Tuesday, November 29, 2022

भारतभूमीमध्ये ज्ञानाचा उपदेश | Knowledge For Bharat

 



ब्रह्मदेवांनी वसिष्ठमुनींना आज्ञा केली.  हे मुने !  हे साधो !  आता तू येथून पुढे पृथ्वीवर जावेस.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर जम्बुद्वीपामध्ये भारतवर्ष आहे.  त्या अत्यंत पवित्र असणाऱ्या भारतभूमीमध्ये जाऊन तेथील सर्व लोकांच्यावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने तू त्यांना या गुह्य ज्ञानाचा उपदेश कारावास.

 

ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना पृथ्वीवरील विशेष स्थान निर्देश करून भारतवर्षामध्ये जाण्याचा आदेश दिला.  याचे कारण भारतभूमि ही अतिशय पवित्र आहे.  'भारत' याचा अर्थ होतो - भायां आत्मविद्यायां रमते इति भारतः I  जो आत्मविद्येमध्ये रमतो तो भारत देश होय.

 

मुळातच या भूमीवर ज्ञानाचे व धर्माचे संस्कार आहेत.  येथे अनेक ऋषि-मुनींनी अवतार घेऊन ज्ञानाचा विस्तार केला आहे.  याच भूमीमध्ये प्रत्यक्ष भगवंतांनी अनेक अवतार घेतले आहेत.  ही वेदांची जन्मभूमी आहे.  या भूमीने कित्येक वेळेला आत्मज्ञानाचे श्रवण केले आहे.  गुरुशिष्यपरंपरा हे तर या भूमीचे वैशिष्ठ्य आणि भूषण आहे.  त्रैलोक्यामध्ये अतिशय दुर्लभ असणाऱ्या आणि राजगुह्य-राजविद्या असणाऱ्या आध्यात्मिक विद्येची ही भूमी आहे.  म्हणून स्वर्गामधील देवदेवता सुद्धा येथे जन्म घेण्याची इच्छा करतात.

 

या पवित्र भूमीमधील लोक आत्मज्ञानाचे अधिकारी आहेत.  म्हणून ब्रह्मदेव वसिष्ठांना भारतवर्षांमध्ये जाण्याचा आदेश देतात.  ब्रह्मदेव वसिष्ठ मुनींना सांगतात की, "हे मुने !  या भारतवर्षामध्ये जाऊन तेथे जे कोणी लोक कर्ममार्गाचे अधिकारी आहेत, त्यांना प्रथम तू कर्मकांडाचा व नंतर क्रमाने ज्ञानाचा उपदेश कर.  तसेच जे विवेक आणि वैराग्यसंपन्न आहेत त्यांना निरतिशय आनंद देणारे ज्ञान तू द्यावेस.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, November 22, 2022

अज्ञानी, श्रद्धाहीन, संशयी | Ignorant, Faithless, Doubtful

 



जर अज्ञानी किंवा श्रद्धाहीन मनुष्य असला तरी तर्कशुद्ध भाषेने, युक्तीने शास्त्राचे महत्त्व समजावून देऊन काळाच्या ओघामध्ये श्रद्धाहीन मनुष्यामध्ये शास्त्र आणि गुरूंच्याविषयी श्रद्धा निर्माण करता येईल आणि अज्ञानाचा ध्वंस करून ज्ञानाची उदात्त दृष्टि प्राप्त करून देता येईल.  हे प्रयत्नाने शक्य आहे.  परंतु संशयी पुरुषाचे संशय निवारण करणे अत्यंत कठीण आहे.  तो सर्वांच्यामध्ये महापापी आहे.

 

याप्रमाणे अज्ञानी, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य या तिघांनाही विवेकबुद्धि असूनही ज्ञानप्राप्ति होत नाही.  त्यामुळे मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त होत नाही.  हे तिघेही स्वतःचा नाश करून घेतात.  परंतु या तिघांच्यामध्ये संशयी मनुष्याचा तर अधिक नाश होतो.  त्याला इहलोकही मिळत नाही आणि परलोक सुद्धा प्राप्त होत नाही.  म्हणजेच त्याला ऐहिक विषयसुखही मिळत नाही.  तसेच स्वर्गसुख सुद्धा मिळत नाही.  त्याला काहीच मिळत नाही.  याला कारण संशय वृत्ति होय.

 

संशय हाच सर्व अनर्थांचे बीज आहे.  स्वतःच्या कर्तृत्वाने खूप परिश्रम घेतले तरी केवळ प्रयत्नाने फळ मिळत नाही.  मग ते कर्म व्यावहारिक असो किंवा बौद्धिक असो.  त्यामध्ये दृढ श्रद्धा, निष्ठा असणे आवश्यक आहे.  तसे नसेल तर कितीही चांगले कर्म असले तरी श्रद्धाहीन कर्म हे केवळ शारीरिक कर्म होईल.  त्याचे काही प्रमाणामध्ये व्यावहारिक फळ मिळाले तरी सुद्धा आहार, विहारादि विषयांचा उपभोग घेताना संशयी वृत्तीमुळे त्याला स्वाद किंवा आनंद उपभोगता येत नाही.  विषयसुख उपभोगण्यासाठी आवश्यक अनुकूल मन नसल्यामुळे सुखप्राप्ति होत नाही.  जर या व्यावहारिक जगामध्ये सुख नाही तर स्वर्गसुख तरी कसे मिळणार ?

 

संशयी वृत्तीमुळे अनेक प्रकारचे विकल्प निर्माण होऊन जीव सुखापासून वंचित होतो.  सम्यक ज्ञानाच्या दृष्टीला पारखा होतो.  प्रत्येक विवेकी मनुष्याने सुरुवातीला गुह्य रहस्य समजले नाही, तरीही शास्त्रावर आणि गुरूंच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी.  तसेच कोणत्याही विधानावर विकल्प न करता संशयरहित मनाने आणि श्रद्धेने गुरुपदेश पुन्हा पुन्हा एकाग्र मनाने श्रवण करावा आणि याच मनुष्यदेहामध्ये निरतिशय शांति प्राप्त करून जीवन परिपूर्ण करावे.  हाच पुरुषार्थ आहे.  हेच मनुष्याचे परमकर्तव्य आहे.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, November 15, 2022

आत्मोद्धाराची साधने – सत्य व तीर्थयात्रा | Means of Self-Upliftment – Truth & Pilgrimage

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.  नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II  (श्रीमद्  भागवत)  अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

सत्य म्हणजे यथार्थ वचन होय.  जसे आहे तसे बोलणे होय.  सत्य बोलणे हा मनुष्याचा आद्य धर्म आहे.  सत्याच्या आधारानेच या पृथ्वीला धारण केले जाते.  सत्याच्या सामर्थ्यानेच सूर्य तप्त होतो, अग्नि जाळण्यास समर्थ होतो, असे सत्याचे महत्त्व अवर्णनीय आहे.  म्हणून मनुष्याने जीवनभर सत्याने वागावे.  सत्याचा कधीही त्याग करू नये.

 

ईश्वराने अनेक तीर्थे निर्माण केली.  तीर्थांच्यामध्ये स्थानमहात्म्य असते.  त्या त्या ठिकाणी जो श्रद्धापूर्वक जाईल आणि दानधर्मादि आचरण करेल त्याला अगणित पुण्यफळ प्राप्त होते.  तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन नव्हे.  तीर्थयात्रेत आपले मन अत्यंत शुद्ध हवे.  तसेच आपले आचरणही अतिशय शुद्ध व स्वच्छ हवे.  तीर्थाच्या ठिकाणी केलेले पाप हे वज्रलेपाप्रमाणे होते.  म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर दुसऱ्याशी भांडण करणे, वैषयिक चर्चा करणे, निंदा-नालस्ती करणे, चोरी करणे, ईश्वराप्रति अश्रद्धेचा भाव निर्माण करणे ही भयंकर पापे आहेत.

 

मात्र जो अतिशय श्रद्धेने तीर्थयात्रा करेल, तेथे दानधर्मादींचे आचरण करेल, ईश्वराचे नामस्मरण करेल, त्यालाच तीर्थयात्रा फलदायी होऊन ईश्वराच्या अस्तित्वाची विशेषत्वाने अनुभूति येऊ शकेल.  तीर्थयात्रेला बाहेर पडल्यामुळे निदान काही प्रमाणात साधकाचे मन रोजच्या व्यवहारापासून, संसाराच्या आसक्तीपासून निवृत्त होऊ शकेल.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, November 8, 2022

गुरुकुलामधील शेवटचा उपदेश | The Take-Away From ‘Gurukul’

 



प्राचीन काळी गुरुकुल परंपरा होती.  लहान मुलांचे उपनयन झाल्यानंतर मुले गुरुगृही जात असत.  गुरुकुलामध्ये काही वर्ष व्रतस्थ राहून अनेक शास्त्रांचे अध्ययन करीत.  अध्ययन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी गुरुकुलामधून पुन्हा घरी येऊन गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करीत.  गुरुकुलामधून घरी जाताना गुरु विद्यार्थ्यांना शेवटचा उपदेश करीत –

 

सत्यं वद |  धर्मं चर |  स्वाध्यायान्मा प्रमदः |

सत्यान्न प्रमदितव्यम् |  धर्मान्न प्रमदितव्यम् |

कुशलान्न प्रमदितव्यम् |  भूत्यै न प्रमदितव्यम् |

स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |

मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |

अतिथिदेवो भव |  यान्यवद्यानि कर्माणि |

तानि सेवितव्यानि |  नो इतराणि |  यान्यस्माकगं सुचरितानि |

तानि त्वयोपास्यानि ||                                           (तैत्तिरीय उपनिषत्)

 

सत्य बोलावे.  धर्माचे आचरण करावे.  स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नये.  सत्यामध्ये प्रमाद करू नये.  धर्मामध्ये प्रमाद करू नये.  कुशल सत्कर्मामध्ये प्रमाद करू नये.  ऐश्वर्यप्रद मंगल, पवित्र कर्मांच्यामध्ये प्रमाद करू नये.  स्वाध्याय व प्रवचन यामध्ये प्रमाद करू नये.  देवकार्य व पितृकार्य यामध्ये प्रमाद करू नये.

 

तू मातेला देवाप्रमाणे मानावेस.  पिता, गुरु व अतिथी यांना देखील देवाप्रमाणे मानावे.  निंद्य नसणाऱ्या कर्मामध्येच प्रवृत्त व्हावे.  त्याव्यतिरिक्त कर्मे करू नयेत.  आपल्या गुरुजनांच्या सुचरिताचे अनुसरण करावे.  त्याचीच उपासना करावी.  थोडक्यात, जीवनभर श्रेष्ठ नीतिमूल्यांचेच आचरण करावे.  त्यासाठी शास्त्राला, वेदांनाच प्रमाणभूत मानावे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, November 1, 2022

आत्मोद्धाराची साधने – दान | Means of Self-Upliftment – Offerings

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.

नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II

(श्रीमद् भागवत)

 

अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

ईश्वराने मनुष्याला दान हे साधन दिले.  जीवनामध्ये दान ही वृत्ति अत्यंत आवश्यक आहे.  कारण दुसऱ्याला देण्यामध्ये त्याग आहे.  समर्पणाची भावना आहे.  दानवृत्तीमुळे विषयासक्ति कमी होते.  ममत्वाचा भाव कमी होतो.  त्यामधून कळत-नकळत वैराग्य उदयाला येते.  दानाने धनाची शुद्धि होते.  जितके आपण देतो तितके आपणास मिळत राहते.  ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो, त्यावेळी आपल्याला व दुसऱ्याला दोघांनाही आनंद होतो.

 

दानवृत्तीमुळे परोपकाराची भावना जागृत होते.  देण्याची सवय लागते.  संसारबंधन कमी कमी व्हायला लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक गोष्टींचे दान देता-देता सर्वात शेवटी मनुष्य आपल्या अहंकाराचेच समर्पण करतो.  त्यालाच सर्वस्वाचे दान किंवा बलिदान असे म्हणतात.  शास्त्रामध्ये कोणाला दान द्यावे ?  केव्हा द्यावे ?  काय द्यावे ?  कोठे द्यावे ?  कसे द्यावे ?  तसेच त्या दानाचे फळ काय ?  याचे वर्णन विस्तारपूर्वक येते.  म्हणून मनुष्याने अवश्य सत्पात्री दान करावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ