Tuesday, December 26, 2017

प्रकृती आणि परमात्मा | Nature and the Supreme Being



त्रिगुणात्मक प्रकृति, त्या प्रकृतीमधून निर्माण होणारी कर्मे व त्यांची सुखदुःखादि फळे या सर्वांचा परमात्मा “साक्षी” आहे.  तो स्वतः काहीच करीत नाही. त्यामध्ये कर्तृत्व-कारयितृत्व, सुखदुःख, पापपुण्यात्मक कर्म-कर्मफळ काहीच नाही.  तर तो स्वतः अविकारी स्वरूपाचा असून कूटस्थसाक्षीचैतन्यस्वरूपाने राहातो.  काय करावे व काय करू नये हे तो ठरवीत नसून प्रकृतीलाच सर्व काही स्वातंत्र्य आहे.  तो या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या सर्व व्यापारापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी आहे.  

नाटकदीपवत् |  नाटकगृहातील दीप जसा नाटकामधील सर्व प्रसंगांचा साक्षी असतो.  तो कोणत्याही प्रसंगाने, घटनेने स्पर्शित, लिप्त न होता अखंडपणे प्रकाशस्वरूपाने, साक्षीस्वरूपाने राहातो.  परमात्मा हा प्रकृतीच्या सर्व क्रिया चालू असतील तरी स्वतः मात्र अविकारी, उपद्रष्टा राहातो. स्वस्वरूपामध्ये अनायासाने, सुखाने, काहीही न करता व न करविता स्वस्थ राहातो.  जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे, हे सिद्ध होते.  ही अविद्यालक्षणाने युक्त असलेली त्रिगुणात्मक प्रकृति सर्व जीवांच्या अंतःकरणावर अज्ञानाचे आवरण घालते.  यामुळे मोहीत झालेले सर्व जीव कर्मप्रवृत्त होवून कर्म-कर्मफळामध्ये बद्ध होतात.  

भगवान म्हणतात – दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |  (गीता अ. ७-१४)
हे अर्जुना  !  या त्रिगुणात्मक असणाऱ्या माझ्या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे.  ही दैवी म्हणजेच ईश्वराची माया, योगमाया अलौकिक, अनाकलनीय आहे.  ही मायाशक्ति विश्वाची, सर्व जीवांची निर्मिती करते, त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण घालून अनेक प्रकारचे मोह निर्माण करून जीवांना भुरळ पाडते.  हीच माया जीवाच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, रागद्वेष, कामक्रोधादि विकार निर्माण करते.  जीवाला विषयाभिमुख व विषयासक्त करून बंधनामध्ये अडकविते.  म्हणजे स्वभावच जीवाला संकल्प निर्माण करून कर्मप्रवृत्त करतो व कर्मफळाने बद्ध करतो.  परंतु आत्मा मात्र प्रकृतीचा, प्रकृतीच्या गुणांचा, सर्व कर्मांचा, कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सुखदुःखादि अनुभवांचा साक्षी आहे.  तो या कशानेही बद्ध, स्पर्शित होत नाही.  तो नित्य, अविकारी स्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, December 19, 2017

त्रिगुणात्मक प्रकृती | Prakriti – The Prime Driver



परमात्मा तर जीवाला कर्मप्रवृत्त करीत नाही किंवा त्याला सुखदुःखात्मक इष्टानिष्ठ फळही देत नाही.  परंतु प्रत्यक्ष अनुभव जर पाहिला तर जीव अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला दिसतो. तसेच तो अनेक प्रकारची सुखदुःखादि कर्मफळेही उपभोगतो.  मग त्या जीवाकडून कर्म करवून घेणारा तसेच जीवाला त्याच्या कर्मांची फळे देणारा कोण आहे ?  आत्म्यामध्ये जर कर्तृत्व-कारयितृत्व वगैरेदि प्रत्ययांचा अत्यंत अभाव असेल तर हे प्रत्यय कोणामुळे निर्माण होतात.  या शंकेवर भगवान स्वतःच उत्तर देतात – स्वभावस्तु प्रवर्तते |  

स्वभावच सर्व जीवांना कर्मप्रवृत्त करतो, कर्म करवून घेतो आणि कर्मफळ देतो.  स्वभावच जीवाच्या मनामध्ये प्रवृत्ति म्हणजे संकल्प निर्माण करतो.  स्वभाव म्हणजेच प्रकृति होय.  ही वासनामय प्रकृति त्रिगुणात्मक असते.  हीच जीवाच्या अंतःकरणामध्ये सात्त्विक, राजसिक, तामसिक वासना निर्माण करते.  मागील अनेक जन्मांच्यामध्ये या वासनांचा संग्रह केलेला असतो.  या सूक्ष्म वासना जेव्हा फलद्रूप होतात तेव्हा त्याचेच रूपांतर संकल्पामध्ये होवून तो जीव प्रकृतीच्या, वासनांच्या अधीन होवून त्या वासना, संकल्प पूर्ण करण्यासाठी कर्मप्रवृत्त होतो.  ही प्रकृति जीवाकडून सर्व प्रकारची कर्मे करवून घेते आणि जीवाला त्याची कर्मफळे उपभोगावयाला लावते.  

मागील अनेक जन्मांच्या वासना असल्यामुळे मनावर त्याचा फार मोठा प्रभाव असतो.  या सूक्ष्म वासना घेवूनच जीव जन्माला येत असतो.  त्यामधूनच प्रत्येकाचा स्वभाव बनतो.  प्रत्येकाचा स्वभाव, म्हणजेच प्रकृती भिन्न-भिन्न स्वरूपाची असते.  त्यामुळे प्रत्येकाचा एक विशिष्ट स्वभाव बनतो, कारण त्यामध्ये त्रिगुणांचे कमी-जास्त प्रमाण असते.  प्रत्येक जीव या प्रकृतीच्या अधीन असतो.  त्याचा स्वभावच त्याच्यावर नियमन करतो.  ही प्रकृतीच प्रत्येक जीवाला कर्मामध्ये प्रवृत्त करते.  ही प्रकृति वासना निर्माण करून जीवाला चांगल्या-वाईट कर्मात प्रवृत्त करते.  म्हणून जशी वासना असेल तसेच कर्म त्याच्या हातून घडते.  तीच प्रकृति जीवाला सुखदुःख उपभोगण्यास लावते.

जीव या वासनामय प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तो काहीही करू शकत नाही.  स्वतःच्या स्वभावावर तो नियंत्रण करू शकत नाही.  म्हणून जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Monday, December 11, 2017

मृगजळ आणि विश्वाचे मिथ्यात्व | Discovering Futility through Mirage



जोपर्यंत मृगजळाचे खरे स्वरूप समजत नाही, तोपर्यंत तो भास सत्य वाटतो.  यामुळे प्रत्यक्षामध्ये तेथे पाणी नसूनही पाणी आहे असे वाटून हरीण तहान शमविण्यासाठी त्या दिशेने धावते.  इतकेच नव्हे तर, मनुष्य सुद्धा पाण्याच्या दिशेने जातो.  परंतु स्वानुभवाने जेव्हा ते पाणी नाही तर, पाण्याचा केवळ भासच आहे हे समजते, त्यानंतर डोळ्यांनी जरी पाणी पाहिले तरी मनुष्यामध्ये प्रवृत्ति दिसत नाही.  

त्याचप्रमाणे जोपर्यंत या दृश्य विश्वाचे असलेले अधिष्ठान – परब्रह्मस्वरूप समजत नाही तोपर्यंत बुद्धि विश्वाला सत्यत्व देते आणि या सत्यत्वबुद्धीमुळेच मनामध्ये विषयकामना निर्माण होते.  असत्य, खोट्या विषयाची कामना कधीही निर्माण होत नाही.  म्हणून सत्यत्वबुद्धीमुळे कामना निर्माण होते आणि कामनापूर्तीसाठी मनुष्य अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रमाणे तो कामना-कर्म-कर्मफळ पुन्हा कामना अशा चक्रामध्ये अडकतो.  

परंतु ज्यावेळी तत्त्वविचाराने विश्वाच्या मागे असलेले विश्वाचे खरे सत्य समजते त्यावेळी आपोआपच विश्वाला बुद्धीने दिलेले सत्यत्व नाहीसे होते, विश्वाचे मिथ्या स्वरूप समजते आणि मनाने निर्माण केलेल्या प्रवृत्ति आणि निवृत्ति या वृत्तींचा निरास होतो.  त्यानंतर तो ज्ञानी पुरुष विश्वाच्या मागे धावत नाही आणि विश्वापासून पाळूनही जात नाही.  तर तो विश्वामध्ये राहूनच विश्वापासून अलिप्त राहातो.  सर्व प्रकारची कर्मे करूनही अंतरंगामधून साक्षीस्वरूपाने राहून अकर्ता-अभोक्तास्वरूप असलेल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, December 5, 2017

जितेंद्रियः | Victor of Senses




जितेंद्रियः – मन शुद्ध होऊन ब्रह्माभ्यासाने विषयासक्ति आणि भोगवासना गळून पडली की, मनाची उपशमा होते.  मनामधील क्षोभ, संताप, कामक्रोधादि विकार संपतात.  याचा परिणाम म्हणून साधकाला स्वभावतःच मनःसंयमन प्राप्त होते.  मन एकदा ताब्यात आले की, आपोआपच सर्व इंद्रिये त्याच्या ताब्यात येऊन तो जितेंद्रिय होतो.  

सर्व इंद्रिये त्यांच्या स्वभावाप्रमाणे बहिर्मुख असून विषयांच्यामध्येच रमत असतात.  ती विषयभोगासाठी सतत व्याकूळ झालेली असतात. वखवखलेली असतात.  यामुळे ती हळूहळू उधळलेल्या घोड्यांच्याप्रमाणे स्वैर, अनियंत्रित होऊन मनुष्याला गुलाम बनवितात.  त्याच्या बुद्धि आणि मनाला खेचून विषयाभिमुख करतात.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला पशुतुल्य बनवितात.  म्हणून जीवन जगत असताना इंद्रियांच्यावर संयमन करणे आवश्यक आहे.  

यासाठी साधकाने विवेकाचा आश्रय घेऊन मनरूपी लगामाने इंद्रियांना वश करून घ्यावे. त्यांना सदाचार, सत्कर्म आणि धर्माचरणामध्ये प्रवृत्त करून दुष्टाचरण आणि अधर्माचरणापासून निवृत्त करावे.  म्हणजे त्यांच्या स्वैर, उच्छृंखल वृत्तीवर नियमन होईल आणि शेवटी ब्रह्माभ्यासाने ज्यावेळी मनावर संपूर्ण संयमन होईल त्यावेळी आपोआपच इंद्रियांच्यावर संपूर्ण निग्रह होईल.  

कूर्मोङ्गानीव सर्वशः |  ज्याप्रमाणे कासव पाण्यामध्ये मुक्त विहार करीत असते, परंतु धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर ते आपले सर्व अवयव कवचाखाली निवृत्त करून रक्षण करते आणि धोका नाहीसा झाल्यानंतर पुन्हा मुक्त संचार करते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला इंद्रियांच्यावर संपूर्ण संयमन प्राप्त होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ