विश्वकर्त्या परमेश्वराच्या आज्ञेने
प्रत्येक जीवाला कर्मफळ प्राप्त होत असते. परमेश्वराची ही कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य
करून साधकाने या विश्वाचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी, साधनेसाठी करून घ्यावा. (Make use of this world for your own sake.) विश्वामध्ये ज्या चांगल्या
गोष्टी दिसतात, त्या
ग्रहण कराव्यात आणि वाईट गुण माझ्यामध्ये येऊ न देण्याचा अभ्यास करावा. यामुळे सर्व विश्वच आपले गुरु होईल. भगवान अवधूतांनी सुद्धा चोवीस गुरु
केले होते. या विश्वामधील प्रत्येक
व्यक्तिकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. म्हणून आयुष्यभर साधकाने 'विद्यार्थी' ही वृत्ति ठेवावी. या विश्वामधून, निसर्गाकडून, डोंगर, नद्या, वृक्ष
नव्हे विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या कणाकणामधून शिकण्यासारखे अलौकिक गुण
आहेत. फक्त हे पाहण्याची दिव्य, शुद्ध दृष्टि मला हवी !
म्हणून जगताना उघडे डोळे ठेऊन जगावे. नीरक्षीर न्यायाने वाईट गोष्टींचा त्याग करून
चांगले गुण, दैवीगुण, धर्म, नीति, जीवनमूल्ये यांची जोपासना करावी. भगवान एक आदर्श जीवन जगण्यासाठी खूप सुंदर सूत्र
सांगतात -
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |
निराशीनिर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः || (गीता अ. ३-३०)
भगवान अर्जुनाला सांगतात, "अर्जुना, तू
सर्व कर्म मला अर्पण कर. कर्म करीत असताना
कर्मफळाची अपेक्षा करू नकोस. कर्माच्या
नियमाप्रमाणे जे फळ मिळेल ते आनंदाने, प्रसादबुद्धीने ग्रहण कर. तू कोठेही
आसक्त होऊ नकोस. कोठेही ममत्वभाव निर्माण करू नकोस."
कर्म करायचे म्हणून करू नये. तर मनापासून कर्म करावे. त्या कर्मामधून आनंद प्राप्त होतो. साधकाने कोणत्याही कर्माला निकृष्ट, तुच्छ मानू नये. कोणतेही कर्म निकृष्ट अथवा उत्कृष्टही नाही. कर्म हे कर्मच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -
कुणी निंदा कुणी वंदा । आमुचा हा स्वहिताचा धंदा ।। (अभंगगाथा)
इतके आपले मन प्रगल्भ झाले पाहिजे. हे परिपक्व मनच साधनेला योग्य, अनुकूल, अधिकारी
होते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

