Tuesday, September 26, 2023

परमात्मस्वरूपाचा अनादर | Disrespect of My Nature

 



प्रत्येक जीवाचे खरे स्वरूप परमात्मस्वरूपच आहे.  परमात्मा दूर नसून आपले स्वतःचे स्वरूपच आहे.  परंतु मानवी शरीरामध्ये असलेले हे परमात्मस्वरूप मूढ, अविवेकी लोक अज्ञानाच्या आवरणामुळे जाणत नाहीत.  अहं शब्दाच्या लक्ष्यार्थाने निर्देशित केलेले माझे निरतिशय आनंद स्वरूप अज्ञानी लोक जाणत नाहीत.  याचे कारण अज्ञानाच्या आवरणामुळे बुद्धि भ्रमिष्ट होऊन अहंकाराच्या उन्मादामुळे त्यांना सद्गुरूंचा संग मिळत नाही.  त्यामुळे गुरुमुखामधून शास्त्राचे श्रवण करण्याची संधी त्यांना मिळत नाही.  त्यामुळे ते अज्ञानी लोक स्वबुद्धीला प्रमाण मानत असल्यामुळे ते प्रत्यक्ष, इंद्रियगोचर आहे त्यालाच सत्यत्व देतात.

 

शरीर, इंद्रियांच्या अतीत असलेले तसेच मन आणि बुद्धीच्याही अतीत असलेले स्वतःचे स्वरूप जाणत नाही.  इतकेच नव्हे तर, त्यांच्या हृदयामध्ये असलेले माझे अस्तित्व सुद्धा मान्य करीत नाहीत.  हाच माझा अनादर आहे, तिरस्कार आहे.  याच अज्ञानामुळे देहादि सर्व अनात्म्याचे धर्म माझ्यावर आरोपित करून जो “मी नाही” तो “मी आहे” असे म्हणतात.  अमानवी असणाऱ्या मला मानव म्हणून पाहतात.  जन्ममृत्युरहित असून सुद्धा जन्ममृत्यूने मर्यादित करतात.  “मी कर्ता”, “मी भोक्ता” असे समजतात.  “मी लहान आहे”, “मी मोठा आहे”, “मी अज्ञानी आहे”, “मी पापी आहे”, “मी बहिरा आहे”, मी आंधळा आहे”, “मी लंगडा आहे”, “मी म्हातारा आहे”, “मी मेलो” याप्रमाणे विपरीत भाव निर्माण करतात.

 

मानवी शरीराचा आश्रय घेऊन मी अवतार घेत असल्यामुळे अज्ञानी जीव फक्त माझे मानवी शरीरच पाहतात.  त्यापलीकडे असलेले जन्ममृत्युरहित, नित्य, कूटस्थ, असंग, निरुपाधिक सच्चिदानंद स्वरूप जाणत नाहीत.  ते शरीरालाच सत्यत्व देत असल्यामुळे माझ्या सगुण रुपालाच महत्व देतात.  मी शरीराने अन्य जीवांच्यासारखा असल्यामुळे त्यांच्यामधीलच मी एक आहे असे मानतात.  त्यामुळे माझे – परमेश्वराचे स्वरूप न जाणता एक मानव आहे असेच म्हणतात.  मला मानवी शरीराने मर्यादित करतात.  यामुळे त्या अवतारामधील ईश्वरत्व न पाहाता मनुष्यत्व पाहिले जाते.  मनुष्यत्व पाहिले की तेथे रागद्वेष आपोआपच निर्माण होतात.  सर्व मानवी मर्यादा येतात.  यामुळे अवतारामध्ये परमेश्वराला किंवा अवतारी पुरुषाला सुद्धा आपण कमी लेखतो.  त्याची अवहेलना, निंदा करतो.  तिरस्कार करतो.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, September 19, 2023

कर्तृत्वाचा निरास | Elimination of Ownership of Action

 



ज्ञानी पुरुष या विश्वामध्ये एखाद्या अज्ञ पुरुषाप्रमाणेच सर्व क्रिया किंवा व्यवहार करीत असतो.  अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच क्रिया व व्यवहार सत्य वाटतो.  अज्ञानी मनुष्य ज्ञानी पुरुषाला सुद्धा उपाधीच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे ज्ञानी मनुष्याच्या येणे-जाणे, कर्म करणे, बोलणे, वगैरेदि सर्वच क्रिया अज्ञानी मनुष्याला सत्य वाटतात.

 

परंतु ज्ञानी पुरुषामधून कर्तृत्वाचा निरास झाल्यामुळे स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानी पुरुष कोठे जातही नाही आणि कोठून येतही नाही.  कोणते कर्म करीतही नाही अथवा बोलतही नाही.  तर या क्रिया केवळ त्याच्या शरीरइंद्रियादि उपाधीमधून घडत असतात.  ज्ञानी पुरुष मात्र यापासून अलिप्तच राहतो.

 

याचे कारण ज्ञानी पुरुषाला परमपदाचे ज्ञान झाल्यामुळे त्याच्यामधील कर्तृत्वबुद्धि निरास पावते.  प्रमाता-प्रमेय-प्रमाण हा व्यवहार निरास पावतो.  मागे सांगितल्याप्रमाणे हेय आणि उपादेयरहित झाल्यामुळे तो द्वंद्वरहीत होतो.  त्याला कशाचीच अपेक्षा नसल्यामुळे कामनांचा अभाव होऊन त्याची कर्मे सुद्धा क्षय पावतात.

 

येथे समारंभ म्हणजेच कर्म होय.  कर्माच्याच साहाय्याने मनुष्याच्या संसारगतीला प्रारंभ होतो.  किंवा ज्याचा आरंभ केला जातो त्याला 'आरंभ' म्हणजे 'कर्म' असे म्हणतात.  ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुष काही त्याग करीत नाही किंवा काही ग्रहणही करीत नाही.  याचे कारण - प्रयोजनअभावात् |  काही मिळविण्याच्या इच्छाच गळून पडल्यामुळे प्रिय-अप्रिय, रागद्वेषादि वृत्ति गळून जातात.  म्हणून ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामधील कामना, कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व या सर्वच संसारप्रत्ययांचा निरास होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, September 12, 2023

मौन साधना | The Practice of Silence

 



शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी असणारी मौनसाधना सांगितली जाते.  भगवान श्रीरमणमहर्षींनी वर्षानुवर्षे मौन साधना केली, आत्मपरीक्षण केले.  जीवनभर साधकांना मौनाचाच उपदेश केला.  मौन याचा अर्थ केवळ न बोलणे नव्हे.  कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकारचे मौन आहे.  व्यवहारामध्ये आपण खरोखरच जे बोलायला पाहिजे, ते कधीच बोलत नाही आणि जे कधीही बोलायला नको, तेच बोलतो.  साधकाचे आणखी एक महत्वाचे ब्रीद आहे आणि ते म्हणजे जीवनामध्ये कोणावरही comments करू नयेत.  दुसऱ्याचे चारित्र्यहनन करू नये.

 

भगवान वाचिक तपस् सांगतात – अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |       (गीता अ. १७-२५)

साधकाने दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक वचन बोलावे.  जे जे आपण अध्ययन करतो, जे जे मी श्रवण करतो, त्यावरच बोलावे.  व्यवहारामध्ये आपण अन्य विषय, व्यक्ति, प्रसंग, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार याबद्दलच अधिक बोलतो.  व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांशी जितके बोलाल, एकमेकांच्या जवळ याल, दुर्दैवाने बोलता-बोलता एकमेकांच्यामधील राग आणि द्वेष उफाळून बाहेर पडतात.  मनुष्य विकारांच्या आहारी जातो.  साधकाचे मन विक्षिप्त, कलुषित होते.

 

तसेच, साधकाच्या दृष्टीने पाहिले तर या सर्व चर्चांचा, त्याला साधनेमध्ये काहीही उपयोग होत नाही.  उलट प्रतिबंधच होतो.  म्हणजे त्याचे मन अधिकाधिक बहिर्मुख, विषयाभिमुख होते.  म्हणूनच श्रुतीने याठिकाणी साधना सांगितलेली आहे की – अन्या वाचा विमुञ्चथ |  हे शिष्या !  तू अन्य वाचेचा त्याग कर आणि मौनाचा अभ्यास कर.  जितके कमी बोलता येईल, तितके कमी बोलावे.  हा अभ्यास करावा.  असा मौनाचा जर अभ्यास केला, तर मन शांत, अंतर्मुख होऊन तेच मन या साधनेसाठी योग्य, अनुकूल आणि अधिकारी होऊ शकते.  अन्य लोक, विश्व, व्यक्ति, प्रसंग याविषयी बोलण्यापेक्षा साधकाने आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, September 5, 2023

मनुष्य शरीराचा 'रथ' | The 'Chariot' of Human Body

 



वसिष्ठ मुनि रथाचा दृष्टांत देतात.  रथ जसा जड, अचेतन असतो तसेच आपले शरीरही रथाप्रमाणे अचेतन आहे आणि या शरीररूपी रथामध्ये बसलेला रथस्वामी म्हणजे जीवात्मा आहे.  या शरीररूपी रथाला पाच ज्ञानेंदिये व पाच कर्मेंद्रिये असे घोडे जोडले आहेत.  असा हा रथ सज्ज होऊन त्याच्यामध्ये रथस्वामी बसला की, तो रथ मार्गक्रमण करू लागतो.  हे मार्ग म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि दृश्य विषय आहेत.  या विषयरूपी मार्गांच्यामधून जात असताना इंद्रियरूपी घोड्यांच्यावर नियमन करण्यासाठी रथस्वामीच्या जवळ मनरूपी लगाम आहे.  म्हणजे मनानेच इंद्रियांच्यावर निग्रह केला पाहिजे.  याप्रमाणे शरीररूपी रथ या संपूर्ण विश्वामध्ये परिभ्रमण करीत असतो.

 

ज्ञानी पुरुष ज्यावेळी या रथाकडे पाहतो, त्यावेळी त्याला निश्चितपणे माहीत असते की, रथ हा माझ्यापासून नित्य भिन्न आहे.  जाण्यायेण्याचे फक्त ते साधन आहे.  'मी' मात्र त्या रथापासून भिन्न असणारा परमात्मस्वरूप आहे.  'मी' परमात्मा त्या रथस्थ पुरुषापासून म्हणजेच जीवाच्या सुद्धा अतीत आहे.  इतकेच नव्हे, तर तो रथस्थ पुरुष आणि मी खरे तर एकच आहोत.  जीव हा जीव नसून जीव स्वतःच परमात्मस्वरूप आहे.  केवळ शरीर, बुद्धि या उपाधीच्या अनुषंगाने त्याला 'जीव' असे म्हटले जाते.  परंतु उपाधीचा निरास केला तर रथही नाही, घोडे, लगाम, रस्तेही नाहीत व रथस्वामी सुद्धा नाही.  केवळ परमात्मस्वरूप हेच सत्य आहे.  म्हणजेच शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान ही सर्व उपाधि काल्पनिक, मिथ्या स्वरूपाची असून, 'मी' परमात्मा मात्र या सर्वांच्याही अतीत आहे.

 

आत्मस्वरूपाचे असे यथार्थ ज्ञान ज्या ज्ञानी पुरुषाला होते, त्याचे या जगात राहणे म्हणजे आनंदाने पर्यटन करणे आहे.  ज्ञानी पुरुष तत्त्वाची दृष्टि प्राप्त झाल्यामुळे अत्यंत स्थिर, शांत व प्रसन्न मनाने राहतो.  याचे कारण त्याच्या दृष्टीने हा दृश्य संसार, सर्व प्रसंग, सर्व दुःखे मिथ्या व कल्पित स्वरूपाची आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ