Showing posts with label Skill. Show all posts
Showing posts with label Skill. Show all posts

Tuesday, December 16, 2025

प्रसंगांना सामोरे जाण्याची विद्या | The Skill of Facing Situations

 



जीवनात प्रत्येक प्रसंग, नव्हे, प्रत्येक क्षण हा नवीन, वैशिष्ठ्यपूर्ण आहे.  त्यामुळे निराश उद्विग्न, पूर्वग्रहदूषित मानाने प्रसंगांना सामोरे जाण्यापेक्षा स्वच्छ, शुद्ध, प्रसन्न मानाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे.  या सर्व विश्वामध्ये आनंदच भरून उरला आहे.  फक्त तो अनुभवता आला पाहिजे.  इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हटले जाते - Enjoy the sorrows.  अशी आपली प्रसन्न वृत्ति ठेवावी.

 

यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच सर्व प्रसंगांचा आपण साकल्याने विचार करावा.  या सर्व प्रसंगांना कारण मी भूतकाळात केलेले कर्मच आहे.  मी पूर्वी केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे म्हणजेच आजचे जीवन आहे.  माझ्या प्रारब्धानुसारच मी जीवन जगत असतो.  प्रारब्धाचा कधीही त्याग करता येत नाही.  प्रारब्ध हे उपभोगुनच संपविले पाहिजे.  प्रारब्धानुसार जे घडणार नसेल ते कितीही प्रयत्न करूनही घडणार नाही आणि जे घडणार आहे - ते घडणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  यामुळे प्रसंगांना सामोरे जाणे, हाच पुरुषार्थ आहे.

 

तिसरी दृष्टि - जे जे आपल्या जीवनात घडते ते सर्व माझ्या हितासाठीच घडते.  या विश्वनियंत्याच्या योजनेप्रमाणे प्रत्येक घटना घडत असते.  एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी असतो.  आपण साधक असल्यामुळे सतत लक्षात ठेवावे की, परमेश्वरच आपल्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग निर्माण करतो.  आपण कर्तृत्वाने त्यामधून बाहेर येऊ शकत नाही.  त्याचवेळी आपण अत्यंत अगतिक, व्याकुळ होतो.  परमेश्वराचा धावा करतो.  आपला अहंकार परमेश्वराला शरण जातो.  अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येच श्रद्धा, निष्ठा, धैर्य, आत्मविश्वास, त्याग, प्रेम, भक्ती या दैवी गुणांचा उत्कर्ष होतो.  म्हणून साधकाने सर्व प्रसंगांना आनंदाने सामोरे जावे.

 

चौथी दृष्टि - साधकाच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग ही त्याची परीक्षाच आहे.  प्रतिकूल प्रसंगांच्यामध्येच सद्गुणांची, दैवी गुणांची परीक्षा होते.  सर्व सुरळीत (smooth) चालले आहे तोपर्यंत कोणीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, मोठमोठी संकटे येऊन मनावर आघात करतात, तेव्हा परमेश्वरावरील, गुरूंच्यावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  स्वतःच्या जीवनावरील विश्वास सुद्धा उडून जातो.  हीच खरी परीक्षा आहे.  ही परीक्षा हळुहळू अवघड होत जाते.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, March 13, 2018

कर्माची खरी कुशलता | The Real Skill in Work




मोक्षाच्या प्राप्तीसाठी क्रमाने पाहिले तर सर्वप्रथम निष्कामकर्मयोग हेच साधन आहे.  मग येथे शंका येईल की, कर्म हेच मोक्षाचे साधन असेल तर सर्वच माणसे रात्रंदिवस कर्मरत आहेत.  त्यामुळे सर्वच जण मुक्त झाले पाहिजेत.  परंतु असे होत नाही.  तर उलट कर्म करून मनुष्य बद्ध होतो.  म्हणूनच भगवान सांगतात की, कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात.

योगः कर्मसु कौशलम्  |   (गीता अ. २-५०)
केवळ नाकतोंड दाबणे, दोन वेळेला प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे, तर कर्मामधील कुशलता म्हणजेच योग आहे आणि ही कुशलता म्हणजेच कर्मामधील निष्काम सेवावृत्ति होय.  अशा प्रकारे कर्म करूनच क्रमाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते.  

जसे, व्यवहारामध्ये आपण पाहतो की, काट्यानेच काटा काढावा.  काटा पायात गेला की खूप यातना होतात.  त्यामुळे त्याठिकाणी कितीही चिंध्या बांधल्या, मलमपट्टी केली तरी सुद्धा जोपर्यंत काटा आत आहे, तोपर्यंत यातना या होणारच !  या यातनांच्यामधून कायमचे मुक्त व्हावयाचे असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे दुसरा टोकदार काटा घ्यावा आणि त्याच्या साहाय्याने पहिला काटा काढावा आणि नंतर दोन्हीही काटे फेकून द्यावेत.  

तसेच निष्काम कर्माच्या साहाय्याने कर्मबंधनाचा नाश केला पाहिजे.  दुष्कर्मांचा त्याग करावा आणि सत्कर्म करीत असताना सुद्धा त्या कर्मामागील कामनांचा, वासनांचा त्याग करावा.  म्हणजेच कर्मामागील दृष्टि बदलावी.  कर्मे तीच करावयाची आहेत.  जर तीच कर्मे सकाम केली, कामना ठेवून केली तर जीवाला ती बद्ध करतात.  जसे, ज्योतिष्टोमेन यजेत् स्वर्गकामः |  स्वर्गकामनेने प्रेरित होऊन जर अग्निहोत्रादि कर्म केले तर मनुष्याला स्वर्गप्राप्ति होते, परंतु – क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति |  या न्यायाने तो मनुष्य पुन्हा मर्त्यलोकात येऊन कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकतो.  परंतु तेच कर्म निष्काम भावनेने केले, आसक्तीचा त्याग केला तर अंतःकरणशुद्धीसाठी ते साधन होते आणि क्रमाने मनुष्य कर्म-कर्मफळाच्या जंजाळामधून मुक्त होतो.  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
                              

- हरी ॐ