Tuesday, December 29, 2020

अभ्यासयोग | Meaning of “Abhyas Yog”

 



अभ्यास म्हणजे काय ?  ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा त्या विषयाची पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आवृत्ति करणे होय.  म्हणजे त्याच स्वरूपाची अप्रतिबद्ध, अखंड वृत्ति निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  येथे अभ्यासाचा विषय आहे निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूप !  त्याच्या अभ्यासासाठी प्रथम साधकाने आपल्या चित्तवृत्ति सर्व विषयांच्यापासून निवृत्त केल्या पाहिजेत.  साधकाने आपले मन भूतकाळातील प्रसंग आणि विषयांच्या आठवणीने क्षुब्ध न करता आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रसंगांनी चिंताग्रस्त न होता संपूर्ण निवृत्त करावे.

 

साधकाने तीव्र विवेकजन्य वैराग्याचा अभ्यास करावा.  विवेकाच्या साहाय्याने विषयांच्या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषय हे अनित्य, नाशवान असून सुखसंवर्धन करण्याऐवजी दुःखालाच कारण होतात.  ते मनुष्याला शृंखलाप्रमाणे आसक्ति निर्माण करून बद्ध करतात.  हे समजेल, उमजेल त्याचवेळी विषयांची तृष्णा कमी होईल.  या सर्व मानसिक बंधनामधून, संसारामधून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे.  थोडक्यात तीव्र वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्वाची आवश्यकता आहे.

 

अशा अंतर्मुख, विवेकवैराग्यसंपन्न आणि एकाग्र चित्ताने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  सद्गुरू हेच संसारामधून मुक्त करून मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त करून देणारे आहेत.  तेच उद्धार करणारे आहेत.  म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून अनन्य भावाने त्यांची काया-वाचा-मनाने अखंड सेवा करावी.  साधकाचे मन संपूर्ण गुरुमय झाले पाहिजे.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच सेवा आणि गुरु हीच उपासना.  अशा प्रकारच्या प्रदीर्घ सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे चित्तामध्ये आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण होते आणि अनात्मवृत्ति हळूहळू गळून पडते.

 

स्वयंप्रकाशमान, निर्गुण, निराकार, जन्ममृत्युरहित, सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारा पुरुष प्राणरहित, मनरहित, अत्यंत शुद्ध असून अव्यक्तस्वरूप असलेल्या अज्ञानाच्याही पलीकडे आहे.  तमसः परमुच्यते |  तो अज्ञानाच्या पलीकडे असलेला पुरुष ‘मी’ आहे.  याप्रकारे अभ्यासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अनात्मवृत्तीचा – देहात्मभावाचा तसेच अहंकार-ममकाराचा त्याग करून आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी.  यालाच अभ्यास, योग असे म्हटले आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, December 22, 2020

अंतःकाळी परमेश्वराचे स्मरण | Remembering God at the End

 



जो यति अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करून देहत्याग करतो, तो परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होतो.  येथे या विधानाचा शाब्दिक अर्थ घेता येणार नाही.  अंतकाळी केवळ मुखाने ‘नारायण’ किंवा ‘श्रीराम’ वगैरे शब्द उच्चारणे म्हणजे परमेश्वराचे स्मरण होत नाही.  स्मरण करणे हे ओठांचे कार्य नाही तर मनाचे लक्षण आहे.  म्हणून स्मरण करतेवेळी ज्या विषयांचे आपण स्मरण करतो त्या विषयाची वृत्ति अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे.  तरच ते स्मरण होऊ शकते.

 

अज्ञात वस्तूचे कधीही स्मरण करता येत नाही.  जी वस्तु आयुष्यामध्ये कधीही अनुभवलेली नाही किंवा ज्या वस्तूचे ज्ञान नाही, अशा वस्तूचे स्मरण करता येत नाही.  अंतकाळी परमेश्वराचे नाम ओठावर आले म्हणजे मोक्ष मिळतो असे नाही, तर त्या नामाचा मनावर संस्कार व्हावा लागतो.  आत्यंतिक ओढ, निरतिशय प्रेम असल्याशिवाय कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची अगर विषयाची तळमळ मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही.

 

अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करण्यापूर्वी त्यापूर्वी जन्मभर अखंडपणे परमेश्वराबद्दल आत्यंतिक ओढ, निस्सीम प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे.  तरच अंतकाळी परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.  म्हणून परमेश्वर हाच शाश्वत, नित्य असून अन्य सर्व विषय अनित्य, नाशवान असल्यामुळे परमेश्वरावरच प्रेम करावे.  पूजन, भजन कीर्तन, सेवा यामधून जन्मभर परमेश्वराचे प्रेम, भक्ति उत्कर्षित करण्याचा अभ्यास करावा.  यासाठीच महात्म्यांचा किंवा ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  या सर्वांचा परिपाक म्हणजे अन्य सर्व विषयांविषयी तुच्छ वृत्ति निर्माण होऊन परमेश्वराच्या स्वरूपाची वृत्ति दृढ व्हावयाला लागेल.  काया-वाचा-मनाने नित्य-निरंतर परमेश्वराचा ध्यास लागेल आणि अंतकाळी अनायासाने परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.

 

सद्गुरूंच्या कृपेने वेदान्तशास्त्राच्या उपदेशाचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे आणि मननाने सर्व संशायांचा निरास करावा.  ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ ही वृत्ति दृढ करावी.  याचा परिपाक म्हणजे स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक सुस्थिति प्राप्त होते.  असाच यति अंतकाळी अभेदरूपाने स्मरण करून शरीराचा त्याग करतो आणि माझ्या स्वरूपाला म्हणजेच निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो.  त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 15, 2020

अध्यात्म म्हणजे काय ? | Meaning of “Adhyatma”

 



ज्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडाला सूर्य प्रकाशमान करतो.  त्याप्रमाणे देहापासून बुद्धिपर्यंत सर्व प्रकाशमान करण्यासाठी अधिष्ठानस्वरूपाने जो राहातो त्याला ‘अध्यात्म’ म्हणतात.  किंवा – आत्मानं देहं अधिकृत्य प्रत्यगात्मतया प्रवृत्तं परमार्थब्रह्मावसानं वस्तु स्वभावः अध्यात्मम् उच्यते |  आत्म्याला म्हणजेच शरीराला आश्रय करून प्रत्यगात्मस्वरूपाने जो राहातो आणि शेवटी पारमार्थिक ब्रह्मस्वरूपच आहे, त्याला अध्यात्म म्हटले जाते.  यावरूनच अध्यात्मविद्या किंवा अध्यात्मशास्त्र हे शब्द प्रचलित झाले.

 

आत्मानं अधिकृत्य प्रत्यगात्मतया यत् प्रवृत्तं विद्या सा अध्यात्मविद्या |  जी विद्या आत्म्याचा म्हणजे शरीराचा आश्रय घेऊन प्रत्यगात्मस्वरूपाच्या वस्तूचे ज्ञान देते, त्या विद्येला अध्यात्मविद्या म्हणतात.  म्हणून अध्यात्म म्हणजे शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, अहंकार किंवा अज्ञान नाही, तर या सर्वांच्या पलीकडे असलेले स्वयंप्रकाशमान प्रत्यगात्मस्वरूप होय.  ते स्वरूप प्रकट करण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे.

 

शरीर हे स्वभावतः जड, अचेतन आहे.  या जड प्रकृतीला, कार्यकारणसंघाताला चेतना देण्यासाठी जो शरीरामध्ये आहे, परंतु जो शरीरापासून भिन्न आहे, तो कार्यकारणसंघाताचा एक अवयव किंवा भाग होत नाही.  तो सर्वांच्यापासून भिन्न आहे.  त्याच्या केवळ सत्तेमुळे अंतःकरणाला सत्ता आणि स्फूर्ति किंवा चेतना मिळते.  हे चेतनयुक्त अंतःकरण स्थूल शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे शरीराला चेतना मिळते.  शरीर जिवंत असल्यासारखे वाटते.  तप्यायः पिण्डवत् |  ज्याप्रमाणे लोखंडाचा थंड, अचेतन गोळा अग्नीच्या संसर्गामुळे तेजःपुंज दिसतो.  त्याचप्रमाणे अचेतन, जड शरीराला जो चेतना देणारा आहे, तो प्रत्यगात्मा म्हणजेच अध्यात्म होय.  म्हणून अध्यात्म हे करावयाचे नसते, जाणवायचे असते.

 

अध्यात्म हेच परब्रह्माचे स्वरूप आहे.  स्वभाव आहे.  स्वभाव म्हणजेच अध्यात्म.  स्वस्य आत्मनः भावः इति स्वभावः |  स्वतःच्या स्वरूपाच्या भाव म्हणजे स्वभाव होय.  जो स्वयंसिद्ध असतो तोच स्वभाव आहे आणि जो स्वभाव आहे तेच स्वरूप असते.  तेच तत्त्व सर्वांच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 8, 2020

मायेचे आवरण व विक्षेपशक्ति | Veiling and Distortion by Maya

 



मायेला दोन प्रकारच्या शक्ति आहेत –

 

१) आवरणशक्ति – यामुळे स्वस्वरूपावर अज्ञानाचे आवरण येऊन, असूनही त्याची प्रचीति येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  जसे गडद अंधारात वस्तु असूनही दिसत नाही.  त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचे स्वस्वरूपावर आवरण आलेले आहे.  भगवान म्हणतात -

धूमेनाव्रियते वन्हिः यथादर्शो मलेन च |

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ||          (गीता अ. ३-३८)

ज्याप्रमाणे अग्नि धुराने झाकला जातो, आरसा धुळीने आणि गर्भ वारेने आवृत्त होतो, त्याप्रमाणे मायाशक्तीने स्वस्वरूपला आवृत्त केलेले आहे.  

 

२) विक्षेपशक्ति – यामुळे एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा भास होतो.  यालाच अन्यथाग्रहण अथवा विपरीतग्रहण असे म्हटले जाते.  जसे रज्जूच्या ठिकाणी रज्जू न दिसता सर्पाची प्रचीति येते.  त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची प्रचीति न येता दृश्य शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे देहात्मबुद्धि निर्माण होऊन अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं सुखी, अहं दुःखी, अहं जन्ममृत्युयुक्तः, अहं ब्राह्मणः, अहं वैश्यः या कल्पना निर्माण होतात.  ‘अहं’ भोवतीच्या या सर्व कल्पना मायेमुळेच उदयाला येतात.  वर्णाश्रम, धर्म, जात, सत्ता, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सौंदर्य या सर्वांचाच अभिमान वाटतो.  यालाच विपरीत दर्शन असे म्हणतात.  

 

मायेमुळे, अज्ञानामुळे या अहंकाराचे सतत पोषण होते; परंतु हीच माया जीवनात असे काही आघात करते की, त्यामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे असणाऱ्या या सर्व कल्पनांचा चक्काचूर होतो.  अहंकाराला तडा जातो.  फुगा खूप फुगविल्यावर जसा फुटतो तसेच अहंकार खूप वर्धन पावला तर त्याचा ही नाश होतो.  जीवनात अनेक संकटे, प्रतिबंध येतात.  मनावर आघात होतात.  हा मायेचाच खेळ आहे.  त्याचवेळी मनुष्य नम्र, विनयशील, अगतिक होतो.  त्याची परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होते.  त्यामुळे जीवनामध्ये संकटे अथवा प्रतिकूल परिस्थिति येणे ही मायेची कृपाच आहे, कारण सर्व सुरळीत, व्यवस्थित चालले असेल तर आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Tuesday, December 1, 2020

मायेचे पाच प्रतिबंध | Five Roadblocks to Realization

 


परब्रह्मस्वरूपावर त्रिगुणात्मक मायेचे आवरण आलेले आहे.  अशा या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे, कारण ही माया अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण करते.  

 

१) विषय हाच पहिला प्रतिबंध आहे.  मनुष्य सुखासाठी पूर्णतः विषयांच्यावरच अवलंबून राहातो.  विषयांच्यामध्येच आसक्त होऊन तो विषयांचा गुलाम होतो.  विषय त्याला बद्ध करतात.  मनुष्य या विषयांच्या आकर्षणामधून सुटू शकत नाही.

२) विषयांच्या उपभोगांचा त्याग केला तरी इंद्रिये स्वस्थ बसू देत नाहीत.  बुद्धिमान, विवेकी पुरुषांची इंद्रिये सुद्धा त्याच्या मनाला खेचून विशायांच्याकडे नेतात.  त्यावेळी सर्व तत्त्वज्ञान, विवेक संपतो व मनुष्य इंद्रियांच्या स्वभावाप्रमाणे स्वैर, उच्छृंखल वर्तन करतो.  

३) इंद्रियांच्यावर काही प्रमाणात संयमन केले, तरीही मन हा तिसरा प्रतिबंध आहे.  विषयांसाठी मन व्याकूळ होते.  विषय मिळाले नाहीत तर ते चिडखोर, क्रोधाविष्ट होते.  असे मन शास्त्रश्रवणामध्ये एकाग्र, तल्लीन, तन्मय होऊ शकत नाही.  नव्हे शास्त्रश्रवणासाठी मन उपलब्धच होत नाही.  

४) विषयांचे आकर्षण कमी केले, इंद्रिये व मन यांचे काही प्रमाणात नियमन केले, तरीही अंतःकरणामध्ये विषयांच्या सूक्ष्म भोगवासना असतात.  वरवरच्या स्थूल कामना गळून पडल्या की, या सूक्ष्म भोगवासना उफाळून बाहेर येतात.  संकल्प निर्माण करतात.  मनाला अस्वस्थ, व्याकूळ करतात आणि पुन्हा विषयभोगामध्येच प्रवृत्त करतात.  

५) या सर्व प्रतिबंधांना पार केले तरी सर्वात शेवटचा प्रतिबंध म्हणजे ‘अहंकार’ होय.  ज्ञानग्रहण करण्यामध्ये अहंकार आणि अहंकारामधून निर्माण झालेल्या कल्पना हा फार मोठा प्रतिबंध आहे.  त्यामुळे ज्ञान घेत असताना सतत द्वंद्व निर्माण होऊन ज्ञान आत्मसात होत नाही.  अहंकार मनुष्याला समर्पण होऊ देत नाही.

 

मायेने निर्माण केलेल्या अशा प्रतिबंधांच्यामुळे आपल्याजवळच तो आनंदाचा सागर असूनही आपल्याला त्याची प्रचीति येऊ शकत नाही.  अशी योगमाया अत्यंत सामर्थ्यशाली असून ती मोहजाल पसरते.  अनेक युक्त्या करते.  अनेक प्रकारांनी जीवांना भुलविते, खेळविते, नाचविते, नजरबंदी करते.  कोणालाही परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही.  जणु काही ती माया सर्व जीवांची परीक्षा घेते.  परमेश्वरच त्या मायेला परीक्षा घेण्याची आज्ञा देतो.  

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ