अज्ञानी पुरुष कधीतरी प्रेम करतो आणि पुष्कळ
वेळेला द्वेष करतो. कधीतरीच त्याला
प्रेमाचा उमाळा येतो परंतु ती प्रेमाची उर्मी काळाच्या ओघात निघूनही जाते. म्हणजेच जोपर्यंत अहंकाराला पोषक वातावरण
असते, तोपर्यंतच प्रेम असते, नंतर तो तिरस्कार करतो. असे प्रेम तर कोणीही करते. पशु सुद्धा करतात. त्यामध्ये काही विशेष पुरुषार्थ नाही. परंतु ज्ञानी पुरुष मात्र नित्य-निरंतर प्रेम
करतो. येथे ‘निरंतर’ हा खूप महत्वाचा शब्द
आहे. अज्ञानी पुरुष द्वेष करणे सोडत
नाही आणि ज्ञानी पुरुष प्रेम करणे, क्षमा करणे सोडत नाही.
मनुष्य स्वतःवरच जास्त प्रेम करतो. आत्मस्वरूप हेच प्रेमाचे आश्रयस्थान आहे. माणसाने दुसऱ्यांवर कितीही प्रेम केले तरी ती
प्रेमाची उर्मी येते आणि निघूनही जाते. प्रेमाची
जागा द्वेषबुद्धि घेते. त्याला ‘प्रेम’
म्हणता येत नाही. म्हणून मनुष्याचे खरे
प्रेम स्वतःवरच आहे. मी अखंडपणे माझ्यावर
सतत प्रेमच करीत असतो. मी कधीही मला
अप्रिय होत नाही. मी माझ्या स्वतःचा द्वेष
करूच शकत नाही. ज्ञानी पुरुष सर्व
भूतमात्रांच्यामध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही. त्याला समत्वाची, एकत्वाची दृष्टि प्राप्त होते.
जसे तो स्वतःवर प्रेम करतो, तसेच
सर्वांच्यावर करू शकतो.
श्री रामकृष्ण परमहंस फार सुंदर गोष्ट सांगत
– एकदा एक विंचु पाण्यामध्ये पडला. त्या
विंचवाला वाचविण्यासाठी एक साधु त्याला पाण्यातून बाहेर काढत होता, पण विंचु
त्याला चावत होता. असे एकदा नाही तर अनेक
वेळेला घडले. त्यावेळी हे सर्व पाहणारा एक
मनुष्य त्या साधूला म्हणाला की, “तो विंचु तुम्हाला चावत आहे तरी तुम्ही त्याला का
वाचवत आहात ?” त्यावर साधु उत्तर देतो, “चावणे
हा विंचवाचा धर्म आहे, विंचु त्याचा धर्म सोडत नाही. दया करणे हा साधूचा धर्म आहे, मग तो मी का बरे
सोडू ?” ही साधूची, ज्ञानी
पुरुषाची उदात्त परमोच्च
दृष्टि आहे. त्या दृष्टीमध्ये स्वार्थ
नाही, कामना अपेक्षा नाहीत, व्यक्तिगत रागद्वेष नाही, आपपर भाव नाही, अहंकार, ममकार
प्रत्यय नाहीत, तर ती शुद्ध, निर्विशेष, आत्मचैतन्यस्वरूपाची अभेद दृष्टि आहे.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–

