Tuesday, March 28, 2023

साध्याशी एकनिष्ठता | Commitment Towards the Goal

 



व्यवहारामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवावयाचे असेल, मग ते क्रीडा असेल, कला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, काहीही असेल, जर ते साध्य प्राप्त करावयाचे असेल, तर मी माझ्या साध्याशी एकनिष्ठ असले पाहिजे.  माझ्या मनामध्ये तळमळ, व्याकुळता निर्माण झाली पाहिजे.  मला साध्याचा ध्यास लागला पाहिजे.  ध्येयप्राप्तीसाठी मी रात्रंदिवस वेडे झाले पाहिजे.  तरच अथक प्रयत्नांच्यानंतर यशश्री प्राप्त होते.  परंतु जर माझे मन साध्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असेल, तर दुर्दैवाने जीवनामध्ये कितीही परिश्रम करूनही साध्यप्राप्ति होत नाही.  काहीतरी तीर्थयात्रा करून, सोमवार ते सोमवार उपवास करून, व्रतवैकल्ये करून आत्मप्राप्ति होत नाही.

 

जीवनामध्ये कोणतीही एखादी विद्या आत्मसात करावयाची असेल, तर त्याच्यासाठी ध्यास लागला पाहिजे.  सर्वस्व अर्पण केले पाहिजे.  त्याच्यासाठी मी आयुष्य दिले पाहिजे.  सतत विचार केला पाहिजे की, “माझ्या साध्याशी मी किती एकनिष्ठ राहिलो ?  खरोखरच माझी तळमळ आहे का ?  जिज्ञासा आहे का ?”  ज्यावेळी मी सर्वस्व देईन, त्यावेळी कोठेतरी काही तरी मिळते.  म्हणून संतांना सुद्धा जीवनामध्ये सर्वस्व द्यावे लागले.  संत रामदास स्वामी सांगतात –

देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगांच्या तुटी |

सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा ||                     (दासबोध)

वेळ जात नाही, काहीतरी शिकायचे म्हणून एक उपनिषद शिकलो, याला शिकणे म्हणत नाही.  याचे कारण शिकण्यासाठी मनामध्ये भाव पाहिजे.  Attitude पाहिजे.

 

श्रुति सांगते –

क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति |       (कठ. उप. १-३-१४)

हा मार्ग तलवारीच्या धारदार पात्यावर चालण्यासारखा अवघड आणि दुष्कर आहे.  याचे कारण विश्व नाही, शास्त्र किंवा गुरूही नाहीत.  तर माझेच मन हे कारण आहे.  या मार्गामध्ये अनेक आडवाटा आहेत.  एक मुख्य राजमार्ग आहे आणि या राजमार्गावरून जात असताना अनेक फाटे आहेत.  जर राजमार्ग सोडून आपण अन्य मार्गांच्यावर गेलो, तर कधीही साध्यप्राप्ति होणार नाही.  म्हणून या साधनेसाठी आपण आपलेच मन योग्य, अनुकूल व अधिकारी बनविले पाहिजे.

 


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, March 21, 2023

निर्निमित्त वैराग्य | Untriggered Dispassion

 



निर्निमित्त वैराग्य म्हणजे काही निमित्ताशिवाय, कारणाशिवाय निर्माण झालेले वैराग्य होय.  आपण मागील वैराग्यप्रकरणामध्ये याचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिला आहे.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सहजासहजी वैराग्य उत्पन्न होत नाही.  वैराग्याचे अनेक प्रकार आहेत.  पुष्कळ वेळेला प्रासंगिक, तात्कालिक, दुसऱ्याकडे पाहून किंवा नैराश्यामधून माणसाला वैराग्य येते.  म्हणून त्याला स्मशान वैराग्य असा शब्द वापरला जातो.  एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यावेळेस आपण स्मशानात जातो, तेथील शोकाकुल वातावरण पाहतो, त्यावेळी क्षणभर वाटते की, खरेच हे सगळे भोग आणि विषय व्यर्थ आहेत.  मनुष्य दुःखाने व्याप्त होतो.  त्याला काहीच खावेसे, उपभोगावेसे वाटत नाही.  परंतु अंत्यविधि झाले, स्मशानातून बाहेर पडले की, पुन्हा व्यवहार सुरु होतो.  मनुष्य पूर्ववत् विषयासक्त जीवन जगू लागतो.

 

किंवा काही वेळेस एखादा भयंकर प्रसंग घडला, संकट आले, तरीही मनामध्ये वैराग्यवृत्ति निर्माण होते.  परंतु हे वैराग्य दीर्घकाळ टिकत नाही.  प्रसंग निघून गेला की, वैराग्यही निघून जाते.  याला खरे वैराग्य म्हणत नाहीत, कारण हे सनिमित्त वैराग्य आहे.  म्हणजेच या वैराग्याच्या मागे एखादा प्रसंग, व्यक्ति, घटना यांपैकी काहीतरी निमित्त असते.  कशामुळेतरी वैराग्य येऊन मनुष्य काही काळापुरताच आध्यात्मिक झाल्यासारखा वाटतो.  परंतु नंतर पुन्हा तो मनुष्य पूर्ववत् संसारामध्ये आसक्त होऊन विषयांचा उपभोग घेऊ लागतो.  म्हणून याला सनिमित्त किंवा तात्कालिक वैराग्य म्हणतात.

 

असे स्पष्ट करून वसिष्ठ मुनि म्हणातात की, रामा !  तुझे वैराग्य मात्र निर्निमित्त आहे.  असे वैराग्य जन्मतःच लहानपणापासून निर्माण होते.  म्हणून वैराग्यसंपन्न साधु निर्माण करता येत नाही तर तो जन्मालाच यावा लागतो.  श्रीरामांच्या मनामध्ये ऐन तारुण्यावस्थेमध्ये असे अभिजात वैराग्य निर्माण झाले होते.  हे वैराग्य चारु म्हणजे अतिशय सुंदर होते.  जो मनुष्य सतत काहीतरी मागतो, असंतुष्ट असतो त्या मनुष्यापेक्षा समाधानी, तृप्त, शांत असलेला विरक्त मनुष्य चारु म्हणजे खूप सुंदर दिसतो.  कारण त्याच्यामध्ये निर्निमित्त वैराग्य असते.  त्याला वैराग्याचा वेगळा उपदेश देण्याची आवश्यकताच नसते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, March 14, 2023

योगभ्रष्ट पुरुष | Realization-Failed Person

 



योगभ्रष्ट म्हणजे योगमार्गापासून च्युत झालेला, किंवा अधःपतन झालेला योगी असा नाही.  तर या जन्मामध्ये श्रवणमनननिदिध्यासना करीत असताना शरीरपतनापूर्वी त्या योग्याला आत्मसिद्धि किंवा ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही, म्हणून त्याला योगभ्रष्ट असे म्हटले आहे.  म्हणजेच त्याला याच शरीरामध्ये जीवन्मुक्तावस्था प्राप्त होत नाही.  याठिकाणी शंका येईल की, सर्व साधना करीत असून सुद्धा त्याला शरीर पडण्यापूर्वी ज्ञाननिष्ठा किंवा जीवन्मुक्तावस्था होत नाही ?

 

१) जरी साधक इंद्रियसंयमन, मनोनिग्रह करून श्रवणमनननिदिध्यासना ही साधना करीत असेल तरी सुद्धा त्याच्या मनामधील विषयभोगवासना संपूर्ण नाहीशी झालेली नसेल.  त्यामुळे अनेक प्रकारचे द्वन्द्व, रागद्वेषांचा प्रभाव, संकल्पविकल्प, कामक्रोधादि विकार निर्माण होतात.  ते ज्ञानसाधनेमध्ये सतत प्रतिबंध निर्माण करतात.  त्यामुळे साधना करूनही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

२) साधना करण्याची इच्छा असेल तरी रजोगुणाच्या प्राबल्यामुळे त्याचे मन सत्वगुणप्रधान नसते.  त्यामुळे तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छा निर्माण होत नाही.  त्यामध्ये तरतमभाव दिसतो.  काही साधकांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत तीव्र मोक्षेच्छा दिसते तर काहींच्या मध्ये सर्वसाधारण, तर काहींच्या मनामध्ये लुकलुकणारी असते.  त्यामुळे साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असेल तरी त्याचे ते प्रयत्न योगनिष्ठेसाठी अपुरे पडतात.  हा दोष शास्त्राचा किंवा गुरूंचा नाही तर स्वतःमध्ये असलेल्या संस्कारांचा आहे.

 

३) साधक दैवीगुणसंपन्न, विवेकवैराग्यसंपन्न असून सत्वगुणप्रधान असतो.  त्याच्यामध्ये तीव्र वैराग्य, जिज्ञासा आणि मोक्षेच्छाही असते.  त्याप्रमाणे तो साधनाही करीत असतो.  परंतु तरी सुद्धा त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याचे कारण – प्रारब्धवशात् |  साधक टाळाटाळ न करता अत्यंत तत्परतेने श्रद्धा आणि निष्ठेने साधना करीत असेल तरी तो शरीराचे प्रारब्ध टाळू शकत नाही, बदलू शकत नाही.  ज्ञानसाधना पूर्ण होण्यापूर्वीच जर शरीराचे प्रारब्ध संपले तर त्याची साधना अपूर्णच राहाते.  त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

 

योगभ्रष्ट पुरुष निश्चितपणे दुर्गतीला म्हणजेच निकृष्ट योनीला किंवा अधोगतीला जात नाही.  मोक्षमार्गामध्ये त्याची प्रगतीच होत असते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, March 7, 2023

राजविद्या आणि राजर्षि | Supreme Knowledge And Sage-Kings

 



सर्व विद्यांच्यामध्ये अध्यात्मविद्येला प्रथम स्थान होते.  राजदंडापेक्षाही धर्मदंडाला उच्च स्थान होते.  राज्य, राजा आणि प्रजा या सर्वांच्यावर धर्माचा, ज्ञानाचा, ज्ञानी सत्पुरुषांचा अंकुश होता आणि त्यांच्या सामर्थ्यशाली अधिकारवाणीने संपूर्ण राष्ट्र नियमित होत होते.  राज्यामध्ये न्यायला व आचारधर्माला सर्वोच्च स्थान होते.  कारण या सर्वांच्यामागे अध्यात्मविद्येचे अधिष्ठान होते.  म्हणून या विद्येला 'राजविद्या' असेही म्हटले जाते.  'राजविद्या' म्हणजे सर्वप्रथम ही क्षत्रिय राजांना उपदेशिली गेली.  किंवा दुसरा अर्थ, राजविद्या म्हणजेच सर्वश्रेष्ठ विद्या होय.  याप्रकारे समाजामध्ये या राजविद्येचा प्रचार आणि प्रसार झाला.

 

सर्वश्रेष्ठ असल्यामुळे ही विद्या सर्व विद्यांची साम्राज्ञी आहे.  तसेच ही विद्या 'राजगुह्य' म्हणजे अत्यंत गोपनीय, गुह्य व रहस्यमय विद्या आहे.  याचे कारण या विद्येचा म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाचा विषय आत्मवस्तु असून, आत्मस्वरूप हे अत्यंत सूक्ष्म व अदृश्य आहे.  विश्वामधील अन्य सर्व विषय डोळ्यांनी दृश्य रूपाने दिसतात.  इंद्रियांना व मनाला अनुभवायला येतात.  त्यामुळे स्थूल विषयांचे ज्ञान सहजपणे होते.  मात्र आत्मवस्तु ही अत्यंत सूक्ष्मतम असून ती डोळ्यांना, इंद्रियांना, मनाला किंवा बुध्दीलाही आकलन होत नाही.  ती अदृश्य, अव्यक्त, निर्विशेष स्वरूपाची आहे.  आत्मा कसा आहे ?  याचे शब्दांनीही वर्णन करता येत नाही.

 

अशी ही आत्मवस्तु प्रत्येक जीवाचे प्रत्यगात्मस्वरूप आहे.  जीव स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप आहे.  म्हणजेच येथे ज्ञाता ही 'मी' आहे आणि ज्ञेय वस्तु सुद्धा 'मी' च आहे.  म्हणून - आत्मानं अधिकृत्य यद्  ज्ञानं तत् अध्यात्मं इति |  आत्मस्वरूपावर म्हणजे स्वस्वरूपावर केंद्रीभूत असणाऱ्या ज्ञानाला "अध्यात्मिक ज्ञान" असे म्हणतात.  म्हणून आत्मविद्या ही सूक्ष्मतम असणाऱ्या आत्मवस्तूची असल्यामुळे तिला 'राजगुह्य' असे म्हटले जाते.  हे रामा !  अशी ही गुह्य ब्रह्मविद्या जाणून सर्व राजे लोक दुःखरहित अवस्थेला प्राप्त झाले.  यावरून समजते की, पूर्वीचे राजे सुद्धा ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्यांना 'राजर्षि' असे म्हटले जात असे.  प्राचीन काळी विदेही राजा जनकासारखे ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मनिष्ठ राजे होऊन गेले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, February 28, 2023

भक्तीचे फळ तात्काळ मिळते | Result Of Devotion Is Instantaneous

 



भक्ति साधकाला ईश्वराभिमुख करून शेवटी ईश्वरस्वरूप बनविते.  भक्तीची पक्वता हेच भक्तीचे फळ आहे.  ते म्हणजे - यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति, अमृतः भवति, तुप्तः भवति |  म्हणून भक्ति प्राप्त झाली की, भक्त आनंदस्वरूप होतो.  हा आनंद कालांतराने नसून ज्याक्षणी भक्तीचा अनन्य भाव निर्माण होतो त्याचक्षणी तो आनंदरस लुटतो.  हा भाव अंतःकरणातील काम-क्रोध, लोभ-मोह, मद-मत्सर, दंभ-दर्प वगैरे दोष नाहीसे करतो आणि सत्य, नम्रता, करुणा, दया, त्याग वगैरे गुणांना भरती येते.  गुणांचा उत्कर्ष होतो.  अहंकार-ममकार नाहीसा होऊन समर्पण, शरणागति येते.  मन अत्यंत शुद्ध, सात्त्विक, प्रसन्न अंतर्मुख होऊन गुणसंपन्न होते.  भक्त मधुरभाषी होतो.  अंतर्बाहय वृत्ति ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन होते.  म्हणून भक्तीचा भाव उदयाला आल्यानंतर होणारा जो अत्यानंदाचा अनुभव आहे.  तो इहलोक आणि परलोकामध्ये मिळणाऱ्या सुखापेक्षा अनंतपटीने अधिक श्रेष्ठ आहे.

 

भक्त्या संजातया भक्त्या - भक्तीचे फळ भक्ति हेच आहे.  भक्त कधीही कोणतीही मुक्ति मागत नाही.  सालोक्य मुक्ति - भगवंताच्या लोकामध्ये जाऊन राहाणे, सामीप्य मुक्ति - भगवंताच्या अत्यंत जवळ जाऊन त्याची माळ, आभूषण वगैरे होऊन राहाणे, सारुप्य - भगवंताच्या रूपामध्ये बनणे आणि सायुज्य - भगवंताच्या विग्रहामध्ये एकरूप होणे.  याउलट भक्त परमेश्वराची सेवा मागतो.  कल्याणगुण गावयास मागतो, परमेश्वराची प्रसन्नता हीच भक्ताची इच्छा असते.  यालाच सेवा म्हणतात.  आनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा |  श्रीकृष्णाच्या अनुकूल होऊन त्याचे अखंड चिंतन करणे हीच उत्तम भक्ति आहे.

 

अन्य सर्व मार्गामध्ये साधकाला कालांतराने फळ मिळते.  कर्मामध्ये यज्ञाचे फळ स्वर्गप्राप्ति हे वर्तमान शरीराचा मृत्यु झाल्यानंतर मिळते.  ज्ञानमार्गामध्ये अनेक प्रकारच्या साधनेने साधनचतुष्टय प्राप्त होते आणि नंतर श्रवण, मनन, निदिध्यासाने व समाधिअभ्यासाने अद्वैतसिद्धि मिळते.  त्याचवेळी मोक्षप्राप्ति होते.  हे एका जन्मात प्राप्त होत नसून, अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या साधनेच्या प्रभावाने शेवटी मिळते.  योगाभ्यासामध्येही तेच आहे.  यमनियमांची सिद्धि करून धारणा, ध्यान, समाधीच्या अभ्यासाने योगनिष्ठा मिळते.  या सर्व साधनेमध्ये अत्यंत कठीण परिश्रम आहेत.  अनेक वेळेला नैराश्य येते; परंतु भक्तीमध्ये मात्र काहीही नाही.  फळ तात्काळ मिळते.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ




Tuesday, February 21, 2023

आदर्श राज्ये आणि युद्धे | Ideal Kingdoms And Wars

 



प्राचीन काळी युद्धाशिवाय राज्ये चालत असत.  राजेलोक परस्परांच्या सहकार्याने पृथ्वीचे रक्षण करीत असत.  एका राज्यात काही कमी पडले तर दुसरे राजे मदतीला येत असत.  शत्रु, युद्ध असा प्रश्नच नव्हता.  फक्त सोयीसाठी देशांच्या सीमा निश्चित केल्या होत्या.  आपापसामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण, प्रेमाचे व विश्वबंधुत्वाचे नाते होते.  राजा व प्रजा अत्यंत सुखाने नांदत होती.  अशी ही आदर्श राज्ये व त्यांचे आदर्श राजे पृथ्वीचे पालन करीत असत.

 

परंतु काळाच्या ओघात राजेलोक सुखासीन होऊन भोगासक्त झाले.  सत्तेचा लोभ वाढला.  त्यामुळे एकमेकांच्यामध्ये द्वेष, मत्सर, असूया, कपट, निर्माण होऊ लागले.  सत्ता ऐश्वर्य, प्रसिद्धि यासाठी स्पर्धा होऊ लागली.  त्यामुळेच देशदेशांच्यामध्येच युद्ध अपरिहार्य ठरले.  राज्य व प्रजेचे रक्षण करण्यासाठी राजांच्यासमोर युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.  म्हणूनच ही सगळी युद्धे प्रथम मनुष्याच्या मनात आणि नंतर राज्या-राज्यांच्यामध्ये, देश, विदेशांच्यामध्ये युद्धे, महायुद्धे होऊ लागली.  युद्ध ही एक मनामधील भयंकर प्रवृत्ति आहे.  यामुळे मन अस्वस्थ व अस्थिर होऊन शत्रूचा सूड उगविण्यासाठी मनुष्य कोणत्याही स्तराला जाऊ शकतो.  विश्वामधील सर्व महायुद्धाचे बीज हे मनुष्याच्या मनात आहे.

 

या युद्धांच्यामध्ये ज्या राजाचा पराभव होत असे, त्या राज्यातील प्रजा दुःखी होऊ लागली.  प्रजेवर अनेक कर लादले जाऊ लागले.  जीवनावश्यक गोष्टींच्यावर सुद्धा प्रजेला कर द्यावा लागत असे.  यामुळे प्रजा त्रस्त होऊन दैन्यावस्थेला प्राप्त झाली.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, February 14, 2023

योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट | Practice-Failed and Behavior-Failed

 



योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट हे दोन्हीही भिन्न पुरुष आहेत.  कर्मभ्रष्ट पुरुष हा धर्माधर्म न जाणणारा, आचारधर्म न जाणणारा असतो.  तो अविवेकी, अविचारी असून कामांध झालेला असतो.  त्यामुळे तो स्वैर, अनियंत्रित, उच्छृंखल होतो.  स्वधर्म आणि सदाचार, सत्कर्माचा त्याग करुन अनाचार, पापाचरण आणि अधर्माचरण हेच त्याचे जीवन असते.  त्यामध्ये त्याला आवड असते.  तामसी उपभोगामध्येच तो रममाण होत असतो.  त्यामुळे त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होत नाही.

 

याउलट योगभ्रष्ट पुरुष हा निश्चितपणे दैवीगुणसंपन्न असून ब्रह्मचर्य, अहिंसा वगैरे तप अनुष्ठान केलेला तपस्वी, तसेच इंद्रियसंयमन, मनःसंयमन करून शमदमादि संपन्न पुरुष असतो.  तो विवेकवैराग्ययुक्त असून सदाचार, सत्कर्म आणि धर्मानुष्ठान करणारा असतो.  परंतु त्याला योगनिष्ठा प्राप्त झालेली नसते म्हणून तो योगभ्रष्ट आहे असे वाटते.  परंतु मृत्युनंतर त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होते आणि तेथे राहून पुण्यक्षय झाला की, पुन्हा मर्त्यलोकामध्ये आचारधर्माने संपन्न असलेल्या धार्मिक, पुण्यवान श्रीमंताच्या पोटी जन्माला येतो.

 

सत्त्वगुणामध्ये दृढ झालेले सात्त्विक उपासक ऊर्ध्वलोकात जातात.  तेथे दीर्घकाळ राहून पुण्यकर्माचे फळ स्वर्गादि भोग भोगून, पुण्यकर्मांचा क्षय झाल्यानंतर मर्त्यलोकामध्ये शुचिर्भूत असलेल्या श्रीमंत लोकांच्या कुळामध्ये जन्माला येतात.  म्हणजेच ज्याची योनि, कुळ आणि कर्म शुद्ध आहे अशा भाग्यवान श्रीमंत कुळामध्ये योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो.  परंतु कर्मभ्रष्ट पुरुष मात्र पुण्यवान ऊर्ध्वलोकांना प्राप्त तर होत नाहीत, इतकेच नव्हे तर शुचिर्भूत श्रीमंत कुळामध्येही जन्माला येत नाही.  कदाचित श्रीमंत कुळ असेल, परंतु त्याचे कुळ आणि आचार शुद्ध नसतील.  किंवा कुळ आणि आचार शुद्ध असतील तर तो श्रीमंत असेलच असे नाही.  म्हणून येथे विशेषकरून शुचिर्भूत श्रीमंत कुळ असे म्हटले आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, February 7, 2023

भूपालांची आणि आचारधर्माची निर्मिति | Creation of Protectors & Guidelines





स्वैर झालेल्या समाजावर नियंत्रण करण्यासाठी, या लोकांना नियम घालून योग्य ते शासन करण्यासाठी ऋषि-मुनींनी प्रथम या पृथ्वीचे विभाग पाडले. क्षत्रियांची निर्मिती केली.  क्षत्रियांच्यामध्ये महापराक्रमी राजेलोक निर्माण केले.  खरे तर प्राचीन काळी सगळीकडे ईश्वराचे साम्राज्य होते.  नियम सांगण्याची आवश्यकता नव्हती.  न वै राज्यं न राजाSSसीन्न दण्डो न च दाण्डिकः |  धर्मेणैव प्रजाः सर्वाः रक्षन्ति स्म परस्परम् ||  (महा. शांति.)  तेथे कोणी नियामक, शासक, राजा नव्हता.  शासन नव्हते, दंड नव्हता.  केवळ सत्याच्या व धर्माच्या आधारेच सर्व प्राणीमात्र मोठ्या आनंदाने जीवन जगत होते.  परंतु काळाच्या ओघात मनुष्यामधील कामक्रोधादि विकार वर्धन पावले.  विकृति वाढल्यामुळे ऋषि-मुनींनी सर्व नियम केले आणि समाजाला, प्रजेला नियमित करण्यासाठी भूपालांची निर्मिती केली.

 

भूपाल म्हणजे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी समर्थ राजेलोक निर्माण केले.  त्यानंतर त्या राजांनी प्रजेचे पालन कोणत्या नियमांच्या साहाय्याने करावे, हेही ठरवून दिले.  त्यासाठीच स्मृतिशास्त्र निर्माण झाले.  धर्म, अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीसाठी पृथ्वीतलावर यज्ञशास्त्राची म्हणजे वेदशास्त्राची निर्मिती केली.  ऋग्वेद, यजुर्वेदादि यज्ञशास्त्र तसेच त्यामधील कर्मकांडांचा प्रचार आणि प्रसार झाला.  ती सर्व कर्मे धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांचे साधन आहेत.

 

म्हणजे काही धर्मकार्य करावयाचे असेल, ऐहिक, पारलौकिक कामना पूर्ण करावयाच्या असतील, तसेच अर्थ म्हणजे संपत्ति मिळवायची असेल तर वेदग्रंथ मनुष्याला साधन देतात.  मात्र त्याचबरोबर मनुष्याने कसे वागावे ?  कोणते आचारधर्म पाळावेत ?  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र, तसेच ब्रह्मचर्य-गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांची कर्तव्ये काय आहेत ?  तसेच स्त्रीधर्म, राजधर्म, प्रजाधर्म या सर्वांचेच यथार्थ वर्णन स्मृतिग्रंथांच्यामधून केले जाते.  स्मृतिग्रंथामधील एखादेच विधान घेऊन वादविवाद करण्यापेक्षा स्मृतिग्रंथांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास आवश्यक आहे.  कारण हे ग्रंथ दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या जीवनाच्या विकासासाठीच आहेत, हे मनुष्याने प्रथम लक्षात घ्यावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ