Wednesday, February 24, 2021

विश्व निर्मिती – परिणाम व विवर्त | Cosmic Creation – Two Transformations

 



जसे, दोरीमधून कल्पनेने – मायेने सर्प निर्माण होतो, त्याचप्रमाणे परमात्म्यामधून मायेने या विश्वाची निर्मिती होते.  म्हणजेच परमात्म्यामधून प्रत्यक्ष, वास्तविक, सत्य विश्वाची निर्मिती झालेलीच नाही.

 

निर्मिती ही दोन प्रकारची असते.  परिणाम व विवर्त हे निर्मितीचे दोन प्रकार आहेत.  शास्त्रकार व्याख्या करतात – स्वस्वरूपपरित्यागेन रूपान्तरपत्तिः इति परिणामः |

स्वस्वरूपअपरित्यागेन रूपान्तरपत्तिः इति विवर्तः ||

स्वस्वरूपाचा पूर्णतः त्याग होऊन एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर होणे, या निर्मितीच्या प्रकाराला ‘परिणाम’ असे म्हणतात.  उदा.  दुधापासून दही बनणे, दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, लोण्यापासून तुप निर्माण होणे, हे याचे उत्तम उदाहरण आहे.  यामध्ये पहिल्या मूळ पदार्थाचा पूर्णतः नाश होऊन दुसरा नवीन पदार्थ निर्माण होतो.  म्हणून दुधापासून दह्याच्या निर्मितीला ‘परिणाम’ असे म्हणतात.

 

यानंतर दुसऱ्या निर्मितीला ‘विवर्त’ असे म्हणतात.  राज्जुमधून सर्पाची निर्मिती, हे याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.  येथे रज्जुमधून सर्पाची निर्मिती होत असताना रज्जूच्या मूळ स्वरूपामध्ये कोणताही बदल, विकार, परिणाम न होता सापाची निर्मिती होते.  म्हणूनच हा साप वास्तविक स्वरूपाने अस्तित्वात नसून तो कल्पित, मिथ्या, असत् स्वरूपाचा असतो.  असा हा सर्प मायेमधून, कल्पनेमधून निर्माण झाल्यामुळे त्यास रज्जूचा ‘विवर्त’ असे म्हणतात.  हा सर्प भासात्मक, अध्यस्त असून रज्जु हे त्याचे अधिष्ठान आहे.  त्यामुळे या कल्पित सापाची निर्मिती झाली किंवा रज्जूच्या ज्ञानाने या कल्पित सापाचा निरास झाला तरी अधिष्ठानस्वरूप राज्जुमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही.

 

याप्रमाणेच निर्गुण-निर्विशेष-निरुपाधिक-निर्विकार परमात्म्यामधून त्रिगुणात्मक मायेच्या साहाय्याने विश्वनिर्मिती होते.  मात्र परमात्मस्वरूपामध्ये कोणताही विकार होत नाही.  म्हणूनच विश्वाची निर्मिती म्हणजेच परब्रह्माचे विवर्त आहे.  परब्रह्मामध्ये झालेला अध्यास, भास आहे व परब्रह्म हे या संपूर्ण मायाकार्याचे, अध्यासाचे अधिष्ठान आहे.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, February 16, 2021

जे पूर्वी आणि नंतर नसते | Non-Existent in Past and Future

 



विश्वामधील सर्व दृश्य पदार्थांचे निरीक्षण केले, त्यांची मीमांसा केली तर समजते की, हे सर्व दृश्य पदार्थ निर्मित-कार्य आहेत.  म्हणून त्या प्रत्येक पदार्थाला निश्चितपणे सुरुवात व शेवट, आदि व अंत आहे.  प्रत्येक पदार्थ हा उत्पत्ति-स्थिति-लययुक्त आहे.  त्यामुळे तो पदार्थ त्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी अस्तित्वात नसतो.  तसेच, नाशानंतर सुद्धा अस्तित्वात नसतो. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा, त्याच्या उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर अभाव असतो.

 

आचार्य म्हणतात की – आदौ अन्ते च यन्नास्ति वर्तमाने अपि तत्तथा |  जी वस्तु पूर्वी म्हणजेच तिच्या उत्पत्तीपूर्वी अस्तित्वात नव्हती व – अन्ते | म्हणजे तिच्या नाशानंतरही ती अस्तित्वात नसते.  ती वर्तमानकाळामध्ये, स्थितिकाळामध्ये असूनही, दिसूनही नसल्यासारखीच आहे. त्यामुळे घट डोळ्यांना दिसला तरी वस्तुतः घट ही सत्य वस्तु आहे का ?  यामध्ये विचार केला पाहिजे.  केवळ दिसते म्हणून सत्य म्हणता येणार नाही.  जे काळामध्ये निर्माण होते, ते सर्वच नाशवान आहे.

 

भगवान म्हणतात –        

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः | 

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ||         (गीता अ. २|१६)   

असत् पदार्थांना कधीही अस्तित्व नसते आणि सत् पदार्थांचा कधीही अभाव नसतो. तत्त्वदर्शी, आत्मज्ञानी लोक याप्रकारे सत्असत् या दोन्हीही वस्तूंचे स्वरूप यथार्थ व स्पष्टपणे जाणतात.  नित्यानित्यवस्तुविवेकामुळे त्यांना खरोखरच सत्य व असत्य समजलेले असते. या विश्वामध्ये, दृश्य विषयांच्यामध्ये कधीही तथ्य, सार नाही, हे त्यांना पटते.  म्हणूनच तत्त्वज्ञानी पुरुष दृश्य, अनित्य अनात्मविषयांच्यापासून मनाने पूर्णतः निवृत्त होतात.

 

परंतु आत्मअज्ञानी, अविवेकी लोक मात्र दृश्यालाच सत्य मानतात.  दृश्य विषयांनाच नको इतके महत्त्व देऊन त्यामध्ये आसक्त होतात.  अनित्य, अशाश्वत विषयांच्या उपभोगांच्यामध्ये रात्रंदिवस रममाण होतात.  कामक्रोधादि विकारांच्या आहारी जाऊन सद्गुणांचा, सदाचाराचा, धर्माचरणाचा त्याग करतात.  पापाचारामध्ये, अधर्मामध्ये प्रवृत्त होऊन स्वतःचे अधःपतन करवून घेतात.  या सर्व अनर्थाचे कारण एकच, आणि ते म्हणजे – दृश्य विषयांना दिलेले सत्यत्व !  म्हणूनच साधकाने दृश्य विषयामधील मिथ्यात्व जाणण्याचा श्रुति, युक्ति यांच्या साहाय्याने सर्वतोपरी प्रयत्न करावा.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, February 9, 2021

यत् दृष्टं तत् असत्यम् | All That is Seen is Futile

 



सामान्यतेने द्रष्टा, म्हणजेच सर्व दृश्य पदार्थांना पाहणारा मनुष्य, दृष्यालाच सत्य मानतो.  जे जे दिसते, ते सत्य आहे, असे मानतो.  परंतु या निर्णयामागे विवेक नाही.  दृश्य पदार्थांच्यामध्ये कोणताही निश्चयात्मक योग्य विवेक, विचार न केल्यामुळेच द्रष्टा दृश्य पदार्थांना सत्यत्व देतो.  स्वप्नावस्थेमध्ये आपण अनेक दृश्य पदार्थ पाहतो.  परंतु स्वप्नामधून जागे झाल्यावर आपणच, स्वप्नामधील सर्व दिसलेले – दृश्य पदार्थ खोटे आहेत, असे म्हणतो.  म्हणूनच येथे आचार्य या दृष्टांतानुसार व्याप्ति (युक्ति) सांगतात.  यत् दृष्टं तत् असत्यम् इति |  जे जे दृश्य असते, ते सर्व असत् मिथ्यास्वरूपच असते, हा युक्तिवाद स्वप्नाच्या दृष्टांतावरून सिद्ध होतो.

 

मग याच स्वप्नदृष्टांताने व उपरोक्त युक्तिवादाने जागृतावस्थेमधील पदार्थांचे मिथ्यात्व सिद्ध होते.  जागृतीमधील पदार्थ हे स्वप्नपदार्थांच्याप्रमाणे दृश्य आहेत.  हा पहिला भाग.  जे जे दृश्य असते, ते असत्-मिथ्या असते, या व्याप्तीमुळे जागृत पदार्थ हे दृश्य असून मिथ्या व असत् स्वरूपाचे आहेत, हे सिद्ध होते.  म्हणूनच जागृतपदार्थ व स्वप्नपदार्थ यांच्यामधील दृश्यत्व व मिथ्यात्व हे दोन धर्म समानच आहेत.

 

मग जागृत पदार्थ व स्वप्नपदार्थ हे दोन्हीही दृश्य व मिथ्या असतील तर मग या दोन्हींच्यामध्ये काय फरक आहे ?  आचार्य स्पष्ट करतात की, या दोन्हींच्यामध्ये अन्तःस्थितत्व व संवृतत्व या दोन धर्मांच्यामध्ये भेद आहे.  म्हणजेच स्वप्नामधील पदार्थ हे शरीराच्या आत संकुचित स्थानामध्ये सूक्ष्म वासनांच्या रूपाने विद्यमान असतात, तर जागृतावस्थेमधील पदार्थ हे शरीराच्या बाहेर, स्थूलरूपाने विद्यमान असतात.

 

स्वप्नावस्थेमधील पदार्थ हे स्वप्नपुरुषाला दिसले तरी ते मनोकल्पित असतात.  मुळात कोणत्याही पदार्थांना दिलेले दृश्यत्व हेच मनाने कल्पिलेले असते.  मन असेल, मनाची वृत्ति असेल तरच दृश्य पदार्थ अनुभवायला येतात.  मनाची वृत्ति नसेल तर पदार्थांचा अनुभव देखिल येत नाही.  मनानेच वस्तूंच्या, पदार्थांच्या दृष्यत्वाला सत्ता दिलेली आहे.  म्हणून दृश्यत्व हेच मनोकल्पित आहे, हे प्रथम समजावून घेतले पाहिजे.  हे समजले तर आपोआपच जागृतावस्थेमधील दृश्य पदार्थही मिथ्या, मनोकल्पित आहेत, हे समजण्यास वेळ लागत नाही.

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, February 2, 2021

गुरु-शिष्य द्वैताची कल्पना | Master-Disciple Duality is Imagination

 



जर कोणी गुरु-शिष्य या द्वैताची कल्पना केली असेल तर ती निश्चितच निवृत्त होते.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी निर्माण केलेला गुरु-शिष्य हा भेद किंवा विकल्प, हे द्वैतही मिथ्या आहे.  गुरु-शिष्य हा भेद केवळ आत्मज्ञानाच्या उपदेशासाठी निर्माण केलेला आहे.  उपदेशानंतर जेव्हा अद्वैत आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हे द्वैत शिल्लक राहत नाही.

 

येथे आचार्य सांगतात की, गुरु-शिष्य हा भेद केवळ उपदेशासाठी निर्माण केला जातो.  तुरीय आत्मा हा अद्वयस्वरूप आहे.  त्याच्यामध्ये द्वैताचा अत्यंत अभाव आहे.  असे जरी असेल तरी आत्मस्वरूपाचे हे अभेद ज्ञान शिष्याला गुरूंच्याशिवाय प्राप्त होत नाही.  शिष्य कितीही बुद्धिमान असेल तरी त्याने स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून आत्मज्ञान घेऊ नये.  कारण बुद्धीमध्ये व्यक्तिगत रागद्वेष असून बुद्धीला मर्यादा असतात.  श्रुति म्हणते –

आचार्याद्ध वै विद्या विदिता साधिष्ठं प्रापत् |                   (छांदो. उप. ४|९|३)

गुरूंच्याकडून प्राप्त झालेली विद्याच आत्मप्राप्ति करून देते.

 

या श्रुतींच्यामधून या अध्यात्ममार्गामध्ये गुरूंची अनिवार्यता स्पष्ट केली आहे.  गुरूंच्याशिवाय आत्मज्ञान व आत्मज्ञानाची अभेद दृष्टि मिळणे केवळ अशक्य आहे.  परंतु गुरूंच्या मुखामधून वेदांतश्रवण केले की, गुरूंच्याच कृपेने शिष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो.  त्याच्या अंतःकरणामधील विषयासक्ति गळून पडते.  परमेश्वराविषयी उत्कट भक्तीचा भाव उदयाला येतो.  अंतःकरण शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, विषयासक्तिरहित व अंतर्मुख होते.  या शुद्ध अंतःकरणामध्ये वेदांतशास्त्राच्या श्रवणामधून आत्मज्ञान उदयाला येते.

 

शास्त्र, ईश्वर व गुरु यांच्या असीम कृपेने साधकाला तत्त्वाचे ज्ञान, तत्त्वाची दृष्टि व त्या अभेद, अद्वैत तत्त्वामध्ये निष्ठा प्राप्त होते.  या ज्ञानावस्थेमध्ये गुरु-शिष्य हा भेदही गळून पडतो.  गुरु-शिष्य दोघेही परब्रह्मस्वरूप होतात.  उपाधिजन्य भेदांचा, विकल्पांचा अत्यंत अभाव होतो.  म्हणुनच उपदेशाचे फळरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर पारमार्थिक तत्त्वामध्ये कोणताही द्वैतविकल्प राहत नाही, असे येथे आचार्यांनी स्पष्ट केले आहे.


 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ