Wednesday, November 20, 2013

मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् आहे का? | Limitations of Human Being






मनुष्य खरोखरीच कर्तुम्-अकर्तुम् आहे का ?  यावर नीट सारासार विचार केला तर असे आढळते की मनुष्य स्वतःच कर्तुम्-अकर्तुम् असता तर पदोपदी दिसणारे दुःखाचे प्रसंग त्याने आपणहून घडवूनच आणले नसते.  दुःखाच्या खाईत आपणहून कोण जाईल ?  त्याला सतत सुख व समाधान हवे आहे.  परंतु आपली इच्छा नसतानाही दुःखद प्रसंग घडतच राहतात.  असे असताना मनुष्य किती प्रमाणात कर्तुम्-अकर्तुम् आहे ?

पूर्ण विवेकाने कळते की मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् अजिबात नाही, कारण मनुष्य सर्वशक्तिमान नाही, अल्पशक्तिमान आहे.  त्यामुळे कितीही विचार केला तरी अल्पबुद्धीची झेप पुढे जाऊ शकत नाही.  अपघात, मृत्यु, रोग अथवा दुःखदायक घटना का घडतात ?  याचे आकलन त्याला होत नाही.  बुद्धि थकते, कुंठीत होते. पुढे सर्व अंधार पसरतो.  पुढे काय ?  हा प्रश्न त्याला सतत भेडसावत राहतो व मनुष्य अगतिक होतो.

या प्रसंगातूनच विचाराला चालना मिळते.  विचाराने हळुहळू त्याला स्वतःची बुद्धि, शक्ति अत्यंत कमी आहे, तसेच सगळीकडून त्याला अतिशय मर्यादा आहेत, याची स्पष्ट जाणीव होते.  त्यामुळे हे दुःखाचे प्रसंग त्याचा अहंकार खाली आणतात.

यापुढे खोल विचार केल्यावर कळते की विश्वात मनुष्यापेक्षा निश्चितपणे श्रेष्ठतर शक्ति आहे.  या सर्वश्रेष्ठ शक्तीची संपूर्ण विश्वावर, साऱ्या चराचर श्रुष्टीवर, नव्हे प्रत्येकाच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे.  ही सर्वश्रेष्ठ सत्ताच कर्तुम्-अकर्तुम् आहे.  या शक्तीलाच ‘ईश्वर’ म्हणतात.  

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005





- हरी ॐ

No comments:

Post a Comment