Saturday, October 27, 2018

स्वप्रयत्नाने रोगातून मुक्तता | Healing by Self-Efforts



प्रत्येक साधकाने स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा.  स्वतःची तीव्र जिज्ञासा, तळमळ असल्याशिवाय उद्धार होणे शक्य नाही.  म्हणून स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपले स्वतःचे योग्य-अनुकूल मन हेच साधन आहे.  यासाठी आचार्य येथे सुंदर दृष्टांत देतात –  

ज्याप्रमाणे एखादा पुरुष ज्वर वगैरेदि एखाद्या महारोगाने व्याधिग्रस्त झाला तर तो स्वतःच स्वतःच्या प्रयत्नाने रोगमुक्त होतो.  वैद्य तपासतील, रोगाचे निदान करतील, त्यावर योग्य औषधे देतील, पथ्य सांगतील. परंतु या सर्वांचे यथायोग्य अनुसरण हे रोग्यानेच केले पाहिजे.  अन्य प्रिय व्यक्तीने जरी पथ्य पाळले तरी रोग्याचा रोग बरा होत नाही.  फार तर लोक सहकार्य करतील, सेवा-शुश्रुषा करतील, उत्तेजन देवून मनोधैर्य वाढवतील, परंतु औषध आणि पथ्य हे रोग्यानेच घेतले पाहिजे.  जे आपल्याला योग्य-अनुकूल आहे त्याचेच ग्रहण करून इतर प्रतिकूल गोष्टींचा जाणीवपूर्वक त्याग केला पाहिजे.  

तसेच औषध अत्यंत श्रद्धेने, माझा रोग निश्चित बरा होईल या विश्वासाने घेतली पाहिजेत.  जे वैद्य आपल्यावर उपचार करून मार्गदर्शन करतात, त्यांच्यावरही श्रद्धा पाहिजे.  तसेच निराश, दुःखी, उतावीळ न होता रोग बरा होईपर्यंत सातत्याने औषधांचे योग्य प्रमाणात योग्य वेळी वैद्यांनी सांगितल्याप्रमाणेच सेवन केले पाहिजे.  या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास त्या रोगावर नियंत्रण करता येते.  

त्याचप्रमाणे, जीव या भवरोगाने ग्रस्त झालेला आहे.  अनादिकाळापासून जीवाला या रोगाची बाधा झालेली आहे.  भयंकर यातना, असह्य वेदना होत असल्यामुळे हा रोगग्रस्त जीव अत्यंत त्रस्त झालेला आहे.  जीवनामधील अनेक प्रसंग, संघर्ष, सुखदुःखांचे आघात त्याच्या मनावर होत आहेत.  या भयंकर दुःखामधून, या भवरोगामधून मुक्त व्हावयाचे असेल तर प्रथम अपथ्याचा, म्हणजे सर्व अंतरिक दुर्गुण, आसुरीगुणसंपत्ति, यांचा त्याग केला पाहिजे.  प्रतिकूल गोष्टी टाळण्याचा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Friday, October 19, 2018

संकल्पांचा त्याग | Renunciation of Resolution





विश्वाच्या, विषयांच्या अधिष्ठानाचे जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते सर्व विषय सत्यच वाटतात. त्यांना सत्यत्व दिल्यामुळेच त्या विषयांच्यामध्ये प्रिय-अप्रिय वृत्ति निर्माण होतात.  त्यामुळे विषयांचे संकल्प, कामना, भोगलालसा निर्माण होते.  परंतु ज्या पुरुषाने या सर्व विश्वाचे, विषयांचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचे प्रत्यगात्मस्वरूपाचे यथार्थ व सम्यक ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याला हे सर्व अध्यस्त, कल्पित असणारे विषय मिथ्या स्वरूपाचे होतात.  एकदा विषयांचे मिथ्यात्व समजले की, त्यामध्ये संकल्प, कामना निर्माण होत नाहीत.  

जोपर्यंत रजताचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या शुक्तीचे ज्ञान नसते, तोपर्यंत शुक्ति न दिसता शुक्तीच्या ठिकाणी चांदीच इंद्रियगोचर होवून सत्य भासते.  यामुळेच ती चांदी घ्यावी, हा संकल्प निर्माण होतो.  चांदीला सत्यत्व दिल्यामुळेच संकल्पाची निर्मिति होते.  परंतु ज्यावेळी रजताच्या अधिष्ठानाचे म्हणजेच शुक्तीचे यथार्थ आणि सम्यक ज्ञान प्राप्त होते त्यावेळी आपोआपच रजतामधील सत्यत्वबुद्धि गळून पडते.  मिथ्या रजताविषयी कोणत्याही प्रकारचा संकल्प निर्माण होत नाही, कारण मिथ्या, भासमान विषयाचा कधीही, कोणीही संकल्प निर्माण करीत नाही.  म्हणजेच अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने अध्यस्त असणाऱ्या वस्तूचा संकल्प गळून पडतो.  

काम जानामि ते मूलं संकल्पात्त्वं हि जायसे |
न त्वां संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यसि ||     (महा. शान्ति. १७७-२५)   
हे काम !  तुझे मूळ कारण मी जाणतो.  संकल्पामधूनच तू जन्माला येतोस म्हणून मी तुझा संकल्प करणार नाही.  त्यामुळे तू मला प्राप्त होणार नाहीस.  

संकल्प हाच कामाचे कारण आहे.  म्हणून ब्रह्मज्ञानी यति सर्व ठिकाणी ब्रह्मस्वरूपच पाहात असल्यामुळे ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त असणाऱ्या सर्व विषयांच्या संकल्पांचा त्याग करतो.  विषयांमधील सत्यत्वबुद्धि गळून पडल्यामुळे आपोआपच मिथ्या विषयांचे सर्व संकल्पही मिथ्या होतात.  गळून पडतात.  तोच सर्वसंकल्पसंन्यासी होतो.  ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे या पुरुषाची द्वैतदृष्टि न राहाता त्याला पारमार्थिक स्वरूपाची, अद्वैताची, अभेदत्वाची दृष्टि प्राप्त होते. 

  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Wednesday, October 17, 2018

उपशमा म्हणजे काय ? | Meaning of ‘Upashama’ (Mitigation)




आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाला ‘शम’ हेच पुष्कल कारण सांगितले जाते.  मग ही उपशमा कशी करावी ?  किंवा ‘उपशमा’ म्हणजे काय ?  उपशमा म्हणजेच ब्रह्मस्वरूपावर आरोपित केलेल्या नामरूपादींचे अग्रहण करणे होय.  

आपण इंद्रियांच्या माध्यमामधून जेव्हा बाह्य विषयांचे अनुभव घेतो तेव्हा मनामध्ये त्या त्या विषयाची वृत्ति निर्माण होते.  वृत्तीरूपाने अंतःकरणामध्ये असणारे हे विषयच मनाला विचलित करतात.  म्हणूनच या विषयांमधून निवृत्त झाले पाहिजे.  परंतु बाह्य विषय हे डोळ्यांना दिसणारच !  म्हणूनच येथे शारीरिक निवृत्ति नसून त्या विषयांचे मनामध्ये जे संस्कार आहेत, प्रचंड आकर्षण आहे त्या विषयासक्तीमधून निवृत्त झाले पाहिजे.  हे सर्व विषय सत्य नसून ते ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त, मिथ्या आहेत, हे समजावून घेवून त्यापासून निवृत्त झाले पाहिजे.  

आचार्य सांगतात –
विरज्य विषयव्राताद्दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः |
स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते || (विवेकचुडामणि) 
पुन्हा पुन्हा विषयांचे दोष पाहून विषयसमुहापासून हळूहळू निवृत्त होऊन मन स्वतःच्या लक्ष्यामध्ये – स्वस्वरूपामध्ये स्थिर करणे यालाच ‘शम’ असे म्हणतात.  

अशा प्रकारे विषयरस, विषयाकर्षण गळून पडले पाहिजे.  यामुळे विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये राहूनही ते विषय मनावर परिणाम करू शकत नाहीत.  मन विचलित करू शकत नाहीत.  भगवान दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी खूप सुंदर उपमा देतात – ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचल असलेल्या समुद्रामध्ये नद्यांचे पाणी प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थिरबुद्धि पुरुषामध्ये सर्व विषय विकार निर्माण न करता प्रवेश करतात त्यालाच परमशांति प्राप्त होते.  कामुक पुरुषाला प्राप्त होत नाही.  म्हणून शमयुक्त, स्थिर मनच ज्ञाननिष्ठेचे अधिकारी आहे.  ‘शम’ हेच ज्ञाननिष्ठेचे पुष्कल साधन आहे.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Monday, October 8, 2018

मोक्षपरायण | Engaged in Liberation




मोक्षः एव परं अयनं यस्य सः मोक्षपरायणः |  मोक्ष हेच ज्याचे आश्रयाचे स्थान आहे, तीच साधकाची परम, अत्युत्कृष्ट गति आहे आणि ती प्राप्त करण्यासाठीच ज्याचे मन व्याकूळ झालेले असून प्रयत्नशील असते, तो मोक्षपरायण होय.  ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये मनुष्याला एखाद्या वस्तूचा ध्यास लागतो, तो वेडा होतो, त्यावेळी मनुष्य काया-वाचा-मनासा त्या ईप्सित विषयासाठी अत्यंत व्याकूळ होत असतो.  ती प्राप्त करण्यासाठी प्राण देतो.  

अशा वेळी अन्य विषय पाहिले, अनुभविले तरी त्याचे मन त्यामध्ये रमत नाही.  ते विषय त्याला आकर्षित करू शकत नाहीत, कारण एकाच विषयाचा ध्यास लागल्यामुळे बाकी सर्व विषय त्याला तुच्छ वाटतात.  ही त्या मनुष्याच्या मनाची अवस्था असते.  

अशीच अवस्था साधकाची मोक्षासाठी झाली पाहिजे.  मोक्षाची तीव्र तळमळ निर्माण होऊन मन त्यासाठी अत्यंत व्याकूळ झाले पाहिजे.  यामुळे आपोआपच अन्य सर्व सुंदर मोहक विषय तुच्छ होतील.  साधक बाह्य विषयांच्यामध्ये वावरत असेल, विषय अनुभवत असेल, तरीही त्याच्या मनामध्ये बाह्य विषयांचे संकल्प उठणार नाहीत.  ते विषय त्याच्या मनाला आकर्षित करून व्याकूळ करू शकणार नाहीत.  ज्यावेळी साधकामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होते त्यावेळी ही अवस्था निर्माण होते.  त्यावेळी फक्त एकच तीव्र इच्छा असते, ती म्हणजे मोक्षप्राप्तीची किंवा ज्ञाननिष्ठेची !  

अशा साधकाचे मन बाह्य विषयासक्तीमधून निवृत्त होऊन अंतर्मुख आणि चिंतनशील होते.  ते मन आत्मचिंतनामध्येच अखंड तन्मय, तल्लीन होते.  तो सत्त्वगुणप्रधान असलेला साधकच मुनि आहे.  मननशीलात् इति मुनिः |  तो अखंड आत्मचिंतनाने आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो.  तो त्याचा स्वभाव बनतो.  त्याला सम्यक यथार्थ ज्ञान प्राप्त होऊन अहंकार-ममकारादि प्रत्यय गळून पडतात आणि तो अंतरंगामध्ये स्वस्वरूपाने आत्मतृप्ति, संतुष्टता प्राप्त करतो.  तो याच शरीरामध्ये राहून जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ




Tuesday, October 2, 2018

नात्यांची मर्यादा | Limitations of Relations




हे मनुष्य !  हे मूढमते !  ज्यांच्यामध्ये तू आसक्त होतोस त्यांचे स्वरूप तरी काय आहे, याचा विचार कर.  तुझी पत्नी कोण ?  तुझा पुत्र कोण ?  ज्या पत्नीला तू माझे-माझे म्हणतोस, जीवनभर तिच्यामध्ये आसक्त होऊन पत्नीचा गुलाम होतोस.  ती पत्नी खरोखरच कोण आहे ?  तुझ्याभोवती असणारे हे सर्व सगेसोयरे, आप्त, नातेवाईक कोण आहेत ?  याचा विचार कर.  म्हणजेच याचा शोध घे.  Proper enquiry कर.  मग तुला समजेल की, हा सर्व संसारच अतिशय विचित्र आहे.  हा संसार नाटकाप्रमाणे किंवा स्वप्नाप्रमाणे भ्रामक काल्पनिक आहे.  

आत्यंतिक प्रेमाने व करुणेने आचार्य मनुष्याला समजावून देतात की, बाळा !  तू कोण ?  तुझी पत्नी कोण ?  तुझा पुत्र कोण ?  तू कोणाचा आहेस ?  तू कोठून आलास ?  कोठे जाणार आहेस ?  या मुलभूत प्रश्नांचा विचार कर.  आपण जन्माला आल्यानंतर पती-पत्नी, पुत्र-पौत्र, सगेसोयरे वगैरे सर्व नाती निर्माण करतो.  “ही माझी पत्नी आहे”, असे म्हणतो.  त्याचप्रमाणे दोघांना पुत्रप्राप्ति होते.  कोणतातरी जीव त्याच्या प्रारब्धकर्माने आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो.  त्याला आपण ‘माझा पुत्र’ असे म्हणतो.  

जोपर्यंत सर्व सुरळीत चालले आहे, परस्परांना अनुकूल आहेत, एकमेकांच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सामंजस्य आहे, तोपर्यंतच नाती टिकतात.  जेव्हा एकमेकांच्या सहवासाने, सान्निध्यात राहून एकमेकांच्यामधील दोष दिसायला लागतात, तेव्हा सर्व नाती संपतात.  आईवडील म्हणजे मुलाला व त्याच्या पत्नीला घरातील अडचण वाटते, अशा वेळी मनुष्य विचार करतो की, अरे !  खरोखरच हा माझा मुलगा आहे का ?  जेव्हा आपलाच मुलगा आपल्या दुःखाला कारण होतो, तेव्हा आपण संबंध तोडतो.  नाती संपतात.  

संसार हा आकाशातील ढगांच्या नागरीप्रमाणे सतत बदलणारा आहे.  संसार हा वाळवंटामधील चमकणाऱ्या वाळूवर भासणाऱ्या पाण्याप्रमाणे भासमान आहे.  केळीच्या सोपटाप्रमाणे संसार निःसार आहे.  स्वप्नाप्रमाणे नाटकाप्रमाणे भासमान आहे.  संसार हा रज्जूवर दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे मिथ्या आहे.  असा हा संसार विचित्र आहे.  म्हणूनच मनुष्याने चिरंतन, शाश्वत सत्याचा शोध घ्यावा.  परमेश्वराला शरण जावे.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |    


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ