Tuesday, December 27, 2022

ज्ञानजिज्ञासेचे मूळ | Root Of Curiosity Of Knowledge

 



रामा !  ज्ञानजिज्ञासा सुद्धा सहजासहजी निर्माण होत नाही.  व्यवहारामधील अन्य सर्व गोष्टींचे महत्व नाहीसे होऊन शास्त्रश्रवण करण्याची तळमळ एखाद्याच भाग्यवान मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते.  अशी तीव्र जिज्ञासा निर्माण होणे म्हणजे जीवाने मागील अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या सुकृतांचे फळ आहे.  पूर्वपुण्याईशिवाय शास्त्राचे शब्द कानावर सुद्धा पडत नाहीत.

 

रामा !  तू तर रघुवंशामधील राजपुत्र आहेस.  ऐश्वर्यसंपन्न, सौन्दर्यसंपन्न असून सर्व विषय आणि उपभोग तुझ्या सेवेला सादर सज्ज आहेत.  अशा या यौवनावस्थेमध्ये सुद्धा तुझ्या अंतःकरणामध्ये अतिशय दुर्लभ अशी विरक्ति निर्माण झाली.  त्या वैराग्याचे वर्णन तू पहिल्या प्रकरणामध्ये शेकडो श्लोकांच्यामधून केलेस.

 

रामा !  तुझे हे वैराग्य केवळ शाब्दिक नव्हते, तर विवेकपूर्ण होते.  म्हणून वैराग्य उदयाला आल्यावर तुझ्या मनामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे ज्ञानजिज्ञासा उत्पन्न झाली.  वैराग्य म्हणजे केवळ घरदार सोडणे किंवा वस्त्र बदलणे नव्हे.  जेथे वैराग्य असेल तेथे जिज्ञासा आवश्यक आहे आणि ज्ञानजिज्ञासा नसेल तर ते वैराग्य साधकाला योग्य दिशेला न नेता अधःपतित करू शकेल.  किंवा असे वैराग्य असेल तर काही काळ साधक घराचा आणि काही विषयांचा त्याग करेल, वस्त्रांचा रंग बदलेल.  परंतु काही काळाने पुन्हा तो संसारमार्गामध्येच प्रवृत्त होईल.

 

म्हणून या मार्गामध्ये वैराग्यप्राप्तीनंतर जिज्ञासा उदयाला येणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.  असे वैराग्य उदयाला आले असेल तर साधकाने समजावे की, आपल्या अनेक जन्मांचे सुकृत फलद्रूप झाले आहे.  त्याचप्रमाणे रामा !  तू मला जो प्रश्न विचारलास यावरून मला समजते की, तुझे पूर्वसुकृत उदयाला आले आहे.  याचा मला खूप आनंद झाला आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ



Tuesday, December 20, 2022

मनाचा मूळ स्वभाव | Natural Propensity of Mind

 



आज जरी चंचलत्व, प्रमाथित्व वगैरे हे दोष मनाचा स्वभाव वाटत असला तरी तो मनाचा स्वभाव नाही.  मनामध्ये जरी चंचलता, क्षोभ वगैरे अनुभवायला येत असतील तरी सुद्धा मनाचा स्वभाव चंचलता वगैरेदि दोष त्याग करून स्थिर होण्याकडेच असतो.  कोणत्या ना कोणत्या तरी साधनाने, बाह्य उपायाने स्थिर होण्याचा, शांत होण्याचा प्रयत्न असतो.  याचाच अर्थ आपल्या स्वस्थितीलाच जाण्याचा मनाचा स्वभाव दिसतो.

 

उदा.  ज्याप्रमाणे शीतलता हा पाण्याचा स्वभाव आहे.  परंतु अग्नीच्या संसर्गाने पाण्याची शीतलता नाहीशी होऊन अग्नीचा दाहकता हा गुण पाण्यामध्ये येतो आणि पाणी उष्ण होते.  हा आपला अनुभव आहे.  परंतु पाणी जरी उष्ण झाले तरी दाहकता किंवा उष्णता हा पाण्याचा स्वभाव किंवा धर्म नाही.  अग्नीच्या संसर्गाने पाण्यामध्ये आलेला तो आगंतुक धर्म आहे.  त्यामुळे त्या आगंतुक धर्माचा त्याग करून पुन्हा आपल्या स्वभावाला जाण्याचा पाण्याचा स्वभाव आहे.  म्हणून पाणी काही वेळानंतर पुन्हा थंड होते.

 

त्याचप्रमाणे मनाचे आहे.  आज जरी मन अत्यंत चंचल, क्षोभकारक वाटत असेल किंवा मनामध्ये अनेक प्रकारची द्वन्द्वे असली तरी सुद्धा ती विषयवासनांच्यामुळे आहेत हे लक्षात ठेवावे.  या सर्व मनाच्या तात्कालिक अवस्था आहेत.  हे समजावून घ्यावे कारण मन आपल्या स्वतःच्या शांत स्थितीला, द्वन्द्वरहित अवस्थेलाच जाण्याचा प्रयत्न करीत असते.  हीच मनाची अंतःस्फूर्त स्वाभाविक प्रवृत्ति दिसते.  हीच मनाची प्रवृत्ति असेल तर चंचलता, अस्थिरता, क्षोभ वगैरे सर्व दोष त्याग करून आपल्या शांत स्वरूपाला जाणे अशक्य नाही.  जरी कठीण असले तरी ते शक्य आहे.

 

याच कारणामुळे भगवान म्हणतात, हे अर्जुना !  मन चंचल आहे यात काहीही संशय नाही.  तरी सुद्धा मनाचा निग्रह करणे शक्य आहे.  त्यासाठी उपाय आहे.  तो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर.  यावर उपाय म्हणजे वैराग्याचा अभ्यास !  श्रुति, स्मृति आणि युक्ति यांच्या साहाय्याने मागे सांगितल्याप्रमाणे सर्व विषयांचे खरे अंतरंग विवेकाने आणि विचाराने स्पष्टपणे पाहाण्याचा प्रयत्न करावा, विषयांचे अनित्यत्व, दुःखित्व, बध्दत्व आणि मिथ्यात्व पुन्हा पुन्हा जाणावे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 13, 2022

वसिष्ठ मुनींचे "ज्ञानावतरण" | Knowledge Incarnation Of Vasishtha Muni

 



विश्वामधील प्रत्येक जीव हा जिज्ञासु आहे.  सर्वचजण आनंदाचे, शांतीचे शोधक व साधक आहेत.  म्हणून रामा !  मी येथे पृथ्वीतलावर आलो आहे.  जोपर्यंत येथे प्राणिमात्र आणि ही भूतपरंपरा आहे तोपर्यंत मी येथे या गुरुशिष्यपरंपरेच्या आणि ज्ञानाच्या रूपाने राहणार आहे.

 

ज्ञानगंगा माझ्या गुरूंच्यापासून म्हणजे ब्रह्मदेवांच्यापासून प्रारंभ झालेली आहे.  ब्रह्मदेव हे केवळ माझे पिता नसून अखिल जगताचे पिता आहेत.  मी त्यांचा प्रथम मानसपुत्र आहे.  याचा मला सार्थ अभिमान आहे.  त्यांनी नियुक्त केल्यामुळेच परमपित्याने जे काही मला सांगितले तेच गुह्य ज्ञान मी जीवांना प्रदान करतो आहे.  रामा !  अध्यात्माच्या आणि ज्ञानाच्या वरवर चर्चा करणे फार सोपे आहे.  परंतु ज्ञानाचा उपदेश देऊन शिष्याला ज्ञानाची अनुभूति देणे, हे अत्यंत अवघड काम आहे.  हे कार्य रामा !  अखंडपणे मी करीत आहे.

 

गुरु हे ज्ञानी पुरुष असून अखंडपणे लोकोद्धाराच्या कार्यामध्ये प्रवृत्त होतात.  परंतु लोकसंग्रहाचे कार्य करीत असताना ज्ञानी पुरुष त्यामध्ये कधीही लिप्त, स्पर्शित आणि विकारयुक्त होत नाहीत.  याचे कारण ज्ञानी पुरुषाला करण्यासारखे, मिळविण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही.  सर्व करीत असताना ते पृथ्वीतलावर निःसंग व निर्लिप्त वृत्तीने जगतात.  आपला उपदेश कोणी ऐकत नाही म्हणून त्यांना नैराश्य ही येत नाही.  त्यांचे मन उद्विग्नही होत नाही.  त्यामुळेच आयुष्यभर हजारो लोकांच्यामध्ये कार्य करूनही ज्ञानी पुरुषाचे मन अत्यंत शांत व सुस्थिर राहते.  भगवंतांनी म्हणूनच ज्ञानी पुरुषाला 'स्थितप्रज्ञ' असे संबोधले आहे.

 

वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, "स्थितप्रज्ञ वृत्तीने, शांत चित्ताने रामा !  मी हे सर्व कार्य करीत आहे.  परंतु व्यवहाराच्या दृष्टीने जरी मी ज्ञानदानाचे कार्य करीत असेल तरी रामा !  वस्तुतः पारमार्थिक स्वरूपाने मात्र अहं किञ्चित् अपि न करोमि |  मी काही करीत नाही.  कारण ज्ञान देणे व ज्ञान घेणे हा व्यवहार सुद्धा खरे तर मिथ्या स्वरूपाचा आहे.  अध्यस्त आहे.  ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान-ज्ञान देणारा हे सर्वच तत्त्वस्वरूपामध्ये अध्यस्त स्वरूपाने स्थित आहे.  म्हणून रामा !  तत्त्व हेच एकमेव सत्य आहे.  तेच तत्त्व माझे स्वस्वरूप आहे.  म्हणून मी वस्तुतः अकर्ता, अलिप्त, अस्पर्शित, निर्विकारस्वरूप, चैतन्यस्वरूप आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, December 6, 2022

भक्ति श्रेष्ठ | Devotion Is The Best

 



कर्म, ज्ञान, योगापेक्षाही भक्ति श्रेष्ठ आहे.  भक्तीने परमेश्वराला सहजपणे प्रसन्न करता येते.  वादविवादाने, योगसामर्थ्याने, तर्कवितर्काने, विचाराने परमेश्वर प्रसन्न होत नाही.  इतकेच नव्हे, तर परमेश्वराशी जवळीक सुद्धा साधता येत नाही.  परमेश्वराजवळ जाण्याचे साधन, त्याला सहज, अनायासाने प्रसन्न करून घेण्याचे साधन म्हणजे अनन्य भक्ति आहे.

 

कर्म, ज्ञान आणि योगसाधनेमध्ये अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.  कर्मामध्ये वर्णाश्रमाचा विचार आणि त्यानुसार अधिकारित्व येते.  धर्मकर्मात बाह्य सामग्री, धनद्रव्य , वेदमंत्र, ऋत्विक वगैरेंची जरूरी आहे.  इतके करून यज्ञकर्मामध्ये अनेक प्रकारचे प्रत्यवाय दोष निर्माण होतात.  ते प्रतिकूल फळ निर्माण करतात.  ज्ञानप्राप्तीमध्ये साधकामध्ये साधनचतुष्टयसंपत्ति, विवेक, वैराग्य, शमादिषट्क संपत्ति आणि मुमुक्षुत्व असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय तो ज्ञानाचा अधिकारी होत नाही.  ही संपत्ति प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ आहे.  त्यानंतर श्रवणमननादि साधना आणि समाधि अभ्यास करणे अत्यंत कठीण आहे.  योगाभ्यासामध्ये इंद्रियांच्यावर संयमन, मनावर संयमन, मनाचा निरोध करण्यासाठी यमनियमांचा कठोर अभ्यास आहे.

 

परंतु भक्तीमध्ये मात्र याप्रकारचे कोणतेही दोष नाहीत.  भक्तीमध्ये अधिकारित्व आहे की नाही याचा विचार नाही.  वर्णाश्रम भेद नाही.  विवेक-वैराग्य, शमदमाची, किंवा यम, नियम, आसन, प्राणायामादि यांचा कठोर अभ्यास नाही.  बाह्य सामग्रीची जरुरी नाही.  वेदपठण, ऋत्वागांची आवश्यकता नाही.  तसेच कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय दोष नाही.  भक्तीमध्ये समर्पण भाव आणि दैन्यता असल्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता नाही, कारण अहंकार आणि भक्ति एका ठिकाणी राहू शकत नाही.  म्हणून कर्म, ज्ञान योगापेक्षा भक्ति श्रेष्ठ आहे.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ