Friday, November 20, 2015

आत्मकल्याण हेच परमकर्तव्य | Self Upliftment - Supreme Duty


संसारोऽयमतीव विचित्रः | खरोखरीच हा संसार विलक्षण व विचित्र आहे.  आपण मनुष्य प्राणी खरेतर या विश्वात आगांतुक आहोत याची सतत जाणीव ठेवली पाहिजे.  विश्वाच्या रंगभूमीवरील आपण माणसे विविध भूमिका पार पाडण्यासाठी येतो.  त्यामुळे आपण आपली भूमिका करावी, अगदी चोखपणे व बिनतक्रार !  नाटकातील पात्रे काही काळ विविध प्रसंग रंगवत खेळ खेळतात व खेळ मोडून काळाच्या पडद्याआड निघून जातात, तसेच हे मानवी जीवन आहे.  हेच जीवनाचे रहस्य आहे.

शांतपणे विवेकपूर्ण विचार केला तर स्पष्टपणे ध्यानात येते की आपण मनातील खुळ्या, वेड्या कल्पनेतून नाती निर्माण करतो व विविध प्रकारच्या आसक्तीच्याही कल्पना निर्माण करतो.  अशा प्रकारे जीवनभर कल्पनांच्या न सुटणाऱ्या घट्ट जाळ्यात अडकून, जीव घुसमटून, गुदमरून मनुष्य स्वतःचा नाश आपणहून ओढवून घेतो.  परंतु तीव्र आत्मेच्छा निर्माण झाली की माणसाचे मन आपोआपच या कल्पनांच्या जाळ्यातून बाहेर येते, आसक्तीतून अलिप्त होते.

यासाठी यावज्जीव श्रुति म्हणते, ही आत्मेच्छेची अवस्था येईपर्यंत अविरत कर्म करत रहा, अहः  अहः संध्यां उपासीत |  त्याचप्रमाणे ती श्रुति वेदात दुसरीकडे असाही आदेश देते, यत् अहरेव विरजेत् तत् अहरेव प्रव्रजेत् |  ज्या दिवशी व ज्या क्षणी मनात विरक्ति येईल, त्याच क्षणी विश्व, विषय, नाती यांचा पूर्ण त्याग करावा व आत्मेच्छा पूर्तीसाठी, “ संन्यस्य श्रवणं कुर्यात् |  सर्व कर्मांचा संन्यास घेऊन शास्त्रश्रवण करावे, कारण “ आत्मकल्याणं एव कर्तव्यम् ” आत्मकल्याण हेच परमकर्तव्य आहे.

त्यासाठी साधनेने मन अंतर्मुख करून ही आत्मेच्छा दृढ करावी.  यासाठी विश्वाचे खरोखर वास्तविक स्वरूप काय आहे ?  याचा “ मनसि विचिन्तय वारं वारम् | ” पुन्हापुन्हा विचार करावा.  विश्वाची निष्फळता, व्यर्थता कळली, मनात पक्की रुजली की मन सहज आसक्तीचा त्याग करेल.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment