Tuesday, January 26, 2016

कर्मफळाचा स्वीकार | Acceptance of Outcomes


कर्म कोणतेही असो, त्याबाबत कधीही बेफिकीर वृत्ति ठेवू नये, निष्काळजी राहू नये, ते कधीही टाळू नये कारण मनापासून, प्राण ओतून, कळकळीने काम केले तरच त्या कर्माचे आशीर्वाद आपल्याला मिळतात व ते आशीर्वाद (Blessings) साधकाला उपयुक्त ठरतात.  ते कर्म आनंदवर्धन करणारे होते.

कर्मफलाच्या नियमाप्रमाणे, जेवढे मिळायचे तेवढेच फळ मिळत असते.  ते कधी कमीही नसते अथवा जास्तही नसते.  मनुष्याच्या अज्ञानयुक्त कलुषित बुद्धीला ते फळ कमी वा जास्त वाटते.  फलासक्ति ठेवून केलेले कर्म आशीर्वाद तर देत नाहीच तर उलट ते कर्म शापदायक ठरते.

साधकाची साधना म्हणजे कर्मत्याग नाही तर कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग आहे.  कर्म केले म्हणजे त्याचे फळ मिळणारच.  तेही स्वीकारले पाहिजे.  जसजसे राग द्वेष कमी होतील तसतसे मन परिपक्व होऊन कर्मफलाचा पूर्णपणे स्वीकार करील.  कर्मफलाचा स्वीकार, मनाची समजूत व विषयांच्या परिपक्वतेतून (Acceptance born out of understanding and maturity) होणे फार महत्वाचे आहे.  त्या कर्मफळाला तोंड दिलेच पाहिजे.  विशेषतः ते प्रतिकूल असेल तेव्हा ! कारण शेवटी येईल ते कर्मफळ आनंदाने स्वीकारण्याची वृत्ति किंवा स्वभाव झाला पाहिजे.  What cannot be cured must be endured.

मनाने केलेला कर्मफळाचा स्वीकार हाच खरा स्वीकार आहे, कारण केवळ शरीराने फळाचा स्वीकार केला तरी मनाने स्वीकार केला नसेल तर मनात प्रचंड खळबळ होईल.  मन विक्षेप, दुःख, यातनांनी विदीर्ण होईल.  विचाराने व विवेकाने मन अंतर्मुख होईल, त्याप्रमाणात कर्मफळाने निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आपोआप कमी होतील.  कर्मफळ शांतपणे, आनंदाने स्वीकारले जाईल.  कर्मफळाची योग्य ती जाण किंवा समज (Appreciation) वाढेल.  मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रत्येक कर्म ईश्वरार्पण वृत्तीने केले पाहिजे.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, January 19, 2016

प्रतिक्रियांचे मूळ कारण | Root Cause of Mental Reactions


आपल्या प्रतिक्रियांचे कारण विश्व नाही.  पण विचार न करता आपल्या सर्व सुखदुःखांचे कारण आपण बाहेर शोधतो.  या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांचा दोष मूलतः आपल्या मनात, वृत्तीत आहे.  कारण सतत प्रसंग येतच राहणार.  आपण कोणत्या वृत्तीने त्या प्रसंगाच्या फलाचा स्वीकार करतो, त्या वृत्तीवर सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव अवलंबून आहे.

म्हणूनच एखाद्याला फार चांगल्या प्रसंगात ठेवले तरी तो सुखी होईलच, असे सांगता येत नाही.  याउलट एखाद्याला अत्यंत यातनामय, वाईट प्रसंगात ठेवले तरीही तो आनंदी व प्रसन्न राहू शकेल.  यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या मनातील राग-द्वेष म्हणजेच Likes & Dislikes हेच प्रतिक्रियांचे मूळ कारण आहेत.  या रागद्वेषामधूनच आपण सतत विश्व पाहतो, प्रत्येक प्रसंग पाहतो व रागद्वेषामधूनच कर्मफलाचे मूल्यमापन सतत करतो.

प्रत्यक्ष कर्म व कर्मफल बंधनकारक नसून त्याच्या फळाची अपेक्षा वृत्ति ही माणसाला बंधनकारक होते.  म्हणून शास्त्रकार म्हणतात की, जितक्या अपेक्षा जास्त तितक्या प्रमाणात अपेक्षाभंग जास्त.  जितका अपेक्षाभंग जास्त तितके नैराश्य, वैफल्य जास्त. याचमुळे जितके विक्षेप वा क्षोभ जास्त तितके बंधन जास्त.  कर्मफलाच्या अपेक्षेच्या वृत्तीने कर्म केले तर दुःखच मिळते.  ते कर्म पुन्हा पुन्हा संसाराला व जन्ममृत्यूला कारणीभूत ठरते.  उलटपक्षी फलेच्छाविरहित कर्म मनाला शांति, समाधान व आनंद देते, सुख देते, चित्तशुद्धि करते.  ते कर्म आत्मज्ञानप्राप्तीला अप्रत्यक्ष साधन होते व संसारातून मुक्त करते.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात: “ हे अर्जुना, तू मुमुक्षु आहेस. त्यामुळे आत्मज्ञानप्राप्ति हे तुझे साध्य असल्याने कर्मफलाचा तू त्याग कर.  जे फळ मिळेल त्याचा पूर्णपणे स्वीकार कर.  कर्माचा कधीही त्याग न करता निःस्वार्थ बुद्धीने कर्म कर.  कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे.  त्याच्या फलावर तुझा अधिकार नाही. ”

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, January 12, 2016

कर्मफळाची प्रतिक्रिया | Reaction to Outcomes



कर्माचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.  पहिल्या प्रकारात मनुष्यनिर्मित कर्म असून त्यालाच पौरुषेय अथवा व्यावहारिक कर्म म्हणतात.  उदा. झाडणे, समाजसेवा करणे, बांधकाम करणे इत्यादि.  दुसऱ्या प्रकारात पूजा, अर्चना, भजन, कीर्तन, धार्मिक, वैदिक कर्म हे अपौरुषेय कर्म आहे.

कर्माचा कर्ता, जीवात्मा हा केवळ कर्म करत नाही तर कर्म पूर्ण होण्याच्या अगोदरच त्या कर्माचे फळ किती मिळेल ?  ते फळ काय असेल ?  कसे मिळेल ?  याची कल्पना किंवा अपेक्षा मनात करत असतो.  किंबहुना फळाची निश्चित कल्पना, अपेक्षा करूनच तो कर्मात प्रवृत्त होतो.  त्यामुळे त्याचे कर्म करण्यात लक्ष नसून ते कर्मफलावर असते.  फलाबाबत ‘Preconceived Judgement’ असते.  त्याचमुळे कर्म पूर्ण झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले की नाही ?  याचे तो मूल्यमापन (Evaluation) करतो.

कर्मफल एकच असले तरी त्यातून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया (Reactions) होतात.  कारण फळ अपेक्षेप्रमाणे असते किंवा नसते.  ते फळ अगोदरच कल्पिलेल्या अपेक्षेप्रमाणे मिळाले तर त्या फलाचा तो आपोआपच स्वीकार करतो व त्यामुळे तो एकदम आनंदी होतो, काही वेळेला हुरळून जातो.  कोणत्याही फलाचा स्वीकार करताना मनात राग व द्वेष (Likes and Dislikes) असतातच.  अपेक्षित फलाचा स्वीकार करण्यात रागद्वेषाच्या प्रतिक्रिया नाहीशा होतात व मन प्रतिक्रियाविरहित म्हणजेच Free from Reactions होते.  अशा प्रतिक्रियारहित मनात आनंद अनुभवास येतो.

याउलट ते फल अपेक्षेप्रमाणे नसेल, मनाविरुद्ध असेल किंवा कमी असेल तर त्या फळाचा मन स्वीकार करत नाही.  ते फळ धुडकावून लावले जाते व त्यामुळे होणारी प्रतिक्रिया म्हणजे एकदम मनात क्षोभ उफाळून येतो.  मन खूप निराश होते, संताप येतो व द्वेषाची भावना निर्माण होते.  मनात विक्षेप येतात व मन दुःखी होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Friday, January 1, 2016

निदिध्यासना | Contemplation



शास्त्रश्रवण व मनन ही साधना झाल्यावर निदिध्यासनेत ब्रह्मस्वरुपाबद्दल कोणत्याही प्रकारचे तार्किक विचारमंथन नाही किंवा आत्म्याची मीमांसा (Logical thinking and enquiry) नाही.  सत्, चित्, आनंद हे शब्द उच्चारल्याबरोबर थेट त्या शब्दाने निर्देशित केलेल्या तत्त्वाचे अंतिम सत्य पाहण्याचा अभ्यास निदिध्यासनेत करावा.

जसे ‘घट’ शब्द उच्चारल्याबरोबर, घट या शब्दावर आपण चिंतन करत नाही, तर तत्क्षणी त्या शब्दातून अभिप्रेत होणारा तो विषय किंवा अर्थ स्पष्टपणे डोळ्यासमोर उभा राहतो.  म्हणजे शब्द सत्य नाही तर शब्दाने प्रतिपादित केलेला विषय सत्य आहे.  विषय किंवा सत्य प्रकटीकरणासाठी शब्द हे साधन आहे.  घट हा शब्द उच्चारताच घटस्वरुपाची वृत्ति निर्माण होते.  त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यशुद्धबुद्धमुक्त हे जे स्वरूप शब्दात प्रकट केलेले आहे, त्या आत्मस्वरुपाची सजातीय वृत्ति सतत निर्माण करावी.

म्हणजेच See the Content of the word. The Content is the Truth.  ही ब्रह्मस्वरुपाची वृत्ति इतकी दृढ व स्थिर करावी की, ब्रह्मस्वरुप हा स्वभाव बनला पाहिजे.  ब्रह्मस्वरुपाची सहजस्वाभाविक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. हिलाच ज्ञाननिष्ठा म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेला मराठीत ‘सहजसमाधि’ म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेमुळे हा ज्ञानी कोणतीही शारीरिक, मानसिक क्रिया करो, त्याची तत्त्वाची म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची दृष्टि सतत कायम असते.  उठता, बसता, खाता, पिता तो “मी स्वतः काहीच करत नाही” अशा वृत्तीने कर्म करतो.

या ब्रह्मनिष्ठेत ब्रह्मस्वरुपाच्या विस्मृतीचा पूर्ण अभाव असतो, कारण तो ज्ञानी ब्रह्मस्वरुप झालेला असतो.  म्हणूनच हा ब्रह्मविद् म्हणतो – ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |  त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ||  या तत्त्ववेत्याचे मन अखंड चैतन्य, सच्चिदानन्दस्वरुपच पाहाते.  ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने निदिध्यासना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ