Tuesday, June 16, 2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being

 



हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ?  प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी कर्तृत्वभावना निर्माण करतो.  त्यामुळे तो चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या जीवाला प्राप्त होते.  तेव्हा जीवाला वाटते की, मला सुख-दुःख झाले.  ही भोक्तृत्वभावना त्याच्यामध्ये निर्माण होते.  याप्रकारे जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त होतो.  म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.

 

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते |            (गीता अ. ३-२७)

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.  अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे.  कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे.  जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.

 

वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप, शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे.  परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते.  कशी ?  आचार्य सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते |  ज्याप्रमाणे शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.

 

एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की, त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते.  आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, June 9, 2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी अज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे अज्ञानाच्या सात अवस्था सांगितल्या आहेत.  यामध्ये सर्व जीवांच्या बीजावस्थेला - अव्यक्तावस्थेला 'बीजजाग्रत्' असे म्हटले आहे.  यानंतर जन्माला आल्याबरोबर पूर्वजन्मातील अज्ञानाच्या संस्कारांच्यामुळे जीव देहाशी तादात्म्य पावतो व "मी देह आहे" अशी कल्पना करतो.  यालाच येथे 'जाग्रत्' असे म्हटले आहे.  "मी जन्माला आलो व मी देह आहे" अशी कल्पना दृढ झाली की, स्वतःभोवती तो जीव अनेक कल्पना करतो.  मागील जन्मामधील जो मी होतो, तोच मी आता आहे, तसेच "हा माझा पुत्र, हे माझे घर" याप्रमाणे जड व चेतन विषयांच्यामध्ये तो जीव ममत्व निर्माण करतो.  मागील जन्मामधील अशी स्मृति म्हणजे 'महाजाग्रत्' अवस्था आहे.

 

हा अज्ञानी जीव जागृत असताना मनोराज्ये रंगवितो.  ही अज्ञानाची 'जाग्रत् स्वप्न' भूमिका आहे.  काही वेळेस जागृतावस्थेमध्येच जीवाला भ्रांतीमुळे अनेक भास होतात.  शिंपल्यावर चांदीचा, वाळूवर मृगजळाचा, दोरीवर सापाचा, हे भास पुन्हा पुन्हा होत राहिले की, जीवाच्या चित्ताला भास होण्याची सवय लागते आणि या सवयीमुळे जेव्हा जीवाला झोपेत काही क्षण असे भास होऊन कसलातरी अनुभव येतो, ही अज्ञानाची 'स्वप्न' भूमिका आहे.  एखादी स्वप्नस्थिति दीर्घकाळ टिकली तर ते स्वप्नही जागृतावस्थेप्रमाणे वाटू लागते.  यालाच अज्ञानाची महाजाग्रत् किंवा 'स्वप्नजाग्रत्' भूमिका सुद्धा म्हटले जाते.

 

यानंतर सर्वात शेवटची भूमिका म्हणजे सुषुप्ति आहे.  जेथे चित्त जागृतही नसते. कोणते स्वप्नही अनुभवत नसते.  कोणती मनोराज्येही नसतात. दीर्घस्वप्नही नसते.  अहंकार, ममकारही नसतात. म्हणजेच जेथे अज्ञानाच्या पूर्वीच्या सहाही अवस्था लय पावतात, ती अज्ञानाची सर्वात शेवटची 'सुषुप्ति' नावाची भूमिका आहे.  या अवस्थेत बीजरूपाने सर्व सुखदुःखात्मक अनुभव तसेच, सर्व पदार्थ स्थित असतात.  हीच करणावस्था आहे.

 

अशा या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत.  येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो.  या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत.  या सात अवस्थांच्या एकमेकांच्या परस्परसंयोगामधून अजूनही अज्ञानाच्या असंख्य अवस्था उत्पन्न होतात.  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, याप्रकारे जीव या अज्ञानाच्या अवस्थांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो.  या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत.  विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते.  या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, June 2, 2026

दुःखांनो या ! मी तयार आहे ! | Welcoming The Calamities






शास्त्रामध्ये प्रार्थना आहे - स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः |                   (शान्तिपाठ)

अकुंठित गति असणाऱ्या गरुडाने आमच्यावर कृपा करावी.  गरुडझेप लोकप्रसिद्ध आहे.  जीवनामध्ये गरुडझेप घ्यावी.  खूप साधना करावी.  आपल्या मनाला तयार करावे.  कितीही दुःखे आली, संकटे आली, आघात झाले तरीही श्रद्धा, निष्ठा डळमळीत होऊ देऊ नये.  उलट, "दुःखांनो या! मी तयार आहे."  (I am ready to receive anything.), ही माझी वृत्ति असावी.

 

परमेश्वर साधकाची सतत परीक्षा घेत असतो.  प्रथम सोपी मग अवघड, अधिक अवघड करीत करीत साधकाला सर्व दिव्यांच्यामधून नेतो.  शेवटी ती दुःखे ही बोथट होतात.  त्यांच्यामधील अवघडपणाच संपतो.  ती दुःखे साधकाला disturb करू शकत नाहीत.  महाभारतामध्ये सहनशीलतेची साक्षात मूर्ति असणारी कुंती म्हणते -

विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम् ||                                  (महाभारत)

हे परमेश्वरा !  आमच्या जीवनामध्ये सतत विपत्ति येवोत.  त्यामुळे आम्हाला तुझे कधीही विस्मरण होणार नाही.  इतकी मनाची तयारी पाहिजे.

 

या श्लोकामध्ये भगवान 'नित्यं' हा शब्द वापरतात.  म्हणजेच नित्यनिरंतर चित्ताची समतोलता ठेवावी.  ही साधना एका क्षणाची नसून अनेक जन्मांची आहे.  म्हणून अध्यात्ममार्गामध्ये ३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही.  ९९.९९ टक्के ही चालत नाहीत.  तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते.  सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी होते.  त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.

 

भगवान म्हणतात - गुरुणापि न विचाल्यते |                              (गीता अ. ६-२२)

महान संकटे येऊनही ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.  यासाठीच साधकाने सर्व प्रसंगांच्यामध्ये मन स्थिर, समतोल, संतुलित ठेवण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न, द्वन्द्वविक्षेपरहित होऊन श्रवणादि ज्ञानसाधनेला योग्य, अधिकारी, अनुकूल होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Tuesday, May 26, 2026

दृष्टांताचे सुयोग्य ग्रहण | Proper Interpretation of Parable

 



वस्तुतः ब्रह्माला कोणतेही कारण नाही आणि ब्रह्म हे सुद्धा कशाचेही कारण होऊ शकत नाही.  कारण ब्रह्माव्यतिरिक्त दुसरी वस्तुच अस्तित्वामध्ये नाही.  परंतु तरीही श्रुति ब्रह्मस्वरूपामध्ये जगत्कारणत्वाचा आरोप करतात.  याचे कारण साधकाला दृश्य जग माहीत आहे.  त्याच जगताच्या साहाय्याने जगताच्या अतीत असणाऱ्या परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देता येते.  ते समजावे म्हणून सोने-अलंकाराचा दृष्टांत दिला आहे.  किंवा रज्जु-सर्पाच्या दृष्टांतामध्येही अज्ञानी पुरुषाला साप दिसतो.  म्हणून साप दोरीमधून निर्माण झाला असे विधान केले जाते.  परंतु दोरी हे सापाचे कारण होऊ शकत नाही.  कारण वस्तुतः साप निर्माण झालाच नाही.

 

म्हणून बुद्धिमान पुरुषाने दृष्टांताचे संपूर्ण ग्रहण करू नये किंवा दृष्टांताचा पूर्णतः त्यागही करू नये.  दृष्टांताबद्दल कोणताही कुतर्क करून गुरूंच्याबरोबर वाद घालू नये.  तर साधकाने दृष्टांत आणि दार्ष्टांत यामधील थोडेफार जे काही साधर्म्य आहे, त्याच्या साहाय्याने दार्ष्टांत समजावून घ्यावा आणि अन्य अंशाचा व कुतर्कांचा त्याग करावा.  दृष्टांत आणि दार्ष्टांत यामध्ये काही अंशीच साम्य असते.  त्यामध्ये पूर्णांशाने साम्य असू शकत नाही.  त्यामुळे पूर्ण दृष्टांताचा तेथे काही उपयोग नसतो.

 

जसे आपणास अंधकारामधील वस्तु पाहावयाच्या असतील तर आपण हातात दिवा घेतो.  दिवा हे प्रकाशाचे साधन आहे.  दिव्यातील वाट, तेल, वगैरेदि या साधनांचा प्रत्यक्ष अंधाराचा नाश करण्यासाठी काहीही उपयोग नसतो.  तसेच दार्ष्टांत समजण्यासाठी दृष्टांताचा फक्त काही भागच आवश्यक असतो.  असे असेल तरी आपल्याला वात, तेल यांसहित दिवा लागतो.  तसेच दृष्टांत आणि दार्ष्टांत यांच्यामध्ये अगदी अंशतः साम्य असेल तरी त्या दृष्टांताचा त्या दिव्याप्रमाणे ज्ञानासाठी निश्चितच उपयोग होतो.  साधकाला दृष्टांताच्या साहाय्याने वेदांच्यामधील - अहं ब्रह्मास्मि |  तत्त्वमसि |  प्रज्ञानं ब्रह्म |  अयमात्मा ब्रह्म |  या महावाक्यांच्यामधून जीवब्रह्मैक्यज्ञान प्राप्त होते.  साधकाने दृष्टांतापेक्षा आपले मन ज्ञानामध्ये ठेवावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, May 19, 2026

काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage

 




मनुष्य म्हणतो की, विश्व बघण्यासाठी आहे. मग काहीही पाहिले तर त्यात काय पाप आहे ?  डोळ्यावर पट्टी बांधून फिरावयाचे का ?  बघावयास लागला की मनामध्ये विचार येतो की, "समोर आलेल्या व्यक्तीबरोबर दोन शब्द बोलण्यामध्ये काय दोष आहे ?"  कोणी भेटले तर दोन गोष्टी बोलणे हा शिष्टाचार आहे.  मन आणखी पुढे जाते आणि म्हणते त्यांच्याशी संबंध ठेवला म्हणून काय झाले ?  लोकांशी संबंध ठेवावयाचा नाही तर कोणाशी ठेवावयाचा ?  याप्रमाणे अनर्थ फुलत जातो आणि मनुष्याचे अधःपतन होते.  आपणच आपले मन क्षुब्ध, संतप्त, विक्षेपयुक्त करतो आणि मनाची शांति, स्थिरता, शुद्धता, संयमन नाहीसे करतो.  हे नाना तऱ्हेचे विचार, पूजा, जप, उपासना वगैरे साधना करताना आपला पिच्छा सोडत नाहीत.  नव्हे, मंत्रजपाच्या वृत्तीच्या ऐवजी अन्य सर्व विचार येत राहातात. हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणून साधकाने, भक्ताने अधिक सावधान, दक्ष राहिले पाहिजे की ज्यामुळे मनामध्ये पाप संकल्पाचा तरंगच उठणार नाही.

 

दद्यान्नावसरं किञ्चित् कामादीनाम् मनागपि |  कामक्रोधादींना कधीही मनामध्ये येण्याचा यत्किंचित् सुद्धा अवसर देता कामा नये.  इतकी सावधानता, दक्षता मनात सतत ठेवली पाहिजे.  म्हणून तर यमराज सर्व साधकांना आदेश देतात - अप्रमत्तः भव |  म्हणजेच - प्रमादं न कुर्यात् |  साधना करीत असताना साधकाने कोणत्याही प्रकारचा प्रमाद, निष्काळजीपणा, चालढकलपणा करू नये.  अत्यंत दक्ष आणि सावधान राहून मनातील सर्व वृत्तींचे निरीक्षण केले पाहिजे आणि पुसटसा सुद्धा विषयाचा संकल्प आणू देता कामा नये.  आला तर तेथेच काढून टाकण्याचा अभ्यास करावा.

 

आज आमची स्थिति अशी आहे की, आमच्या मनात काय विचार येतात, ते कोणत्या विषयाचे आहेत याची बिलकुल जाणीव नाही.  मन स्वैर, भरकटलेले, कल्पनाविलासामध्ये रमणारे आहे.  यामुळे आपण काय विचार करतो, काय बोलतो, कोठे बोलतो, कोणाला बोलतो याचा परिणाम काय होईल, काय करतो याची यत्किंचित् सुद्धा जाणीव नाही.  सुकाणु किंवा शीड नसलेल्या बोटीप्रमाणे मन मानेल तसे दिशाहीन, स्वैर, अनियंत्रित, उच्छ्रंखल जीवन आहे.  म्हणून येथे म्हटले आहे की कामादि संकल्पांना थोडीही अजाणतेने संधि देता कामा नये.  उलट साधकाने अत्यंत दक्ष राहून मनातील प्रत्येक वृत्तीचे निरीक्षण करावे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, May 12, 2026

आत्मा, मन, संकल्प, मोक्ष | Self, Mind, Resolve, Liberation

 



हे राघवा !  जे विषयवृत्तिरहित आहे, जे सामान्यतेने सर्वव्यापी आहे, तेच अनिर्वचनीय असणारे तत्त्व म्हणजे आत्मा असून त्यालाच परमेश्वर असे म्हणतात.  आत्मस्वरूपामध्ये विषयवृत्ति, अविद्या, सर्व कल्पना, सर्व मर्यादा, सर्व शब्द यांचा अत्यंत अभाव आहे.  हे निष्पाप रामा !  ब्रह्मदेवापासून स्तंबापर्यंत गवत वगैरेदी हे सर्व जग, सदासर्वदा सर्वकाळी आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे अविद्या येथे कोठेही कधीही कशीही लेशमात्रही अस्तित्वात नाही.  हे संपूर्ण दृश्य जग निश्चितच ब्रह्म स्वरूप आहे.  ते नित्य चिद्घन, क्षतिरहित, अविनाशी आहे.  या स्वरूपामध्ये मन नावाची कोणतीही कल्पना मुळीच अस्तित्वात नाही.

 

नित्य, सर्वव्यापी, शुद्ध, चिन्मात्र, निरुपद्रवी, शांत, समभावाने युक्त असलेल्या निर्विकार आत्मस्वरूपामध्ये जी वृत्ति चैतन्याच्या स्वभावाच्या विरुद्ध असणाऱ्या विषयांची कल्पना करून विषयांच्या मागे धावते, अशा त्या अशुद्ध, म्लान वृत्तीलाच 'मन' असे म्हणतात.

 

खरे तर एक, अद्वय, सर्वव्यापी व शांत असणाऱ्या परमात्म्यामध्ये ही अविद्या अस्तित्वातच नसते.  तर ती केवळ संकल्प मात्राने उत्पन्न झाल्यासारखी वाटते.  हे रामा !  ही अविद्या संकल्पामधूनच उत्पन्न झालेली असल्यामुळे ती संकल्पानेच नष्टही होते.

 

हे रामा !  'मी ब्रह्मस्वरूप नाही' या अतिदृढ संकल्पामुळे मन बद्ध होते, तर 'हे सर्व ब्रह्मस्वरूपच आहे' या दृढ संकल्पामुळे मन मुक्त होते.  म्हणून बंधन व मोक्ष हे दोन्हीही संकल्पावरच अवलंबून आहेत.  संकल्प हेच परम बंधन असून संकल्पांचा त्याग म्हणजेच मुक्ती आहे.  म्हणून संकल्पांच्यावर विजय मिळवून साधकाने संकल्परहित होण्याचा प्रयत्न करावा.  हे राघवा !  याप्रमाणे तू संकल्पांच्यावर विजय मिळव व नंतर तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला जे करायचे ते तू कर !

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, May 5, 2026

आदर्श जीवनाचे सूत्र | Principle for Ideal Life

 



विश्वकर्त्या परमेश्वराच्या आज्ञेने प्रत्येक जीवाला कर्मफळ प्राप्त होत असते.  परमेश्वराची ही कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य करून साधकाने या विश्वाचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी, साधनेसाठी करून घ्यावा.  (Make use of this world for your own sake.)  विश्वामध्ये ज्या चांगल्या गोष्टी दिसतात, त्या ग्रहण कराव्यात आणि वाईट गुण माझ्यामध्ये येऊ न देण्याचा अभ्यास करावा.  यामुळे सर्व विश्वच आपले गुरु होईल.  भगवान अवधूतांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते.  या विश्वामधील प्रत्येक व्यक्तिकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे.  म्हणून आयुष्यभर साधकाने 'विद्यार्थी' ही वृत्ति ठेवावी.  या विश्वामधून, निसर्गाकडून, डोंगर, नद्या, वृक्ष नव्हे विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या कणाकणामधून शिकण्यासारखे अलौकिक गुण आहेत.  फक्त हे पाहण्याची दिव्य, शुद्ध दृष्टि मला हवी !

 

म्हणून जगताना उघडे डोळे ठेऊन जगावे.  नीरक्षीर न्यायाने वाईट गोष्टींचा त्याग करून चांगले गुण, दैवीगुण, धर्म, नीति, जीवनमूल्ये यांची जोपासना करावी.  भगवान एक आदर्श जीवन जगण्यासाठी खूप सुंदर सूत्र सांगतात -  

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |

निराशीनिर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ||                         (गीता अ. ३-३०)

भगवान अर्जुनाला सांगतात, "अर्जुना, तू सर्व कर्म मला अर्पण कर.  कर्म करीत असताना कर्मफळाची अपेक्षा करू नकोस.  कर्माच्या नियमाप्रमाणे जे फळ मिळेल ते आनंदाने, प्रसादबुद्धीने ग्रहण कर.  तू कोठेही आसक्त होऊ नकोस. कोठेही ममत्वभाव निर्माण करू नकोस."  

 

कर्म करायचे म्हणून करू नये.  तर मनापासून कर्म करावे.  त्या कर्मामधून आनंद प्राप्त होतो.  साधकाने कोणत्याही कर्माला निकृष्ट, तुच्छ मानू नये.  कोणतेही कर्म निकृष्ट अथवा उत्कृष्टही नाही.  कर्म हे कर्मच आहे.  संत तुकाराम महाराज म्हणतात -

कुणी निंदा कुणी वंदा ।  आमुचा हा स्वहिताचा धंदा ।।                (अभंगगाथा)

इतके आपले मन प्रगल्भ झाले पाहिजे.  हे परिपक्व मनच साधनेला योग्य, अनुकूल, अधिकारी होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ