Tuesday, July 23, 2024

अविचल ज्ञानी पुरुष | Unmoved Realized Being

 



वसिष्ठ मुनि येथे ज्ञानी पुरुषाचे वर्णन करीत आहेत.  ज्ञानी पुरुष अलिप्त असतो.  तो शांत होतो, असेही नाही.  तो आत आहे, असेही नाही किंवा बाहेर आहे असेही नाही.  तो निष्क्रिय आहे असेही म्हणता येत नाही, तो काही ग्रहणही करीत नाही किंवा तो कर्मामध्येच मग्न होतो असेही नाही.

 

ज्ञानी मनुष्य अज्ञानी मनुष्याप्रमाणे बहिरंगाने व्यवहार करताना दिसतो.  म्हणूनच तो शांत आहे असे म्हणावे तर तो अखंड कार्यामध्ये रत झालेला दिसतो.  तो निष्क्रिय आहे म्हणावे तर तो व्यवहार करताना दिसतो.  परंतु कार्यमग्न असताना सुद्धा तो अतिशय शांत दिसतो.  तो त्याच्या अंतरंगामध्ये आहे म्हणावे तर तो बाहेर लोकसंग्रह करताना दिसतो.  तो बाहेरच्या जगात जनसंपर्कामध्ये आहे असे म्हणावे तर सर्वांच्यामध्ये असूनही तो तेथे कोठेच नसल्याचे जाणवते.  तो कोणाला काही देत नाही म्हणावे तर तोच समाजाला भरभरून देत असतो.  तो कोणाकडून काही घेत नाही म्हणावे तर तो सर्वांची दुःखे घेत असतो.  राघवा !  ज्ञानी पुरुष कर्म करतो की करीत नाही, तो काही घेतो की घेत नाही, या कशाचेच वर्णन करता येत नाही.  कर्म करताना तो अज्ञानी पुरुषाप्रमाणे "मी कर्ता" असा भाव निर्माण करीत नाही.  तसेच कर्माचे फळ उपभोगताना त्यामध्ये आसक्तही होत नाही.

 

हे रामा !  असा हा ज्ञानी पुरुष गेलेल्या वस्तूची उपेक्षा करतो.  प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेली वस्तु स्वीकार करतो.  जी वस्तु मिळाली नाही, त्या वस्तूची तो अपेक्षा करीत नाही आणि जी मिळाली आहे त्याचा तिरस्कारही करीत नाही.  तो क्षुब्ध होत नाही किंवा कधी अक्षुब्धही होत नाही.  याउलट अज्ञानी पुरुष मात्र मिळाले तरी आणि न मिळाले तरी दुःखीच असतो.  त्याला अनपेक्षित मिळाले तरी दुःखी होतो आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी तो अतृप्तच असतो.  मात्र ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत.

 

ज्याप्रमाणे पावसाळ्यात समुद्रामध्ये शेकडो नद्यांनी प्रवेश केला किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी आटले तरी समुद्रामध्ये मात्र कोणताही बदल होत नाही.  समुद्र त्याच्या स्वरूपाने अचल राहतो.  तसेच ज्ञानी पुरुष सर्व काळी, सर्व अवस्थांच्यामध्ये अतिशय शांत व अविचल राहतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, July 16, 2024

गुरुकृपा आणि परमेश्वर कृपा | Grace Of Guru And God

 




साधुमहात्मे हेच अनंताच्या यात्रेमध्ये आश्रय आहेत.  एकवेळ ईश्वराची कृपा नसली तरी चालेल परंतु महात्म्यांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.  गुरुनानक म्हणतात -  

गुरु गोविंद दोनु खड़े किसके लागू पाय |

बलिहारी गुरुदेव की गोविन्द दिये बताय ||

गुरु आणि परमेश्वर यांच्यामध्ये सद्गुरू हेच श्रेष्ठ आहेत, कारण परमेश्वर स्वतः आपले स्वरूप प्रकट करू शकत नाही.  तर ईश्वरनिष्ठ पुरुषच परमेश्वराचे स्वरूप उलगडून सांगतात.  आपल्या आतच परमेश्वराची प्रचीति करून देतात. आपलेच स्वतःचे स्वरूप हे परमेश्वरस्वरूप आहे हे प्रचीतीला आणून देतात.  याचाच अर्थ महात्मा हा परमेश्वरापासून भिन्न नसून साक्षात भूतलावर चालते बोलते परमेश्वर स्वरूप आहेत.  म्हणून त्यांची कृपा ही परमेश्वराची कृपा आहे.

 

अशा ईश्वरनिष्ठ लोकांची जर कृपा झाली, त्यांचा अनुग्रह मिळाला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही.  त्यांची जवळीक आपल्या मनात श्रद्धा निर्माण करून भक्तीचा भाव निर्माण करील.  ज्याप्रमाणे निर्धन मनुष्याला पैशाची गरज असेल तर त्याने श्रीमंत धनिकाकडे जावे.  तोच त्याची गरज पूर्ण करू शकेल.  हे जसे आपण व्यवहारात पाहातो त्याप्रमाणे आपल्या मनात जर ईश्वरप्रेम नसेल आणि ते प्राप्त करावयाचे असेल तर ते कोणाकडून प्राप्त करावे ?  ज्यांच्याजवळ परमेश्वराबद्दल निःसीम दृढ प्रेम आहे, जे ईश्वररूपामध्ये तल्लीन, तन्मय झालेले आहेत अशा ईश्वरनिष्ठ महात्म्यांच्याकडे गेले पाहिजे.

 

महापुरुषांच्यामध्ये परमेश्वराविषयी अनन्य, उत्कट निष्ठा आणि भक्ति असल्यामुळे त्यांच्या सान्निध्याने आपल्यामध्ये श्रद्धा, भक्ति, निष्ठा निर्माण होईल.  ते प्रेम परमेश्वर सुद्धा देऊ शकत नाही, कारण परमेश्वर सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले आहे.  म्हणून महापुरुषांची कृपा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रहहेतुकम् |  मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ||       (विवेकचूडामणि)

या तीन अत्यंत दुर्लभ वस्तु परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतात - मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा आश्रय !


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, July 9, 2024

मनोमय विश्व | Mind-Generated World

 



श्रीवसिष्ठ मुनि येथे युक्तिवाद देऊन आणखी स्पष्टपणे सिद्ध करतात की, दृश्य विश्व हे केवळ मनोकाल्पित आहे.  त्यासाठीच येथे सांगतात की, ब्रह्माजी हा स्वतःच मनोमात्र म्हणजे मनोमय आहे.  ब्रह्माजीची उत्पत्ति ही प्रत्यक्ष पृथ्व्यदि पंचमहाभूतांच्यामधून  झालेली नाही.  त्यामुळे ब्रह्माजीला स्थूल देह नाही.  ब्रह्माजी हा केवळ मनोमात्र आहे.

 

त्यामुळेच हे रामा !  विश्व सुद्धा मनोमात्रच आहे. "जसे कारण तसे कार्य" असा न्याय आहे.  ब्रह्म हे कारण आणि विश्व हे ब्रह्माचे कार्य असल्यामुळे, विश्व हे ब्रह्माजीमधून निर्माण झाल्यामुळे जसा ब्रह्माजी तसेच विश्व असणार, हे गृहीत आहे.  म्हणून ब्रह्माजी मनोमय असल्यामुळे हे विश्वही मनोमय आहे, हे आपोआपच सिद्ध होते.  त्यामुळे आपणास स्थूल मानाने जरी हे विश्व दिसत असेल तरी विश्वाची निर्मिति प्रत्यक्ष पृथ्व्यदि पंचमहाभूतांच्यामधून झालेली नसून मनोमय ब्रह्माजीमधून झालेली आहे.  म्हणून हे भौतिक दिसणारे विश्व म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ब्रह्माजीच्या मनाची केवळ एक कल्पना आहे.

 

हे विश्व म्हणजे ब्रह्माजीचेच स्वप्न आहे.  ब्रह्माजी हा अत्यंत शुद्धसंवित् स्वरूप असल्यामुळे त्याला आपल्या आतिवाहिक देहाची सतत स्मृति असते.  म्हणून त्याचे विश्वरूपी स्वप्न दीर्घकाळ चालू राहते.  तसेच ब्रह्माजीला आधिभौतिक देह नसल्यामुळे त्याची जागृतावस्था शक्य नाही आणि त्याला आतिवाहिक देहाचे विस्मरणच होत नाही.  म्हणून त्याचे स्वप्न म्हणजेच आपल्याला दिसणारे हे दृश्य विश्व दीर्घकाळ, चार युगे, कल्पांतापर्यंत राहते.  त्यानंतर ब्रह्माजीला त्याच्या आतिवाहिक देहाची विस्मृति होणे म्हणजेच महाप्रलय आहे.  त्यावेळी संपूर्ण दृश्य विश्व लय पावते.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


 

- हरी ॐ


Tuesday, July 2, 2024

विभूतियोगाचा विचार | Essence of “Vibhooti Yog”

 




विश्वामध्ये प्रत्येक कार्याला कारण हे असतेच.  परमेश्वर हाच विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण आहे, हे सिद्ध केलेले आहे.  परमेश्वरामधूनच विश्व निर्माण झाले व परमेश्वरामध्येच स्थित आहे.  त्यामुळे विश्व हेच परमेश्वराचे स्वरूप आहे.  प्रत्येक नामरूपामध्ये परमात्मा अनुस्यूत आहे.  सर्व मण्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे सूत्र अनुस्यूत असते त्याप्रमाणे दृकदृश्यरूपाने असलेले हे जगत परमात्म्यामध्येच अनुस्यूत आहे.  म्हणून हे अर्जुना !  मी कोठे नाही असे नाही.  मी सर्वत्र आहे.  जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ‘मी’ च आहे.  मी हे संपूर्ण विश्व अंतर्बाह्य व्यापून राहिलेलो आहे.  यामुळे हे सर्व विश्व माझ्या विभूतीच आहे.

 

हे लक्षात ठेवून भगवंतांनी ब्रह्मांडामधील चेतन-अचेतन, भौतिक आणि पारलौकिक अशा अत्यंत महत्वाच्या विभूति सांगितल्या आणि शेवटी स्पष्ट केले की, जेथे जेथे शक्ति, ऐश्वर्य, तेज, ओज, उत्कर्ष, सौंदर्य, सत्ता, मांगल्य वगैरे आहे, ते सर्व भगवंताचेच स्वरूप आहे.  त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, फिरता प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराचे चिंतन करावे.  येथे भगवंतांना जगाचे किंवा विषयाचे चिंतन अभिप्रेत नसून प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने परमेश्वराचे अनुसंधान अभिप्रेत आहे.  प्रेत्येक विषय ईश्वरानुसंधानासाठी साधनभूत होतो.  थोडक्यात यामधून परमेश्वराची अखंड उपासना होते.

 

निकृष्ट वस्तुमध्ये उत्कृष्ट वस्तु पाहाणे म्हणजेच उपासना होय.  उदा. शाळिग्रामामध्ये विष्णुरूप पाहाणे किंवा पिंडीमध्ये शिव पाहाणे.  वास्तविक शाळिग्राम हा विष्णु नाही किंवा पिंड ईश्वरस्वरूप नाही.  तरीही परमेश्वर सर्व विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण असल्यामुळे या सर्व उपासना शक्य आहेत.  या सर्व अध्यस्त उपासना आहेत.  याचे फळ म्हणजे साधकाला मनाची एकाग्रता आणि चित्तशुद्धि प्राप्त होते.  व्यक्तिगत रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी होतो.  अहंकार-ममकार समर्पण होतो.  संपूर्ण विश्व परमेश्वरमय पाहिल्यामुळे मनाची विशालता प्राप्त होते.  सर्व उच्चनीच भेद, वर्ण, आश्रम, जात, पंथभेद संपतात आणि मन अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  याचा परिणाम म्हणजे त्या भक्ताला सद्गुरूप्राप्ति होते आणि परमेश्वर स्वतःच सद्गुरूरूपाने भक्ताला उपदेश देऊन आत्मबोध देतो.  त्याचे अज्ञान ध्वंस करून आत्मप्रचीति देतो.  यामुळे भक्ताचे जीवन कृतार्थ होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, June 25, 2024

उदय-अस्त रहित ज्ञानवृत्ति | Unwavering Knowledge

 



ज्ञानी पुरुषाला कैवल्यप्राप्ति, निरतिशय पदाची प्राप्ति झाल्यानंतर त्याचे अंतःकरणही त्याच पदाचा आश्रय घेऊन आत्माकार होते.  ज्ञानी पुरुष स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप होतो.  चैतन्यस्वरूप कोठून येतही नाही व  कोठे जातही नाही.  ते आकाशाप्रमाणे अंतर्बाहय सर्वांना व्यत्प्त करते.  म्हणून चैतन्याकार वृत्ति ही उदय-अस्तरहित आहे.  अज्ञानी मनुष्याने श्रवण केले तर शाब्दिक ज्ञान उदयाला येते आणि थोड्या वेळाने ती ज्ञानवृत्ति निघूनही जाते.  म्हणून या मार्गात प्रवचनकार भरपूर आहेत.  प्रवचनाच्या वेळेस त्यांची ज्ञानवृत्ति येते आणि दुसऱ्यांना उपदेश दिला की त्यांची ज्ञानवृत्ति निघून जाते.  असे हे ज्ञान येणारे आणि जाणारे असेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही.

 

आत्मज्ञानी पुरुषामध्ये एकदा ही ज्ञानवृत्ति उदयाला आली की, त्याचे ज्ञान पुन्हा कधीही अस्त पावत नाही.  त्या ज्ञानामध्ये शंका, संशय, विकल्प राहत नाहीत. भयंकर मोठा प्रसंग आला तरीही ज्ञाननिष्ठ पुरुष ज्ञानापासून थोडाही विचलित होत नाही.  आभाळ कोसळले, सगळे जग बुडाले तरीही तो ज्ञानाच्या स्थितीमध्ये दृढ राहतो.  त्यासाठी विदेही जनकाचे उदाहरण प्रसिद्ध आहे.  जनक राजा म्हणतो - मिथिलायां प्रदीप्तायां न मे दहति किञ्चन |  सर्व मिथिला नगरी अग्नीने दग्ध झाली तरी माझे कधीही दग्ध होत नाही.  कारण मी या मिथिला नगरीपासून अत्यंत विलक्षण असून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप आहे.  'मी' आत्मा मात्र नित्य शाश्वत आहे.  अशा या परिपूर्ण ज्ञानाने ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.

 

इतकेच नव्हे, तर ही ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्त असणारा ज्ञानी पुरुष विदेही जनकाप्रमाणे बहिरंगाने सर्व क्रिया किंवा व्यवहार करताना दिसत असेल तरी वस्तुतः तो क्रियाशून्य असतो.  तो काही देत नाही, काही ग्रहण करीत नाही, कशाचा त्याग करीत नाही.  त्याच्या दृष्टीने शरीर शरीराचे काम करते, इंद्रिय इंद्रियांचे कार्य करतात.  असे समजून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप अकर्ता-अभोक्ता आहे, असे त्याचे ज्ञान असते.  म्हणून सर्व क्रिया करूनही तो या सर्वांच्याकडे साक्षीभावाने पाहतो.  जसे प्रारब्ध आहे, तसतसे शरीर प्रारब्धावर सोपवून तो स्वतः मात्र स्वस्वरूपामध्ये स्थित होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, June 18, 2024

साधकाची पुनर्जन्म गति | Seeker’s Progress Upon Rebirth

 



साधकाचा किंवा त्याने केलेल्या साधनेचा कधीही नाश होत नाही.  प्रारब्धक्षयाने वर्तमान शरीराचा जरी मृत्यु झाला तरी तो पुण्यात्मा जीव साधनेचे सर्व संस्कार घेऊन पुढच्या योनीमध्ये प्रवेश करतो.  तो कधीही दुर्गतीला जात नाही किंवा त्याचे अधःपतनही होत नाही.  साधनेच्या संस्कारांच्या प्रभावाने पुढच्या जन्मी सुद्धा त्याचे मन सत्त्वगुणप्रधानच होते.  कदाचित काही वेळेला एखाद्या पापकर्माच्या प्रभावाने त्याला अधोयोनी मिळाली म्हणजेच पशुपक्ष्यांचे शरीर मिळाले तरी चांगले संस्कार नष्ट होत नाहीत.

 

मागच्या जन्मी जर सत्त्वगुणांचे अनेक संस्कार झाले असतील तर या जन्मी कुत्र्याची अधोयोनी मिळाली तरीही तो कुत्रा अत्यंत सात्त्विक वातावरणामध्ये वाढेल.  एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये त्याला सत्संग मिळेल.  जिथे वेदघोष चालतील, जिथे प्रवचन, कीर्तन, भजन, सत्संग चालू आहे, अशा महात्म्यांच्या सान्निध्यात त्याला राहायला मिळेल.  त्यामुळे त्या योनीमध्ये सुद्धा जीवाचे अधःपतन होणार नाही हे सिद्ध होते.  कर्माचे भोग भोगले की, त्या जीवाला पुन्हा पुढची योनी मिळेल.

 

समजा, एखादा साधक साधना करीत असताना मृत झाला व त्याच्या अंतःकरणामध्ये काही विषयांच्या कामना असतील तर तो पुढच्या जन्मी अत्यंत चारित्र्यसंपन्न, शुद्ध, पवित्र व श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  त्यामुळे त्याच्या कामना सहजच पूर्ण होतील व त्या पूर्ण झाल्या की, लगेचच त्याचे पूर्वजन्मींचे संस्कार जागृत होऊन तो सर्वसंगपरित्याग करेल व पुन्हा साधनेत प्रवृत्त होईल.

 

किंवा याउलट एखादा साधक प्रखर वैराग्यसंपन्न असेल, मनामध्ये कोणतीही कामना नसेल व त्याचा साधना करता-करता मृत्यु झाला तर पुढच्या जन्मी तो सदाचारसंपन्न, मात्र अत्यंत गरीब परंतु भक्तिसंपन्न आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  काही काळ घरामध्ये राहील आणि अत्यंत लहान वयामध्ये त्याच्या अंतःकरणात पूर्वजन्मीचे साधनेचे संस्कार जागृत झाले की, तो घरादाराचा त्याग करून साधनेमध्ये प्रवृत्त होईल.  तो पुन्हा अत्यंत जोमाने व उत्साहाने तीव्र गतीने साधना करेल व मोक्षाची प्राप्ति करून घेईल.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, June 11, 2024

आत्मविस्मृतीचे पिशाच्च | The Ghost Of Self-Amnesia

 



दृढ असणाऱ्या आत्मविस्मृतीमुळे जीवाला आतिवाहिक देहच आधिभौतिक - स्थूल देहाच्या रूपाने एखाद्या पिशाच्चासारखा भासू लागतो.  "मी चैतन्यस्वरूप आहे", या आत्मस्वरूपाची त्याला दृढ विस्मृति होते.  त्यामुळे आधिभौतिक देहाची कल्पना एखाद्या पिशाच्चाप्रमाणे त्याच्या मागे लागते.  जन्मानुजन्मे ही स्थिति असल्यामुळे ही आत्मविस्मृति दृढ होत जाते.  जीव या दृश्याला व स्थूल देहालाच सत्य मानून शोकमोहयुक्त संसारामध्येच बद्ध होतो.

 

येथे श्रीवसिष्ठमुनि अत्यंत सूक्ष्म भाग सांगत आहेत.  अज्ञानी जीव स्वतःचा स्थूल देह पाहतो व त्याच्याशीच तादात्म्य पावतो.  "मी म्हणजेच देह", अशी दृढ कल्पना करतो.  स्थूल देहाचे गुणधर्म, विकार स्वतःवर आरोपित करतो.  त्यामुळे मर्यादित होऊन जन्ममृत्युयुक्त होतो.  त्याचे जीवन बहिर्मुख होते.

 

जसे भूताची कल्पना मनामध्ये निर्माण झाली की, ते नसलेले भूतही आपल्यामागे लागते.  "येथे भूत आहेच", अशी कल्पना दृढ झाली की, मनुष्य भयभीत होतो.  त्याचप्रमाणे - देहोSहम् |  "मी म्हणजे देह" ही कल्पना मनुष्याच्या मागे पिशाच्चाप्रमाणे लागते.  एकदा या देहाला सत्यत्व दिले की, मग अनेक समस्या निर्माण होतात.  त्या सर्व समस्या सत्य वाटू लागतात.  अशी ही देहात्मबुद्धि मनामध्ये निर्माण होते.  जोपर्यंत आत्मविस्मृति आहे, तोपर्यंत देह सत्य भासतो.

 

खरे तर जीवाला फक्त आतिवाहिक देहच आहे.  किंबहुना जीव म्हणजेच आतिवाहिक देह आहे.  परंतु जीवाला जोपर्यंत दृश्य सत्य वाटते तोपर्यंत आत्मविस्मृति असते.  त्यामुळे त्याला दृश्य असणारा स्थूल देहच सत्य वाटतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ