Sunday, November 26, 2017

श्रवण साधनेमधील अडथळे | Obstacles in Shravan Sadhana



एखाद्या अपरिपक्व साधकाने कर्मानुष्ठान न करता हट्टाने संन्यास ग्रहण केला तर त्याला कधीही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याउलट श्रावणादि साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आणि अडथळे येतात.  प्रतिबंध अनेक प्रकारचे आहेत –

१. मनामध्ये विषयासक्ति आणि विषयभोगवासना असल्यामुळे बाह्य सुंदर व मोहक असणारे विषय कामना निर्माण करून मन बहिर्मुख करतात आणि विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  तो विषयांच्याशिवाय जगू शकत नसल्यामुळे विषयांचा त्याग करणे त्याला अत्यंत कठीण होते.  उलट तो विषयांच्या आकर्षणाला बळी पडतो.

२. एखादे वेळी विषयांच्या मगरमिठीमधून सुटका झाली तरी सुद्धा इंद्रिये अतिशय बलवान आणि प्रबल असतात.  त्यामुळे अनेक वर्षांच्या इंद्रियांना लागलेल्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत.  इंद्रियांना विषयसुखाची चटक लागलेली असल्यामुळे ती साधकाच्या मनाला अत्यंत व्याकूळ करून विषयाकडे खेचून नेतात.  यामुळे इंद्रियसंयमन आणि मनःसंयमन सुटते आणि साधक पुन्हा विषयभोगामध्ये रममाण होतो.  

३. प्रयत्नाने आणि अभ्यासाने इंद्रियांच्यावर काही प्रमाणामध्ये संयमन केले, तरी त्याच्यामागे असलेल्या मनामधील अनेक प्रकारचे रागद्वेषादि दोष आणि कामक्रोधादि विकार नाहीसे होत नाहीत.  चित्तशुद्धि नसल्यामुळे ते दोष पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून बाहेर येतात आणि मनामध्ये क्षोभ, संताप, विक्षेप निर्माण होतात. मनाची एकाग्रता खंडित होते.  त्यामुळे मन शास्त्रश्रवणामध्ये राहात नाही.  थोडक्यात मनःसंयमन आणि मनोनिग्रह नसल्यामुळे शास्त्राचा गूढार्थ आणि तत्त्वार्थ स्पष्ट, निःसंशय होत नाही.  

४. काही वेळेला मनामध्ये सुप्त असलेले विषयांचे सूक्ष्म संस्कार आणि विषयभोगवासना कोणत्यातरी प्रसंगाच्या निमित्ताने उफाळून बाहेर येतात व मनाला व्याकूळ, अस्वस्थ करून विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे साधकामधील विवेकवैराग्यादि गुणांचा ऱ्हास होतो आणि श्रवणाची साधना खंडित होते.  

५. सर्वात शेवटी, मनुष्यामधील अहंकार हा फार मोठा अडथळा आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

           
- हरी ॐ

Tuesday, November 21, 2017

संन्यास आणि निष्काम कर्मयोग | Renunciation & Dispassionate Actions



ज्यांनी गुरूगृही जावून श्रद्धा आणि भक्तीने आचार्यांची अनन्य भावाने सेवा केलेली नाही, अंतःकरणशुद्धि प्राप्त केलेली नाही आणि त्यामुळे वेदान्तशास्त्राचे सम्यक व यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त झालेले नाही, असे पारमार्थिक तत्त्व न जाणणारे अविद्वान लोक सर्वकर्मसंन्यास आणि निष्काम कर्मयोग हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाचे आहेत असे म्हणतात.  एका मार्गामध्ये प्रवृत्ति आणि दुसऱ्या मार्गामध्ये सर्व कर्मांच्यामधून पूर्ण निवृत्ति आहे.  त्याचप्रमाणे कर्मयोग अविद्वान गृहस्थाश्रमी साधकांना दिलेला असून सर्वकर्मसंन्यास संन्यस्त वृत्तीच्या विद्वान पुरुषांना दिलेला आहे.  त्यामुळे दोघांचे फळही भिन्न स्वरूपाचे आहे.  दोन्हीही मार्गांमध्ये अधिकारीभेद, साधनभेद आणि फलभेद असल्यामुळे अविद्वान लोक हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाने पाहातात.  

परंतु वेदान्तशास्त्राचे रहस्य जाणणारे पंडित लोक मात्र दोन्हीही मार्ग एकच आहेत असे म्हणतात.  चित्तशुद्धि हेच ज्ञानाचे साधन आहे आणि ही चित्तशुद्धि निष्काम कर्मयोगाचे व उपासनेचे फळ आहे.  श्रुतींच्यामधून प्रतिपादित केलेले ईश्वराचे माहात्म्य, महिमा, ईशनशीलत्व तसेच कर्म-कर्मफळाचे स्वरूप श्रवण करून साधक कर्म व उपासनेमध्ये प्रवृत्त होतो.  कर्म व उपासनेमधून ज्याचे चित्त शुद्ध झालेले आहे त्याच्या अंतःकरणामध्येच हे ज्ञान फलद्रूप होते.  ज्ञानयोग व कर्मयोग यामध्ये साध्य-साधनसंबंध आहे हे सिद्ध होते.  कर्मयोग हे साधन असून ज्ञानयोग हे साध्य आहे.  म्हणून ज्ञानाचे फल मोक्ष आहे व कर्मयोगाचेही फळ क्रमाने मोक्षप्राप्तीच आहे.  

कर्मयोगाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून कर्मयोगनिष्ठा ही उपायनिष्ठा असून ज्ञानयोगनिष्ठा ही उपेयनिष्ठा आहे.  तसेच ज्ञानपूर्वक सर्वकर्मसंन्यासाचेही फळ ज्ञानप्राप्ति हेच आहे.  सर्व कर्तृकारादि प्रत्ययांचा निरास झाल्यावरच ज्ञानप्राप्ति होते.  सर्वकर्मसंन्यासाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून सर्वकर्मसंन्यास हे साधन असून ज्ञाननिष्ठा हे साध्य आहे.  

याप्रकारे कर्मयोगनिष्ठा व सर्वकर्मसंन्यास या दोन्हींचीही परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  कर्मयोग व सर्वकर्मसंन्यास यामध्ये अधिकारीभेद, साधनभेद असले तरीही दोन्हीही मार्गांचे फळ मात्र एकच आहे.  म्हणून मुमुक्षु साधकाने आपल्या अधिकाराप्रमाणे कोणत्याही एका मार्गाचे सातत्याने दीर्घकाळ अनुष्ठान करून त्या मार्गामध्ये निष्ठा प्राप्त केली तर त्याला मोक्षप्राप्ति होते.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ –    

Tuesday, November 14, 2017

नवविधा भक्ति | Nine-Fold Devotion




श्रवण, कीर्तन, स्मरण, चरणसेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व आत्मसमर्पण अशी नऊ प्रकारची भक्ति आहे.

यामध्ये परीक्षित राजासारखी श्रवणभक्ति असावी.  श्रवण करता-करताच त्याचे मन शुद्ध, विरक्त व ज्ञानसंपन्न होऊन त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  दुसरी कीर्तनभक्ति आहे.  नारदमहर्षि, संत तुलसीदास यांच्यासारख्या अनेक संतांनी जीवनभर अखंडपणे नामसंकीर्तन करीत-करीत परमेश्वराची कृपा प्राप्त केली.  काया-वाचा-मनाने परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याचे जीवन कृतार्थ व परिपूर्ण झाले.  ध्रुव बाळभक्त प्रल्हाद हे स्मरणभक्तीची प्रसिद्ध उदाहरणे आहेत.  यांनी अखंडपणे भगवंताचे स्मरण केले.  हजारो जन्मांच्यामधील पापे भस्मसात करण्याचे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे.  फक्त हे नाम आवडीने, मनापासून घ्यावयास हवे.  

पादसेवन म्हणजेच चरणसेवा होय.  बंधु भरत हे चरणसेवेचे उत्तम उदाहरण आहे.  चरणसेवेच्या भावामध्ये मनामधील अहंकार-ममकारादि वृत्ति तसेच सर्व विकार आपोआपच संपतात.  साधक नम्र, विनयशील, नतमस्तक होतो.  राजा अंबरीष अर्चनसेवेने उद्धरून गेला.  अक्रूराने भगवंताची वंदनभक्ति केली.  मनोभावे वंदन करीत असल्यामुळे भगवंताने त्यास आपल्या दिव्य रूपाचे दर्शन दिले.

भक्त हनुमान, लक्ष्मण यांनी जीवनभर दास्यभक्ति केली.  परमेश्वर हा माझा स्वामी व मी त्याचा सेवक, या दास्यत्व भावामुळे त्यांनी अखंडपणे ईश्वराची सेवा केली.  पार्थ अर्जुनाने भगवंताची सख्यभावाने भक्ति केली.  व्रजामधील गोपींनी तर भगवंताच्या चरणी आत्मनिवेदन म्हणजेच स्वतःला समर्पित केले.  आपले संपूर्ण जीवन कृष्णमय करून सर्व कर्मेही भगवंतालाच अर्पण केली.  याप्रमाणे भक्तीचा भावच साधकाला परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जातो.  



- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, November 7, 2017

काय निवडावे ? | What to Choose ?



भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |  ‘भज’ याचा एक अर्थ म्हणजे निवडणे.  तू गोविंदाला भज म्हणजे तू गोविंदाचीच निवड कर.  विश्वामध्ये निवडण्यासाठी दोनच वस्तु आहेत.  एक आहे विश्व व दुसरा आहे परमेश्वर !  या दोन्हींपैकीच काहीतरी एक निवडले पाहिजे.  काय निवडावे ?  याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.  तरीही इथे आचार्य सांगतात की, हे मनुष्या !  तू विश्व व क्षणिक विषय, भोग यांना निवडण्यापेक्षा आनंदस्वरूप गोविंदालाच आयुष्यात निवड.  त्यामध्येच तुझ्या जीवनाचे कल्याण आहे.

दोन वस्तूंच्यामधून एक निवडणे हे बुद्धीचे कार्य आहे.  मनुष्य बुद्धीने विचार करून सतत काहीतरी निवडत असतो.  विषय, भोग, यांचा निवाडा करून त्यांची प्राप्ति करून उपभोगतो.  पुन्हा त्या विश्वामधील विषयच निवडतो.  परंतु वस्तुतः विश्वामध्ये विषय व परमेश्वर अशा दोनच वस्तु आहेत.  यांपैकी सर्वसामान्यतेने सर्व जीव विषयांनाच महत्व देतात.  आपण या दृश्य विश्व व विषयांना सत्य मानले आहे.  त्यामुळे त्यांनाच महत्व देऊन विषयांची प्राप्ति व विषयांचे येथेच्छ भोग घेणे, हेच आपले जीवन बनले आहे.  

प्रत्येक मनुष्य जन्माला येतो.  जन्मल्यापासुनच त्याच्या अवतीभोवती अनेक विषय व भोग त्याला दिसतात.  विषयांच्या संगाने त्याच्या मनात विषयांच्याच अनंत कामना निर्माण होतात.  त्यामुळे तो या विषयांनाच निवडतो.  आयुष्यभर विषयांच्या प्राप्तीसाठीच परिश्रम करीत राहतो.  परंतु दुर्दैवाने सर्व विषय मिळवून व भोगून सुद्धा त्याच्या मनाची शांति होत नाही.  विषय सतत मनुष्याला अतृप्त, असमाधानीच ठेवतात.  विषयांच्या संगाने मनुष्याचे क्रमाने अधःपतन होते.  जितके विषय अधिक तितक्या प्रमाणात क्षोभ, संताप, अपेक्षाभंग निर्माण होऊन मन उद्विग्न, अस्थिर होते.  

म्हणूनच भगवान अर्जुनाला आदेश देतात –
अनित्यमसुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम् |  (गीता अ. ९-३३)
हे अर्जुना !  या अनित्य, दुःखयुक्त मर्त्यलोकामध्ये जन्माला आल्यानंतर तू माझे – परमेश्वराचेच भजन कर.


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Mataji Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ