Showing posts with label Sadhana Panchakam. Show all posts
Showing posts with label Sadhana Panchakam. Show all posts

Tuesday, December 8, 2015

ज्ञानासाठी नतमस्तक | Surrender for Knowledge


शिष्य असो, पुत्र असो किंवा बंधू किंवा पत्नी असो, ब्रह्मविद्येसाठी गुरूंच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय गुरु ज्ञान प्रदान करत नाहीत.  प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे जीवश्च कंठश्च मित्र !  रात्रंदिवस दोघे एकमेकांच्या सहवासात होते.  अर्जुनाने काहीही व कोणत्याही क्षणी मागावे व भगवंताने त्याची इच्छापूर्ती करावी.  अर्जुनाने बोलविता क्षणीच श्रीकृष्ण हजर होत असत.  इतका घनिष्ट सहवास असूनही भगवंतांनी जीवनाचे सर्वश्रेष्ठ रहस्य कधीही आपणहून अर्जुनाला उलगडून सांगितले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे, अर्जुनाला स्वतःला ब्रह्मविद्येबद्दल जिज्ञासाच नव्हती आणि मी क्षत्रिय, मी अजिंक्य, महापराक्रमी, वीर, योद्धा हा त्याचा अभिमान त्याला सोडत नव्हता.  दुसऱ्यापुढे वाकणे, नम्र होणे हे त्याच्या क्षत्रियाच्या ताठर वृत्तीत कधीच बसत नव्हते.  परंतु युद्धाच्या वेळेस तो अगतिकतेने भगवंताला समर्पण झाला.  ‘सखा’ असलेल्या श्रीकृष्णाला त्याने ‘गुरूं’च्या पूज्य भावनेने स्वीकारले व शिष्यत्व पत्करले.  त्याचवेळी गीतेचा उपदेश भगवंतांनी त्याला केला.

प्राणापलीकडे विलक्षण बंधुप्रेम असणाऱ्या लक्ष्मणाने रामाची वनवासात बारा वर्षे सेवा करूनही लक्ष्मणाचा अहंकार गेला नाही म्हणून श्रीरामानेही त्याला गूढ तत्त्वज्ञान प्रकट केले नाही.

या परम पवित्र ज्ञानासाठी शिष्यही तितकाच शुद्ध, निर्मळ मनाचा असावा लागतो.  नंतरच साधकाने एकाक्षर ब्रह्माची अत्यंत व्याकुळतेने गुरूंना प्रार्थना करावी, कारण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही.  साधकाच्या सर्व साधनेचा परिपाक, शेवट ज्ञानात होतो.  अशा सर्वगुणविशिष्ट असलेल्या ज्ञानासाठी मनोभावे गुरूंची प्रार्थना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, December 1, 2015

सद्गुरू ईश्वरापेक्षा श्रेष्ठ | Sadguru Greater than the Almighty


गुरु ईश्वरस्वरूपच असल्याने शिष्यासाठी गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच उपासना व गुरु हीच सेवा आहे.  त्याने अखंडपणे कायावाचामनसा गुरुभक्ति करावी, कारण गुरु आत्मोपदेश देऊन त्याचा आत्मोद्धार करतात.  गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत.  गुरूंच्यापेक्षा ईश्वर सुद्धा श्रेष्ठ नाही.  गुरु हेच जिज्ञासूच्या जीवनातील अंतिम व अत्युत्तम तपस आहे.  आत्मज्ञान प्रदान करून जीवाचा उद्धार करणाऱ्या गुरुसेवेपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तपस नाही.

भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूंच्याकडेच पाठवितो. म्हणून गुरुचरणाचा आश्रय घ्यावा.  याचसाठी स्वतः परिपूर्ण ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने सुद्धा सांदिपनी गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा व उपासना केली.  परमश्रेष्ठ गुरुस्थानी असणाऱ्या महात्म्यांचा संग, सहवास अत्यंत दुर्लभ, अनाकलनीय व निश्चितपणे फलदायी असतो.  यासाठी ईश्वर शोधण्यापेक्षा गुरु शोधावा.

गुरु हेच स्थान इतके पूज्य, पवित्र व पावन करणारे आहे की, तेथे शिष्याने यत्किंचितही व्यावहारिक बुद्धि ठेऊ नये.  व्यावहारिक बुद्धि ठेवल्याने गुरूंचे आशीर्वाद मिळत नाहीत, कारण व्यावहारिक बुद्धि सदैव रागद्वेष व अपेक्षायुक्त असते.  शिष्याने संपूर्णपणे गुरुचरणी समर्पण होऊन एकनिष्ठपणे सेवा करावी.  गुरुसेवा हीच ईश्वरसेवा होय.  गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना.  गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा !

ईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरूंच्यावर अनन्यसाधारण भक्ति असेल, नितान्त श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल तर वेदान्तातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला सहज उलगडते, कळते.  तत्त्वप्रतिपादन व तत्त्वानुभूति आपोआप होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, November 24, 2015

गुरुसेवेचे महत्व | Importance of Service to Sadguru



स्वतःचा उद्धार होण्यासाठी श्रद्धा व भक्तीपूर्वक, मनोभावे गुरूंना शरण जाणे आवश्यक आहे. आचार्यांशिवाय हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गुरूंच्याशिवाय त्या ज्ञानाचे फळ म्हणजे शांति, तृप्ति मिळत नाही. गुरुचरणी समर्पण कसे व्हावे ?

गुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा हा अर्थ नव्हे, कारण गुरुप्राप्ति होईपर्यंत साधकाने ईश्वराची पूजा, त्याची सेवा, भक्ति व उपासना करावी. सगुण, साकार इष्ट देवतेवर त्याची पूर्ण श्रद्धा व अढळ निष्ठा असते. त्याच्यासाठी ईश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम्, सर्वश्रेष्ठ असतो. तो निःशंकपणे कायावाचामनासा एकनिष्ठेने ईश्वराची सेवा करतो. वाचेने परमेश्वराचे कल्याणगुण व त्याचा महिमा भजनपूजनात गातो आणि मनाने त्याचेच रूप आठवतो, परमेश्वराचे स्मरण करतो. शेवटी या ईश्वरसेवेचे फळ म्हणून त्याला गुरुप्राप्ति होते.

शिष्याने रोज गुरुचरणांची सेवा करावी. शिष्याने सेवावृत्तीने रहावे. गुरुसेवेत “चरण” हा शब्द खास करून आला आहे. चरणसेवा म्हणजे गुरूंच्या ठिकाणी साधकाने अत्यंत नम्र व विनयशील रहाणे होय, कारण ईश्वररूप गुरुचरणाशी शिष्याने पूर्णपणे समर्पण व्हावे. चरणसेवा ही नम्रतेचे प्रतीक आहे.

गुरूंना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करावा. येथे केवळ शारीरिक समर्पण अभिप्रेत नसून, गुरुचरणाशी अहंकाराचे समर्पण करावे व तेच खरे समर्पण होय. त्यामुळेच शिष्याच्या वृत्तीत नम्रता व विनयशीलता प्राप्त होते आणि ज्ञानप्राप्तीच्या साधनेतील सर्व प्रतिबंध, अहंकार समर्पणामुळे आपोआप नाहीसे होतात. गुरुसेवा हेच त्याचे ध्येय ! गुरु हेच त्याचे आश्रयस्थान ! गुरुसेवा हेच त्याचे जीवन.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

Friday, November 20, 2015

आत्मकल्याण हेच परमकर्तव्य | Self Upliftment - Supreme Duty


संसारोऽयमतीव विचित्रः | खरोखरीच हा संसार विलक्षण व विचित्र आहे.  आपण मनुष्य प्राणी खरेतर या विश्वात आगांतुक आहोत याची सतत जाणीव ठेवली पाहिजे.  विश्वाच्या रंगभूमीवरील आपण माणसे विविध भूमिका पार पाडण्यासाठी येतो.  त्यामुळे आपण आपली भूमिका करावी, अगदी चोखपणे व बिनतक्रार !  नाटकातील पात्रे काही काळ विविध प्रसंग रंगवत खेळ खेळतात व खेळ मोडून काळाच्या पडद्याआड निघून जातात, तसेच हे मानवी जीवन आहे.  हेच जीवनाचे रहस्य आहे.

शांतपणे विवेकपूर्ण विचार केला तर स्पष्टपणे ध्यानात येते की आपण मनातील खुळ्या, वेड्या कल्पनेतून नाती निर्माण करतो व विविध प्रकारच्या आसक्तीच्याही कल्पना निर्माण करतो.  अशा प्रकारे जीवनभर कल्पनांच्या न सुटणाऱ्या घट्ट जाळ्यात अडकून, जीव घुसमटून, गुदमरून मनुष्य स्वतःचा नाश आपणहून ओढवून घेतो.  परंतु तीव्र आत्मेच्छा निर्माण झाली की माणसाचे मन आपोआपच या कल्पनांच्या जाळ्यातून बाहेर येते, आसक्तीतून अलिप्त होते.

यासाठी यावज्जीव श्रुति म्हणते, ही आत्मेच्छेची अवस्था येईपर्यंत अविरत कर्म करत रहा, अहः  अहः संध्यां उपासीत |  त्याचप्रमाणे ती श्रुति वेदात दुसरीकडे असाही आदेश देते, यत् अहरेव विरजेत् तत् अहरेव प्रव्रजेत् |  ज्या दिवशी व ज्या क्षणी मनात विरक्ति येईल, त्याच क्षणी विश्व, विषय, नाती यांचा पूर्ण त्याग करावा व आत्मेच्छा पूर्तीसाठी, “ संन्यस्य श्रवणं कुर्यात् |  सर्व कर्मांचा संन्यास घेऊन शास्त्रश्रवण करावे, कारण “ आत्मकल्याणं एव कर्तव्यम् ” आत्मकल्याण हेच परमकर्तव्य आहे.

त्यासाठी साधनेने मन अंतर्मुख करून ही आत्मेच्छा दृढ करावी.  यासाठी विश्वाचे खरोखर वास्तविक स्वरूप काय आहे ?  याचा “ मनसि विचिन्तय वारं वारम् | ” पुन्हापुन्हा विचार करावा.  विश्वाची निष्फळता, व्यर्थता कळली, मनात पक्की रुजली की मन सहज आसक्तीचा त्याग करेल.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, November 26, 2013

प्रारब्ध आणि समतोल जीवन | Fate and Balanced Life



प्रारब्धकर्मामुळे मनुष्य भूतकाळही जगत नाही, भविष्यकाळही जगत नाही तर वर्तमानकाळातील ‘आताचा क्षणच’ केवळ जगतो.   पुढच्या क्षणी काय होणार ?  हे त्याला माहीत नसते.  तो पुढचा क्षण सुखाचा असेल किंवा कदाचित दुःखाचा असेल.  संपूर्ण जीवन विशिष्ट घटनांनी साचेबंद झालेले असते.  हे जीवनाचे स्वरूप साधकाने विचारात घ्यावे.

 तसेच कोणतीही घटना मनुष्य टाळू शकत नाही, बदलू शकत नाही.  प्रारब्धाने पूर्णपणे पूर्वनियोजित जीवन असेल तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वावच कोठे राहतो ?  ही शंका मनात उद्भवेल.  एकमेकांच्या प्रारब्धामुळे विविध घटना अत्यंत घनिष्टपणे एकमेकात गुंतल्याने त्या घटना किंवा ते कर्म झालेच पाहिजे.  त्याला पर्याय नाही.  चांगले अथवा वाईट सर्वच कर्मवशात् म्हणजेच प्रारब्धवशात् घडत असते.

परंतु सर्व माणसे स्वार्थाने चांगल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेतात तर वाईट अथवा दुःखद कर्माचा दोष पळपुटेपणाने माणसे दुर्दैवावर, फुटक्या नशिबावर ढकलतात.  पेरावे तसे उगवते या न्यायाने, आपल्याच कर्माचे फळ सुखद अथवा दुःखद घटनेच्या रूपाने आपल्यापुढे उभे रहात असेल, तर आनंदाने हुरळून जाण्याचे कारण नाही, तसेच दुःखाने अश्रुपात करण्याचेही कारण नाही.  दोन्ही परिस्थितीत कोणत्याही प्रकारे भावनेचा उद्रेक होण्याचे कारण नाही.  पूर्ण समतोल वृत्तीनेच दोन्ही प्रसंग स्वीकारले पाहिजेत, प्रतिक्रियारहित स्वीकार केला पाहिजे.

जेथे मनाची शांति व सुख आहे, तेथे सर्वच प्रसंगात भावनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष आढळत नाही.  जीवनाची पूर्ण समज तेथे असल्याने सर्वच प्रसंगाचे स्वागत केले जाते.  तरंगरहित नीरव शांति त्या मनात, अंतःकरणात नांदत असते.  तेथे मनाची, विचारांची पूर्ण परिपक्वता आहे.  असे हर्षविषादरहित, संतुलित मन घडविले पाहिजे, हीच तितिक्षा अथवा सहनशीलता आहे.  असे मन सदैव समाधानी व आनंदी असते.  अशी व्यक्ति सदैव प्रसन्नचित्त असते.       

 
"साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ


Wednesday, November 20, 2013

मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् आहे का? | Limitations of Human Being






मनुष्य खरोखरीच कर्तुम्-अकर्तुम् आहे का ?  यावर नीट सारासार विचार केला तर असे आढळते की मनुष्य स्वतःच कर्तुम्-अकर्तुम् असता तर पदोपदी दिसणारे दुःखाचे प्रसंग त्याने आपणहून घडवूनच आणले नसते.  दुःखाच्या खाईत आपणहून कोण जाईल ?  त्याला सतत सुख व समाधान हवे आहे.  परंतु आपली इच्छा नसतानाही दुःखद प्रसंग घडतच राहतात.  असे असताना मनुष्य किती प्रमाणात कर्तुम्-अकर्तुम् आहे ?

पूर्ण विवेकाने कळते की मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् अजिबात नाही, कारण मनुष्य सर्वशक्तिमान नाही, अल्पशक्तिमान आहे.  त्यामुळे कितीही विचार केला तरी अल्पबुद्धीची झेप पुढे जाऊ शकत नाही.  अपघात, मृत्यु, रोग अथवा दुःखदायक घटना का घडतात ?  याचे आकलन त्याला होत नाही.  बुद्धि थकते, कुंठीत होते. पुढे सर्व अंधार पसरतो.  पुढे काय ?  हा प्रश्न त्याला सतत भेडसावत राहतो व मनुष्य अगतिक होतो.

या प्रसंगातूनच विचाराला चालना मिळते.  विचाराने हळुहळू त्याला स्वतःची बुद्धि, शक्ति अत्यंत कमी आहे, तसेच सगळीकडून त्याला अतिशय मर्यादा आहेत, याची स्पष्ट जाणीव होते.  त्यामुळे हे दुःखाचे प्रसंग त्याचा अहंकार खाली आणतात.

यापुढे खोल विचार केल्यावर कळते की विश्वात मनुष्यापेक्षा निश्चितपणे श्रेष्ठतर शक्ति आहे.  या सर्वश्रेष्ठ शक्तीची संपूर्ण विश्वावर, साऱ्या चराचर श्रुष्टीवर, नव्हे प्रत्येकाच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे.  ही सर्वश्रेष्ठ सत्ताच कर्तुम्-अकर्तुम् आहे.  या शक्तीलाच ‘ईश्वर’ म्हणतात.  

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005





- हरी ॐ