Tuesday, December 8, 2015

ज्ञानासाठी नतमस्तक | Surrender for Knowledge


शिष्य असो, पुत्र असो किंवा बंधू किंवा पत्नी असो, ब्रह्मविद्येसाठी गुरूंच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय गुरु ज्ञान प्रदान करत नाहीत.  प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे जीवश्च कंठश्च मित्र !  रात्रंदिवस दोघे एकमेकांच्या सहवासात होते.  अर्जुनाने काहीही व कोणत्याही क्षणी मागावे व भगवंताने त्याची इच्छापूर्ती करावी.  अर्जुनाने बोलविता क्षणीच श्रीकृष्ण हजर होत असत.  इतका घनिष्ट सहवास असूनही भगवंतांनी जीवनाचे सर्वश्रेष्ठ रहस्य कधीही आपणहून अर्जुनाला उलगडून सांगितले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे, अर्जुनाला स्वतःला ब्रह्मविद्येबद्दल जिज्ञासाच नव्हती आणि मी क्षत्रिय, मी अजिंक्य, महापराक्रमी, वीर, योद्धा हा त्याचा अभिमान त्याला सोडत नव्हता.  दुसऱ्यापुढे वाकणे, नम्र होणे हे त्याच्या क्षत्रियाच्या ताठर वृत्तीत कधीच बसत नव्हते.  परंतु युद्धाच्या वेळेस तो अगतिकतेने भगवंताला समर्पण झाला.  ‘सखा’ असलेल्या श्रीकृष्णाला त्याने ‘गुरूं’च्या पूज्य भावनेने स्वीकारले व शिष्यत्व पत्करले.  त्याचवेळी गीतेचा उपदेश भगवंतांनी त्याला केला.

प्राणापलीकडे विलक्षण बंधुप्रेम असणाऱ्या लक्ष्मणाने रामाची वनवासात बारा वर्षे सेवा करूनही लक्ष्मणाचा अहंकार गेला नाही म्हणून श्रीरामानेही त्याला गूढ तत्त्वज्ञान प्रकट केले नाही.

या परम पवित्र ज्ञानासाठी शिष्यही तितकाच शुद्ध, निर्मळ मनाचा असावा लागतो.  नंतरच साधकाने एकाक्षर ब्रह्माची अत्यंत व्याकुळतेने गुरूंना प्रार्थना करावी, कारण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही.  साधकाच्या सर्व साधनेचा परिपाक, शेवट ज्ञानात होतो.  अशा सर्वगुणविशिष्ट असलेल्या ज्ञानासाठी मनोभावे गुरूंची प्रार्थना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment