Tuesday, July 7, 2026

ज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Knowledge

 



आत्माकार वृत्ति होणे म्हणजेच ज्ञान असून ते ज्ञान सात प्रकारचे आहे.  मुक्ति हीच ज्ञेयवस्तु असून ती मुक्ति या सात भूमिकांच्याही अतीत आहे.  ज्याला सत्यवस्तूचा अवबोध होतो, तो जीव पुन्हा कधीही या संसारचक्रामध्ये बद्ध होत नाही.

 

शुभेच्छा या पहिल्या भूमिकेमध्ये मनुष्य विचारशील असतो.  वैराग्य उत्पन्न होण्यापूर्वी अशी जी शास्त्रश्रवणाची व सत्संगाची इच्छा निर्माण होते, यालाच "शुभेच्छा" असे म्हणतात.

 

यानंतर तो मनुष्य शास्त्राच्या व सज्जनांच्या संगामध्ये जातो.  शास्त्रश्रवण करून शास्त्रावर चिंतन करतो.  सत्संगाच्या प्रभावाने त्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांच्याबद्दल विरक्ति उत्पन्न होते.  मग तो सदाचाराकडे प्रवृत्त होतो.  म्हणजेच श्रवण-मननादि असणाऱ्या सदाचाररूपी साधनेमध्ये त्याची प्रवृत्ति होते.  यालाच "विचारणा" असे म्हणतात.

 

शुभेच्छा आणि विचारणा या दोन भूमिकांच्या दीर्घकाळ केलेल्या अभ्यासामुळे विषयांच्यामधील आसक्ति नाहीशी होते.  यालाच "तनुमानसा" असे म्हणतात.  ज्याने प्रथम दीर्घकाळ नित्यानित्यविवेक केला आहे, सत्संगामध्ये जाऊन श्रवणादि साधना केली आहे, असा साधक ज्ञानाच्या पुढच्या भूमिकेमध्ये प्रवेश करतो.  तनुमानसा भूमिकेत साधकाचे मन विरक्त झाल्यामुळे अत्यंत सूक्ष्म होते.

 

याप्रमाणे शुभेच्छा, विचारणा व तनुमानसा या तीन भूमिकांचा ज्याने दीर्घकाळ अभ्यास केला आहे, त्याच्या चित्तामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न होते.  असे विरक्त चित्तच शुद्ध व सत्यस्वरूप आत्मस्वरूपामध्ये स्थित होते.  यालाच "सत्त्वापत्ति" असे म्हणतात.  हे ज्ञानाची चवथी भूमिका आहे.  

 

यानंतर वरील चार भूमिकांच्या अभ्यासामुळे साधक पूर्णतः निःसंग होतो. त्याचे चित्त सत्त्वगुणावर आरूढ होते.  यालाच "असंसक्ति" असे म्हणतात.  ही ज्ञानाची पाचवी भूमिका आहे.  

 

या पाच भूमिकांच्या अभ्यासाने साधक आत्मस्वरूपामध्ये रममाण होऊन त्याला दृढ आत्मनिष्ठा प्राप्त होते.  त्यावेळी त्याला अंतःकरणामध्ये किंवा बाहेर कोठेही दृश्य पदार्थांचे भान राहत नाही.  या अवस्थेत साधक देहभान, विश्वाचे भान हरपतो.  त्याचे चित्त स्वस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय व तद्रूप होते.  आत्मचैतन्याव्यतिरिक्त अन्य कशाचेही भान किंवा जाणीव राहत नसल्यामुळे या भूमिकेला "पदार्थाभावनी" असे म्हणतात.

 

याप्रमाणे पूर्वोक्त सहा भूमिकांचा जो साधक दृढ अभ्यास करतो, त्याच्या चित्तामधून सर्व भेद पूर्णतः नष्ट होतात.  भेदबुद्धीचा-द्वैतबुद्धीचा पूर्णतः निरास होतो.  जीव-जगत-ईश्वर हे भेद संपतात व चित्त पूर्णतः स्वस्वरूपाशी तन्मय होते.  याप्रमाणे चित्ताला अशी स्वरूपनिष्ठा प्राप्त झाली की, त्या स्थितीला "तुर्यगा" असे म्हणतात.  ही ज्ञानाची सातवी भूमिका आहे.  सर्व जीवन्मुक्त पुरुषांच्यामध्ये ही तुर्यावस्था विद्यमान असते.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, June 30, 2026

भक्ति म्हणजे परमेश्वराला निवडणे | Bhakti - Choosing The Supreme

 



महाभारतीय युद्ध सुरु होण्यापूर्वी युद्धामध्ये सहकार्य मागण्यासाठी दोन्हीही पक्षाकडील बलाढ्य वीर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे येतात.  भगवान म्हणतात, "दुर्योधना, तू प्रथम आला असशील तरीही अर्जुन माझ्या चरणांशी बसल्यामुळे डोळे उघडताक्षणी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे.  तेव्हा प्रथम अर्जुन मागेल."  पार्थ अर्जुन हे ऐकून खूप सुखावतो.  त्याच्या मुखामधून अनाहूतपणे स्फुट शब्द बाहेर येतात.  "भगवंता !  आज मला तुझे सैन्य नको, शस्त्रास्त्रे नकोत.  काहीही नको, परमेश्वरा, मला फक्त माझ्या पक्षात 'तू' असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे 'धर्मयुद्ध' आहे.  तू निःशस्त्र असलास तरी चालेल.  तुझे केवळ अस्तित्वच अत्यंत मंगलकारक, स्फूर्तिदायक आहे.  तू माझ्या पक्षात असताना सर्व विश्व माझ्या विरुद्ध गेले तरीही माझा नाश खचित होणार नाही.  या विश्वामधील कोणतीही शक्ति मला स्पर्शदेखील करणार नाही."

 

हे अपेक्षित उत्तर ऐकून भगवान फक्त हसतात आणि दुर्योधन आनंदाने निःश्वास सोडतो, कारण त्यालाही हेच हवे असते.  "निःशस्त्र कृष्ण काय करणार ?  त्यापेक्षा त्याचे सैन्य मिळाले तर पर्यायाने आपले सैन्यबल अधिक वाढेल व आपला विजय निश्चित होईल", अशी त्याची विचारसरणी असते.  तो अर्जुनाला मनामध्ये मूर्ख ठरवून त्याला शतशः धन्यवाद देतो.  भगवंताव्यतिरिक्त उरलेला वाटा दुर्योधनास मिळतो आणि भगवंताचा वाटा भगवंताच्या प्रियसख्या अर्जुनाला मिळतो.  दोन्हीही वीर आपापल्या वाटेने निघून जातात.  येथे प्रसंग संपतो.

 

परंतु या प्रसंगाचा खरा अर्थ, खरा निर्णय दिव्यदृष्टि प्राप्त झालेला संजय स्वतःच गीतेच्या अंतिम श्लोकामध्ये स्पष्ट करतो -

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||                             (गीता अ. १८-७८)

ज्याठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्जुन त्याठिकाणी लक्ष्मी, विजय, यश, ऐश्वर्य, नीति, धर्म आहे असे माझे निश्चित मत आहे.  या कथेचा अभिप्राय एकच की, भक्ताने परमेश्वराला निवडावे.  परमेश्वरालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. हीच भक्ति आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, June 23, 2026

बोधचंचु | Pretentious Orator

 




साधकाने दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचे निरीक्षण करावे.  आपल्याला जी अल्पबुद्धि मिळालेली आहे, त्या बुद्धीच्या साहाय्याने युक्तीचा आधार घेऊन शास्त्राचे सार समजावून घ्यावे.  परंतु जे लोक योग्यायोग्याचा विचार करीत नाहीत म्हणजे आपण जे बोलतो ते योग्य आहे की अयोग्य आहे, याचेही ज्यांना भान राहत नाही, ते लोक दुसऱ्यांच्या मताचे खंडन कारण्यामध्येच स्वतःला ज्ञानी समजतात.  असा मनुष्य सतत दुसऱ्यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करतो.  परंतु दुसरे लोकही अशा बोधचंचु मनुष्याचे उपदेश फार काळ ऐकू शकत नाहीत.  काळाच्या ओघात दुसऱ्यांना उपदेश देणाऱ्या या साधकाचा अहंकार वाढतो.  त्याचे मन अस्वस्थ व अशांत होते.  त्यामुळे त्याला स्वतःलाही आनंद होत नाही आणि त्याच्या उपदेशाने दुसऱ्यालाही आनंद किंवा शांति मिळत नाही.  अशा शाब्दिक पांडित्य असणाऱ्या पढतमूर्खाने अधिकार नसताना दुसऱ्या अज्ञानी मनुष्याला ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजे एका अंध मनुष्याने दुसऱ्या अंध मनुष्याला मार्ग दाखविण्यासारखे निष्फळ, व्यर्थ व अनर्थकारक आहे.

 

हे रामा !  वस्तुतः प्रत्येकाच्या हृदयाकाशामध्ये सच्चिदानंदस्वरूप असणारे चैतन्य आहेच.  परंतु अज्ञानी मनुष्य आपल्या आत चैतन्य न पाहता सर्व अनर्थच पाहतो.  अशा अज्ञानी मनुष्याला 'बोधचंचु' असे म्हणतात.  जो स्वतः अज्ञानी आहे.  परंतु तरीही त्याला स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान असतो तो बोधचंचु मनुष्य स्वतःचा व दुसऱ्याचाही घात करतो.  कारण त्याचे शाब्दिक ज्ञान व त्याचा अनुभव यामध्ये एकवाक्यता नसते.  असा पढतमूर्ख मनुष्य दुसऱ्यांना उपदेश देण्यात तत्पर असेल, निष्णात असेल तरी साधकाने त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नये.  अध्यात्ममार्गामध्ये साधकाने अशा पढतमुर्खांच्यापासून, दांभिक लोकांच्यापासून अत्यंत सावध राहावे.  ढगांनी आकाशाला मलीन करावे, त्याचप्रमाणे हा बोधचंचु मनुष्य आपल्या ज्ञानावर अभिमानाचे व कुतर्काचे आवरण घालून नाश करतो.

 

म्हणून हे रामा !  आत्मज्ञान घेताना अशा बोधचंचु लोकांना किंवा त्यांच्या वचनांना प्रमाणभूत मानू नये.  जसे समुद्रामधून सर्व बाजूंनी अनेक प्रकारे पाणी प्रवेश करते.  समुद्र त्या सर्व प्रवाहांना सामावून घेतो.  त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अन्य सर्व प्रमाणांच्या समावेश होतो.  म्हणून तेच ज्ञानाचे खरे प्रमाण आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, June 16, 2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being

 



हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ?  प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी कर्तृत्वभावना निर्माण करतो.  त्यामुळे तो चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या जीवाला प्राप्त होते.  तेव्हा जीवाला वाटते की, मला सुख-दुःख झाले.  ही भोक्तृत्वभावना त्याच्यामध्ये निर्माण होते.  याप्रकारे जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त होतो.  म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.

 

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते |            (गीता अ. ३-२७)

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.  अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे.  कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे.  जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.

 

वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप, शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे.  परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते.  कशी ?  आचार्य सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते |  ज्याप्रमाणे शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.

 

एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की, त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते.  आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, June 9, 2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी अज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे अज्ञानाच्या सात अवस्था सांगितल्या आहेत.  यामध्ये सर्व जीवांच्या बीजावस्थेला - अव्यक्तावस्थेला 'बीजजाग्रत्' असे म्हटले आहे.  यानंतर जन्माला आल्याबरोबर पूर्वजन्मातील अज्ञानाच्या संस्कारांच्यामुळे जीव देहाशी तादात्म्य पावतो व "मी देह आहे" अशी कल्पना करतो.  यालाच येथे 'जाग्रत्' असे म्हटले आहे.  "मी जन्माला आलो व मी देह आहे" अशी कल्पना दृढ झाली की, स्वतःभोवती तो जीव अनेक कल्पना करतो.  मागील जन्मामधील जो मी होतो, तोच मी आता आहे, तसेच "हा माझा पुत्र, हे माझे घर" याप्रमाणे जड व चेतन विषयांच्यामध्ये तो जीव ममत्व निर्माण करतो.  मागील जन्मामधील अशी स्मृति म्हणजे 'महाजाग्रत्' अवस्था आहे.

 

हा अज्ञानी जीव जागृत असताना मनोराज्ये रंगवितो.  ही अज्ञानाची 'जाग्रत् स्वप्न' भूमिका आहे.  काही वेळेस जागृतावस्थेमध्येच जीवाला भ्रांतीमुळे अनेक भास होतात.  शिंपल्यावर चांदीचा, वाळूवर मृगजळाचा, दोरीवर सापाचा, हे भास पुन्हा पुन्हा होत राहिले की, जीवाच्या चित्ताला भास होण्याची सवय लागते आणि या सवयीमुळे जेव्हा जीवाला झोपेत काही क्षण असे भास होऊन कसलातरी अनुभव येतो, ही अज्ञानाची 'स्वप्न' भूमिका आहे.  एखादी स्वप्नस्थिति दीर्घकाळ टिकली तर ते स्वप्नही जागृतावस्थेप्रमाणे वाटू लागते.  यालाच अज्ञानाची महाजाग्रत् किंवा 'स्वप्नजाग्रत्' भूमिका सुद्धा म्हटले जाते.

 

यानंतर सर्वात शेवटची भूमिका म्हणजे सुषुप्ति आहे.  जेथे चित्त जागृतही नसते. कोणते स्वप्नही अनुभवत नसते.  कोणती मनोराज्येही नसतात. दीर्घस्वप्नही नसते.  अहंकार, ममकारही नसतात. म्हणजेच जेथे अज्ञानाच्या पूर्वीच्या सहाही अवस्था लय पावतात, ती अज्ञानाची सर्वात शेवटची 'सुषुप्ति' नावाची भूमिका आहे.  या अवस्थेत बीजरूपाने सर्व सुखदुःखात्मक अनुभव तसेच, सर्व पदार्थ स्थित असतात.  हीच करणावस्था आहे.

 

अशा या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत.  येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो.  या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत.  या सात अवस्थांच्या एकमेकांच्या परस्परसंयोगामधून अजूनही अज्ञानाच्या असंख्य अवस्था उत्पन्न होतात.  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, याप्रकारे जीव या अज्ञानाच्या अवस्थांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो.  या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत.  विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते.  या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, June 2, 2026

दुःखांनो या ! मी तयार आहे ! | Welcoming The Calamities






शास्त्रामध्ये प्रार्थना आहे - स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः |                   (शान्तिपाठ)

अकुंठित गति असणाऱ्या गरुडाने आमच्यावर कृपा करावी.  गरुडझेप लोकप्रसिद्ध आहे.  जीवनामध्ये गरुडझेप घ्यावी.  खूप साधना करावी.  आपल्या मनाला तयार करावे.  कितीही दुःखे आली, संकटे आली, आघात झाले तरीही श्रद्धा, निष्ठा डळमळीत होऊ देऊ नये.  उलट, "दुःखांनो या! मी तयार आहे."  (I am ready to receive anything.), ही माझी वृत्ति असावी.

 

परमेश्वर साधकाची सतत परीक्षा घेत असतो.  प्रथम सोपी मग अवघड, अधिक अवघड करीत करीत साधकाला सर्व दिव्यांच्यामधून नेतो.  शेवटी ती दुःखे ही बोथट होतात.  त्यांच्यामधील अवघडपणाच संपतो.  ती दुःखे साधकाला disturb करू शकत नाहीत.  महाभारतामध्ये सहनशीलतेची साक्षात मूर्ति असणारी कुंती म्हणते -

विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम् ||                                  (महाभारत)

हे परमेश्वरा !  आमच्या जीवनामध्ये सतत विपत्ति येवोत.  त्यामुळे आम्हाला तुझे कधीही विस्मरण होणार नाही.  इतकी मनाची तयारी पाहिजे.

 

या श्लोकामध्ये भगवान 'नित्यं' हा शब्द वापरतात.  म्हणजेच नित्यनिरंतर चित्ताची समतोलता ठेवावी.  ही साधना एका क्षणाची नसून अनेक जन्मांची आहे.  म्हणून अध्यात्ममार्गामध्ये ३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही.  ९९.९९ टक्के ही चालत नाहीत.  तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते.  सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी होते.  त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.

 

भगवान म्हणतात - गुरुणापि न विचाल्यते |                              (गीता अ. ६-२२)

महान संकटे येऊनही ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.  यासाठीच साधकाने सर्व प्रसंगांच्यामध्ये मन स्थिर, समतोल, संतुलित ठेवण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न, द्वन्द्वविक्षेपरहित होऊन श्रवणादि ज्ञानसाधनेला योग्य, अधिकारी, अनुकूल होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ