Tuesday, December 26, 2023

शम संपत्ति | The Riches Of Satisfaction

 



हे रामा !  संसार हा वाळवंटाप्रमाणे अतिशय रूक्षस्थान आहे.  कारण संसारामध्ये मनुष्याला अत्यंत यातना प्राप्त होतात.  मनामध्ये हजारो विषयांच्या तृष्णा असल्यामुळे विषय उपभोगण्यासाठी मन सतत व्याकूळ होते.  कितीही उपभोगले तरी मनाची तृप्ति होत नाही.  विषयांच्या भयंकर कामना मनुष्याचे जीवन असह्य करतात.  परंतु त्याच मनामध्ये जर शम या गुणाचा उदय झाला तर ते मन अत्यंत शांत होते.  शमाने मोक्ष प्राप्त होतो.  शमाने परमपद प्राप्त होते.  शम म्हणजे शिव व शम म्हणजेच शांति आहे.  शम गुणामुळे मनामधील सर्व भ्रम नष्ट होतात.  ज्याच्याजवळ शम हा गुण आहे, ज्याचे चित्त अत्यंत शुद्ध व शांत झाले आहे, त्याचे शत्रु सुद्धा त्याचे मित्र होतात.

 

साधकाच्या अंतःकरणामध्ये शम या गुणाचा उदय झाला की, त्याचे हृदयही अलंकार घातल्याप्रमाणे शोभून दिसते.  त्याचे चित्त अतिशय शुद्ध होते.  ज्या सत्पुरुषांच्या हृदयामध्ये शम हा गुण विकसित होतो, असे सज्जन पुरुष जणु काही दोन-दोन कमलपुष्पांनी युक्त होतात.  शम या गुणामुळे त्यांना सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य या मुक्ति मिळून ते जणु काही भगवंतासारखे दिसतात.  या विश्वामध्ये जितकी दुःखे आहेत, जितक्या कामना, विषयतृष्णा आहेत, असह्य शारीरिक रोग आणि मानसिक व्याधि आहेत, संसारामधील अशा सर्व प्रकारच्या यातना शमयुक्त चित्तामध्ये नाश पावतात.  ज्याप्रमाणे प्रकाशामुळे अंधाराचा समूळ ध्वंस होतो, त्याचप्रमाणे शम आल्यावर आधिव्याधि, तृष्णा-कामना या सर्वांचा नाश होतो.

 

जो पुरुष शमयुक्त असून ज्याचे मन अतिशय शांत झालेले असते तोच खऱ्या अर्थाने सर्व जीवांच्यावर प्रेम करतो.  त्याच्यामधील ममत्व भाव, अपपर भाव नष्ट होतो.  माझा-परका असा भेदभाव न करता उच्च-नीच, जात, पंथ, धर्म, आश्रम, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न करता तो समत्वाच्या-एकत्वाच्या दृष्टीने पाहतो.  मन शमयुक्त झाले की, ज्ञानी पुरुषाला जी शांति आणि जे परमसुख मिळते तेवढे सुख तर कुठल्याच रसायनाने मिळत नाही.  स्वर्गातील अमृत पिऊन मनुष्याला कदाचित अमृतत्व मिळते.  पण तेही नाशवान स्वरूपाचे असते.  त्यामुळे अमृतापेक्षाही शमामधील सुख अधिक आहे.  अधिक काय सांगावे !  रामा !  अरे साक्षात् लक्ष्मीने आलिंगन देऊन सुद्धा असे सुख मिळत नाही, असे सुख शम या गुणाने प्राप्त होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, December 19, 2023

योग-क्षेम | Livelihood Of The Realized

 



 ज्ञानीव्यतिरिक्त असलेल्या आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासु भक्तांचा योगक्षेम कोण चालवितो ?  परमेश्वर जर सर्व विश्वाचा विश्वंभर असेल तर ज्ञानी पुरुषाचाच फक्त योगक्षेम मी चालवितो असे भगवान का म्हणतात ?  खरे पाहाता परमेश्वर हा ज्ञानीप्रमाणे अन्य सर्व भक्तांचाही योगक्षेम पाहात असतो.  परंतु अन्य सर्व भक्त त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये भेद पाहात असल्यामुळे त्यांची अनन्य भक्ति नसून द्वैतजन्य असते.  त्याचप्रमाणे ते स्वतःच्या योगक्षेमासाठी स्वतःच प्रयत्न करीत असतात.

 

याउलट अनन्यदर्शी ज्ञानी लोक काया वाचा आणि मनाने माझ्याच स्वरूपामध्ये रममाण झालेले असल्यामुळे स्वतःच्या योगक्षेमाचा ते विचार करीत नाहीत.  ते स्वतःसाठी जगतच नाहीत.  जीवन जगण्यामध्ये आणि मारण्यामध्ये कशातच त्यांना स्पृहा नसते.  मीच त्यांचा आश्रयदाता, शरणागतीचे स्थान आहे.  त्यामुळे अशा ज्ञानी पुरुषांचा योगक्षेम मी – परमेश्वर चालविणार नाही तर कोण चालविणार ?  मलाच त्यांची काळजी घेतली पाहिजे.  अन्य सर्वजण त्यांची काळजी तेच घेतात.  मी प्रयत्न करतो आणि मी मिळवीन हा त्यांचा अहंकार आहे.  या अहंकारामुळेच ते माझ्यापासून दूर जातात.  वास्तविक पाहाता सर्वांचाच योगक्षेम मी चालवितो.  परंतु अहंकारी, द्वैतबुद्धीच्या लोकांना हे कळत नाही त्याला मी काय करू ?  शरण आलेल्यांना अभय देणे, त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.

 

ज्ञानी पुरुष स्वतः आत्मतृप्त असून आप्तकाम असल्यामुळे त्याच्या दृष्टीने निश्चितच योगक्षेम नाही.  तो स्वतःसाठी जगत नसेल तरी जगाच्या कल्याणासाठी जगत असतो.  तो स्वतः स्वतःच्या शरीराचे रक्षण, वर्धन किंवा पोषण करीत नाही.  तसेच मिथ्या, नाशावान शरीर असेल तरी त्याच शरीरामधून तो परमेश्वराचे कार्य करीत असतो.  इतकेच नव्हे तर – प्रारब्धाय समर्पितं स्ववपुः |  या आचार्यांच्या विधानाप्रमाणे तो स्वतःचे शरीर प्रारब्धाला अर्पण करून स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.  असे असून सुद्धा शरीरामधूनच ईश्वरी कार्य आणि लोककल्याण व लोकोद्धार होत असल्यामुळे त्याच्या शरीराचा योगक्षेम भगवंतालाच पाहिला पाहिजे.  ज्ञानी परमेश्वराला योगक्षेमासाठी प्रार्थना करीत नाहीत.  तर उलट त्याचा योगक्षेम भगवान स्वेच्छेने स्वतःकडे घेतात.  म्हणून येथे म्हटले आहे योगक्षेमं वहाम्यहम् |

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 12, 2023

मनोजय | Victory Over Mind

 




कैवल्यप्राप्तीसाठी विवेकी साधक काहीही करीत नाही.  हाता-पायाची कोणतीही विचित्र हालचाल करीत नाही.  म्हणजे योगासने, प्राणायामादि करीत नाही.  मोक्षासाठी अनेक तीर्थयात्रांना, देशांतराला जाण्याची आवश्यकता नाही.  म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी देश किंवा स्थान बदलण्याची गरज नाही. मोक्षासाठी शरीराला क्लेश देण्याचीही अवशक्यकता नाही.  जर कोणी म्हणेल की, "मी माझे शरीर स्वस्थ ठेवेन, हातापायाची चालना करेन, योगासने करून अंग लवचिक ठेवेन, शेकडो प्राणायामे करेन, अनेक स्थानांच्यामध्ये जाईन, तीर्थयात्रा करेन, शरीराला खूप क्लेश देईन, उपवास करेन, अनवाणी पायाने चालत जाईन, अघोर तपश्चर्या करेन आणि आत्मप्राप्ती करेन." या कशानेही अज्ञानाचा निरास होत नाही व आत्मप्राप्ती होत नाही.  या सर्व साधकाच्या चुकीच्या कल्पना आहेत.

 

वसिष्ठ मुनि येथे आत्मप्राप्तीमध्ये सर्व बहिरंग साधनांचा निषेध करीत आहेत.  कारण या सर्व साधना केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आहेत.  या साधना ज्ञानप्राप्तीसाठी साहाय्यकारी आहेत.  पण केवळ या साधना केल्या म्हणजे आपण सर्व काही मिळविले, असे साधकाने वाटून घेऊ नये.  याचे कारण आत्मप्राप्ती ही केवळ आणि केवळ पुरुषार्थानेच साध्य होते.  मनामधील वासनांचा संपूर्ण त्याग हाच केवळ आत्मप्राप्तीसाठी एकमात्र पुरुषार्थ आहे.  मनोजयानेच परमपदाची प्राप्ति होते.

 

मनोजय म्हणजे वासनांचा क्षय करणे होय.  ही फार मोठी साधना आहे.  अन्य सर्व साधना केल्या परंतु मनामध्ये अनेक भोगवासना असतील तर केलेल्या सर्व साधना व्यर्थ आहेत.  तसेच बहिरंगाने अन्य कोणतीही साधना केली नाही, परंतु मनामध्ये एकही विषयवासना नसेल म्हणजे मन पूर्णतः वैराग्यसंपन्न असेल तर आपोआपच मनावर जय प्राप्त होतो.  मन पूर्णतः संयमित होते.  संयमित मन कामरहित होते आणि याच वासनारहित मनामध्ये साधकाला निरंकुश तृप्तीचा, आत्मतत्त्वाचा अनुभव येतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ



Tuesday, December 5, 2023

तीन प्रकारच्या शंका | Three Types of Doubts

 



प्रामुख्याने शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या शंका किंवा संशय सांगितले जातात.  प्रमाणशंका, प्रमेयशंका आणि प्रमाशंका.  जे लौकिक आणि मूर्ख अज्ञानी लोक आहेत, त्यांना मरेपर्यंत सारख्याच क्षणाक्षणाला शंका निर्माण होतात.  त्यांचे मन सतत संशययुक्त असते.  स्वतःच्या बुद्धीला शास्त्र समजत नाही, कारण वेदांतशास्त्र हे बुद्धीच्याही अतीत आहे.  त्यामुळे असा मनुष्य वेदांतशास्त्राबद्दलच शंका घेतो.  त्याला हे शास्त्र अत्यंत रुक्ष, बोजड, अवघड वाटते.  त्याला त्या वेदांतशास्त्रामध्ये काही रस वाटत नाही, कारण त्याने कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो.  आपली बुद्धि अत्यंत प्राकृत आणि स्थूल आहे.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे जे डोळ्यांना दिसते, तेच फक्त सत्य अशी सवय लागल्यामुळे मनावर तेच संस्कार झालेले आहेत.  मनुष्य स्वतःचे म्हणणे सोडायला कधीही तयार नसतो.

 

दुसरी शंका म्हणजे प्रमेयविषयक शंका होय.  प्रमेय म्हणजेच या शास्त्रामाधून प्रतिपादित केलेला जो ज्ञेय विषय आत्मा, याबद्दलच अनेक शंका आहेत.  आत्मा अस्ति न वा |  आत्मा खरोखरच आहे की नाही ?  वर्षानुवर्षे आत्मस्वरूपाचे ज्ञान घेतात आणि आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका विचारतात.  अशा लोकांना कधीही शांति, समाधान प्राप्त होत नाही.  

भगवान म्हणतात – संशयात्मा विनश्यति |              (गीता अ. ४-४०)

संशयी पुरुषाचा नाश होतो.  त्याला आत, अंतरंगामध्ये स्थिरता, शांति आणि समाधान मिळत नाही.  याचे कारण श्रद्धेचा अभाव आहे.

 

आणि तिसरी शंका म्हणजेच प्रमाविषयक शंका होय.  प्रमा म्हणजेच ज्ञान.  साधकाला आत्मज्ञानाविषयीच शंका निर्माण होतात.  “खरोखरच या ज्ञानाने मला मोक्ष मिळेल का ?  या ज्ञानाचे फळ निरतिशय आनंदाची प्राप्ति मला होईल का ?  या ज्ञानामध्ये इतके सामर्थ्य आहे का ?”  अशा शंका निर्माण होतात.  परंतु शास्त्रकार सांगतात – आत्मज्ञान हे स्वतःच फलस्वरूप आहे.  हे ज्ञान श्रवण करीत असतानाच त्याचा अनुभव येतो.  मन जर शुद्ध, परिपक्व, रागद्वेषरहित असेल, एकाग्र, तल्लीन, तन्मय जर असेल, तर ज्ञानाची अनुभूति श्रवण करतानाच आली पाहिजे, इतके या ज्ञानाचे सामर्थ्य आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, November 28, 2023

मला मोक्ष कसा मिळेल ? | How Will I Get Liberation ?

 



ज्यावेळी श्रद्धावान मनुष्य मोक्षाचा उपाय काय ?  मला मोक्ष कसा मिळेल ?  त्यासाठी मी काय करावे ?  असा गांभीर्याने विचार करेल, एखादा विषय मिळविण्यासाठी मनुष्य अस्वस्थ होतो तसा ज्यावेळी मुक्तिसाठी मनुष्य साधनप्रवृत्त होईल, त्यावेळी हे रामा !  त्या तीव्र मुमुक्षूला लवकरात लवकर मोक्ष मिळण्याची शक्यता आहे.  म्हणजेच मोक्षासाठी मोक्षाची तीव्र तळमळ वाटली पाहिजे.  यामधून वसिष्ठ मुनींनी मुमुक्षुत्व हे साधन सूचित केले आहे.

 

कोणत्याही गोष्टीसाठी तळमळ किंवा ध्यास निर्माण झाला पाहिजे.  व्यवहारामध्ये सुद्धा उत्तुंग यश मिळवायचे असेल तर मनुष्य त्या ध्येयाने झपाटला पाहिजे.  त्याचे सर्व आचरण ध्येयानुकूल पाहिजे.  आपल्या ध्येयाव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टी गौण होऊन त्या सर्वांचे महत्व कमी झाले पाहिजे.  रात्रंदिवस ध्येयाने प्रेरित होऊन मनुष्य ज्यावेळी अत्यंत दक्ष राहून विवेकाने ध्येयानुकूल प्रयत्नांच्यामध्ये प्रवृत्त होईल, त्यावेळी ध्येय त्या मनुष्यापासून दूर राहत नाही.  शीघ्रातिशीघ्र मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो.

 

तसेच मोक्षाच्या बाबतीत आहे.  सर्व ज्ञानी महात्मे व संतांचे चरित्र पाहिले तर दिसते की, ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने त्यांचे संपूर्ण जीवन तपोमय, ज्ञानमय व तेजस्वी बनले होते.  सर्वांनी साधनेमध्ये व कठोर तपश्चर्येमध्ये स्वतःला झोकून दिले होते.  सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय ईश्वरप्राप्ति होत नाही.  हे त्यांनी आपल्या जीवनामधून प्रत्यक्ष दाखवून दिले होते.  साधकांनी ज्ञानी पुरुषांची अशी चरित्रे समोर ठेऊन आत्मप्राप्तीच्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावे.


 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, November 21, 2023

ईश्वराभिमुख वैदिक कर्मे | Divine Vaidik Actions

 



सर्व वैदिक कर्मांच्या अनुष्ठानाने चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने जीव ईश्वरस्वरूपाला प्राप्त होतात.  म्हणून प्रत्येक जीवाने वैदिक कर्मांचे अनुष्ठान केले पाहिजे.  ही कर्मे ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपापर्यंत नेणारी आहेत.

 

अहं यज्ञःयज्ञ म्हणजे स्मार्त कर्म.  स्मृतींनी प्रतिपादित केलेली कार्ये म्हणजे स्मार्त कर्मे होय.  यांनाच काही वेळेला धार्मिक कर्मे असे म्हटले जाते.

 

अहं स्वधापितरांना श्राद्धादि कर्मामध्ये पिंडरूपाने दिलेल्या अन्नाला स्वधा म्हणतात.  पितृयज्ञ केवळ शारीरिक कर्म नसून त्यामागे श्रद्धा आणि प्रेमाचा भाव आहे.  त्यामुळे हेही कर्म चित्तशुद्धीचे साधन होते.

 

अहं औषधम्औषध तसेच व्रीहियवादि सर्व प्रकारचे अन्न माझेच स्वरूप आहे.  भगवान म्हणतात त्याप्रमाणे चतुर्विध अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे.  म्हणून वेदामध्ये म्हटले आहे – अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |  अन्नं न निन्द्यात् |  तत् व्रतम् |  अन्न हे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे अन्नाची कधीही निंदा, तिरस्कार करू नये.  ते शुद्ध वृत्तीने खावे.  अन्नानेच मनुष्याच्या मनाची जडण-घडण होत असते.  शुद्ध आणि प्रसन्न वृत्तीने खाण्यामध्ये अंतरिक सुख आणि आनंद आहे.  विश्वामधील सर्व प्राणिमात्रांचे पोषण, वर्धन आणि रक्षण करणारे अन्न असल्यामुळे उपभोग म्हणून न खाता परमेश्वरस्वरूप आहे असे जाणून आदरयुक्त भावाने खावे.  ही सुद्धा एक साधना आहे.  स्वधा म्हणजे सर्व प्राणीमात्र जे अन्न खातात ते व्याधींचे नाश करणारे औषध होय, असाही अर्थ घ्यावा.

 

अहं मंत्रःपितृयज्ञ किंवा देवतायज्ञामध्ये ज्याच्या साहाय्याने हवन करतात, ते मंत्र माझे स्वरूप आहे.  मंत्रांच्या साहाय्याने हवन करून देवांना प्रसन्न करून मनुष्य आपली इच्छा पूर्ण करू शकतो.  देवतांना संतुष्ट करून त्यांची कृपा प्राप्त करता येते.  म्हणून मंत्र हे माझे स्वरूप आहे.

 

तसेच यज्ञामध्ये हवन केले जाते ते तूप आणि ज्याच्यामध्ये हवन केले जाते, तो अग्नि सुद्धा माझे स्वरूप आहे.  थोडक्यात यज्ञामधील अग्नि, हवन करण्यासाठी असलेली सामग्री, मंत्र आणि कर्म सुद्धा माझे स्वरूप आहे.  सर्व ब्रह्मस्वरूप आहे हा भाव ठेवावा.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, November 14, 2023

नास्तिकांना मार्गदर्शन | Guidance for Non-Believers

 



संसारग्रस्त मनुष्याला सतत दुःखांचाच अनुभव येत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये आनंदस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होईल.  खरोखरच ते परमपद आहे का ?  असा प्रश्न निर्माण होतो.  म्हणून येथे वसिष्ठ मुनि सांगतात की, ज्याच्या मनामध्ये तत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे, त्याने त्यामध्ये प्रयत्नपूर्वक विचार करावा.  तत्त्व किंवा आत्मस्वरूप नाहीच, असे म्हणणे अत्यंत घातक असून त्यामुळे स्वतःचेच अस्तित्व नाकारण्यासारखे आहे.

 

श्रुति म्हणते - असन्नेव स भवति असद् ब्रह्मेति चेत् वेद |  (तैत्ति. उप.)  जो ब्रह्मस्वरूपाला असत्  म्हणजे नाही असे म्हणतो, तो स्वतःच असत् होतो.  म्हणजे तो स्वतःच स्वतःचे अस्तित्व अमान्य करतो.  कारण तत्त्व हे स्वतःचे पारमार्थिक स्वरूप आहे.  तसेच तत्त्वाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सुद्धा माझ्या - तत्त्वाच्या सत्तेची आवश्यकता आहे.  म्हणूनच सत्तेचा - अस्तित्वाचा म्हणजे सत् तत्त्वाचा कोणीही निरास करू शकत नाही.  वसिष्ठ मुनि सांगतात की, नास्तिक मनुष्याने याप्रमाणे तत्त्वामध्ये विचार करावा.

 

याशिवाय असणारे जे आस्तिक लोक आहेत म्हणजे आत्मचैतन्यस्वरूपाच्या, ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांचा विश्वास आहे, जे बुद्धीने तत्त्वाचे अस्तित्व जाणतात, अशा श्रद्धावान विवेकी साधकांनी त्यापुढे साधना करून, तत्त्वाचे विशेष ज्ञान प्राप्त करून या भवसागरमधून पार व्हावे.  कारण श्रद्धा हेच ज्ञानाचे साधन आहे.  याप्रमाणे दृढ श्रद्धा निर्माण झाल्यानंतरच तत्त्वाचे ज्ञान होऊन त्यामध्ये निष्ठा प्राप्त होते आणि साधक क्रमाने या अज्ञानकल्पित संसारामधून मुक्त होतो.

 

जो जेथे ज्या पायरीवर आहे, तेथून त्याने क्रमाने आपल्या जीवनाचा विकास करावा.  हाच उद्देश आहे.  नास्तिक लोकांनी, केवळ दिसत नाही म्हणून ईश्वर नाही, आत्मचैतन्य नाही, असे म्हणण्यापेक्षा बुद्धीने थोडा सखोल विचार करावा.  कारण विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्याला दिसत नाहीत, तरीही त्या अस्तित्वामध्ये आहेत.  म्हणून नास्तिक बुद्धिवादी लोकांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यापेक्षा त्यामध्ये विचार करावा आणि आस्तिक श्रद्धावान लोकांनी गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रवण करावे.  त्यानंतर त्यापुढील मननादि साधनेमध्ये प्रवृत्त होऊन ज्ञान, ज्ञाननिष्ठा व तत्त्वाची साक्षात् अनुभूति प्राप्त करावी.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ