Tuesday, June 25, 2019

“ॐ नमः शिवाय” – १ | Meaning of “Om Namah Shivay” – 1




प्रथम मंत्रामधून ‘नमः शिवाय’ या दोन शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे.  ‘नमः’ शब्दाचा वाच्यार्थ ‘त्याग’ असून हा अर्थ कर्मकांडामध्ये प्रसिद्ध आहे.  ‘शिवाय’ या शब्दामध्ये दोन पदे आहेत.  शिवाय = शिव + आय |  व्याकरणशास्त्रामध्ये प्रकृति व प्रत्यय प्रसिद्ध आहेत.  ‘शिवाय’ शब्दामधील ‘शिव’ या शब्दाला ‘प्रकृति’ असे म्हणतात तर ‘आय’ हा ‘शिव’ या प्रकृतीचा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे.  याप्रकारे ‘शिव’ या प्रकृतीचा वाच्यार्थ ‘आनंद’ हा आहे.  ‘आनंद’ या शब्दाने पुढे सांगितले जाणारे धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार अर्थही उपलक्षित होतात.  तसेच ‘शिवाय’ यातील ‘आय’ या चतुर्थीच्या प्रत्ययाचा वाच्यार्थ ‘फळ’ म्हणजेच ‘मनोवांछित सिद्धी’ असा होतो.  

शं शं आनंदं करोति ददाति इति शङ्करः |  जो सर्वांना आनंद प्रदान करतो, त्यास ‘शङ्कर’ असे म्हणतात.  याचे कारण शंकर हा स्वतःच आनंदस्वरूप आहे.  याठिकाणी ‘शिव’ या शब्दामधून एखादी मर्त्य व्यक्ति किंवा शरीर सूचित केलेले नसून शिव म्हणजेच आनंदस्वरूप ‘परब्रह्म’ होय.  या आनंदस्वरूपामध्ये कोणताही तर-तमभाव, उत्कर्ष-अपकर्ष, उच्च-नीच, उत्कृष्ट-निकृष्ट असा भेद नाही.  यानंतर शास्त्रकार ‘शिव’ या शब्दाची आणखी एक व्याख्या करतात –  

शेते तिष्ठति सर्वं जगत् यस्मिन् सः शिवः शम्भुः विकाररहितः |
ज्याच्यामध्ये संपूर्ण जग शयन करते, समाविष्ट होते, त्या अविनाशी, अविकारी तत्त्वास ‘शिव’ असे म्हणतात.  तेच तत्त्व संपूर्ण विश्वामध्ये, चराचरामध्ये तसेच, सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये स्थित आहे.  तोच शिव सर्वांना आनंद देणारा आहे.  शिव कोणाला आनंद देतो ?  याचे उत्तर ‘नमः शिवाय’ यामधून दिलेले आहे.  जो साधक ‘नमः’ झालेला आहे, म्हणजेच जो शिवाला अनन्य भावाने शरण गेलेला आहे, त्यालाच शिव आनंद प्रदान करतो.   



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, June 18, 2019

मंत्रोपासाना का करावी ? | Purpose of Mantra-Upasana




मंत्रोपासना समजण्यासाठी प्रथम मंत्र म्हणजे काय ?  हे समजले पाहिजे.  मननात् त्रायते इति मन्त्रः |  जो मननाच्या साहाय्याने साधकाचे रक्षण करतो, त्यास ‘मंत्र’ असे म्हणतात.  रक्षण याचा अर्थ केवळ बहिरंगाने संकटांच्यामधून रक्षण नव्हे. जीवनामध्ये संकटे ही येणारच !  एक संकट गेले की, दुसरे संकट दत्त म्हणून समोर उभे असतेच.  जीवनामध्ये सतत छोटे-मोठे, चांगले-वाईट प्रसंग घडतच राहतात.  बहिरंगाचे रक्षण हे खरे रक्षण नसून मनाचे सामर्थ्य वाढणे, हेच खरे रक्षण आहे.  मन सामर्थ्यशाली होण्यासाठीच ‘मंत्रोपासना’ आहे.  

किंवा रक्षण म्हणजेच मृत्यूच्या भीतीपासून रक्षण होय.  मनुष्याला सतत मृत्यूची भीति ग्रस्त करते.  या भीतीपासून मुक्त व्हावयाचे असेल तर त्यासाठी मृत्यूच्या कल्पनेचा निरास होणे आवश्यक आहे.  म्हणून मृत्यूपासून रक्षण म्हणजेच अज्ञानापासून रक्षण होय.  त्यासाठीच अंतःकरणामध्ये ज्ञानसूर्याचा उदय झाला पाहिजे.  या ज्ञानप्राप्तीसाठी ‘मंत्रोपासना’ हीच साहाय्यकारी साधना आहे.  

किंवा रक्षण म्हणजे संसारापासून रक्षण होय.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे !  तरसंसरति इति संसारः |  ज्याठिकाणी सतत बदल, विकार होतात, त्यास ‘संसार’ असे म्हणतात.  आपल्या मनामध्ये सतत क्षणाक्षणाला अनंत बदल होत असतात.  मनामध्येच राग-द्वेष, काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर, सुख-दुःख, कपट-असूया, स्वार्थ, लोलुपता, कामना अशा अनंत वृत्ति सतत निर्माण होत असतात.  यामुळेच मनात सतत संघर्ष अनुभवायला येतो.  मन अत्यंत अस्थिर, उद्विग्न, विक्षिप्त असते.  यालाच ‘संसार’ असे म्हणतात.  

यामधून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो, परंतु या चक्रव्यूहातून आपणास बाहेर पडता येत नाही.  जसे, रेशमाचा कीडा स्वतःच स्वतःभोवती जाळे विणतो व बद्ध होतो.  तसे आपणच आपल्याभोवती कल्पनेने जाळे निर्माण केलेले आहे.  माझे-माझे म्हणून घट्ट पकडलेले आहे.  मी स्वतःविषयी कल्पना करतो, विश्वाबद्दल, अन्य व्यक्तींच्याबद्दल कल्पना करतो व त्या कल्पनाच मला बद्ध करतात.  त्यामधून नंतर इच्छा असूनही सुटू शकत नाही.  या सर्व मनोकाल्पित संसारामधून मुक्त होण्यासाठी ‘मंत्रोपासना’ हे प्रभावी साधन आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ

Tuesday, June 11, 2019

गुरुकृपा अपरिहार्य आहे | Guru’s Blessing is Indispensible




आत्मस्वरूपाचा बोध करणे म्हणजे केवळ प्रवचन देणे नव्हे.  प्रोफेसर भरपूर आहेत.  प्रवचनकार भरपूर आहेत.  परंतु आत्मस्वरूप शिष्याच्या अंतःकरणात प्रकट करणे अत्यंत कठीण आहे.  म्हणून ज्ञान देणे म्हणजे शिकविणे किंवा प्रचार करणे नसून ते श्रोत्यांच्या हृदयामध्ये प्रकट करणे होय.  जसे, एखाद्या गुलाबाच्या कळीला सूर्यकिरणाचा स्पर्श होऊन ते हळूवारपणे उमलते व क्रमाने पूर्ण विकसित होते.  तसेच हे आत्मज्ञान अन्तःकरणात प्रकट झाले पाहिजे.  

शिष्याने उपदेश व उपदेशग्रहण यामध्ये अत्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  कारण साधक अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी, विश्व, परमेश्वर, आत्मा, गुरु, शास्त्र, साधना या सर्वांच्याविषयी अनंत कल्पना निर्माण करून मनामध्ये कल्पनांचे जंजाळ करतो.  तसेच, अध्यात्मशास्त्रावरील अनेक पुस्तके गोळा करून त्यांचा तौलनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो.  वेगवेगळ्या महाराजांकडे जाऊन भिन्न-भिन्न साधना करतो.  थोड्या काळात अनुभव आला नाही तर महाराज बदलतो.  अशा शिष्याला आत्मबोध करणे खरोखरच अत्यंत अवघड आहे.  

काही साधक स्वविचाराने, स्वबुद्धीने आत्मानुभव करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधक टी. व्ही. वर पाहून, काही इंटरनेटवरून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधकांना मोबाईल फोनवरून आत्मज्ञान हवे असते.  ही सर्व साधने अत्यंत प्रगत असतील व एकविसाव्या शतकात नव्हे, आणखी कोणत्या युगात जरी मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी उपनिषदांच्यामध्ये श्रुतीने आदेश दिलेला आहे –
तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् |    (मुण्ड. उप. १-२-१२)

आत्मतत्त्वाचे यथार्थ व सम्यक् ज्ञान प्राप्त करण्यासाठी जिज्ञासु साधकाने हातामध्ये समिधा घेऊन, सर्वसंगपरित्याग करून म्हणजेच मन विषयासक्तरहित करून त्याने श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच शरण जावे.  गुरूंना अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय गुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे शक्य नाही आणि गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ज्ञानाची प्राप्ति होणे शक्य नाही.  केवळ विद्वत्ता, बुद्धि व तर्काच्या जोरावर ज्ञाननिष्ठा मिळत नाही.  या मार्गात गुरुकृपेशिवाय पर्याय नाही.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


Tuesday, June 4, 2019

त्यागामधून जीवनमुक्तावस्था | Life-Liberation Through Renunciation




श्रुति म्हणते –
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्त्वमानशुः |     (नारा. उप. २-१२)
कर्माने, प्रजेने अथवा धनाने अमृतत्त्वाची प्राप्ति होत नसून फक्त त्यागानेच होते.  

परमात्म्याने इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ति बहिर्मुख बनविल्यामुळे जणु काही इंद्रियांची हिंसाच केलेली आहे.  त्यामुळे जीव बाह्य विषयांनाच पाहतो.  अंतरात्म्याला पाहत नाही.  एखादाच धीर पुरुष इंद्रियांच्या बहिर्मुख प्रवृत्तीवर संयमन करून अमृतत्त्वाची इच्छा करतो.  

किंवा –
यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येSस्य हृदि श्रिताः |
अथ मर्त्योSमृतो भवति अत्र ब्रह्म समन्श्रुते ||            (कठ. उप. २-३-१४)
जेव्हा अंतःकरणामधील सर्व कामनांचा निःशेष त्याग होतो, तेव्हाच मर्त्य जीव अमृतस्वरूप होऊन त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते.  या सर्व श्रुतींच्यावरून सिद्ध होते की, जोपर्यंत अज्ञानमूलक वासना नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत साधकाला आत्मस्वरूपाची प्राप्ति होणे शक्य नाही.  

अज्ञानाच्या नाशाशिवाय निःशेष कामनात्याग शक्य नाही आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय आत्मअज्ञानाचा ध्वंस होणे शक्य नाही.  म्हणूनच आचार्य येथे फार सुंदर शब्द वापरतात – विशिष्टधीमत्त्वमन्तरेण श्रोत्रादिआत्मभावः परित्यक्तुं न शक्यते |  म्हणून जो आत्मज्ञानाच्या साहाय्याने देहादि आत्मभावाचा, अहंभावाचा त्याग करतो, त्यालाच जीवनमुक्तावस्था प्राप्त होते.  तो जिवंत असतानाच, देहपातापूर्वीच या संसारबंधनातून मुक्त होतो.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ