शास्त्रामध्ये प्रार्थना आहे - स्वस्ति
नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः | (शान्तिपाठ)
अकुंठित गति असणाऱ्या गरुडाने आमच्यावर कृपा
करावी. गरुडझेप लोकप्रसिद्ध आहे. जीवनामध्ये गरुडझेप घ्यावी. खूप साधना करावी. आपल्या मनाला तयार करावे. कितीही दुःखे आली, संकटे आली, आघात झाले तरीही श्रद्धा, निष्ठा डळमळीत होऊ देऊ नये. उलट, "दुःखांनो या! मी तयार आहे." (I am
ready to receive anything.), ही माझी वृत्ति असावी.
परमेश्वर साधकाची सतत परीक्षा घेत असतो. प्रथम सोपी मग अवघड, अधिक अवघड करीत करीत साधकाला सर्व दिव्यांच्यामधून नेतो. शेवटी ती दुःखे ही बोथट होतात. त्यांच्यामधील अवघडपणाच संपतो. ती दुःखे साधकाला disturb
करू शकत नाहीत. महाभारतामध्ये सहनशीलतेची साक्षात मूर्ति असणारी
कुंती म्हणते -
विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो |
भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम् || (महाभारत)
हे परमेश्वरा ! आमच्या जीवनामध्ये सतत विपत्ति येवोत. त्यामुळे आम्हाला तुझे कधीही विस्मरण होणार
नाही. इतकी मनाची तयारी पाहिजे.
या श्लोकामध्ये भगवान 'नित्यं' हा
शब्द वापरतात. म्हणजेच नित्यनिरंतर
चित्ताची समतोलता ठेवावी. ही साधना एका
क्षणाची नसून अनेक जन्मांची आहे. म्हणून अध्यात्ममार्गामध्ये
३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही. ९९.९९ टक्के ही चालत नाहीत. तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते. सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून
घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी
होते. त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व
प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.
भगवान म्हणतात - गुरुणापि न विचाल्यते | (गीता
अ. ६-२२)
महान संकटे येऊनही ज्ञानी पुरुष विचलित होत
नाही. यासाठीच साधकाने सर्व
प्रसंगांच्यामध्ये मन स्थिर, समतोल, संतुलित ठेवण्याचा अभ्यास करावा. त्यामुळे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न, द्वन्द्वविक्षेपरहित होऊन श्रवणादि ज्ञानसाधनेला योग्य, अधिकारी, अनुकूल होते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

