Showing posts with label Freedom. Show all posts
Showing posts with label Freedom. Show all posts

Tuesday, February 14, 2017

स्वातंत्र्य आणि प्रकृतीचा स्वभाव | Freedom and Force of Own Nature


प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुरूप त्या त्या कर्माचे फळ – सुखदुःख अनुभवण्यासाठी जन्माला येतो.  यामुळे जीवन जगत असताना त्याला स्वातंत्र्य असेल तरी सर्व व्यवहार त्याच्या वासना नियमित करतात.  उदा.  एखादी गाय खुंटीला बांधली असेल तरी दोर जितका लांब आहे तितक्याच अंतरापर्यंत ती भ्रमण करू शकेल.  तितकेच तिला स्वातंत्र्य आहे.  परंतु नकळत तो दोर गायीच्या स्वातंत्र्यावर नियमन करीत असतो.  ती गाय एका ठराविक सीमेच्या पलीकडे जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येक जीव आपापले संस्कार घेऊन जन्माला येतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतो.  सर्व विश्व त्याचे परिभ्रमणाचे क्षेत्र आहे.  कोठे जावे आणि काय करावे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.  परंतु नकळत त्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या स्वातंत्र्यावर नियमन करतो.  कोठे जावे किंवा जाऊ नये, काय करावे किंवा करू नये हे प्रत्येक मनुष्य त्याच्या विचाराने ठरवीत असेल तरी सुद्धा त्याचे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणेच तो कर्म करतो.

म्हणून भगवान म्हणतात की, सर्व भूतमात्र अनेक प्रकारच्या कर्मांचे कारण असलेल्या रागद्वेषात्मक प्रकृतीला प्राप्त होतात आणि रागद्वेषांच्या संस्कारानुरूप अनेक प्रकारचा व्यापार-चेष्टा व्यवहार करतात.  यामुळे प्रकृतीच्या अधीन असलेले हे सर्व प्राणी एक क्षणभर सुद्धा तूष्णी म्हणजे शांत अवस्थेमध्ये राहू शकत नाहीत.  प्रत्येक जीव त्याच्या स्वभावाप्रमाणे जातो.  कितीही चांगल्या वातावरणामध्ये एखाद्याला ठेवले तरी सुद्धा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो.  कितीही समजावून सांगितले किंवा विनवण्या केल्या तरी त्याला समजत नाही. तो डोळ्याने पाहातो एक आणि समजतो फार वेगळेच !  यात कोणाचा दोष आहे ?  अन्य व्यक्तीला दोष देवून काय उपयोग ?  दोष असेल तर तो त्याच्या स्वतःच्या स्वभावाचा आहे.  त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा आहे.  तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागणार !  एकाच प्रसंगामध्ये दोन व्यक्ति असतील तरी दोघांच्या प्रतिक्रिया भिन्नभिन्न असतात, कारण प्रत्येकाची प्रकृति भिन्नभिन्न स्वभावाची आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, February 16, 2016

शोक-मोहातून मुक्तता | Freedom from Grief & Enticement


अहंकार-ममकाराच्या प्रत्ययाने निर्माण झालेला शोक-मोहरूपी संसार प्रत्येक जीवाला अनुभवायला येतो.  तो शोक इंद्रियांना घटादि विषयाप्रमाणे अनुभवायला येत नसून तो प्रत्येकाला आपल्या मनामध्ये प्रचीतीला येतो, कारण तो इंद्रियांचा विषय नसून मनाचा आहे.  या शोकाचे कारण विश्व, बाह्य प्रसंग किंवा विषय नसून मन हेच कारण आहे.

याच मनामध्ये अहंकार असून त्याभोवती आपण स्वतःबद्दलच्या कल्पनांचे वलय निर्माण करतो आणि नंतर ‘मी’ सोडून अन्य व्यक्ति, विषय, स्थावर-जंगम यांच्या अनुषंगाने ममत्व निर्माण करतो.  जेथे जेथे हा ममत्व प्रत्यय निर्माण होईल त्याठिकाणी आपले प्रेम, आसक्ति निर्माण होते आणि आपोआपच अनेक प्रकारच्या अपेक्षा निर्माण होतात.  हाच प्रत्यय सर्वांना बद्ध करतो.  यातुनच मोह आणि शोक म्हणजेच संसार अनुभवायला येतो.

थोडक्यात संसाराला कारण मोह आणि शोक, त्याला कारण अहंकार-ममकार आणि त्याचे मूळ कारण स्वस्वरूपाचे अज्ञान !  म्हणून सर्व संसारच अज्ञानकल्पित आहे.  यामुळे संसारातून मुक्त होणे म्हणजे विषयांचा, लोकांचा, विश्वाचा त्याग करणे नसून सुख-दुःखात्मक असलेल्या द्वन्द्वात्मक कल्पनांमधून मुक्तता होय.  शोकातून मुक्तता म्हणजे मोहातून मुक्तता म्हणजे पर्यायाने अहंकारामधून मुक्तता होय.  अहंकारापासून मुक्तता अज्ञाननिवृत्तीने होते आणि ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होतो व संसाराचा समूळ निरास होतो.

गुरूंच्या उपदेशाने अज्ञानाचा निरास होऊन ज्ञानप्राप्ति होते आणि अज्ञानकल्पित संसाराचा ध्वंस होतो.  म्हणून सर्व शास्त्राचे आणि उपदेशाचे प्रयोजन संसारनिवृत्ति म्हणजेच अज्ञाननिवृत्ति आणि अज्ञाननिवृत्ति म्हणजेच ज्ञानप्राप्ति होय.  थोडक्यात अज्ञानाचा निरास करून संसारनिवृत्ति करणे हेच ज्ञानाचे प्रयोजन आहे.  त्यामुळे ज्ञान हे जरी positive असले तरी त्याचे कार्य अज्ञानकल्पित संसाराचा निरास करणे हेच आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, September 8, 2015

व्यक्तिगत चातुर्वर्ण्य व्यवस्था | Personal Pre-Dispositions


व्यक्तिगत स्थारावारही चातुर्वर्ण्य व्यवस्था दिसते.  कोणताही मनुष्य चोवीस तास एकच वर्णाचा राहू शकत नाही.  दैनंदिन जीवनातही आपण दिवसाचा काही काळ ब्राह्मण, काही काळ क्षत्रिय तर काही काळ वैश्य आणि शूद्र असतो.  प्रत्येक मनुष्य हा गुणप्राधान्याने या चारही वर्णांचे अनुसरण करतो.

प्रत्येक जण हा स्वभावाला वश असतो.  जन्माने प्राप्त झालेली जात ही मनाची वृत्ति किंवा मनुष्याचे कर्म ठरवीत नाही.  जात किंवा कर्म बदलून माणूस बदलू शकत नाही.  मनुष्य कोणते कर्म करतो यापेक्षा ते कसे करतो, याला अधिक महत्व आहे.  बहिरंगाने श्रेष्ठ असणाऱ्या कर्मामागे राग, द्वेष, अहंकार असेल तर ते निकृष्ठ होईल आणि याउलट झाडू मारण्यासारख्या बहिरंगाने निकृष्ठ असणाऱ्या कार्मामागे सेवेचा, भक्तीचा शुद्ध भाव असेल तर ते कर्म सर्वोत्कृष्ट होऊ शकते.  इतकेच नव्हे, तर ते कर्म साधकाला अंतःकरणाच्या शुद्धीचे साधन होऊन मोक्षाचेही साधन होऊ शकते.  प्रत्यक्ष कोणतेही कर्म हे उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही तर ते कोणत्या भावाने केले जाते, यावरच त्या कर्माची श्रेष्ठता अवलंबून आहे.

सर्व संत हे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांच्या कर्मांनी, गुणांनी ते श्रेष्ठ ठरले.  म्हणूनच प्रत्येकाने तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  म्हणजेच, शूद्रापासून क्रमाने ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थच प्रत्येक मनुष्य – मग तो कोणत्याही वर्णाचा, जातीचा, पंथाचा असो, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब कोणताही असो, तो गुणवृत्तीने ब्राह्मण होऊ शकतो.  प्रत्येक मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

यावरून सिद्ध होत की, चातुर्वर्ण्य हा वस्तुतः समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी अथवा समाजाच्या अधःपतनासाठी सांगितलेला नसून प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी सांगितलेला आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

Tuesday, September 23, 2014

कर्म अपरिहार्य आहेत | Actions are Indispensable

 
अज्ञानी जीव कधीच कर्मरहित राहू शकत नाही. कर्मरहित राहाणे म्हणजेच स्वस्वरूपात राहाणे होय. त्यामुळे ज्ञानी हाच फक्त स्वस्वरूपात नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकतो. त्याव्यतिरिक्त असणारे अज्ञानी, अविवेकी जीव कर्मरहित राहू शकत नाहीत.
 
याचे कारण, स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार यांच्याशी तादात्म्य पावून सर्व जीव बहिर्मुख होतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात विषयभोगवासना निर्माण होते. भोगवासनेमुळे ते अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात. तसेच हट्टाने किंवा स्वच्छेने जरी कर्मरहित राहाण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्य कर्मरहित राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणप्राबल्यामुळे सर्व जीव प्रकृतीचे गुलाम होवून कर्मामध्ये प्रवृत्त होतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. म्हणजेच कर्म करावयाचे किंवा करावयाचे नाही, हे जीव ठरवीत नसून प्रकृतीचे गुण ठरवितात.
 
सत्त्व, रज आणि तम हे तीन प्रकृतीचे सहजस्वाभाविक गुणधर्म आहेत. अनेक संकल्प, कामना यांच्यामुळे द्रव्य, गुण, कर्म, जातिवासना तसेच रागद्वेषादि विकार निर्माण होतात. हे सर्व प्रकृतिगुणांच्या अंतःप्रेरणेने जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असल्यामुळे सर्व जीव अगतिक होवून त्या त्या संकल्पाच्या आहारी जातात. इतकेच नव्हे तर, कर्म करावे की करू नये हे स्वातंत्र्यही त्यांना राहात नाही. तो प्रबल संकल्प किंवा कामना जीवाला अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त करते. मग ते कर्म अंतरिक असो व बाह्य असो. जीव त्यामध्ये प्रवृत्त होतात.
 
याप्रकारे अज्ञानी जीव प्रकृतीच्या गुणांनी मोहीत झाल्यामुळे प्रकृतीच्या अधीन होतात आणि ती प्रकृति त्यांना कर्म करावयाला भाग पाडते. त्यामुळे ते सर्व जीव एक क्षणभरही कर्मरहित, नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकत नाहीत.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
- हरी ॐ