Tuesday, June 16, 2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being

 



हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ?  प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी कर्तृत्वभावना निर्माण करतो.  त्यामुळे तो चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या जीवाला प्राप्त होते.  तेव्हा जीवाला वाटते की, मला सुख-दुःख झाले.  ही भोक्तृत्वभावना त्याच्यामध्ये निर्माण होते.  याप्रकारे जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त होतो.  म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.

 

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते |            (गीता अ. ३-२७)

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.  अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे.  कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे.  जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.

 

वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप, शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे.  परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते.  कशी ?  आचार्य सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते |  ज्याप्रमाणे शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.

 

एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की, त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते.  आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, June 9, 2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी अज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे अज्ञानाच्या सात अवस्था सांगितल्या आहेत.  यामध्ये सर्व जीवांच्या बीजावस्थेला - अव्यक्तावस्थेला 'बीजजाग्रत्' असे म्हटले आहे.  यानंतर जन्माला आल्याबरोबर पूर्वजन्मातील अज्ञानाच्या संस्कारांच्यामुळे जीव देहाशी तादात्म्य पावतो व "मी देह आहे" अशी कल्पना करतो.  यालाच येथे 'जाग्रत्' असे म्हटले आहे.  "मी जन्माला आलो व मी देह आहे" अशी कल्पना दृढ झाली की, स्वतःभोवती तो जीव अनेक कल्पना करतो.  मागील जन्मामधील जो मी होतो, तोच मी आता आहे, तसेच "हा माझा पुत्र, हे माझे घर" याप्रमाणे जड व चेतन विषयांच्यामध्ये तो जीव ममत्व निर्माण करतो.  मागील जन्मामधील अशी स्मृति म्हणजे 'महाजाग्रत्' अवस्था आहे.

 

हा अज्ञानी जीव जागृत असताना मनोराज्ये रंगवितो.  ही अज्ञानाची 'जाग्रत् स्वप्न' भूमिका आहे.  काही वेळेस जागृतावस्थेमध्येच जीवाला भ्रांतीमुळे अनेक भास होतात.  शिंपल्यावर चांदीचा, वाळूवर मृगजळाचा, दोरीवर सापाचा, हे भास पुन्हा पुन्हा होत राहिले की, जीवाच्या चित्ताला भास होण्याची सवय लागते आणि या सवयीमुळे जेव्हा जीवाला झोपेत काही क्षण असे भास होऊन कसलातरी अनुभव येतो, ही अज्ञानाची 'स्वप्न' भूमिका आहे.  एखादी स्वप्नस्थिति दीर्घकाळ टिकली तर ते स्वप्नही जागृतावस्थेप्रमाणे वाटू लागते.  यालाच अज्ञानाची महाजाग्रत् किंवा 'स्वप्नजाग्रत्' भूमिका सुद्धा म्हटले जाते.

 

यानंतर सर्वात शेवटची भूमिका म्हणजे सुषुप्ति आहे.  जेथे चित्त जागृतही नसते. कोणते स्वप्नही अनुभवत नसते.  कोणती मनोराज्येही नसतात. दीर्घस्वप्नही नसते.  अहंकार, ममकारही नसतात. म्हणजेच जेथे अज्ञानाच्या पूर्वीच्या सहाही अवस्था लय पावतात, ती अज्ञानाची सर्वात शेवटची 'सुषुप्ति' नावाची भूमिका आहे.  या अवस्थेत बीजरूपाने सर्व सुखदुःखात्मक अनुभव तसेच, सर्व पदार्थ स्थित असतात.  हीच करणावस्था आहे.

 

अशा या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत.  येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो.  या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत.  या सात अवस्थांच्या एकमेकांच्या परस्परसंयोगामधून अजूनही अज्ञानाच्या असंख्य अवस्था उत्पन्न होतात.  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, याप्रकारे जीव या अज्ञानाच्या अवस्थांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो.  या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत.  विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते.  या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, June 2, 2026

दुःखांनो या ! मी तयार आहे ! | Welcoming The Calamities






शास्त्रामध्ये प्रार्थना आहे - स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः |                   (शान्तिपाठ)

अकुंठित गति असणाऱ्या गरुडाने आमच्यावर कृपा करावी.  गरुडझेप लोकप्रसिद्ध आहे.  जीवनामध्ये गरुडझेप घ्यावी.  खूप साधना करावी.  आपल्या मनाला तयार करावे.  कितीही दुःखे आली, संकटे आली, आघात झाले तरीही श्रद्धा, निष्ठा डळमळीत होऊ देऊ नये.  उलट, "दुःखांनो या! मी तयार आहे."  (I am ready to receive anything.), ही माझी वृत्ति असावी.

 

परमेश्वर साधकाची सतत परीक्षा घेत असतो.  प्रथम सोपी मग अवघड, अधिक अवघड करीत करीत साधकाला सर्व दिव्यांच्यामधून नेतो.  शेवटी ती दुःखे ही बोथट होतात.  त्यांच्यामधील अवघडपणाच संपतो.  ती दुःखे साधकाला disturb करू शकत नाहीत.  महाभारतामध्ये सहनशीलतेची साक्षात मूर्ति असणारी कुंती म्हणते -

विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम् ||                                  (महाभारत)

हे परमेश्वरा !  आमच्या जीवनामध्ये सतत विपत्ति येवोत.  त्यामुळे आम्हाला तुझे कधीही विस्मरण होणार नाही.  इतकी मनाची तयारी पाहिजे.

 

या श्लोकामध्ये भगवान 'नित्यं' हा शब्द वापरतात.  म्हणजेच नित्यनिरंतर चित्ताची समतोलता ठेवावी.  ही साधना एका क्षणाची नसून अनेक जन्मांची आहे.  म्हणून अध्यात्ममार्गामध्ये ३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही.  ९९.९९ टक्के ही चालत नाहीत.  तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते.  सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी होते.  त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.

 

भगवान म्हणतात - गुरुणापि न विचाल्यते |                              (गीता अ. ६-२२)

महान संकटे येऊनही ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.  यासाठीच साधकाने सर्व प्रसंगांच्यामध्ये मन स्थिर, समतोल, संतुलित ठेवण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न, द्वन्द्वविक्षेपरहित होऊन श्रवणादि ज्ञानसाधनेला योग्य, अधिकारी, अनुकूल होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ