Saturday, December 24, 2016

मानव कोण आहे? | Who is Human?


यः मानवःमानव कोण आहे ?  मननशीलात् इति मानवः |  जो विवेकी मनुष्य गुरुपदेशाचे श्रवण करून सूक्ष्म विवेकाने आत्मानात्मस्वरूप जाणून अनात्मविषयांचा त्याग करतो आणि नित्य, शाश्वत असणाऱ्या आत्मस्वरूपाचाच आश्रय घेतो, तोच खऱ्या अर्थाने मानव आहे.

नवं नवं संकल्पविशयं जातं कामयते इति नवः कामी तद्विपरीतः मानवः अकामी इत्यर्थः |
ज्याच्या मनामध्ये सतत एकामागे एक नवीन नवीन विषयांचे संकल्प निर्माण होतात त्याला नवः असे म्हणतात.  तोच कामी आहे.  थोडक्यात असंतुष्ट, अतृप्त पुरुषाला नवः असे म्हटले आहे आणि ‘मा’ म्हणजे नाही.  कामी पुरुषाच्या विरुद्ध असलेला जो तो ‘मानव’ होय.

म्हणून मानव शब्दाचा अर्थ होतो – ज्याच्या मनामध्ये नवीन नवीन कामना निर्माण होत नाहीत असा अकामी पुरुष हाच मानव म्हणण्यास योग्य आहे.  याचे कारण तो चिंतनशील असतो यामुळे विवेकाच्या साहाय्याने सत् आणि असत् वस्तूचा आश्रय घेतो.

त्याचा परिणाम म्हणजे अनित्य, असत् स्वरूपाच्या सर्व विषयांच्या कामना गळून पडतात आणि तो अकामी होतो.  असा अकामी पुरुषच संतुष्ट असून त्याला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहात नाही


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 20, 2016

परमेश्वराच्या अवताराचे प्रयोजन | Purpose of God’s Incarnation


शरीराने, वाचेने आणि मनाने संपूर्ण शास्त्रनिषिद्ध कर्मे करतात ते पापी, दुष्ट पुरुष आहेत.  जगाच्या नाशालाच ते जन्मलेले असल्यामुळे अशा उन्मत्त, अहंकारी, स्वैर दुष्टांचा संहार करून विश्वामध्ये पुन्हा धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.  अधर्माचा उच्छेद करून म्हणजे अधार्मिक, स्वैर, हिंसाचारी असलेल्या दुष्ट पुरुषांचा नाश करून अभ्युदय-निःश्रेयस प्राप्तीचे साधन असलेल्या धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.

सर्व अधिकारी, श्रद्धावान लोकांनी शास्त्रप्रतिपादित कर्मांचे नियमाने अनुष्ठान करणे म्हणजे धर्मसंस्थापना होय.  हा परमेश्वराचा अवतार प्रत्येक युगामध्ये म्हणजेच ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्यावेळी होतो.  तसेच परमेश्वर स्वतःच योगमायेच्या साहाय्याने त्यावेळी योग्य शरीर निर्माण करून सगुण साकार रूपाला प्राप्त होतो. हाच परमेश्वराचा अवतार होय.

या अवताराची तीन प्रयोजने आहेत.  १. साधूंचे रक्षण, २. दुष्टांचा संहार आणि ३. धर्मसंस्थापना
तो हे कशासाठी करतो ?  याचे कारण यज्ञयागादि कर्मानुष्ठानाने सर्व देव संतुष्ट होतात.  मनुष्य यज्ञयागादि कर्मांच्यामध्ये देवतांचा हविर्भाग देऊन देवतांना संतुष्ट करतात.  देवता संतुष्ट झाल्या की, त्यांच्या कृपेने योग्य वेळी आवश्यकतेनुसार पर्जन्यवृष्टि होते आणि त्यामुळे धान्यसमृद्धि होते व सर्व प्राणिमात्रांचे जीवन सुकर होते.

याप्रमाणे धर्माच्या रक्षणानेच सर्व विश्वाचे रक्षण होते.  विश्वामध्ये सुस्थिति निर्माण होते.  उत्कर्ष, अभ्युदय होऊन जीवन सुखी होते.  म्हणून धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे.  यासाठीच परमेश्वर अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 13, 2016

ब्रह्मज्ञानी तृप्त का असतो ? | Why Self-Realized is Complete?


ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाने तृप्त असतो.  व्यवहारामध्ये आपण बघतो की, मनुष्य एखाद्या वस्तूच्या प्राप्तीने तृप्त झाला तरी त्याला अन्य वस्तूंची इच्छा असतेच.  तसेच ब्रह्मज्ञानी पुरुषाला आत्मतृप्ति प्राप्त झाली तरी अन्य विषय मिळवायला काय हरकत आहे ?  परंतु ही आत्मतृप्ति बाह्य विषयांच्या प्राप्तीमधून झालेली नसून स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक अवस्था आहे.  त्यामुळे ती केवळ अनुभूति नसून तो ब्रह्मज्ञानी पुरुषाचा स्वभाव असतो.  ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर अन्य कोणताही मोठा लाभ शिल्लक राहात नाही, कारण सर्व निःसार, निःसत्त्व होते.

योगक्रियेने प्राप्त होणाऱ्या आकाशामधून गमन करणे, अणिमा, गणिमा वगैरेदि सिद्धींची तो अपेक्षा करीत नाही.  या सर्व सिद्धि मायिक असल्यामुळे संसारांतर्गत आहे.  त्यामुळे या सिद्धि मोक्षाचे साधन नसून संसारामध्येच अडकविणाऱ्या आहेत.  म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष सिद्धींची अपेक्षा करीत नाही.  काही लोकांना मृत्यूनंतर उर्ध्वगति मिळून देवपदवी मिळावी ही इच्छा असते.  परंतु या कशाचाही मोह त्याला नसतो, कारण तो आत्मस्वरूपाने सर्व विश्वाचा आत्मा झाल्यामुळे ब्रह्माविष्णुमहेशादि इंद्र, वरुणादि देवतांचा सुद्धा आत्मस्वरूप झालेला असतो.  ‘मी’ च विश्वस्वरूप आहे, ही त्याची अनुभूति असते.

तो स्वतःच जीवन्मुक्तावस्था अनुभवत असल्यामुळे श्रौतस्मार्तादि कार्मामधून प्राप्त होणारी चित्तशुद्धि व त्याद्वारे प्राप्त होणारा मोक्ष याची सुद्धा त्याला इच्छा नसते.  जो बद्ध आहे त्याला मोक्ष हवा असतो.  परंतु ‘मी’ नित्यमुक्त असल्यामुळे ‘मी’ ला कोणीही बंधन घालू शकत नाही.  ‘मी’ सर्वव्यापी असल्यामुळे परिपूर्ण आहे.  ‘मी’ तृप्त आहे.  यामुळे काहीही मिळवायचे प्रयोजन नसल्यामुळे कशाचीही इच्छा राहात नाही, अपेक्षा नाही, कारण आत्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व मायान्तर्गत आहे.  म्हणून मिथ्या आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 6, 2016

कर्म ईश्वरार्पण का करावे ? | Why God-Oriented Actions?

ईश्वरार्पण केलेल्या कर्मामध्ये –

१. कर्म विषयाभिमुख नसते.
२. जरी कर्म बाह्यांगाने शारीरिक असेल तरीही त्याचा आश्रय परमेश्वरच असतो. म्हणजेच प्रत्येक कर्म ईश्वराभिमुख झालेले असते.
३. अन्य कर्मांच्यामध्ये असणाऱ्या कामुकतेचा आणि उपभोगवासनेचा लवलेशही नसतो.
४. कर्म निस्वार्थ, निष्काम वृत्तीने ईश्वरसेवा म्हणून केले जाते.
५. प्रत्येक कर्मामध्ये असलेली कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावना परमेश्वरचरणी अर्पण केलेली असते.
६. कर्म जीवाला विषयाभिमुख आणि विषयासक्त न करता ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय करते.
७. रागद्वेषादि आणि कामक्रोधादि विकार तसेच, त्यांचा होणारा परिणाम कमी होवून मन शुद्ध होते.

थोडक्यात, ईश्वरार्पणबुद्धीने केलेले कर्म हे बंधनकारक न होता चित्तशुद्धीचे साधन होवून सत्वगुणाचा उत्कर्ष होतो आणि तेच कर्म क्रमाने मनुष्याला मोक्षापर्यंत म्हणजेच निरतिशय आनंदाच्या प्राप्तीपर्यंत घेवून जाते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, November 29, 2016

जीवनात कर्माचे प्रयोजन | Role of Karma (Action) in Life


कर्म करावे की न करावे हे मनुष्यावर अवलंबून नाही.  जीवाने स्वकर्तृत्वाने कर्माची निर्मिति केलेली नसून विश्वकर्त्या परमेश्वराने विश्व निर्माण करीत असतानाच सर्व जीवांची उन्नति व्हावी म्हणून कर्म हे साधन दिलेले आहे.  त्यामुळे कर्म हे ईश्वरनिर्मित आहे.  जे ईश्वराने निर्माण केलेले आहे ते कोणीही थांबवू शकत नाही किंवा टाळूही शकत नाही.  म्हणून विश्वामध्ये कर्म हे अटळ आहे.  हा विश्वाचा नियम आहे.

त्यानुसार शरीर धारण केलेल्या प्रत्येक जीवाला सुद्धा हे कर्म अटळ आहे.  फक्त त्या कर्माचा उपयोग कसा करावयाचा, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे.  ज्याप्रमाणे, चाकू एखाद्याचा प्राण घेवू शकेल किंवा तोच चाकू एखाद्याचा जीव वाचवू शकेल.  चाकूने काय करावयाचे व काय करावयाचे नाही, हे चाकू ठरवीत नसून ज्याच्या हातामध्ये चाकू असतो त्या मनुष्याच्या मनामधील संकल्प ठरवितो.  त्याचप्रमाणे कर्माचा योग्य रीतीने सदुपयोग केला तर ते कर्म जीवनामध्ये सुसंगति आणि उत्कर्षाचे साधन होईल.

थोडक्यात कर्म करण्याचे स्वातंत्र्य जरी मनुष्याला असले तरीही कर्म करावे की न करावे याचे स्वातंत्र्य त्याला नाही, कारण कर्म हे ईश्वरनिर्मित असल्यामुळे ती ईश्वराज्ञा आहे.  जिज्ञासु मोक्षार्थी मनुष्याने कर्मफळाची अपेक्षा न करता वेदप्रतिपादित विहित कर्म ईश्वरार्पणबुद्धीने, सेवावृत्तीने करून जीवन जगावे.  यामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त होवून त्याचे अंतःकरण शुद्ध, निर्मळ होईल आणि तो साधनचतुष्टयसंपन्न होवून आत्मज्ञानप्राप्तीसाठी अधिकारी होईल.  क्रमाने गुरूंच्या कृपेने ज्ञानप्राप्ति होवून मोक्षप्राप्ति होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Monday, November 21, 2016

मूढ व दुष्टांचा नाश | Fools and Wicked are Destroyed


श्रद्धावान, असूयारहित साधकांच्या विपरीत असलेले जे अविवेकी, अहंकारी, दुष्ट बुद्धीचे अविद्वान लोक अहंकारामुळे परमेश्वराचा आदेश मानीत नाहीत.  त्यांची बुद्धि असूयेने आणि अहंकाराने प्रवृत्त झालेली असल्यामुळे सर्वगुणसंपन्न, कर्तुं-अकर्तुं परमेश्वराची सत्ता मानायला तयार होत नाही.  परमेश्वराचा आदेश हा प्रमाणभूत न मानता स्वबुद्धीला प्रमाण मानून मीच कर्तुं-अकर्तुं आहे, या भावाने अहंकाराने प्रेरित होवून मन मानेल त्याप्रमाणे कर्मामध्ये प्रवृत्त होतात.

ते असुरी संपत्तीने युक्त असलेले वेदप्रतिपादित कार्मानुष्ठान न करण्यातच सुख मानणारे आणि खावे, प्यावे, मजा करावी अशा प्रकारच्या तमोगुणप्रधान कर्मामध्येच रममाण होणारे विपरीत बुद्धीचे लोक नष्ट होतात.  म्हणजेच पुण्यलोक असणाऱ्या मनुष्यलोकापासून च्युत होतात.  मनुष्य देह धारण करूनही ते पशुतूल्य जीवन जगतात.

जे दुराग्रही लोक माझ्या मताचे म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुसरण न करता कर्मफलाच्या इच्छेने स्वउपभोगासाठीच कर्मप्रवृत्त होतात ते निश्चितपणे हळूहळू नाश पावतात, कारण कर्मफलाच्या अपेक्षेमुळे स्वतःच्या कर्तृत्वानेच ते कामक्रोधादि विकार निर्माण करतात.  यामुळे त्यांचे मन अत्यंत अशुद्ध, अस्वस्थ, क्षुब्ध होवून त्यांचे जीवन असह्य होते.

थोडक्यात परमेश्वरावर श्रद्धा असूनही कामुकतेने प्रेरित झाल्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये चित्ताची शुद्धि आणि निर्मळता प्राप्त होत नाही.  तसेच, सद्गुणांची जोपासना होत नाही आणि आंतरिक सुख, शांति प्राप्त होत नाही.  उलट त्यांचे जीवन दुःख आणि यातनेनेच भरलेले असते.  हाच मनुष्याचा नाश होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, November 15, 2016

सनातन धर्माची वैशिष्ट्ये | Characteristics of Sanatan Dharma



परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||          (गीता अ. ४-८)

वेदप्रतिपादित सनातन धर्माची काही ठळक वैशिष्ट्ये दिसतात –

१. अन्य सर्व धर्म कोणत्या तरी महान पुरुषांनी स्थापन केलेले आहेत.  परंतु सनातन धर्म मात्र मनुष्यनिर्मित नसून ईश्वरनिर्मित आहे हे सिद्ध होते.

२. अन्य कोणत्याही धर्मामध्ये अवतार मानलेला नाही.  याउलट सनातन धर्मामध्येच परमेश्वराचा अवतार शास्त्राने सिद्ध केलेला आहे.  अवतारकार्यामध्ये परमेश्वराने धर्माचा उच्छेद करणाऱ्या अधार्मिक नराधमांचा – असुरांचा नाश केला.  धर्मजागृति करावयाची असेल तर प्रथम धर्मानुष्ठान करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा, भक्ति, धर्मनिष्ठा निर्माण होणे आवश्यक आहे.  तसेच धर्माचरण करण्यासाठी समाजामध्ये योग्य ते अनुकूल वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

३. कोणत्याही अवतारामध्ये भगवंतांनी नवीन धर्माची स्थापना केलेली नाही.  तर अनादि काळापासून आलेल्या वेदप्रतिपादित धर्माची पुन्हा पुन्हा स्थापना केली.  आवश्यकतेनुसार आणि काळानुरूप धर्मजागृति केली.  परंतु अन्य धर्मांची स्थापना केलेली आहे.

४. परमेश्वराचा अवतार पापपुण्यात्मक कर्मामुळे झालेला नसल्यामुळे त्याला स्वातंत्र्य आहे.  अवतारामध्ये तो कर्माने बद्ध नसून तो प्रकृतीच्या अधीन नसतो.  तसेच सगुण, साकार होऊन सुद्धा त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होत नाही.  तो नित्य पूर्ण, सच्चिदानंदस्वरूप असून मुक्त आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, November 8, 2016

परमेश्वर अवतार का घेतो ? | Why God Incarnates ?



सर्व वर्णाश्रमादि प्राणिमात्रांच्या अभ्युदयासाठी आणि निःश्रेयसप्राप्तीसाठी धर्म हेच साधन आहे.  त्याच्या सम्यक अनुष्ठानाने मनुष्याच्या ऐहिक आणि पारलौकिक इच्छा पूर्ण होऊन समृद्धी, भरभराट व स्वर्गप्राप्ति होते.  तसेच तोच धर्म निष्काम वृत्तीने अनुसरण केल्यास चित्तशुद्धीद्वारा मोक्षप्राप्तीचे साहाय्यकारी साधन होतो.  अशा प्रकारच्या प्रवृत्ति आणि निवृत्ति लक्षणांनी युक्त असलेला धर्म नाश पावतो.  म्हणजेच त्याचे अनुसरण करणारे लोक समाजामध्ये कमी होतात.  त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाल्यासारखा दिसतो.

याचे कारण अर्थ आणि कामाने प्रेरित झालेले, राजोतमोगुणांनी युक्त असलेले, असुरीसंपत्तीने  युक्त असलेले असुरी वृत्तीचे भोगवादी कामांध लोक त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या धाकाने आणि सत्तेच्या सामर्थ्याने व स्वबलाने धर्माचरण करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचा त्रास, पीडा देतात.  धर्माचरणामध्ये विघ्ने आणून सर्वत्र दशहतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करतात.  सर्वसामान्य धार्मिक लोकांचे जीवन विस्कळीत करतात.  त्यांना धर्माने आणि सदाचाराने जगू देत नाहीत आणि बळजबरीने धर्माचरणापासून निवृत्त करून अधर्मामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे समाजात गोंधळ निर्माण होऊन असुरी प्रवृत्तीच्या आचारामुळे धर्माचरण व धर्मानुष्ठान करणाऱ्यांची संख्या कमी होते.  यामुळे वैदिक धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उत्कर्ष होतो.

सर्व वर्णाश्रमामध्ये कर्तव्याचा त्याग झाल्यामुळे, भोगवासना प्रबल झाल्यामुळे समाजामध्ये हिंसाचार वगैरे वाढतो आणि पर्यायाने समाजाचे, कुटुंबाचे आणि व्यक्तीचे अधःपतन होते.  लोकांच्या जीवनावर धर्माचे असलेले नियमन नाहीसे होते.  थोडक्यात सर्व समाजामध्ये धर्माचे अनुष्ठान कमी होऊन अधर्माचा उत्कर्ष होतो.  अशा वेळी धर्माचे अनुसरण करणाऱ्या धार्मिक लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी व अधार्मिक हिंसाचारी लोकांचा नाश करण्यासाठी, तसेच त्यांचे नियमन करण्यासाठी मी - परमेश्वर कालानुरूप माझ्या योगमायेच्या साहाय्याने अनुरूप देह धारण करतो.  अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ