Tuesday, August 25, 2026

सहा प्रकारची शरणागति | Six Types Of Surrender

 




भगवंताला दीनभाव अत्यंत प्रिय आहे. नारदमहर्षि म्हणतात - दैन्यप्रियत्वात् |       (नारदभक्तिसूत्र)

भक्त ज्यावेळी अत्यंत दीन, अगतिक होतो, त्याचवेळी तो परमेश्वराला अनन्यभावाने शरण येतो.  म्हणून भगवान म्हणतात -

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |  

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||                             (गीता अ. १८-६६)

किंवा -

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत |

तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ||                         (गीता अ. १८-६२)

हे अर्जुना !  तू अन्य सर्व आश्रयांचा त्याग करून फक्त मला - परमेश्वरालाच श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने शरण ये.  मी स्वतः तुझा या संसारसागरामधून उद्धार करेन.

 

परमेश्वराला शरण जाणे म्हणजे काय ?  शरणागति सहा प्रकारची आहे. शास्त्रकार सांगतात -

अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् |

रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृत्वे वरणं तथा |

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागतिः ||

१) परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा संकल्प करणे.

२) परमेश्वराच्या प्रतिकूल असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करणे.

३) परमेश्वर माझे रक्षण करेल हा दृढ विश्वास ठेवणे.

४) संकटकाळी परमेश्वरालाच रक्षणकर्ता म्हणून निवडणे.

५) आत्मसमर्पण करणे.

६) अंतःकरणामध्ये दीनभाव, व्याकुळता, दैन्यता निर्माण करणे.

 

अशा प्रकारे परमेश्वराला शरण गेले पाहिजे.  शरणागति ही शारीरिक क्रिया नाही.  शरणागति म्हणजेच स्वतःचे रागद्वेष, विकार, स्वतःचा अहंकार-ममकार, सर्वस्व अर्पण करणे होय.  स्वत्वाचाच त्याग झाला पाहिजे.  अर्पण एकदाच करता येते.  एकदा अर्पण केले की, आपले स्वतःचे काहीच राहात नाही.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, August 18, 2026

विषयरूपी वाऱ्याने अस्वस्थ | Tossed-up By Sense Objects

 



साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर व शांत होतो.  त्यावेळी त्याच्या चित्तामधील सर्व इच्छा गळून पडतात.  मन, बुद्धी, इंद्रिये शांत होतात. ज्ञा नी पुरुष वासनाशून्य झाल्यामुळे त्याची कर्मे सुद्धा क्षीण होतात.

 

ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राचे बटन दाबले कि यंत्र चालू होते व पुन्हा दाबले कि ते बंद होते.  यंत्राला शक्ति मिळाली नाही की, आपोआपच शांत होऊन बंद पडते.  त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये वासना किंवा इच्छा उत्पन्न होत नसल्यामुळे ज्ञानी पुरुषाच्या क्रिया शांत होतात.  तसेच त्याला जगताचे मिथ्यात्व समजल्यामुळे शरीरयात्रार्थ कर्मे करूनही तो अकर्ताच राहतो.  ती कर्मे त्याला बद्ध करीत नाहीत.  सर्व शरीर प्रारब्धाला समर्पित करून तो शांतीने आणि आनंदाने राहातो.

 

पूर्वीच्या काळी एडक्यांचा खेळ होता.  दोरीच्या दोन टोकांना एडके बांधले जायचे.  त्यांच्यामध्ये एक नळी असायची.  नळीमधील दोरी जसजशी हलेल, तसतसे ते एडके हलायचे.  त्याप्रमाणेच हे रामा !  हे मनरूपी यंत्र चालण्यासाठी विषयभोगवासना हीच कारण आहे.  वासनाच मनुष्याच्या मनाला आयुष्यभर खेळवितात.  वासनांच्यामुळे मनुष्याचे मन सतत अस्वस्थ व अस्थिर होते.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे वाऱ्याची हालचाल ही  वाऱ्यामध्येच होत असते, त्याचप्रमाणे विषयांच्या ज्ञानामध्येच इंद्रियांची हालचाल होत असते.  इंद्रियांचे सर्व व्यापार विषयोपभोगांमध्ये होतात.  म्हणून विषयरूपी वारा आला की, अज्ञानी लोकांचे मन अस्वस्थ व विकारयुक्त होते.  

 

परंतु याउलट आत्मज्ञान मात्र अत्यंत शुद्ध ज्ञान आहे.  जसजसे, अंतःकरणामध्ये आत्मज्ञान उदयाला येते, तसतसे ज्ञानी पुरुष अंतर्मुख होतो आणि त्याला सर्व पदार्थ, सर्व दिशा, सर्व काळ, या सर्वांचे दर्शन आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये होते.  म्हणजेच  तो संपूर्ण दृश्य विश्व आत्मचैतन्यस्वरूपामध्ये पाहतो.  हे संपूर्ण दृश्य विश्व भासमान व मिथ्या असून वस्तुतः आत्मस्वरूपामध्येच अधिष्ठित आहे, याचे त्याला ज्ञान असते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, August 11, 2026

एकांतवासाचे फायदे | Benefits Of Solitude

 




एकान्तवास कशासाठी करावा ?  त्याचे अनेक फायदे आहेत.

१) आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बाह्य विषयांचे आकर्षण मनाला सतत भुरळ पाडत असते.  विषय अत्यंत मोहक असल्यामुळे नकळत आपण त्यांना बळी पडत असतो आणि त्याबरोबर वाहात राहातो.  विषयसंगामुळे आपल्या मनात सतत अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, आशा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्यातुनच कामादि विकार निर्माण होतात.  आपण कितीही चांगले असलो तरी लोकांच्या सान्निध्याने कपटीपणा, द्वेष, मत्सर, कटुता वगैरे आपण शिकतो.  त्यांच्या सवयी आपण उचलतो.  म्हणून काही काळ का होईना प्रत्येकाने सर्व विषयांचा आणि जनसंपर्काचा त्याग करून एकान्तवास करावा.

 

२) जीवन जगत असताना अनेक संकटे, दुःखाचे प्रसंग सतत येत असतात.  हे प्रसंग का येतात ?  याचे कारण शोधताना आपण सर्व दुःखांचे मूळ कारण बाहेर शोधत असतो - मग ते प्रसंगामध्ये, विषयामध्ये किंवा व्यक्तीमध्ये असो.  एकान्तवासात मनुष्य एकटा असतो.  सर्व जनसंपर्क आणि प्रसंगांच्यापासून काही प्रमाणात दूर राहातो.  काही प्रमाणात का होईना तो आत्मपरीक्षण करतो.  अंतर्मुख होण्याची त्याला संधी मिळते.  सर्व दुःखांचे कारण आपल्या मनातच आहे हे एकान्तवासामध्येच समजते.  जर बदल करावयाचा असेल तर आपल्याला आपले मन कसे आहे ?  त्यात काय दोष आहेत ?  आपण कोठे आहोत ?  हे स्पष्टपणे समजले पाहिजे आणि दोष समजण्याची संधी फक्त एकान्तवासातच मिळते.  दोष समजल्यानंतर ते काढून टाकण्याचा जो प्रयत्न करतो तोच खरा साधक आहे.

 

३) आपण आपल्या मनाला सतत कोणत्यातरी विषयात गुंतवीत असतो, कारण थोडे शरीराने शांत बसले की मन उफाळून येते.  ते आपण सहन करू शकत नाही.  या मनाला सामोरे जाणे अत्यंत कठीण जाते.  जो स्वतःच्या मनाला सामोरे जातो तोच विश्वाला, जीवनातील सर्व प्रसंगांना अत्यंत सहजपणे सामोरे जाऊ शकतो.  हे अंतरिक सामर्थ्य येण्यासाठी एकान्तवासाची जरूरी आहे.  एकान्तवासात मनाला बाहेर कोठेही गुंतविता येत नाही.  तसेच विषयांचा, लोकांचा संपर्क नसल्यामुळे मनाने मनाला सामोरे गेले पाहिजे.  या अभ्यासाने मनाची अंतरिक शक्ति वाढते.  मन अंतर्मुख होते.  असे मन ईश्वरचिंतनामध्ये एकाग्र करता येते.  हे चिंतन, उपासना एकान्तवासामध्येच होते.  म्हणून एकान्तवास साधनेला पूरक आणि पोषक आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ


Tuesday, August 4, 2026

एकात्मक दृष्टि | Unitive View

 




सर्व तत्त्वज्ञानी पुरुषांच्यामध्येही श्रेष्ठ असणाऱ्या हे रामा !  अरे, हे नानाविध असणारे अनंत, अमर्याद असणारे हे संपूर्ण विश्व सन्मात्रच आहे हे तू जाणून घे.  विश्व म्हणजे चैतन्यच आहे.  विश्व नावाची वेगळी गोष्टच येथे अस्तित्वात नाही.  हीच पारमार्थिक दृष्टि आहे.  जो अज्ञानी जीव या पारमार्थिक दृष्टीने पाहत नाही, त्यालाच हे विश्व शेकडो-लाखो भ्रमांनी युक्त असल्यासारखे दिसते.  परंतु राघवा !  हे विश्व म्हणजे चैतन्याचा केवळ चमत्कार आहे.  याशिवाय अन्य काहीही नाही.  जसे प्रत्येकाला प्रत्येकाच्या संकल्पनगरीमध्ये भिन्न भिन्न नगरी दिसतात, तेथील व्यवहार दिसतात, त्याचप्रमाणे हे दृश्य विश्व म्हणजे केवळ कल्पनाविलास आहे.

 

ज्याप्रमाणे एका मनुष्याच्या मनामधील देशकाळांच्या कल्पनेला दुसऱ्या मनुष्याच्या मनामधील देशकाळ बाधा आणू शकत नाहीत, त्याप्रमाणे जीवांच्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना असल्यामुळे त्या त्या प्रमाणे अनेक सर्ग-सृष्टि उत्पन्न होतात.  त्या एकमेकांना बाधा करीत नाहीत.  प्रत्येकाची सृष्टि ही भिन्न भिन्न आहे.  तसेच हे रामा !  जग भिन्न, जगापासून मी भिन्न, माझ्यापासून ईश्वर भिन्न, या भेदबुद्धीमुळेच "हे जग, हा मी" असे भ्रम उत्पन्न होतात.

 

जसे सोन्याकडे सोन्याच्या दृष्टीने पाहिले नाही, तर त्यामध्ये अलंकारांचा भ्रम उत्पन्न होतो.  तसेच तत्त्वाची दृष्टि प्राप्त झाली नसेल तर अनेक भेद उत्पन्न होतात.  जसे अलंकारादींचे भ्रम हे सोन्यामध्ये होतात व अलंकारांना सत्ता सुद्धा सोन्यामुळेच मिळते.  मात्र भेददृष्टीचा त्याग केला तर तेथे केवळ सोने आणि सोनेच अनुभवायला येते.

 

त्याचप्रमाणे या जगाकडे भेददृष्टीने न पाहता तत्त्वाच्या दृष्टीने पाहिले तर समजते की, अविद्या ही कधीही आत्मतत्त्वापासून भिन्न नसते.  अलंकारादि महाभेद डोळ्यांना दिसले तरी त्यांच्यामध्ये एकच एक शुद्ध सोने आहे.  या ऐक्यबोधामुळे सद्रूप दिसणारे जगही असद्रूप होते.  म्हणजेच ते जग तात्त्विक दृष्टीने चैतन्यमयच होते.  जसे मातीची चित्रे मृण्मय असतात.  लाटा, तरंग वगैरे जलमय असतात.  लाकडाची मूर्ति म्हणजे लाकूडच असते.  घट व तत्सम वस्तु या मृण्मयच असतात.  त्याचप्रमाणे त्रैलोक्याचा हा भ्रम ब्रह्ममयच आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Saturday, July 25, 2026

अनन्यता | Single Pointed Basis

 




भगवान नारदमहर्षि म्हणतात - अन्याश्रयाणां त्यागः अनन्यता |         (नारदभक्तिसूत्र )

जीवन जगत असताना आपण आपल्या कामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा आश्रय घेतो.  भक्ताने, साधकाने या सर्व आश्रयांचा त्याग केला पाहिजे.

 

१. धनाश्रय - व्यवहारामध्ये इच्छापूर्तीचे धन हे प्रमुख साधन मानले जाते.  आपल्याकडे पैसे असेल तर आपण पैशाने वस्तूच काय पण माणसे सुद्धा विकत घेऊ, असा अहंकार निर्माण होतो.  स्वतःच्या धनसंपत्तीवर मनुष्याचा प्रचंड विश्वास असतो.

२. कर्माश्रय - अनेक प्रकारच्या व्यावहारिक बहिरंग कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होऊन मनुष्य आपल्या सर्व कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.  कर्म हे कामनापूर्तीचे साधन असेल तरीही कर्माने मनुष्याच्या सर्वच कामना पूर्ण होत नाहीत.

३. देवताश्रय - काही भक्त आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या देवतांचा आश्रय घेतात.  साधक आपली ज्ञानसाधना सोडून कामानेने प्रेरित होतो आणि शीघ्र फळ देणाऱ्या या देवतांच्या उपासनेमध्येच रममाण होतो.  यामुळे सतत एकामागे एक कामनांचे वर्धन होऊन भक्त अधिक कामुक, विषयासक्त होतो.  परमेश्वरस्वरूपापासून दूर जातो.

४. अन्य जीवाश्रय - काही लोकांचा अन्य व्यक्ति, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र यांच्यावर विश्वास असतो.  परंतु दुर्दैवाने अन्य लोकही आपल्याप्रमाणेच जीवनामध्ये दुःखी, निराश, उद्विग्न झालेले असतात.  या विश्वामधील अन्य कोणतीही व्यक्ति माझा उद्धार करू शकत नाही.  म्हणून साधकाने अन्य जीवाश्रयाचा त्याग करावा.

५. स्वबलाश्रय - 'मी' माझ्या कर्तृत्वाने जप, तप, साधना, उग्र तपश्चर्या करून परमेश्वराला प्राप्त कारेन, असा अहंकार निर्माण होतो.  परंतु स्वकर्तृत्वाचा अहंकार आणि परमेश्वर या दोन गोष्टी एके ठिकाणी राहू शकत नाहीत.  म्हणून साधकाने या फाजील आत्मविश्वासाचाही त्याग करावा.

 

भक्ताने या सर्व आश्रयांचा फोलपणा, मर्यादा जाणाव्यात.  त्याचवेळी भक्त अत्यंत अगतिक, व्याकूळ होईल.  त्यावेळी तो परमेश्वराची कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य करून अनन्य भावाने परमेश्वरचरणी लीन होईल.  त्याचवेळी अन्य आश्रय आपोआप गळून पडतात.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, July 21, 2026

सत् , असत् की अतीत ? | Real, Apparent Or Transcendental?

 




ज्यावेळी चैतन्य हे 'अहं' वृत्तीने युक्त होते, त्यावेळी त्याला 'जीव' अशी संज्ञा मिळते.  ज्यावेळी चैतन्य समुद्रामधील तरंगांच्याप्रमाणे विविध संकल्प, विकल्प, अनेक भ्रम यांच्या रूपाने स्फुरण पावते, त्यावेळी त्याला 'जग' असे म्हणतात.  चैतन्यमधून संकल्पविकल्पादि भ्रम निर्माण झालेले आहेत.  चैतन्यामधूनच सर्व विषयवृत्ति निर्माण होतात.  पदार्थ किंवा जग म्हणजे जणु काही चैतन्यला मिळालेले आकार आहेत.  म्हणून घटचैतन्य, पटचैतन्य, सूर्यचैतन्य असे सर्व जगच चैतन्यमय आहे.  दिसते ते सर्वच चैतन्य आहे.  चैतन्यापासून कोणताही पदार्थ भिन्न नाही किंवा चैतन्यापासून दूर ही नाही.  म्हणून विषय पाहणे म्हणजे चैतन्याचेच दर्शन आहे.  याप्रमाणे सर्वच चैतन्यस्वरूप आहे.

 

हे रामा !  या सृष्टीच्या पूर्वी चैतन्यच अस्तित्वामध्ये होते.  तेच चैतन्य सृष्टीचे कारण बनून सृष्टीच्या प्रारंभी सृष्टीची लीला निर्माण करते.  स्वतःमध्येच सृष्टि निर्माण करते.  म्हणजे चैतन्य स्वतःमध्येच विश्वरूपाने व्यक्त होते.  मात्र सृष्टि निर्माण झाल्यानंतरही चैतन्यामध्ये कोणताही बदल किंवा परिणाम होत नाही.  जसे दोरीमधून साप निर्माण होताना दोरीमध्ये कोणताही बदल होत नाही.  दोरी हालत नाही किंवा विषारीही होत नाही.  दोरी ही दोरीच राहते.  मात्र दोरी तिच्या स्वरूपामध्ये सर्परूपाने भासमान होते.  दोरीमध्ये दिसणारा सर्प हा वस्तुतः असत् असूनही सत् असल्यासारखा आपल्याला भासतो.

 

त्याचप्रमाणे जीव व जग हे प्रत्यक्ष असत् असूनही सत् असल्यासारखे भासते.  खरे तर त्याला सत् ही म्हणता येत नाही आणि असत् ही म्हणता येत नाही.  आत्मज्ञानाच्या प्रभावाने चैतन्य आपल्या जगद्रूपाचा स्वतःच निरास करते.  म्हणजे ज्ञानाने जगद्रूप चैतन्याचा निरास होऊन अधिष्ठानरूप चैतन्य शिल्लक राहते.  म्हणून चैतन्यस्वरूप हे सत् आणि असत् या दोन्हींच्या अतीत असून दोन्हींच्याही आत अधिष्ठानस्वरूपाने आहे.  याचे कारण जग आहे असे म्हणावे तर जगाचा निरास होतो आणि नाही असे म्हणावे तर हे जग डोळ्यांना दिसते.  म्हणून संस्कृतमध्ये म्हटले जाते - सत् चेत् न बाधेत असत् चेत् न प्रतीयेत |  वस्तु सत् स्वरूप असेल तर तिचा कधी निरास होत नाही आणि वस्तु असत् असेल तर त्याचा कधीही अनुभव येत नाही.  म्हणून विश्वरूपी असणारे चैतन्य हे सत् ही नाही आणि असत् ही नाही, तर ते या दोन्हींचेही अधिष्ठान आहे.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ


Tuesday, July 14, 2026

प्रेम आणि ज्ञानी पुरुष | Love and The Self-Realized

 




अज्ञानी पुरुष कधीतरी प्रेम करतो आणि पुष्कळ वेळेला द्वेष करतो.  कधीतरीच त्याला प्रेमाचा उमाळा येतो परंतु ती प्रेमाची उर्मी काळाच्या ओघात निघूनही जाते.  म्हणजेच जोपर्यंत अहंकाराला पोषक वातावरण असते, तोपर्यंतच प्रेम असते, नंतर तो तिरस्कार करतो.  असे प्रेम तर कोणीही करते.  पशु सुद्धा करतात.  त्यामध्ये काही विशेष पुरुषार्थ नाही.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र नित्य-निरंतर प्रेम करतो.  येथे ‘निरंतर’ हा खूप महत्वाचा शब्द आहे.  अज्ञानी पुरुष द्वेष करणे सोडत नाही आणि ज्ञानी पुरुष प्रेम करणे, क्षमा करणे सोडत नाही.

 

मनुष्य स्वतःवरच जास्त प्रेम करतो.  आत्मस्वरूप हेच प्रेमाचे आश्रयस्थान आहे.  माणसाने दुसऱ्यांवर कितीही प्रेम केले तरी ती प्रेमाची उर्मी येते आणि निघूनही जाते.  प्रेमाची जागा द्वेषबुद्धि घेते.  त्याला ‘प्रेम’ म्हणता येत नाही.  म्हणून मनुष्याचे खरे प्रेम स्वतःवरच आहे.  मी अखंडपणे माझ्यावर सतत प्रेमच करीत असतो.  मी कधीही मला अप्रिय होत नाही.  मी माझ्या स्वतःचा द्वेष करूच शकत नाही.  ज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही.  त्याला समत्वाची, एकत्वाची दृष्टि प्राप्त होते.  जसे तो स्वतःवर प्रेम करतो, तसेच सर्वांच्यावर करू शकतो.

 

श्री रामकृष्ण परमहंस फार सुंदर गोष्ट सांगत – एकदा एक विंचु पाण्यामध्ये पडला.  त्या विंचवाला वाचविण्यासाठी एक साधु त्याला पाण्यातून बाहेर काढत होता, पण विंचु त्याला चावत होता.  असे एकदा नाही तर अनेक वेळेला घडले.  त्यावेळी हे सर्व पाहणारा एक मनुष्य त्या साधूला म्हणाला की, “तो विंचु तुम्हाला चावत आहे तरी तुम्ही त्याला का वाचवत आहात ?”  त्यावर साधु उत्तर देतो, “चावणे हा विंचवाचा धर्म आहे, विंचु त्याचा धर्म सोडत नाही.  दया करणे हा साधूचा धर्म आहे, मग तो मी का बरे सोडू ?”  ही साधूची, ज्ञानी पुरुषाची उदात्त परमोच्च दृष्टि आहे.  त्या दृष्टीमध्ये स्वार्थ नाही, कामना अपेक्षा नाहीत, व्यक्तिगत रागद्वेष नाही, आपपर भाव नाही, अहंकार, ममकार प्रत्यय नाहीत, तर ती शुद्ध, निर्विशेष, आत्मचैतन्यस्वरूपाची अभेद दृष्टि आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ