Showing posts with label Yog. Show all posts
Showing posts with label Yog. Show all posts

Tuesday, December 17, 2024

अभ्यास योगाची साधना | Means of “Abhyas Yog”

 




प्रत्येक साधक हा धार्मिक, श्रद्धावान, आध्यात्मिक असेल तरीही त्याचे मन परमेश्वरामध्ये लगेचच एकाग्र होत नाही.  याचे कारण आज मनामध्ये अनेक विषयांच्याच वृत्ति आहेत.  अजुनही मनामध्ये विषयांच्याबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.  विषयांचे महत्व आहे.  यामुळे विषयांच्यामध्ये सत्यत्वबुद्धि निर्माण होऊन मनामध्ये कामना निर्माण होतात.  पुन्हा पुन्हा ते मन विषयांच्यामध्ये रुळते, रममाण होते.  यामुळे परमेश्वरामध्ये मन एकाग्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये अनेक प्रतिबंध निर्माण होतात.  यासाठीच भगवान या श्लोकात ‘अभ्यासयोगाची’ साधना देतात.

 

मग अभ्यासयोग म्हणजे काय ?  आचार्य सांगतात –

विपरीतप्रत्ययान्तिरस्कृत्य सजातीयप्रत्ययावृत्तिरभ्यासः |  सर्व विपरीत - विजातीय वृत्तींचा निरास करून जाणीवपूर्वक, सातत्याने, अखंडपणे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  भगवान म्हणतात -

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् |

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ||                    (गीता अ. ६-२६)

जसजसे मन विषयांच्याकडे जाईल तसतसे त्यावर नियंत्रण करावे.  केवळ मन दाबून, ओढून एकाग्र होत नाही.  तर त्यासाठी विवेकाने विषयदोषदर्शन करावे.  म्हणजेच विषयांच्या अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं, मिथ्यात्वं या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषयांचे खरे स्वरूप पाहावे.  यामुळे मन आपोआपच त्यांच्यापासून निवृत्त होईल.  त्या त्या प्रमाणात विषयांचे संस्कार कमी होतील.

 

या संस्कारांचा प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराच्या उपासनेचा संस्कार वाढवावा.  जाणीवपूर्वक, सावधानतेने, मनाला विषयासक्तीमधून निवृत्त करून उपासना करावी.  परमेश्वराची वृत्ति पुन्हा-पुन्हा निर्माण करावी.  सुरुवातीला खूप अवघड वाटेल.  यामध्ये विषयांच्या वृत्ति आल्यामुळे विरल चिंतन होईल.  परंतु सातत्याने दीर्घकाळ उपासना केल्यानंतर सरलचिंतन होऊन परमेश्वराचीच वृत्ति म्हणजे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण होईल.  यालाच ‘अभ्यास’ असे म्हटले आहे.  या अभ्यासयोगामुळे क्रमाने चित्तशुद्धि होऊन ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, March 8, 2022

धर्माने प्रारब्धाचा नाश | Duty (Dharma) Can Destroy Fate

 



प्रयत्नाने साध्यप्राप्ति तर होतेच होते, पण पुरुषार्थाने प्रारब्धाचा सुद्धा नाश करता येतो.  यावरून लक्षात येईल की, आपल्या धर्मग्रंथांच्यामधून किंवा शास्त्रग्रंथांच्यामधून कोठेही अज्ञात दैवाला, अंधविश्वासाला, निष्क्रियतेला स्थान दिलेले नाही.  तर उलट शास्त्र प्रत्येक मनुष्याला त्याच्या नियत कर्तव्यकर्मामध्येच प्रवृत्त करते.  शास्त्र मनुष्याला आळशी, कर्मशून्य बनवीत नसून कर्तव्यपरायण, कर्तव्यदक्ष बनविते.  शास्त्र मनुष्याला परमोच्च सकारात्मक दृष्टि देते.  जीवन उत्साहाने व आनंदाने जगण्यास प्रवृत्त करते आणि त्याच जीवनामध्ये मनुष्याला परमपुरुषार्थ असणाऱ्या मोक्षामध्ये प्रवृत्त करते.

 

जो मनुष्य शास्त्राने सांगितलेल्या मागणे सत्कर्माचे आचरण करतो, त्याला त्यापासून निश्चितपणे इच्छित फळ प्राप्त होते.  त्याव्यतिरिक्त केलेले सर्व कर्म अनर्थाला कारण होते.  म्हणून साधकाने नित्यनिरंतर वेदविहित कर्मांचेच अनुष्ठान करावे. हिंसादि वेदनिषिद्ध कर्मांचा पूर्णतः त्याग करावा.  कोणते कर्म योग्य व कोणते अयोग्य, हे ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे.  सर्वसाधारणपाने जोपर्यंत अनुकूल प्रसंग येतात तोपर्यंत मनुष्य धर्माचे अनुसरण करतो.  परंतु काही वेळेस प्रतिकूल परिस्थिति आल्यावर मनुष्याची धर्मावरची श्रद्धा उडते.  तसेच काही वेळेला मनुष्य स्वार्थ, लोभ या विकारांना वश होऊन सत्कर्म-सदाचाराचा त्याग करतो.

 

म्हणुनच येथे वसिष्ठ विशेषत्वाने सांगतात की, प्रतिकूल परिस्थिति आली तरीही मनुष्याने धर्माचा त्याग करू नये. तसेच स्वार्थ, लोभाला वश होऊन कधीही आपल्या सत्कर्मामध्ये तडजोड करू नये.  धर्माचरणापासून विचलित होऊ नये.  याचे कारण - धर्मो रक्षति रक्षितः |  जो मनुष्य कितीही संकटे आली तरीही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने, विवेकाने, धर्माच्याच मार्गाने जाईल, त्याला आज नाही उद्या त्याचे इप्सित फळ निःसंशयपाने प्राप्त होते.  ते सत्कर्मच त्या मनुष्याचे अधःपतनापासून रक्षण करते.  यामध्ये संशय नाही. मात्र - धर्म एव हतः हन्ति |  अधार्मिक आचरण मनुष्याच्या अधःपतनालाच कारण होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019




- हरी ॐ




Tuesday, September 21, 2021

शांति आणि योगसाधना | Silence and Yog Sadhana

 




नीरव शांतस्वरूप आपल्या आतच आहे.  परंतु बहिर्मुख मनामुळे ते असूनही अनुभवायला येत नाही.  त्यासाठी सूर्यास्ताप्रमाणे मनामधील सर्व बहिर्मुख वृत्ति हळुहळू निवृत्त केल्या तर मनामध्येच असलेली परंतु मनाच्याही अतीत असलेली शांति अनुभवायला मिळेल.  सर्व वृत्तींचा निरोध करून मन निवृत्त करणे आणि स्वस्वरूपामध्ये स्थिर करण्यासाठीच योगसाधना आहे.

 

याचा अर्थ शांति बाह्य विषयांमध्ये नाही किंवा घटपटादिप्रमाणे एखादा विषय नाही.  ती आपल्या आतच आहे.  ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर एकामागे एक समुद्राच्या लाटा सतत येत असतात, त्यामुळे आपल्याला खळखळाट दिसतो.  इतकेच नव्हे, तर एखादा मनुष्य पोहायला लागला तर सतत आघात होणाऱ्या लाटांच्यामुळे हेलकावे खात राहातो.  परंतु त्याच लाटांच्या खाली समुद्राच्या तळाशी गेले तर तेथे लाटांचे आघात होत नाहीत, हेलकावे नाहीत.  याउलट आपल्याला नीरव शांत स्थिति अनुभवायला येते.  त्याचप्रमाणे आपण सर्व मनाच्या अवस्थेमध्येच जगत आहोत.  त्यामुळे, लाटांच्याप्रमाणे मनामध्ये निर्माण होणाऱ्या विषयांच्या वृत्ति, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचे आघात सतत होत असतात.  असा एकही क्षण नाही की, त्यावेळी रागद्वेष नाहीत, द्वंद्व नाहीत, विक्षेप नाहीत.  या सर्व ऊर्मींच्यामुळे आपण मनाबरोबर हेलकावे अनुभवतो.  आपल्यामधील शांति, सुख हरवून बसतो.  हेच मन स्वरूपाच्या शांतीपासून वंचित करते.

 

म्हणून जर आपल्याला खरोखरच नीरव शांतस्वरूप अनुभवायचे असेल तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनाच्या अतीत जाण्याचा अभ्यास केला पाहिजे.  मनाच्या अंतरंगामध्ये शांतीचा शोध घेतला पाहिजे.  जसे आपण अंतरंगामध्ये आत जावू त्या प्रमाणामध्ये मनामध्ये वर वर दिसणारे सर्व विक्षेप, संकल्प-विकल्प, द्वंद्व, रागद्वेषांचे परिणाम कमी कमी होतील आणि मन तणावरहित होईल.  मनानेच निर्माण केलेले विचारांचे दडपण कमी होईल.  हळूहळू शांतीचा उत्कर्ष होईल.  यासाठीच योगसाधना आहे.  थोडक्यात मनानेच मनातील सर्व वृत्तींचा त्याग करून मनाने निर्माण केलेल्या सर्व काल्पनिक बंधनांच्यामधून मुक्त होऊन स्वस्वरूपाच्या नीरव शांत स्थितीमध्ये स्वस्थ राहाणे हीच योगाची परमोच्च अवस्था आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Tuesday, March 13, 2018

कर्माची खरी कुशलता | The Real Skill in Work




मोक्षाच्या प्राप्तीसाठी क्रमाने पाहिले तर सर्वप्रथम निष्कामकर्मयोग हेच साधन आहे.  मग येथे शंका येईल की, कर्म हेच मोक्षाचे साधन असेल तर सर्वच माणसे रात्रंदिवस कर्मरत आहेत.  त्यामुळे सर्वच जण मुक्त झाले पाहिजेत.  परंतु असे होत नाही.  तर उलट कर्म करून मनुष्य बद्ध होतो.  म्हणूनच भगवान सांगतात की, कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात.

योगः कर्मसु कौशलम्  |   (गीता अ. २-५०)
केवळ नाकतोंड दाबणे, दोन वेळेला प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे, तर कर्मामधील कुशलता म्हणजेच योग आहे आणि ही कुशलता म्हणजेच कर्मामधील निष्काम सेवावृत्ति होय.  अशा प्रकारे कर्म करूनच क्रमाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते.  

जसे, व्यवहारामध्ये आपण पाहतो की, काट्यानेच काटा काढावा.  काटा पायात गेला की खूप यातना होतात.  त्यामुळे त्याठिकाणी कितीही चिंध्या बांधल्या, मलमपट्टी केली तरी सुद्धा जोपर्यंत काटा आत आहे, तोपर्यंत यातना या होणारच !  या यातनांच्यामधून कायमचे मुक्त व्हावयाचे असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे दुसरा टोकदार काटा घ्यावा आणि त्याच्या साहाय्याने पहिला काटा काढावा आणि नंतर दोन्हीही काटे फेकून द्यावेत.  

तसेच निष्काम कर्माच्या साहाय्याने कर्मबंधनाचा नाश केला पाहिजे.  दुष्कर्मांचा त्याग करावा आणि सत्कर्म करीत असताना सुद्धा त्या कर्मामागील कामनांचा, वासनांचा त्याग करावा.  म्हणजेच कर्मामागील दृष्टि बदलावी.  कर्मे तीच करावयाची आहेत.  जर तीच कर्मे सकाम केली, कामना ठेवून केली तर जीवाला ती बद्ध करतात.  जसे, ज्योतिष्टोमेन यजेत् स्वर्गकामः |  स्वर्गकामनेने प्रेरित होऊन जर अग्निहोत्रादि कर्म केले तर मनुष्याला स्वर्गप्राप्ति होते, परंतु – क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति |  या न्यायाने तो मनुष्य पुन्हा मर्त्यलोकात येऊन कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकतो.  परंतु तेच कर्म निष्काम भावनेने केले, आसक्तीचा त्याग केला तर अंतःकरणशुद्धीसाठी ते साधन होते आणि क्रमाने मनुष्य कर्म-कर्मफळाच्या जंजाळामधून मुक्त होतो.  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
                              

- हरी ॐ




Tuesday, January 17, 2017

ज्ञानयोग | Path of Knowledge



ज्ञानं एव योगः ज्ञानयोगः |  ज्ञान हाच योग आहे.  योग हा शब्द ‘युज’ धातुपासून बनलेला आहे. युज म्हणजे जोडणे.  या अर्थाने ज्ञान हेच जीवाला ईश्वराशी जोडणारे साधन आहे.  नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जावयाचे असेल तर सेतु या साधनाची आवश्यकता असते.  याठिकाणी सुद्धा जीव हा एका अवस्थेला असून त्याला अज्ञानरूपी भवसागरामधून पार करून मोक्षावस्थेला न्यावयाचे आहे.  त्यासाठी त्याला सेतुप्रमाणे साधनाची आवश्यकता आहे की, जे साधन त्याला मोक्षावस्थेपर्यंत घेवून जाईल.  संसार हा अज्ञानकल्पित असल्यामुळे संसाराला पार करून मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान हेच साधन आहे.  तोच ज्ञानयोग होय.

हा मार्ग कोणाला सांगितला?
सांख्य म्हणजे ज्यांनी आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक करून त्या दोघांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त केलेले आहे, असे विवेकी साधक आहेत.  जे वेदांतशास्त्रामधून प्रतिपादित केलेल्या निर्विशेष परब्रह्माचे स्वरूप आत्मानात्मविचाराने समजावून घेवून ते परब्रह्म प्रत्यगात्मस्वरूपाने जाणतात ते ब्रह्मज्ञानी म्हणजेच सांख्य होत.  ते ब्रहमज्ञानी केव्हा होतात ?  तर – ब्रह्मचर्याश्रमादेव कृतसंन्यासानाम |  

ते सत आणि असत वस्तूचे स्वरूप समजावून घेवून असतचा त्याग करून सत वस्तूचा आश्रय घेतात.  असत वस्तूचा त्याग म्हणजेच सर्व ऐहिक इंद्रियांच्या उपभोगांचा त्याग करून विषयभोगात न अडकता ब्रह्मचर्याश्रमातून एकदम सर्व कर्मांचा संन्यास घेतात अशा साधनचतुष्टयसंपन्न असलेल्या साधकांना ब्रह्मस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त करण्यासाठी ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे.  हे सर्व विश्व आणि मी ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारच्या ब्रह्माकारवृत्तीने स्वस्वरुपाची निश्चल स्थिति प्राप्त होते.  तोच योग होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


            - हरी ॐ –