Tuesday, December 26, 2017

प्रकृती आणि परमात्मा | Nature and the Supreme Being



त्रिगुणात्मक प्रकृति, त्या प्रकृतीमधून निर्माण होणारी कर्मे व त्यांची सुखदुःखादि फळे या सर्वांचा परमात्मा “साक्षी” आहे.  तो स्वतः काहीच करीत नाही. त्यामध्ये कर्तृत्व-कारयितृत्व, सुखदुःख, पापपुण्यात्मक कर्म-कर्मफळ काहीच नाही.  तर तो स्वतः अविकारी स्वरूपाचा असून कूटस्थसाक्षीचैतन्यस्वरूपाने राहातो.  काय करावे व काय करू नये हे तो ठरवीत नसून प्रकृतीलाच सर्व काही स्वातंत्र्य आहे.  तो या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या सर्व व्यापारापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी आहे.  

नाटकदीपवत् |  नाटकगृहातील दीप जसा नाटकामधील सर्व प्रसंगांचा साक्षी असतो.  तो कोणत्याही प्रसंगाने, घटनेने स्पर्शित, लिप्त न होता अखंडपणे प्रकाशस्वरूपाने, साक्षीस्वरूपाने राहातो.  परमात्मा हा प्रकृतीच्या सर्व क्रिया चालू असतील तरी स्वतः मात्र अविकारी, उपद्रष्टा राहातो. स्वस्वरूपामध्ये अनायासाने, सुखाने, काहीही न करता व न करविता स्वस्थ राहातो.  जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे, हे सिद्ध होते.  ही अविद्यालक्षणाने युक्त असलेली त्रिगुणात्मक प्रकृति सर्व जीवांच्या अंतःकरणावर अज्ञानाचे आवरण घालते.  यामुळे मोहीत झालेले सर्व जीव कर्मप्रवृत्त होवून कर्म-कर्मफळामध्ये बद्ध होतात.  

भगवान म्हणतात – दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |  (गीता अ. ७-१४)
हे अर्जुना  !  या त्रिगुणात्मक असणाऱ्या माझ्या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे.  ही दैवी म्हणजेच ईश्वराची माया, योगमाया अलौकिक, अनाकलनीय आहे.  ही मायाशक्ति विश्वाची, सर्व जीवांची निर्मिती करते, त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण घालून अनेक प्रकारचे मोह निर्माण करून जीवांना भुरळ पाडते.  हीच माया जीवाच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, रागद्वेष, कामक्रोधादि विकार निर्माण करते.  जीवाला विषयाभिमुख व विषयासक्त करून बंधनामध्ये अडकविते.  म्हणजे स्वभावच जीवाला संकल्प निर्माण करून कर्मप्रवृत्त करतो व कर्मफळाने बद्ध करतो.  परंतु आत्मा मात्र प्रकृतीचा, प्रकृतीच्या गुणांचा, सर्व कर्मांचा, कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सुखदुःखादि अनुभवांचा साक्षी आहे.  तो या कशानेही बद्ध, स्पर्शित होत नाही.  तो नित्य, अविकारी स्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, December 19, 2017

त्रिगुणात्मक प्रकृती | Prakriti – The Prime Driver



परमात्मा तर जीवाला कर्मप्रवृत्त करीत नाही किंवा त्याला सुखदुःखात्मक इष्टानिष्ठ फळही देत नाही.  परंतु प्रत्यक्ष अनुभव जर पाहिला तर जीव अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला दिसतो. तसेच तो अनेक प्रकारची सुखदुःखादि कर्मफळेही उपभोगतो.  मग त्या जीवाकडून कर्म करवून घेणारा तसेच जीवाला त्याच्या कर्मांची फळे देणारा कोण आहे ?  आत्म्यामध्ये जर कर्तृत्व-कारयितृत्व वगैरेदि प्रत्ययांचा अत्यंत अभाव असेल तर हे प्रत्यय कोणामुळे निर्माण होतात.  या शंकेवर भगवान स्वतःच उत्तर देतात – स्वभावस्तु प्रवर्तते |  

स्वभावच सर्व जीवांना कर्मप्रवृत्त करतो, कर्म करवून घेतो आणि कर्मफळ देतो.  स्वभावच जीवाच्या मनामध्ये प्रवृत्ति म्हणजे संकल्प निर्माण करतो.  स्वभाव म्हणजेच प्रकृति होय.  ही वासनामय प्रकृति त्रिगुणात्मक असते.  हीच जीवाच्या अंतःकरणामध्ये सात्त्विक, राजसिक, तामसिक वासना निर्माण करते.  मागील अनेक जन्मांच्यामध्ये या वासनांचा संग्रह केलेला असतो.  या सूक्ष्म वासना जेव्हा फलद्रूप होतात तेव्हा त्याचेच रूपांतर संकल्पामध्ये होवून तो जीव प्रकृतीच्या, वासनांच्या अधीन होवून त्या वासना, संकल्प पूर्ण करण्यासाठी कर्मप्रवृत्त होतो.  ही प्रकृति जीवाकडून सर्व प्रकारची कर्मे करवून घेते आणि जीवाला त्याची कर्मफळे उपभोगावयाला लावते.  

मागील अनेक जन्मांच्या वासना असल्यामुळे मनावर त्याचा फार मोठा प्रभाव असतो.  या सूक्ष्म वासना घेवूनच जीव जन्माला येत असतो.  त्यामधूनच प्रत्येकाचा स्वभाव बनतो.  प्रत्येकाचा स्वभाव, म्हणजेच प्रकृती भिन्न-भिन्न स्वरूपाची असते.  त्यामुळे प्रत्येकाचा एक विशिष्ट स्वभाव बनतो, कारण त्यामध्ये त्रिगुणांचे कमी-जास्त प्रमाण असते.  प्रत्येक जीव या प्रकृतीच्या अधीन असतो.  त्याचा स्वभावच त्याच्यावर नियमन करतो.  ही प्रकृतीच प्रत्येक जीवाला कर्मामध्ये प्रवृत्त करते.  ही प्रकृति वासना निर्माण करून जीवाला चांगल्या-वाईट कर्मात प्रवृत्त करते.  म्हणून जशी वासना असेल तसेच कर्म त्याच्या हातून घडते.  तीच प्रकृति जीवाला सुखदुःख उपभोगण्यास लावते.

जीव या वासनामय प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तो काहीही करू शकत नाही.  स्वतःच्या स्वभावावर तो नियंत्रण करू शकत नाही.  म्हणून जीवांच्या या सर्व कर्मप्रवृत्तीचे व सुखदुःखादि संसारबंधनाचे कारण परमात्मा नसून त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Monday, December 11, 2017

मृगजळ आणि विश्वाचे मिथ्यात्व | Discovering Futility through Mirage



जोपर्यंत मृगजळाचे खरे स्वरूप समजत नाही, तोपर्यंत तो भास सत्य वाटतो.  यामुळे प्रत्यक्षामध्ये तेथे पाणी नसूनही पाणी आहे असे वाटून हरीण तहान शमविण्यासाठी त्या दिशेने धावते.  इतकेच नव्हे तर, मनुष्य सुद्धा पाण्याच्या दिशेने जातो.  परंतु स्वानुभवाने जेव्हा ते पाणी नाही तर, पाण्याचा केवळ भासच आहे हे समजते, त्यानंतर डोळ्यांनी जरी पाणी पाहिले तरी मनुष्यामध्ये प्रवृत्ति दिसत नाही.  

त्याचप्रमाणे जोपर्यंत या दृश्य विश्वाचे असलेले अधिष्ठान – परब्रह्मस्वरूप समजत नाही तोपर्यंत बुद्धि विश्वाला सत्यत्व देते आणि या सत्यत्वबुद्धीमुळेच मनामध्ये विषयकामना निर्माण होते.  असत्य, खोट्या विषयाची कामना कधीही निर्माण होत नाही.  म्हणून सत्यत्वबुद्धीमुळे कामना निर्माण होते आणि कामनापूर्तीसाठी मनुष्य अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रमाणे तो कामना-कर्म-कर्मफळ पुन्हा कामना अशा चक्रामध्ये अडकतो.  

परंतु ज्यावेळी तत्त्वविचाराने विश्वाच्या मागे असलेले विश्वाचे खरे सत्य समजते त्यावेळी आपोआपच विश्वाला बुद्धीने दिलेले सत्यत्व नाहीसे होते, विश्वाचे मिथ्या स्वरूप समजते आणि मनाने निर्माण केलेल्या प्रवृत्ति आणि निवृत्ति या वृत्तींचा निरास होतो.  त्यानंतर तो ज्ञानी पुरुष विश्वाच्या मागे धावत नाही आणि विश्वापासून पाळूनही जात नाही.  तर तो विश्वामध्ये राहूनच विश्वापासून अलिप्त राहातो.  सर्व प्रकारची कर्मे करूनही अंतरंगामधून साक्षीस्वरूपाने राहून अकर्ता-अभोक्तास्वरूप असलेल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, December 5, 2017

जितेंद्रियः | Victor of Senses




जितेंद्रियः – मन शुद्ध होऊन ब्रह्माभ्यासाने विषयासक्ति आणि भोगवासना गळून पडली की, मनाची उपशमा होते.  मनामधील क्षोभ, संताप, कामक्रोधादि विकार संपतात.  याचा परिणाम म्हणून साधकाला स्वभावतःच मनःसंयमन प्राप्त होते.  मन एकदा ताब्यात आले की, आपोआपच सर्व इंद्रिये त्याच्या ताब्यात येऊन तो जितेंद्रिय होतो.  

सर्व इंद्रिये त्यांच्या स्वभावाप्रमाणे बहिर्मुख असून विषयांच्यामध्येच रमत असतात.  ती विषयभोगासाठी सतत व्याकूळ झालेली असतात. वखवखलेली असतात.  यामुळे ती हळूहळू उधळलेल्या घोड्यांच्याप्रमाणे स्वैर, अनियंत्रित होऊन मनुष्याला गुलाम बनवितात.  त्याच्या बुद्धि आणि मनाला खेचून विषयाभिमुख करतात.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला पशुतुल्य बनवितात.  म्हणून जीवन जगत असताना इंद्रियांच्यावर संयमन करणे आवश्यक आहे.  

यासाठी साधकाने विवेकाचा आश्रय घेऊन मनरूपी लगामाने इंद्रियांना वश करून घ्यावे. त्यांना सदाचार, सत्कर्म आणि धर्माचरणामध्ये प्रवृत्त करून दुष्टाचरण आणि अधर्माचरणापासून निवृत्त करावे.  म्हणजे त्यांच्या स्वैर, उच्छृंखल वृत्तीवर नियमन होईल आणि शेवटी ब्रह्माभ्यासाने ज्यावेळी मनावर संपूर्ण संयमन होईल त्यावेळी आपोआपच इंद्रियांच्यावर संपूर्ण निग्रह होईल.  

कूर्मोङ्गानीव सर्वशः |  ज्याप्रमाणे कासव पाण्यामध्ये मुक्त विहार करीत असते, परंतु धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर ते आपले सर्व अवयव कवचाखाली निवृत्त करून रक्षण करते आणि धोका नाहीसा झाल्यानंतर पुन्हा मुक्त संचार करते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला इंद्रियांच्यावर संपूर्ण संयमन प्राप्त होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ



Sunday, November 26, 2017

श्रवण साधनेमधील अडथळे | Obstacles in Shravan Sadhana



एखाद्या अपरिपक्व साधकाने कर्मानुष्ठान न करता हट्टाने संन्यास ग्रहण केला तर त्याला कधीही ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  याउलट श्रावणादि साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आणि अडथळे येतात.  प्रतिबंध अनेक प्रकारचे आहेत –

१. मनामध्ये विषयासक्ति आणि विषयभोगवासना असल्यामुळे बाह्य सुंदर व मोहक असणारे विषय कामना निर्माण करून मन बहिर्मुख करतात आणि विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  तो विषयांच्याशिवाय जगू शकत नसल्यामुळे विषयांचा त्याग करणे त्याला अत्यंत कठीण होते.  उलट तो विषयांच्या आकर्षणाला बळी पडतो.

२. एखादे वेळी विषयांच्या मगरमिठीमधून सुटका झाली तरी सुद्धा इंद्रिये अतिशय बलवान आणि प्रबल असतात.  त्यामुळे अनेक वर्षांच्या इंद्रियांना लागलेल्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत.  इंद्रियांना विषयसुखाची चटक लागलेली असल्यामुळे ती साधकाच्या मनाला अत्यंत व्याकूळ करून विषयाकडे खेचून नेतात.  यामुळे इंद्रियसंयमन आणि मनःसंयमन सुटते आणि साधक पुन्हा विषयभोगामध्ये रममाण होतो.  

३. प्रयत्नाने आणि अभ्यासाने इंद्रियांच्यावर काही प्रमाणामध्ये संयमन केले, तरी त्याच्यामागे असलेल्या मनामधील अनेक प्रकारचे रागद्वेषादि दोष आणि कामक्रोधादि विकार नाहीसे होत नाहीत.  चित्तशुद्धि नसल्यामुळे ते दोष पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून बाहेर येतात आणि मनामध्ये क्षोभ, संताप, विक्षेप निर्माण होतात. मनाची एकाग्रता खंडित होते.  त्यामुळे मन शास्त्रश्रवणामध्ये राहात नाही.  थोडक्यात मनःसंयमन आणि मनोनिग्रह नसल्यामुळे शास्त्राचा गूढार्थ आणि तत्त्वार्थ स्पष्ट, निःसंशय होत नाही.  

४. काही वेळेला मनामध्ये सुप्त असलेले विषयांचे सूक्ष्म संस्कार आणि विषयभोगवासना कोणत्यातरी प्रसंगाच्या निमित्ताने उफाळून बाहेर येतात व मनाला व्याकूळ, अस्वस्थ करून विषयभोगामध्ये प्रवृत्त करतात.  यामुळे साधकामधील विवेकवैराग्यादि गुणांचा ऱ्हास होतो आणि श्रवणाची साधना खंडित होते.  

५. सर्वात शेवटी, मनुष्यामधील अहंकार हा फार मोठा अडथळा आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

           
- हरी ॐ

Tuesday, November 21, 2017

संन्यास आणि निष्काम कर्मयोग | Renunciation & Dispassionate Actions



ज्यांनी गुरूगृही जावून श्रद्धा आणि भक्तीने आचार्यांची अनन्य भावाने सेवा केलेली नाही, अंतःकरणशुद्धि प्राप्त केलेली नाही आणि त्यामुळे वेदान्तशास्त्राचे सम्यक व यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त झालेले नाही, असे पारमार्थिक तत्त्व न जाणणारे अविद्वान लोक सर्वकर्मसंन्यास आणि निष्काम कर्मयोग हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाचे आहेत असे म्हणतात.  एका मार्गामध्ये प्रवृत्ति आणि दुसऱ्या मार्गामध्ये सर्व कर्मांच्यामधून पूर्ण निवृत्ति आहे.  त्याचप्रमाणे कर्मयोग अविद्वान गृहस्थाश्रमी साधकांना दिलेला असून सर्वकर्मसंन्यास संन्यस्त वृत्तीच्या विद्वान पुरुषांना दिलेला आहे.  त्यामुळे दोघांचे फळही भिन्न स्वरूपाचे आहे.  दोन्हीही मार्गांमध्ये अधिकारीभेद, साधनभेद आणि फलभेद असल्यामुळे अविद्वान लोक हे दोन्हीही मार्ग भिन्न स्वरूपाने पाहातात.  

परंतु वेदान्तशास्त्राचे रहस्य जाणणारे पंडित लोक मात्र दोन्हीही मार्ग एकच आहेत असे म्हणतात.  चित्तशुद्धि हेच ज्ञानाचे साधन आहे आणि ही चित्तशुद्धि निष्काम कर्मयोगाचे व उपासनेचे फळ आहे.  श्रुतींच्यामधून प्रतिपादित केलेले ईश्वराचे माहात्म्य, महिमा, ईशनशीलत्व तसेच कर्म-कर्मफळाचे स्वरूप श्रवण करून साधक कर्म व उपासनेमध्ये प्रवृत्त होतो.  कर्म व उपासनेमधून ज्याचे चित्त शुद्ध झालेले आहे त्याच्या अंतःकरणामध्येच हे ज्ञान फलद्रूप होते.  ज्ञानयोग व कर्मयोग यामध्ये साध्य-साधनसंबंध आहे हे सिद्ध होते.  कर्मयोग हे साधन असून ज्ञानयोग हे साध्य आहे.  म्हणून ज्ञानाचे फल मोक्ष आहे व कर्मयोगाचेही फळ क्रमाने मोक्षप्राप्तीच आहे.  

कर्मयोगाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून कर्मयोगनिष्ठा ही उपायनिष्ठा असून ज्ञानयोगनिष्ठा ही उपेयनिष्ठा आहे.  तसेच ज्ञानपूर्वक सर्वकर्मसंन्यासाचेही फळ ज्ञानप्राप्ति हेच आहे.  सर्व कर्तृकारादि प्रत्ययांचा निरास झाल्यावरच ज्ञानप्राप्ति होते.  सर्वकर्मसंन्यासाची परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  म्हणून सर्वकर्मसंन्यास हे साधन असून ज्ञाननिष्ठा हे साध्य आहे.  

याप्रकारे कर्मयोगनिष्ठा व सर्वकर्मसंन्यास या दोन्हींचीही परिसमाप्ति ज्ञाननिष्ठेमध्येच होते.  कर्मयोग व सर्वकर्मसंन्यास यामध्ये अधिकारीभेद, साधनभेद असले तरीही दोन्हीही मार्गांचे फळ मात्र एकच आहे.  म्हणून मुमुक्षु साधकाने आपल्या अधिकाराप्रमाणे कोणत्याही एका मार्गाचे सातत्याने दीर्घकाळ अनुष्ठान करून त्या मार्गामध्ये निष्ठा प्राप्त केली तर त्याला मोक्षप्राप्ति होते.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ –    

Tuesday, November 14, 2017

नवविधा भक्ति | Nine-Fold Devotion




श्रवण, कीर्तन, स्मरण, चरणसेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व आत्मसमर्पण अशी नऊ प्रकारची भक्ति आहे.

यामध्ये परीक्षित राजासारखी श्रवणभक्ति असावी.  श्रवण करता-करताच त्याचे मन शुद्ध, विरक्त व ज्ञानसंपन्न होऊन त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  दुसरी कीर्तनभक्ति आहे.  नारदमहर्षि, संत तुलसीदास यांच्यासारख्या अनेक संतांनी जीवनभर अखंडपणे नामसंकीर्तन करीत-करीत परमेश्वराची कृपा प्राप्त केली.  काया-वाचा-मनाने परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याचे जीवन कृतार्थ व परिपूर्ण झाले.  ध्रुव बाळभक्त प्रल्हाद हे स्मरणभक्तीची प्रसिद्ध उदाहरणे आहेत.  यांनी अखंडपणे भगवंताचे स्मरण केले.  हजारो जन्मांच्यामधील पापे भस्मसात करण्याचे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे.  फक्त हे नाम आवडीने, मनापासून घ्यावयास हवे.  

पादसेवन म्हणजेच चरणसेवा होय.  बंधु भरत हे चरणसेवेचे उत्तम उदाहरण आहे.  चरणसेवेच्या भावामध्ये मनामधील अहंकार-ममकारादि वृत्ति तसेच सर्व विकार आपोआपच संपतात.  साधक नम्र, विनयशील, नतमस्तक होतो.  राजा अंबरीष अर्चनसेवेने उद्धरून गेला.  अक्रूराने भगवंताची वंदनभक्ति केली.  मनोभावे वंदन करीत असल्यामुळे भगवंताने त्यास आपल्या दिव्य रूपाचे दर्शन दिले.

भक्त हनुमान, लक्ष्मण यांनी जीवनभर दास्यभक्ति केली.  परमेश्वर हा माझा स्वामी व मी त्याचा सेवक, या दास्यत्व भावामुळे त्यांनी अखंडपणे ईश्वराची सेवा केली.  पार्थ अर्जुनाने भगवंताची सख्यभावाने भक्ति केली.  व्रजामधील गोपींनी तर भगवंताच्या चरणी आत्मनिवेदन म्हणजेच स्वतःला समर्पित केले.  आपले संपूर्ण जीवन कृष्णमय करून सर्व कर्मेही भगवंतालाच अर्पण केली.  याप्रमाणे भक्तीचा भावच साधकाला परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जातो.  



- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ