Tuesday, February 28, 2023

भक्तीचे फळ तात्काळ मिळते | Result Of Devotion Is Instantaneous

 



भक्ति साधकाला ईश्वराभिमुख करून शेवटी ईश्वरस्वरूप बनविते.  भक्तीची पक्वता हेच भक्तीचे फळ आहे.  ते म्हणजे - यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति, अमृतः भवति, तुप्तः भवति |  म्हणून भक्ति प्राप्त झाली की, भक्त आनंदस्वरूप होतो.  हा आनंद कालांतराने नसून ज्याक्षणी भक्तीचा अनन्य भाव निर्माण होतो त्याचक्षणी तो आनंदरस लुटतो.  हा भाव अंतःकरणातील काम-क्रोध, लोभ-मोह, मद-मत्सर, दंभ-दर्प वगैरे दोष नाहीसे करतो आणि सत्य, नम्रता, करुणा, दया, त्याग वगैरे गुणांना भरती येते.  गुणांचा उत्कर्ष होतो.  अहंकार-ममकार नाहीसा होऊन समर्पण, शरणागति येते.  मन अत्यंत शुद्ध, सात्त्विक, प्रसन्न अंतर्मुख होऊन गुणसंपन्न होते.  भक्त मधुरभाषी होतो.  अंतर्बाहय वृत्ति ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन होते.  म्हणून भक्तीचा भाव उदयाला आल्यानंतर होणारा जो अत्यानंदाचा अनुभव आहे.  तो इहलोक आणि परलोकामध्ये मिळणाऱ्या सुखापेक्षा अनंतपटीने अधिक श्रेष्ठ आहे.

 

भक्त्या संजातया भक्त्या - भक्तीचे फळ भक्ति हेच आहे.  भक्त कधीही कोणतीही मुक्ति मागत नाही.  सालोक्य मुक्ति - भगवंताच्या लोकामध्ये जाऊन राहाणे, सामीप्य मुक्ति - भगवंताच्या अत्यंत जवळ जाऊन त्याची माळ, आभूषण वगैरे होऊन राहाणे, सारुप्य - भगवंताच्या रूपामध्ये बनणे आणि सायुज्य - भगवंताच्या विग्रहामध्ये एकरूप होणे.  याउलट भक्त परमेश्वराची सेवा मागतो.  कल्याणगुण गावयास मागतो, परमेश्वराची प्रसन्नता हीच भक्ताची इच्छा असते.  यालाच सेवा म्हणतात.  आनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा |  श्रीकृष्णाच्या अनुकूल होऊन त्याचे अखंड चिंतन करणे हीच उत्तम भक्ति आहे.

 

अन्य सर्व मार्गामध्ये साधकाला कालांतराने फळ मिळते.  कर्मामध्ये यज्ञाचे फळ स्वर्गप्राप्ति हे वर्तमान शरीराचा मृत्यु झाल्यानंतर मिळते.  ज्ञानमार्गामध्ये अनेक प्रकारच्या साधनेने साधनचतुष्टय प्राप्त होते आणि नंतर श्रवण, मनन, निदिध्यासाने व समाधिअभ्यासाने अद्वैतसिद्धि मिळते.  त्याचवेळी मोक्षप्राप्ति होते.  हे एका जन्मात प्राप्त होत नसून, अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या साधनेच्या प्रभावाने शेवटी मिळते.  योगाभ्यासामध्येही तेच आहे.  यमनियमांची सिद्धि करून धारणा, ध्यान, समाधीच्या अभ्यासाने योगनिष्ठा मिळते.  या सर्व साधनेमध्ये अत्यंत कठीण परिश्रम आहेत.  अनेक वेळेला नैराश्य येते; परंतु भक्तीमध्ये मात्र काहीही नाही.  फळ तात्काळ मिळते.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ




Tuesday, February 21, 2023

आदर्श राज्ये आणि युद्धे | Ideal Kingdoms And Wars

 



प्राचीन काळी युद्धाशिवाय राज्ये चालत असत.  राजेलोक परस्परांच्या सहकार्याने पृथ्वीचे रक्षण करीत असत.  एका राज्यात काही कमी पडले तर दुसरे राजे मदतीला येत असत.  शत्रु, युद्ध असा प्रश्नच नव्हता.  फक्त सोयीसाठी देशांच्या सीमा निश्चित केल्या होत्या.  आपापसामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण, प्रेमाचे व विश्वबंधुत्वाचे नाते होते.  राजा व प्रजा अत्यंत सुखाने नांदत होती.  अशी ही आदर्श राज्ये व त्यांचे आदर्श राजे पृथ्वीचे पालन करीत असत.

 

परंतु काळाच्या ओघात राजेलोक सुखासीन होऊन भोगासक्त झाले.  सत्तेचा लोभ वाढला.  त्यामुळे एकमेकांच्यामध्ये द्वेष, मत्सर, असूया, कपट, निर्माण होऊ लागले.  सत्ता ऐश्वर्य, प्रसिद्धि यासाठी स्पर्धा होऊ लागली.  त्यामुळेच देशदेशांच्यामध्येच युद्ध अपरिहार्य ठरले.  राज्य व प्रजेचे रक्षण करण्यासाठी राजांच्यासमोर युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.  म्हणूनच ही सगळी युद्धे प्रथम मनुष्याच्या मनात आणि नंतर राज्या-राज्यांच्यामध्ये, देश, विदेशांच्यामध्ये युद्धे, महायुद्धे होऊ लागली.  युद्ध ही एक मनामधील भयंकर प्रवृत्ति आहे.  यामुळे मन अस्वस्थ व अस्थिर होऊन शत्रूचा सूड उगविण्यासाठी मनुष्य कोणत्याही स्तराला जाऊ शकतो.  विश्वामधील सर्व महायुद्धाचे बीज हे मनुष्याच्या मनात आहे.

 

या युद्धांच्यामध्ये ज्या राजाचा पराभव होत असे, त्या राज्यातील प्रजा दुःखी होऊ लागली.  प्रजेवर अनेक कर लादले जाऊ लागले.  जीवनावश्यक गोष्टींच्यावर सुद्धा प्रजेला कर द्यावा लागत असे.  यामुळे प्रजा त्रस्त होऊन दैन्यावस्थेला प्राप्त झाली.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, February 14, 2023

योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट | Practice-Failed and Behavior-Failed

 



योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट हे दोन्हीही भिन्न पुरुष आहेत.  कर्मभ्रष्ट पुरुष हा धर्माधर्म न जाणणारा, आचारधर्म न जाणणारा असतो.  तो अविवेकी, अविचारी असून कामांध झालेला असतो.  त्यामुळे तो स्वैर, अनियंत्रित, उच्छृंखल होतो.  स्वधर्म आणि सदाचार, सत्कर्माचा त्याग करुन अनाचार, पापाचरण आणि अधर्माचरण हेच त्याचे जीवन असते.  त्यामध्ये त्याला आवड असते.  तामसी उपभोगामध्येच तो रममाण होत असतो.  त्यामुळे त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होत नाही.

 

याउलट योगभ्रष्ट पुरुष हा निश्चितपणे दैवीगुणसंपन्न असून ब्रह्मचर्य, अहिंसा वगैरे तप अनुष्ठान केलेला तपस्वी, तसेच इंद्रियसंयमन, मनःसंयमन करून शमदमादि संपन्न पुरुष असतो.  तो विवेकवैराग्ययुक्त असून सदाचार, सत्कर्म आणि धर्मानुष्ठान करणारा असतो.  परंतु त्याला योगनिष्ठा प्राप्त झालेली नसते म्हणून तो योगभ्रष्ट आहे असे वाटते.  परंतु मृत्युनंतर त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होते आणि तेथे राहून पुण्यक्षय झाला की, पुन्हा मर्त्यलोकामध्ये आचारधर्माने संपन्न असलेल्या धार्मिक, पुण्यवान श्रीमंताच्या पोटी जन्माला येतो.

 

सत्त्वगुणामध्ये दृढ झालेले सात्त्विक उपासक ऊर्ध्वलोकात जातात.  तेथे दीर्घकाळ राहून पुण्यकर्माचे फळ स्वर्गादि भोग भोगून, पुण्यकर्मांचा क्षय झाल्यानंतर मर्त्यलोकामध्ये शुचिर्भूत असलेल्या श्रीमंत लोकांच्या कुळामध्ये जन्माला येतात.  म्हणजेच ज्याची योनि, कुळ आणि कर्म शुद्ध आहे अशा भाग्यवान श्रीमंत कुळामध्ये योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो.  परंतु कर्मभ्रष्ट पुरुष मात्र पुण्यवान ऊर्ध्वलोकांना प्राप्त तर होत नाहीत, इतकेच नव्हे तर शुचिर्भूत श्रीमंत कुळामध्येही जन्माला येत नाही.  कदाचित श्रीमंत कुळ असेल, परंतु त्याचे कुळ आणि आचार शुद्ध नसतील.  किंवा कुळ आणि आचार शुद्ध असतील तर तो श्रीमंत असेलच असे नाही.  म्हणून येथे विशेषकरून शुचिर्भूत श्रीमंत कुळ असे म्हटले आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, February 7, 2023

भूपालांची आणि आचारधर्माची निर्मिति | Creation of Protectors & Guidelines





स्वैर झालेल्या समाजावर नियंत्रण करण्यासाठी, या लोकांना नियम घालून योग्य ते शासन करण्यासाठी ऋषि-मुनींनी प्रथम या पृथ्वीचे विभाग पाडले. क्षत्रियांची निर्मिती केली.  क्षत्रियांच्यामध्ये महापराक्रमी राजेलोक निर्माण केले.  खरे तर प्राचीन काळी सगळीकडे ईश्वराचे साम्राज्य होते.  नियम सांगण्याची आवश्यकता नव्हती.  न वै राज्यं न राजाSSसीन्न दण्डो न च दाण्डिकः |  धर्मेणैव प्रजाः सर्वाः रक्षन्ति स्म परस्परम् ||  (महा. शांति.)  तेथे कोणी नियामक, शासक, राजा नव्हता.  शासन नव्हते, दंड नव्हता.  केवळ सत्याच्या व धर्माच्या आधारेच सर्व प्राणीमात्र मोठ्या आनंदाने जीवन जगत होते.  परंतु काळाच्या ओघात मनुष्यामधील कामक्रोधादि विकार वर्धन पावले.  विकृति वाढल्यामुळे ऋषि-मुनींनी सर्व नियम केले आणि समाजाला, प्रजेला नियमित करण्यासाठी भूपालांची निर्मिती केली.

 

भूपाल म्हणजे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी समर्थ राजेलोक निर्माण केले.  त्यानंतर त्या राजांनी प्रजेचे पालन कोणत्या नियमांच्या साहाय्याने करावे, हेही ठरवून दिले.  त्यासाठीच स्मृतिशास्त्र निर्माण झाले.  धर्म, अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीसाठी पृथ्वीतलावर यज्ञशास्त्राची म्हणजे वेदशास्त्राची निर्मिती केली.  ऋग्वेद, यजुर्वेदादि यज्ञशास्त्र तसेच त्यामधील कर्मकांडांचा प्रचार आणि प्रसार झाला.  ती सर्व कर्मे धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांचे साधन आहेत.

 

म्हणजे काही धर्मकार्य करावयाचे असेल, ऐहिक, पारलौकिक कामना पूर्ण करावयाच्या असतील, तसेच अर्थ म्हणजे संपत्ति मिळवायची असेल तर वेदग्रंथ मनुष्याला साधन देतात.  मात्र त्याचबरोबर मनुष्याने कसे वागावे ?  कोणते आचारधर्म पाळावेत ?  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र, तसेच ब्रह्मचर्य-गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांची कर्तव्ये काय आहेत ?  तसेच स्त्रीधर्म, राजधर्म, प्रजाधर्म या सर्वांचेच यथार्थ वर्णन स्मृतिग्रंथांच्यामधून केले जाते.  स्मृतिग्रंथामधील एखादेच विधान घेऊन वादविवाद करण्यापेक्षा स्मृतिग्रंथांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास आवश्यक आहे.  कारण हे ग्रंथ दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या जीवनाच्या विकासासाठीच आहेत, हे मनुष्याने प्रथम लक्षात घ्यावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ