  म्हणून आम्ही येथे तार्किकांच्या मतामधील किंचित दोष दाखविला.  आत्मतत्त्वाच्या यथार्थ ज्ञानासाठी वेदान्तशास्त्र हेच एकमेव प्रमाणभूत शास्त्र असून मुमुक्षूंनी वेदान्तशास्त्राचा आदर करावा.  तार्किक लोक दुसऱ्यांचे दोष दाखविण्यामध्ये तत्पर आहेत.  मात्र आम्ही अशी तत्परता दाखविलेली नाही.  तर आम्ही तार्किकांच्या मनामधील किंचित दोष दाखविला.  आम्हाला कोणाचेही दोष सांगण्याची इच्छा नाही.  तर मुमुक्षूंनी योग्य मार्गाचे, योग्य मताचे अनुसरण करावे, चुकीची मते ग्रहण करू नयेत, म्हणून अयोग्य मतांचे आम्ही खंडन केले.

 

वेदज्ञानी पुरुष, ज्याच्यामुळे विरोध, वादविवाद निर्माण होतात, त्या वादविवादांचे कारण, वाद करणाऱ्यांच्यावरच सोडून आपल्या सद्बुद्धीचे संरक्षण करतात, त्या पुरुषालाच सुखपूर्वक शांति प्राप्त होते.  म्हणूनच आचार्य सुद्धा म्हणतात – वादे वादे तत्त्वबोधः न जायते |  वादविवादांच्यामधून तत्त्वस्वरूपाचा बोध होत नाही.  ज्यावेळी या ज्ञानामध्ये अनेक मते-मतांतरे समोर येतात तेव्हा, साधकाने स्वबुद्धि हे प्रमाण न ठेवता वेदान्तशास्त्रालाच प्रमाणभूत मानावे.  कारण वेद हे एखाद्या मर्त्य मनुष्याच्या बुद्धिमधून निर्माण झालेले नसून वेदज्ञान हे अपौरुषेय ज्ञान आहे.  बुद्धिमधून निर्माण झालेल्या ज्ञानाला मर्यादा असतात.  त्यामध्ये व्यक्तिगत रागद्वेष निर्माण होतात.  त्यामुळे ते ज्ञान प्रमाणभूत होऊ शकत नाही.  म्हणून श्रुतिप्रमाण हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.


 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ