Tuesday, November 29, 2016

जीवनात कर्माचे प्रयोजन | Role of Karma (Action) in Life


कर्म करावे की न करावे हे मनुष्यावर अवलंबून नाही.  जीवाने स्वकर्तृत्वाने कर्माची निर्मिति केलेली नसून विश्वकर्त्या परमेश्वराने विश्व निर्माण करीत असतानाच सर्व जीवांची उन्नति व्हावी म्हणून कर्म हे साधन दिलेले आहे.  त्यामुळे कर्म हे ईश्वरनिर्मित आहे.  जे ईश्वराने निर्माण केलेले आहे ते कोणीही थांबवू शकत नाही किंवा टाळूही शकत नाही.  म्हणून विश्वामध्ये कर्म हे अटळ आहे.  हा विश्वाचा नियम आहे.

त्यानुसार शरीर धारण केलेल्या प्रत्येक जीवाला सुद्धा हे कर्म अटळ आहे.  फक्त त्या कर्माचा उपयोग कसा करावयाचा, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे.  ज्याप्रमाणे, चाकू एखाद्याचा प्राण घेवू शकेल किंवा तोच चाकू एखाद्याचा जीव वाचवू शकेल.  चाकूने काय करावयाचे व काय करावयाचे नाही, हे चाकू ठरवीत नसून ज्याच्या हातामध्ये चाकू असतो त्या मनुष्याच्या मनामधील संकल्प ठरवितो.  त्याचप्रमाणे कर्माचा योग्य रीतीने सदुपयोग केला तर ते कर्म जीवनामध्ये सुसंगति आणि उत्कर्षाचे साधन होईल.

थोडक्यात कर्म करण्याचे स्वातंत्र्य जरी मनुष्याला असले तरीही कर्म करावे की न करावे याचे स्वातंत्र्य त्याला नाही, कारण कर्म हे ईश्वरनिर्मित असल्यामुळे ती ईश्वराज्ञा आहे.  जिज्ञासु मोक्षार्थी मनुष्याने कर्मफळाची अपेक्षा न करता वेदप्रतिपादित विहित कर्म ईश्वरार्पणबुद्धीने, सेवावृत्तीने करून जीवन जगावे.  यामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त होवून त्याचे अंतःकरण शुद्ध, निर्मळ होईल आणि तो साधनचतुष्टयसंपन्न होवून आत्मज्ञानप्राप्तीसाठी अधिकारी होईल.  क्रमाने गुरूंच्या कृपेने ज्ञानप्राप्ति होवून मोक्षप्राप्ति होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Monday, November 21, 2016

मूढ व दुष्टांचा नाश | Fools and Wicked are Destroyed


श्रद्धावान, असूयारहित साधकांच्या विपरीत असलेले जे अविवेकी, अहंकारी, दुष्ट बुद्धीचे अविद्वान लोक अहंकारामुळे परमेश्वराचा आदेश मानीत नाहीत.  त्यांची बुद्धि असूयेने आणि अहंकाराने प्रवृत्त झालेली असल्यामुळे सर्वगुणसंपन्न, कर्तुं-अकर्तुं परमेश्वराची सत्ता मानायला तयार होत नाही.  परमेश्वराचा आदेश हा प्रमाणभूत न मानता स्वबुद्धीला प्रमाण मानून मीच कर्तुं-अकर्तुं आहे, या भावाने अहंकाराने प्रेरित होवून मन मानेल त्याप्रमाणे कर्मामध्ये प्रवृत्त होतात.

ते असुरी संपत्तीने युक्त असलेले वेदप्रतिपादित कार्मानुष्ठान न करण्यातच सुख मानणारे आणि खावे, प्यावे, मजा करावी अशा प्रकारच्या तमोगुणप्रधान कर्मामध्येच रममाण होणारे विपरीत बुद्धीचे लोक नष्ट होतात.  म्हणजेच पुण्यलोक असणाऱ्या मनुष्यलोकापासून च्युत होतात.  मनुष्य देह धारण करूनही ते पशुतूल्य जीवन जगतात.

जे दुराग्रही लोक माझ्या मताचे म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुसरण न करता कर्मफलाच्या इच्छेने स्वउपभोगासाठीच कर्मप्रवृत्त होतात ते निश्चितपणे हळूहळू नाश पावतात, कारण कर्मफलाच्या अपेक्षेमुळे स्वतःच्या कर्तृत्वानेच ते कामक्रोधादि विकार निर्माण करतात.  यामुळे त्यांचे मन अत्यंत अशुद्ध, अस्वस्थ, क्षुब्ध होवून त्यांचे जीवन असह्य होते.

थोडक्यात परमेश्वरावर श्रद्धा असूनही कामुकतेने प्रेरित झाल्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये चित्ताची शुद्धि आणि निर्मळता प्राप्त होत नाही.  तसेच, सद्गुणांची जोपासना होत नाही आणि आंतरिक सुख, शांति प्राप्त होत नाही.  उलट त्यांचे जीवन दुःख आणि यातनेनेच भरलेले असते.  हाच मनुष्याचा नाश होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, November 15, 2016

सनातन धर्माची वैशिष्ट्ये | Characteristics of Sanatan Dharma



परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||          (गीता अ. ४-८)

वेदप्रतिपादित सनातन धर्माची काही ठळक वैशिष्ट्ये दिसतात –

१. अन्य सर्व धर्म कोणत्या तरी महान पुरुषांनी स्थापन केलेले आहेत.  परंतु सनातन धर्म मात्र मनुष्यनिर्मित नसून ईश्वरनिर्मित आहे हे सिद्ध होते.

२. अन्य कोणत्याही धर्मामध्ये अवतार मानलेला नाही.  याउलट सनातन धर्मामध्येच परमेश्वराचा अवतार शास्त्राने सिद्ध केलेला आहे.  अवतारकार्यामध्ये परमेश्वराने धर्माचा उच्छेद करणाऱ्या अधार्मिक नराधमांचा – असुरांचा नाश केला.  धर्मजागृति करावयाची असेल तर प्रथम धर्मानुष्ठान करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा, भक्ति, धर्मनिष्ठा निर्माण होणे आवश्यक आहे.  तसेच धर्माचरण करण्यासाठी समाजामध्ये योग्य ते अनुकूल वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

३. कोणत्याही अवतारामध्ये भगवंतांनी नवीन धर्माची स्थापना केलेली नाही.  तर अनादि काळापासून आलेल्या वेदप्रतिपादित धर्माची पुन्हा पुन्हा स्थापना केली.  आवश्यकतेनुसार आणि काळानुरूप धर्मजागृति केली.  परंतु अन्य धर्मांची स्थापना केलेली आहे.

४. परमेश्वराचा अवतार पापपुण्यात्मक कर्मामुळे झालेला नसल्यामुळे त्याला स्वातंत्र्य आहे.  अवतारामध्ये तो कर्माने बद्ध नसून तो प्रकृतीच्या अधीन नसतो.  तसेच सगुण, साकार होऊन सुद्धा त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होत नाही.  तो नित्य पूर्ण, सच्चिदानंदस्वरूप असून मुक्त आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, November 8, 2016

परमेश्वर अवतार का घेतो ? | Why God Incarnates ?



सर्व वर्णाश्रमादि प्राणिमात्रांच्या अभ्युदयासाठी आणि निःश्रेयसप्राप्तीसाठी धर्म हेच साधन आहे.  त्याच्या सम्यक अनुष्ठानाने मनुष्याच्या ऐहिक आणि पारलौकिक इच्छा पूर्ण होऊन समृद्धी, भरभराट व स्वर्गप्राप्ति होते.  तसेच तोच धर्म निष्काम वृत्तीने अनुसरण केल्यास चित्तशुद्धीद्वारा मोक्षप्राप्तीचे साहाय्यकारी साधन होतो.  अशा प्रकारच्या प्रवृत्ति आणि निवृत्ति लक्षणांनी युक्त असलेला धर्म नाश पावतो.  म्हणजेच त्याचे अनुसरण करणारे लोक समाजामध्ये कमी होतात.  त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाल्यासारखा दिसतो.

याचे कारण अर्थ आणि कामाने प्रेरित झालेले, राजोतमोगुणांनी युक्त असलेले, असुरीसंपत्तीने  युक्त असलेले असुरी वृत्तीचे भोगवादी कामांध लोक त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या धाकाने आणि सत्तेच्या सामर्थ्याने व स्वबलाने धर्माचरण करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचा त्रास, पीडा देतात.  धर्माचरणामध्ये विघ्ने आणून सर्वत्र दशहतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करतात.  सर्वसामान्य धार्मिक लोकांचे जीवन विस्कळीत करतात.  त्यांना धर्माने आणि सदाचाराने जगू देत नाहीत आणि बळजबरीने धर्माचरणापासून निवृत्त करून अधर्मामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे समाजात गोंधळ निर्माण होऊन असुरी प्रवृत्तीच्या आचारामुळे धर्माचरण व धर्मानुष्ठान करणाऱ्यांची संख्या कमी होते.  यामुळे वैदिक धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उत्कर्ष होतो.

सर्व वर्णाश्रमामध्ये कर्तव्याचा त्याग झाल्यामुळे, भोगवासना प्रबल झाल्यामुळे समाजामध्ये हिंसाचार वगैरे वाढतो आणि पर्यायाने समाजाचे, कुटुंबाचे आणि व्यक्तीचे अधःपतन होते.  लोकांच्या जीवनावर धर्माचे असलेले नियमन नाहीसे होते.  थोडक्यात सर्व समाजामध्ये धर्माचे अनुष्ठान कमी होऊन अधर्माचा उत्कर्ष होतो.  अशा वेळी धर्माचे अनुसरण करणाऱ्या धार्मिक लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी व अधार्मिक हिंसाचारी लोकांचा नाश करण्यासाठी, तसेच त्यांचे नियमन करण्यासाठी मी - परमेश्वर कालानुरूप माझ्या योगमायेच्या साहाय्याने अनुरूप देह धारण करतो.  अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, November 1, 2016

परमेश्वर अवताराचे स्वरूप | Nature of God’s Incarnation


परमेश्वराचा अवतार कोणत्या स्वरूपाचा आहे ?  तो पारमार्थिक आहे का ?  कधीच नाही, कारण परमेश्वराची उपाधी मायिक असल्यामुळे अवतारकार्य सुद्धा मायिकच आहे.  स्वप्नाप्रमाणे परमेश्वर मायेमधून विश्वरचना करून अनेक प्रकारचे जीव निर्माण करतो.  अशा मायिक भासात्मक विश्वामध्ये तो माया – उपाधी निर्माण करतो आणि कार्य करतो.  परंतु हा अवतार आणि कार्य स्वप्नाप्रमाणे काल्पनिक, भासात्मक, मायिकच आहे. तो एक केवळ भास आहे.

सर्व जीव अवताराचे खरे स्वरूप न समजता उपाधीला सत्यत्व देतात.  त्यामुळे त्यांना अवतार आणि अवतार कार्य सत्य वाटते.  परंतु प्रत्यक्षात मात्र भगवान कधीही आला नाही आणि गेलाही नाही.  त्याने काही कार्यही केलेले नाही.  हेच पारमार्थिक सत्य आहे.  जे दिसते ते सर्व मायिक आहे.  न जायते म्रियते वा कदाचित् |  या वचनाप्रमाणे त्याला जन्म नाही किंवा मृत्यु नाही.  

मग अवताराला कोणती सत्ता आहे ?  रज्जुसर्पवत् |  रज्जूवर सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे !  सर्पाला कोणतीही व्यावहारिक सत्ता नसून काल्पनिक, भासात्मक सत्ता आहे, कारण सर्पाची निर्मिति काल्पनिक आहे.  

याप्रमाणे भगवंताचा अवतार व्यावहारिक आणि पारमार्थिक नाही.  तर सर्पाप्रमाणे प्रातिभासिक आहे.  म्हणून येथे आत्ममायया संभवामि |  म्हटले आहे.  किंवा - संभवामि देहवान् इव भवामि |  या विधानामध्ये आचार्यांनी ‘इव’ हा शब्द योजला आहे.  जणु काही मी देहावान झाल्यासारखा भासवितो.  परंतु परमेश्वर स्वतः मात्र निर्गुण, निराकार आहे हेच भगवंताच्या अवताराचे रहस्य आहे.   


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ