Tuesday, March 28, 2023

साध्याशी एकनिष्ठता | Commitment Towards the Goal

 



व्यवहारामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवावयाचे असेल, मग ते क्रीडा असेल, कला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, काहीही असेल, जर ते साध्य प्राप्त करावयाचे असेल, तर मी माझ्या साध्याशी एकनिष्ठ असले पाहिजे.  माझ्या मनामध्ये तळमळ, व्याकुळता निर्माण झाली पाहिजे.  मला साध्याचा ध्यास लागला पाहिजे.  ध्येयप्राप्तीसाठी मी रात्रंदिवस वेडे झाले पाहिजे.  तरच अथक प्रयत्नांच्यानंतर यशश्री प्राप्त होते.  परंतु जर माझे मन साध्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असेल, तर दुर्दैवाने जीवनामध्ये कितीही परिश्रम करूनही साध्यप्राप्ति होत नाही.  काहीतरी तीर्थयात्रा करून, सोमवार ते सोमवार उपवास करून, व्रतवैकल्ये करून आत्मप्राप्ति होत नाही.

 

जीवनामध्ये कोणतीही एखादी विद्या आत्मसात करावयाची असेल, तर त्याच्यासाठी ध्यास लागला पाहिजे.  सर्वस्व अर्पण केले पाहिजे.  त्याच्यासाठी मी आयुष्य दिले पाहिजे.  सतत विचार केला पाहिजे की, “माझ्या साध्याशी मी किती एकनिष्ठ राहिलो ?  खरोखरच माझी तळमळ आहे का ?  जिज्ञासा आहे का ?”  ज्यावेळी मी सर्वस्व देईन, त्यावेळी कोठेतरी काही तरी मिळते.  म्हणून संतांना सुद्धा जीवनामध्ये सर्वस्व द्यावे लागले.  संत रामदास स्वामी सांगतात –

देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगांच्या तुटी |

सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा ||                     (दासबोध)

वेळ जात नाही, काहीतरी शिकायचे म्हणून एक उपनिषद शिकलो, याला शिकणे म्हणत नाही.  याचे कारण शिकण्यासाठी मनामध्ये भाव पाहिजे.  Attitude पाहिजे.

 

श्रुति सांगते –

क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति |       (कठ. उप. १-३-१४)

हा मार्ग तलवारीच्या धारदार पात्यावर चालण्यासारखा अवघड आणि दुष्कर आहे.  याचे कारण विश्व नाही, शास्त्र किंवा गुरूही नाहीत.  तर माझेच मन हे कारण आहे.  या मार्गामध्ये अनेक आडवाटा आहेत.  एक मुख्य राजमार्ग आहे आणि या राजमार्गावरून जात असताना अनेक फाटे आहेत.  जर राजमार्ग सोडून आपण अन्य मार्गांच्यावर गेलो, तर कधीही साध्यप्राप्ति होणार नाही.  म्हणून या साधनेसाठी आपण आपलेच मन योग्य, अनुकूल व अधिकारी बनविले पाहिजे.

 


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, March 21, 2023

निर्निमित्त वैराग्य | Untriggered Dispassion

 



निर्निमित्त वैराग्य म्हणजे काही निमित्ताशिवाय, कारणाशिवाय निर्माण झालेले वैराग्य होय.  आपण मागील वैराग्यप्रकरणामध्ये याचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिला आहे.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सहजासहजी वैराग्य उत्पन्न होत नाही.  वैराग्याचे अनेक प्रकार आहेत.  पुष्कळ वेळेला प्रासंगिक, तात्कालिक, दुसऱ्याकडे पाहून किंवा नैराश्यामधून माणसाला वैराग्य येते.  म्हणून त्याला स्मशान वैराग्य असा शब्द वापरला जातो.  एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यावेळेस आपण स्मशानात जातो, तेथील शोकाकुल वातावरण पाहतो, त्यावेळी क्षणभर वाटते की, खरेच हे सगळे भोग आणि विषय व्यर्थ आहेत.  मनुष्य दुःखाने व्याप्त होतो.  त्याला काहीच खावेसे, उपभोगावेसे वाटत नाही.  परंतु अंत्यविधि झाले, स्मशानातून बाहेर पडले की, पुन्हा व्यवहार सुरु होतो.  मनुष्य पूर्ववत् विषयासक्त जीवन जगू लागतो.

 

किंवा काही वेळेस एखादा भयंकर प्रसंग घडला, संकट आले, तरीही मनामध्ये वैराग्यवृत्ति निर्माण होते.  परंतु हे वैराग्य दीर्घकाळ टिकत नाही.  प्रसंग निघून गेला की, वैराग्यही निघून जाते.  याला खरे वैराग्य म्हणत नाहीत, कारण हे सनिमित्त वैराग्य आहे.  म्हणजेच या वैराग्याच्या मागे एखादा प्रसंग, व्यक्ति, घटना यांपैकी काहीतरी निमित्त असते.  कशामुळेतरी वैराग्य येऊन मनुष्य काही काळापुरताच आध्यात्मिक झाल्यासारखा वाटतो.  परंतु नंतर पुन्हा तो मनुष्य पूर्ववत् संसारामध्ये आसक्त होऊन विषयांचा उपभोग घेऊ लागतो.  म्हणून याला सनिमित्त किंवा तात्कालिक वैराग्य म्हणतात.

 

असे स्पष्ट करून वसिष्ठ मुनि म्हणातात की, रामा !  तुझे वैराग्य मात्र निर्निमित्त आहे.  असे वैराग्य जन्मतःच लहानपणापासून निर्माण होते.  म्हणून वैराग्यसंपन्न साधु निर्माण करता येत नाही तर तो जन्मालाच यावा लागतो.  श्रीरामांच्या मनामध्ये ऐन तारुण्यावस्थेमध्ये असे अभिजात वैराग्य निर्माण झाले होते.  हे वैराग्य चारु म्हणजे अतिशय सुंदर होते.  जो मनुष्य सतत काहीतरी मागतो, असंतुष्ट असतो त्या मनुष्यापेक्षा समाधानी, तृप्त, शांत असलेला विरक्त मनुष्य चारु म्हणजे खूप सुंदर दिसतो.  कारण त्याच्यामध्ये निर्निमित्त वैराग्य असते.  त्याला वैराग्याचा वेगळा उपदेश देण्याची आवश्यकताच नसते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, March 14, 2023

योगभ्रष्ट पुरुष | Realization-Failed Person

 



योगभ्रष्ट म्हणजे योगमार्गापासून च्युत झालेला, किंवा अधःपतन झालेला योगी असा नाही.  तर या जन्मामध्ये श्रवणमनननिदिध्यासना करीत असताना शरीरपतनापूर्वी त्या योग्याला आत्मसिद्धि किंवा ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही, म्हणून त्याला योगभ्रष्ट असे म्हटले आहे.  म्हणजेच त्याला याच शरीरामध्ये जीवन्मुक्तावस्था प्राप्त होत नाही.  याठिकाणी शंका येईल की, सर्व साधना करीत असून सुद्धा त्याला शरीर पडण्यापूर्वी ज्ञाननिष्ठा किंवा जीवन्मुक्तावस्था होत नाही ?

 

१) जरी साधक इंद्रियसंयमन, मनोनिग्रह करून श्रवणमनननिदिध्यासना ही साधना करीत असेल तरी सुद्धा त्याच्या मनामधील विषयभोगवासना संपूर्ण नाहीशी झालेली नसेल.  त्यामुळे अनेक प्रकारचे द्वन्द्व, रागद्वेषांचा प्रभाव, संकल्पविकल्प, कामक्रोधादि विकार निर्माण होतात.  ते ज्ञानसाधनेमध्ये सतत प्रतिबंध निर्माण करतात.  त्यामुळे साधना करूनही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

२) साधना करण्याची इच्छा असेल तरी रजोगुणाच्या प्राबल्यामुळे त्याचे मन सत्वगुणप्रधान नसते.  त्यामुळे तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छा निर्माण होत नाही.  त्यामध्ये तरतमभाव दिसतो.  काही साधकांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत तीव्र मोक्षेच्छा दिसते तर काहींच्या मध्ये सर्वसाधारण, तर काहींच्या मनामध्ये लुकलुकणारी असते.  त्यामुळे साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असेल तरी त्याचे ते प्रयत्न योगनिष्ठेसाठी अपुरे पडतात.  हा दोष शास्त्राचा किंवा गुरूंचा नाही तर स्वतःमध्ये असलेल्या संस्कारांचा आहे.

 

३) साधक दैवीगुणसंपन्न, विवेकवैराग्यसंपन्न असून सत्वगुणप्रधान असतो.  त्याच्यामध्ये तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छाही असते.  त्याप्रमाणे तो साधनाही करीत असतो.  परंतु तरी सुद्धा त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याचे कारण – प्रारब्धवशात् |  साधक टाळाटाळ न करता अत्यंत तत्परतेने श्रद्धा आणि निष्ठेने साधना करीत असेल तरी तो शरीराचे प्रारब्ध टाळू शकत नाही, बदलू शकत नाही.  ज्ञानसाधना पूर्ण होण्यापूर्वीच जर शरीराचे प्रारब्ध संपले तर त्याची साधना अपूर्णच राहाते.  त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

योगभ्रष्ट पुरुष निश्चितपणे दुर्गतीला म्हणजेच निकृष्ट योनीला किंवा अधोगतीला जात नाही.  मोक्षमार्गामध्ये त्याची प्रगतीच होत असते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, March 7, 2023

राजविद्या आणि राजर्षि | Supreme Knowledge And Sage-Kings

 



सर्व विद्यांच्यामध्ये अध्यात्मविद्येला प्रथम स्थान होते.  राजदंडापेक्षाही धर्मदंडाला उच्च स्थान होते.  राज्य, राजा आणि प्रजा या सर्वांच्यावर धर्माचा, ज्ञानाचा, ज्ञानी सत्पुरुषांचा अंकुश होता आणि त्यांच्या सामर्थ्यशाली अधिकारवाणीने संपूर्ण राष्ट्र नियमित होत होते.  राज्यामध्ये न्यायला व आचारधर्माला सर्वोच्च स्थान होते.  कारण या सर्वांच्यामागे अध्यात्मविद्येचे अधिष्ठान होते.  म्हणून या विद्येला 'राजविद्या' असेही म्हटले जाते.  'राजविद्या' म्हणजे सर्वप्रथम ही क्षत्रिय राजांना उपदेशिली गेली.  किंवा दुसरा अर्थ, राजविद्या म्हणजेच सर्वश्रेष्ठ विद्या होय.  याप्रकारे समाजामध्ये या राजविद्येचा प्रचार आणि प्रसार झाला.

 

सर्वश्रेष्ठ असल्यामुळे ही विद्या सर्व विद्यांची साम्राज्ञी आहे.  तसेच ही विद्या 'राजगुह्य' म्हणजे अत्यंत गोपनीय, गुह्य व रहस्यमय विद्या आहे.  याचे कारण या विद्येचा म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाचा विषय आत्मवस्तु असून, आत्मस्वरूप हे अत्यंत सूक्ष्म व अदृश्य आहे.  विश्वामधील अन्य सर्व विषय डोळ्यांनी दृश्य रूपाने दिसतात.  इंद्रियांना व मनाला अनुभवायला येतात.  त्यामुळे स्थूल विषयांचे ज्ञान सहजपणे होते.  मात्र आत्मवस्तु ही अत्यंत सूक्ष्मतम असून ती डोळ्यांना, इंद्रियांना, मनाला किंवा बुध्दीलाही आकलन होत नाही.  ती अदृश्य, अव्यक्त, निर्विशेष स्वरूपाची आहे.  आत्मा कसा आहे ?  याचे शब्दांनीही वर्णन करता येत नाही.

 

अशी ही आत्मवस्तु प्रत्येक जीवाचे प्रत्यगात्मस्वरूप आहे.  जीव स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप आहे.  म्हणजेच येथे ज्ञाता ही 'मी' आहे आणि ज्ञेय वस्तु सुद्धा 'मी' च आहे.  म्हणून - आत्मानं अधिकृत्य यद्  ज्ञानं तत् अध्यात्मं इति |  आत्मस्वरूपावर म्हणजे स्वस्वरूपावर केंद्रीभूत असणाऱ्या ज्ञानाला "अध्यात्मिक ज्ञान" असे म्हणतात.  म्हणून आत्मविद्या ही सूक्ष्मतम असणाऱ्या आत्मवस्तूची असल्यामुळे तिला 'राजगुह्य' असे म्हटले जाते.  हे रामा !  अशी ही गुह्य ब्रह्मविद्या जाणून सर्व राजे लोक दुःखरहित अवस्थेला प्राप्त झाले.  यावरून समजते की, पूर्वीचे राजे सुद्धा ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्यांना 'राजर्षि' असे म्हटले जात असे.  प्राचीन काळी विदेही राजा जनकासारखे ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मनिष्ठ राजे होऊन गेले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ