Tuesday, November 24, 2015

गुरुसेवेचे महत्व | Importance of Service to Sadguru



स्वतःचा उद्धार होण्यासाठी श्रद्धा व भक्तीपूर्वक, मनोभावे गुरूंना शरण जाणे आवश्यक आहे. आचार्यांशिवाय हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गुरूंच्याशिवाय त्या ज्ञानाचे फळ म्हणजे शांति, तृप्ति मिळत नाही. गुरुचरणी समर्पण कसे व्हावे ?

गुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा हा अर्थ नव्हे, कारण गुरुप्राप्ति होईपर्यंत साधकाने ईश्वराची पूजा, त्याची सेवा, भक्ति व उपासना करावी. सगुण, साकार इष्ट देवतेवर त्याची पूर्ण श्रद्धा व अढळ निष्ठा असते. त्याच्यासाठी ईश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम्, सर्वश्रेष्ठ असतो. तो निःशंकपणे कायावाचामनासा एकनिष्ठेने ईश्वराची सेवा करतो. वाचेने परमेश्वराचे कल्याणगुण व त्याचा महिमा भजनपूजनात गातो आणि मनाने त्याचेच रूप आठवतो, परमेश्वराचे स्मरण करतो. शेवटी या ईश्वरसेवेचे फळ म्हणून त्याला गुरुप्राप्ति होते.

शिष्याने रोज गुरुचरणांची सेवा करावी. शिष्याने सेवावृत्तीने रहावे. गुरुसेवेत “चरण” हा शब्द खास करून आला आहे. चरणसेवा म्हणजे गुरूंच्या ठिकाणी साधकाने अत्यंत नम्र व विनयशील रहाणे होय, कारण ईश्वररूप गुरुचरणाशी शिष्याने पूर्णपणे समर्पण व्हावे. चरणसेवा ही नम्रतेचे प्रतीक आहे.

गुरूंना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करावा. येथे केवळ शारीरिक समर्पण अभिप्रेत नसून, गुरुचरणाशी अहंकाराचे समर्पण करावे व तेच खरे समर्पण होय. त्यामुळेच शिष्याच्या वृत्तीत नम्रता व विनयशीलता प्राप्त होते आणि ज्ञानप्राप्तीच्या साधनेतील सर्व प्रतिबंध, अहंकार समर्पणामुळे आपोआप नाहीसे होतात. गुरुसेवा हेच त्याचे ध्येय ! गुरु हेच त्याचे आश्रयस्थान ! गुरुसेवा हेच त्याचे जीवन.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

No comments:

Post a Comment