हे रामा ! सत्संगाचे फळ प्रत्यक्ष बहिरंगाने दिसत नाही. सत्संगामध्ये गेल्यावर एखादी व्यावहारिक गोष्ट किंवा
वस्तु मिळत नाही. व्यवहारामध्ये अन्य अनेक
संग आहेत. त्यामधून मनुष्याला धन, सत्ता, प्रतिष्ठा
वगैरेदि अनेक दृश्य वस्तु प्राप्त होतात. ते
व्यावहारिक फळ दुसऱ्यांना दाखविता येते. परंतु
सत्संगामध्ये गेल्यावर काय मिळते ? असा
प्रश्न आपल्यास कोणी विचारला तर आपण व्यावहारिक दृष्टीने त्याचे उत्तर देऊ शकत नाही.
कारण सत्संगाचे फळ डोळ्यांना दिसत नाही.
तेथे जाऊन एखादी पदवी किंवा प्रमाणपत्र मिळत
नाही. परंतु सत्संगाचा आपल्या मनावर मात्र
खूप मोठा परिणाम होतो. आपले जीवन अंतरबाह्य
बदलते. कदाचित एखादा नास्तिक मनुष्य असेल तर
तो सत्संगाच्या प्रभावाने आस्तिक, श्रद्धावान सुद्धा होऊ शकतो.
सत्संगामध्ये गेल्यानंतर साधकामध्ये
सर्वात पहिला फरक पडत असेल तर तो म्हणजे साधक विवेकाचा आश्रय घेतो. आपण आयुष्यामध्ये कसे जगावे ? कशाला किती महत्त्व द्यावे ? धर्म काय ? आणि अधर्म काय ? आपल्या विचारांची दिशा काय असावी ? असे सर्व ज्ञान साधकाला होते. मगच जीवनामध्ये बदल होऊ लागतो. सत्संगामधून प्राप्त झालेल्या या विवेकाचे साधक
रक्षण करतो. म्हणजेच गुरूंनी सांगितलेल्या
शास्त्रदृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतो. गुरु
आपल्या जीवनाला अधिष्ठानरूप होतात.
जसजसे साधक सत्संगामध्ये जाईल, तसतसे त्याच्या
मनामधील विषयासक्तीचा प्रभाव कमी कमी होतो. सत्संगाची आवड निर्माण होते. त्याला भोगांच्यामध्ये, विषयांच्यामध्ये रस वाटेनासा
होतो. गुरुमुखामधून शास्त्रश्रवणाची दृढ इच्छा
मनामध्ये निर्माण होते. सत्संगामध्ये गेल्यानंतर
त्याला परमानंदाची प्राप्ति होते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–