भगवान नारदमहर्षि म्हणतात - अन्याश्रयाणां
त्यागः अनन्यता | (नारदभक्तिसूत्र )
जीवन जगत असताना आपण आपल्या कामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा आश्रय घेतो. भक्ताने, साधकाने या सर्व आश्रयांचा त्याग केला पाहिजे.
१. धनाश्रय - व्यवहारामध्ये
इच्छापूर्तीचे धन हे प्रमुख साधन मानले जाते. आपल्याकडे पैसे असेल तर आपण पैशाने वस्तूच
काय पण माणसे सुद्धा विकत घेऊ, असा अहंकार निर्माण होतो. स्वतःच्या
धनसंपत्तीवर मनुष्याचा प्रचंड विश्वास असतो.
२. कर्माश्रय - अनेक प्रकारच्या
व्यावहारिक बहिरंग कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होऊन मनुष्य आपल्या सर्व कामना पूर्ण
करण्याचा प्रयत्न करतो. कर्म हे
कामनापूर्तीचे साधन असेल तरीही कर्माने मनुष्याच्या सर्वच कामना पूर्ण होत नाहीत.
३. देवताश्रय - काही भक्त आपल्या
कामना पूर्ण करण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या देवतांचा आश्रय घेतात. साधक आपली ज्ञानसाधना सोडून कामानेने प्रेरित
होतो आणि शीघ्र फळ देणाऱ्या या देवतांच्या उपासनेमध्येच रममाण होतो. यामुळे सतत एकामागे एक कामनांचे वर्धन होऊन भक्त
अधिक कामुक, विषयासक्त
होतो. परमेश्वरस्वरूपापासून दूर जातो.
४. अन्य जीवाश्रय - काही लोकांचा
अन्य व्यक्ति, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र
यांच्यावर विश्वास असतो. परंतु दुर्दैवाने
अन्य लोकही आपल्याप्रमाणेच जीवनामध्ये दुःखी, निराश, उद्विग्न
झालेले असतात. या विश्वामधील अन्य कोणतीही
व्यक्ति माझा उद्धार करू शकत नाही. म्हणून
साधकाने अन्य जीवाश्रयाचा त्याग करावा.
५. स्वबलाश्रय - 'मी' माझ्या
कर्तृत्वाने जप, तप, साधना, उग्र तपश्चर्या करून
परमेश्वराला प्राप्त कारेन, असा
अहंकार निर्माण होतो. परंतु स्वकर्तृत्वाचा
अहंकार आणि परमेश्वर या दोन गोष्टी एके ठिकाणी राहू शकत नाहीत. म्हणून साधकाने या फाजील आत्मविश्वासाचाही त्याग
करावा.
भक्ताने या सर्व आश्रयांचा फोलपणा, मर्यादा जाणाव्यात. त्याचवेळी भक्त अत्यंत अगतिक, व्याकूळ होईल. त्यावेळी
तो परमेश्वराची कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य करून अनन्य भावाने परमेश्वरचरणी लीन
होईल. त्याचवेळी अन्य आश्रय आपोआप गळून
पडतात.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

