Saturday, May 28, 2016

कर्म आणि आत्मज्ञान प्राप्ति | Actions and Self-Realization


संपूर्ण संसाराचे, दुःखाचे मूळ कारण म्हणजेच अविद्या होय.  अविद्या म्हणजेच स्वस्वरूपाचे अज्ञान - अविद्याकामकर्मग्रंथि आहे.  त्याचा निरास करण्याचे सामर्थ्य अपराविद्येमध्ये नाही, कारण अपराविद्या कर्मात्मक आहे.  या विद्येमध्ये कर्म-कर्मफलाचे प्रतिपादन केलेले आहे.  काय करावे आणि काय करू नये ?  त्याचप्रमाणे अमुक एक कर्म केले की, त्याचे अमुक एक फळ मिळेल, याप्रमाणे ही विद्या फक्त कर्म आणि कर्मफळाचेच प्रतिपादन करते आणि म्हणून ती विद्या कर्मपरच असल्यामुळे ती कार्माचाच निरास करू शकत नाही.

ज्याप्रमाणे, अंधाराचा नाश करावयाचा असेल तर अंधाराच्या विरोधी असणारा घटक म्हणजेच प्रकाश आवश्यक आहे. तसेच, कर्माचा नाश करावयाचा असेल तर कर्माच्या विरोधी घटक पाहिजे.  परंतु ही अपरा विद्या कर्माच्या विरोधी नाही, तर उलट ती कर्मात्मक आहे.  कर्म, कर्मफलपर आहे.  हेच अधिक स्पष्ट करण्यासाठी येथे टीकाकार सुंदर दृष्टांत देतात –

तुम्ही शंभर वेळेला रोज उठून प्राणायाम केला, तरी शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भास झाला असेल आणि कोणीतरी सांगितले की “ अरे ! ही चांदी नाही, शिंपला आहे. ” यावर तो मनुष्य जर म्हणत असेल की, “ जरा थांबा ! मी प्राणायाम करतो, साधना करतो आणि साधनेने माझ्या भासाची निवृत्ति होईल. ”  असे शंभर नव्हे, लाखो प्राणायाम केले, हजारो कर्मे केली, जप-जाप्य, व्रत-वैकल्ये पूजा केली, तपश्चर्या केली, तरी त्याच्यामुळे चांदीचा भास निरास होत नाहीजोपर्यंत शिंपल्याचे दर्शन होत नाही, शिंपल्याचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत शिंपल्याच्या अज्ञानाची निवृत्ति अन्य कोणत्याही साधनाने होऊ शकत नाही.

अविद्या आणि कर्म हे एकमेकांच्या विरोधी नसल्यामुळे कर्म कधीही अविद्येचा ध्वंस करू शकत नाही.  फक्त ज्ञानच कर्माच्या, अज्ञानाच्या विरोधी आहे.  त्यामुळे फक्त ज्ञानच अज्ञानाचा ध्वंस करू शकते.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007




- हरी ॐ

Tuesday, May 24, 2016

मृगजळापासून शिकवण | Lessons from a Mirage


वाळवंटामध्ये सर्वत्र वाळूचे साम्राज्य असते.  प्रखर उन्हाळ्यात त्या वाळूवर सूर्याचे तप्त किरण पडल्यावर वाळू चमकते.  त्यावेळी तेथे एखाद्या तृषार्त झालेल्या मनुष्याला त्या वाळूवर वाळू न दिसता पाणी दिसते.  पाणी दिसल्याबरोबर त्याला एकदम बरे वाटते.  “ लवकरात लवकर तेथे जावे आणि ते पाणी पिऊन तहान शांत करावी ”, या कल्पनेने तो तृषार्त झालेला मनुष्य वाळवंटामध्ये धावतो, चालतो-चालतो आणि त्याच्या लक्षात येते की, जितका तो पाण्याच्या दिशेने जातो, तितके ते पाणी पुढे-पुढे जात आहे.

जे पाणी त्याची तहान भागवू शकेल, असे खरे पाणी त्याला कधीही प्राप्त होत नाही.  त्यानंतर त्याच्या डोळ्यांना पाणी दिसते, परंतु तोच मनुष्य बुद्धीने विचार करतो की, “ ज्याच्यासाठी मी धावत आहे, ज्याला मी डोळ्यांनी पाणी म्हणून पाहत आहे, तेथे पाणी नाही तर फक्त पाण्याचा एक भास आहे. ”  हे विचारांनी तो जाणतो आणि शांत होतो.

या दृष्टांतामध्ये त्या मनुष्याची प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था होते.  पाणी घेण्यामध्ये ही प्रवृत्ति नाही आणि पाणी त्याग करण्यामध्ये सुद्धा प्रवृत्ति नाही.  म्हणजे प्रवृत्तीही नाही आणि निवृत्ति सुद्धा नाही.  डोळ्यांना पाणी दिसते, परंतु बुद्धीने त्याच पाण्याचा निरास केलेला आहे.  पाण्यामधील सत्यत्वबुद्धीचा विचाराने निरास होऊन त्या मनुष्याला प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था प्राप्त होते.

आजपर्यंत संसारामधून कोणीही शाश्वत सुख, सार किंवा तथ्य पाप्त केलेले नाही.  “ हा संसार करून मला खरोखरच नित्य फळ मिळणार की अनित्य फळ मिळणार ? ”  यामध्ये साधकाने विचार करावा.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, May 17, 2016

ब्रह्मज्ञानी पुरुषाचा संकल्प | Will of the Self-Realized Saint



ब्रह्मज्ञानी पुरुषाचे सर्व संकल्प पूर्ण होतात.  याचे कारण एकच, ते म्हणजे त्याचे अत्यंत शुद्ध असणारे अंतःकरण होय.  तोच सत्यसंकल्पवान होतो.  त्याच्या संकल्पाला स्वार्थ, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार, अहंकार, ममकार या कोणत्याही विकाराचा स्पर्श सुद्धा नसतो.  म्हणूनच त्याचा संकल्प अत्यंत स्थिर, दृढ व सामर्थ्यसंपन्न असल्यामुळे त्या संकल्पामध्ये प्रचंड मोठी शक्ति असते.

यामुळे ज्ञानी पुरुष जी जी कामना करतो, मग ती कामना ऐहिक किंवा पारलौकिक असेल, इतकेच नव्हे, तर ती कामना स्वतःसाठी केलेली असेल किंवा अन्य लोकांच्यासाठी केलेली असेल, ती प्रत्येक कामना पूर्ण होते.  याचे कारण तो पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने पूर्ण तृप्त व कृतकृत्य असतो.  त्याची मूलभूत असणारी कामना किंवा भोगवासना गळून पडते.

श्रुति म्हणते –
या वेद निहितं गुहायां परमे व्योमन् |   (तैत्ति. उप. २-१)
जो ज्ञानी पुरुष हे स्वरूप स्वतःच्याच बुद्धिगुहेमध्ये पाहतो, त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्याला मिळविण्यासारखे, भोगण्यासारखे, ज्ञान घेण्यासारखे, ऐकण्यासारखे, करण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही.  तो पूर्ण तृप्त, आप्तकाम होतो.

श्रुति म्हणते –
श्रोत्रियस्य चाकामहतस्य | (तैत्ति. उप. २-८-३)
तोच श्रोत्रिय, ब्रह्मज्ञानी पुरुष अकामहत होतो. त्याला प्राप्त होणाऱ्या आनंदाची कोणीही कल्पनाच करू शकत नाही. तो स्वतःच आनंदस्वरूप होतो.  या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या आनंदाच्या अंशमात्र आनंदावर इंद्रादि देवदेवता जगतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, May 10, 2016

मन - मल आणि विक्षेप | Mind - Impurity and Distortion


मनामध्ये स्वभावतःच मल आणि विक्षेप हे दोन प्रमुख दोष आहेत.  आचार्य येथे दोन दृष्टांत देतात – जसे, आरशावर खूप धूळ साठलेली असेल, तर आरशासमोर उभे राहूनही प्रतिबिंब दिसत नाही.  त्याप्रमाणेच, अंतःकरणामध्ये रागद्वेषादि विकाररूपी धूळ, अशुद्धता असेल, तर आत्मस्वरूप प्राप्त होत नाही.  यालाच ‘मल’ असे म्हटले जाते.

आचार्य दुसरा दृष्टांत देतात – जर पाणी हलवून अस्थिर, चंचल केले तर त्या पाण्यामध्ये कधीही प्रतिबिंब दिसू शकत नाही.  याप्रमाणेच मन चंचल, अस्वस्थ, अस्थिर असेल, तर ते मन कधीही एकाग्र, तल्लीन, तन्मय होऊ शकत नाही.  मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर भरकटत राहते.  मनामध्ये भयंकर वादळे, संघर्ष निर्माण होतात.  मन सैरभैर, उच्छृंखल, विक्षिप्त होते.  एक क्षणभरही ते स्थिर, एकाग्र होत नाही.  यालाच ‘विक्षेप’ असे म्हणतात.  संत बहिणाबाई वर्णन करतात –
मन वढायं वढायं उभ्या पिकातलं ढोरं | 
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावरं ||   (संत बहिणाबाई)

या दोन दोषांच्यामुळेच आत्मस्वरूप असूनही दिसत नाही.  म्हणून ज्यावेळी ज्ञानाच्या प्रसादाने हे दोन दोष निरास होतील, मन शुद्ध व एकाग्र होईल, त्याचवेळी आत्मदर्शन शक्य आहे.  येथे ज्ञानाचा प्रसाद म्हणजेच बुद्धीचा प्रसाद होय.  श्रुति सुद्धा म्हणते –
धातुप्रसादान्महिमानमात्मनः |        (कठ. उप. १-२-२०)

साधकावर स्वतःच्या बुद्धीचीच कृपा झाली पाहिजे.  आपल्यावर गुरूंची, परमेश्वराची, शास्त्राची कृपा अखंडपणे आहेच, आपल्यावर आपलीच कृपा होणे आवश्यक आहे.  आपलेच मन या साधनेला अनुकूल झाले पाहिजे.  संत तुकाराम म्हणतात –
मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण ||  (संत तुकाराम महाराज)


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, May 3, 2016

स्वस्वरूप – दूर की समीप ? | The Self – Far or Near ?


भगवान गीतेमध्ये म्हणतात -
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेSखिलम् |
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ||  (गीता अ. १५-१२) 

“ हे अर्जुना !  ज्या सूर्याचा प्रकाश अखिल जगातला प्रकाशमान करतो, ते तेज माझेच आहे, असे जाण.  तेच तेज चंद्रामध्ये, अग्नीमध्ये आहे. ” असे ते स्वरूप अत्यंत दूर आहे.  विश्वामध्ये ज्या ज्या वस्तू दूर आहेत, त्याहीपेक्षा ते स्वरूप दूर आहे.  म्हणजेच ते अज्ञानी लोक आहेत, त्यांना ते स्वरूप अत्यंत दुर्विज्ञेय असल्यामुळे अत्यंत दूर आहे.

त्या प्राकृत बुद्धीच्या लोकांना कितीही उपदेश दिला तरी त्यांच्या बुद्धीला काहीही आकलन होत नाही.  त्यांच्या दृष्टीने ब्रह्म ही एक कल्पनाच होते.  “ ब्रह्म आनंद स्वरूप आहे ”, हे शाब्दिक ज्ञान त्यांना होते, परंतु त्याचा अनुभव मात्र कधीही येत नाही.  त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो की, “ खरोखरच ब्रह्मस्वरूप आहे का? आनंद, सुख, शांति आहे का ?  की ब्रह्म ही एक केवळ कल्पनाच आहे ? ” अशा विकल्पांच्यामुळे ते लोक ब्रह्मस्वरूपापासून आणखी दूर जातात.  इतके दूर जातात की, काही वेळेस या मार्गामध्ये च्युत होतात.

परंतु श्रुति या ठिकाणी लगेचच सांगते की, ते ब्रह्म दूर नाही, तर अत्यंत समीप, अगदी जवळ या शरीरामध्येच आहे.  जे विवेकी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून तत्त्वस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करतात, साधना करतात, अंतःकरणाची शुद्धि करतात, त्यांच्यासाठी ते स्वरूप अत्यंत जवळ म्हणजेच या शरीरामध्ये आहे.  ते स्वतःचेच स्वात्मस्वरूप आहे.  ते माझ्याही आत आहे आणि सर्वांच्याही अंतःकरणामध्ये अहं अहं स्वरूपाने संनिविष्ट आहे त्यालाच सर्वांतर्यामी असे म्हणतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007




- हरी ॐ