Sunday, March 24, 2013

शास्त्रोक्त कर्म (Action based on Spiritual Science)

मनुष्याने कितीही खोल, दूरवर विचार केला तरी त्याला जीवनात निःसंशयपणे योग्य व आयोग्य कर्म हे ठरविता येत नाही.  त्यामुळे निश्चयात्मिका बुद्धीने घेतलेल्या निर्णयातून केलेल्या कर्माबाबत मनाने सतत संशय घेणे थांबत नाही.  अशा स्थितीत शास्त्र आपल्या मदतीला धावून येते.  शास्त्रच योग्य व अयोग्य कर्म कोणते हे निश्चितपणे सांगते.  म्हणून शास्त्राचा आधार मनुष्याने जरूर घ्यावा.

शास्त्र या शब्दाची व्याख्या – ‘शासनात् उपदेशात् त्रायते इति  शास्त्रम् | अशी आहे.  शास्त्र माणसाला त्याच्या हिताचे योग्य-अयोग्य कर्माचे मार्गदर्शन करते, उपदेश करते व जीवाचे प्रथम रक्षण करते.  शास्त्र सांगते – नियतं कुरु कर्म त्वम् |

शास्त्रोक्त कार्मामधून जीवाची उन्नती करणे हे शास्त्राचे प्रयोजन आहे.  म्हणून एक तर कर्म चांगले की वाईट हा विचार करण्यात बुद्धि खर्च करण्याचे कारण नाही.  शास्त्र त्याच्या जीवनाचा आधार बनते.  आपोआपच शास्त्रोक्त नित्य-नैमित्तिक कर्मामधील संशयवृत्तीचा निरास होतो.

शास्त्र हेच प्रमाण असल्याने मनुष्य श्रद्धेने व सातत्याने कर्म करतो.  ते कर्म जसेच्या तसे पूर्णपणे तो स्वीकारतो.  शास्त्राचा शब्द हा निर्णायक आहे.  त्याबाबत त्याची निःसंशय वृत्ति होते.  विचारांची स्पष्टता, स्वच्छता येते.  मन द्वंद्वरहित होते.  त्यामुळे कर्मामागील निष्ठेपासून किंवा निर्णायक वृत्तीपासून मनुष्य कधीही ढळत नाही.  त्याचे मन स्थिर होते.


 - "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून,  तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

                                                                     - हरी ॐ

Monday, March 18, 2013

सगुण परब्रह्म? (Manifestation of The Supreme Being)

भगवान गीतेमध्ये म्हणतात –

                               उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः |
                               परमात्मेति चाप्युक्तः देहेSस्मिन्पुरुषः परः || (गीता अ. १३/२२)

परब्रह्म हे वस्तुतः निर्गुण, निर्विशेष, निर्विकार स्वरूप आहे. परंतु उपाधीमुळे ते सविशेष भासते. म्हणून उपाधीच्या दृष्टीने पहिले तर जीव-जगत्-ईश्वर हे भेद मिथ्या आहेत, परंतु  अधिष्ठानाच्या दृष्टीने ते तीन्हीही परब्रह्मस्वरूपच आहेत.

इंद्रियांच्या, मनबुद्धीच्या कक्षेत येणारे विषय ग्रहण करणे एवढेच आज स्थूल बुद्धीला माहीत आहे. ‘यत् दृष्टं तत् सत्यम् |  अशीच सर्वांची कल्पना आहे.  माणूस स्वतःला बुद्धिमान समजतो पण भिंतीपलीकडचेही त्याला समजत नाही, दिसत नाही.  अणु पाहायचा असेल तर सूक्ष्मदर्शीची आवश्यकता आहे परंतु, आत्मा हा तर आणूपेक्षाही सूक्ष्म आहे.  त्यामुळे तो डोळ्यांना दिसत नाही, मनाला अनुभवायला येत नाही, बुद्धीला आकलन होत नाही.  म्हणून आत्मा नाही, असे म्हणणे पूर्णतः अयोग्य आहे.  स्वतःच्या बुद्धीची क्षमता नाही, म्हणून परमेश्वरच नाही असे म्हणणे हीच मोठी अंधश्रद्धा आहे.

याउलट – अस्ति इति विश्वासः श्रद्धा | विश्वाच्या मागे कारण असलेच पाहिजे. मग ते दिसो अथवा न दिसो.  ‘ कारणं विना कार्यं न सिद्ध्यति | ’ कारणाशिवाय कधीही कार्याची सिद्धि होऊ शकत नाही.  या जगड्व्याळ विश्वाच्या मागे अधिष्ठान आहेच.

परंतु – ‘यत् दृष्टं तत् सत्यम् | अशी सत्यत्व बुद्धि असणाऱ्या अज्ञानी साधकाला एकदम अध्यासरहित असणारे निर्गुण, निर्विशेषस्वरूप समजणार नाही, कारण हे ज्ञान बुद्धीच्या अतीत आहे. त्यामुळे अशा सामान्य अधिकारी साधकांना हा सर्व अध्यास आहे, असे समजणे अवघड आहे.  त्यासाठीच पुरुषसूक्तात भगवंताच्या सुंदर अशा विराट पुरुषाची कल्पना करतात व सगुण परब्रह्माचे स्वरूप प्रतिपादित करतात.




- "पुरुषसूक्तम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  जानेवरी २००६  
- Reference: "Purushasuktam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, January 2006

- हरी ॐ


Saturday, March 9, 2013

गुरुनिष्ठेचे महत्व (Importance of the Faith in The Guru)







गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ति किंवा मर्त्य शरीर नसून गुरु हे तत्व आहे. गुरूंच्याकडे कधीही एक व्यक्ति म्हणून पाहू नये. गुरुशिष्यांच्यामध्ये व्यवहार होऊ नये. गुरूंचे शब्द वेदमंत्रांच्याप्रमाणे प्रमाण मानावेत. आज्ञा गुरूणां ह्यविचारणीया ||

गुरूंनी आज्ञा दिल्यानंतर त्यावर विचार करू नये. स्वतःची बुद्धि चालवू नये. म्हणजेच गुरूंच्या आज्ञेमध्ये तडजोड न करता त्या आज्ञेचे, आदेशाचे पालन करावे. गुरूंना पर्याय देणे म्हणजे गुरूंची अवज्ञा केल्यासारखे आहे. गुरूंनी सांगावे आणि आपण ऐकावे.

अशी जर नितांत श्रद्धा उदयाला आली, तर साधकाच्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न शिल्लक राहत नाही. इतकेच नव्हे, तर त्याला श्रुतींचे गूढार्थही तात्काळ आकलन होतात. अंतःकरणामध्ये ईश्वरी तत्वाची दिव्य अनुभूती येते. तीव्र वैराग्य प्राप्त होऊन तत्वदर्शन होते. त्यालाच क्रमाने सहजावस्था, ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. या सर्व गोष्टी केवळ एका गुरुकृपेने प्राप्त होतात. श्रुति म्हणते –

यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ |
तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः || (श्वेत. उप. ६-२३)

ईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरुंच्यावर अनन्यसाधारण भक्ति असेल, नितांत श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल, तर वेदांतातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला समजते. परंतु गुरूंच्याविषयी थोडी जरी श्रद्धा कमी झाली, मनामध्ये संशय, विकल्प आले तरी साधकाचे अधःपतन होते. भगवान म्हणतात –

संशयात्मा विनश्यति | (गीता अ. ४-४०)

म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान परमोच्च आहे. गुरुसेवा हीच साधना, गुरुसेवा हीच तपश्चर्या, गुरुसेवा हीच पूजा आहे ! गुरुसेवा हे सर्वश्रेष्ठ साधना आहे.
- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  एप्रिल २०१२  
- Reference: "Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012

- हरी ॐ