Tuesday, September 8, 2015

व्यक्तिगत चातुर्वर्ण्य व्यवस्था | Personal Pre-Dispositions


व्यक्तिगत स्थारावारही चातुर्वर्ण्य व्यवस्था दिसते.  कोणताही मनुष्य चोवीस तास एकच वर्णाचा राहू शकत नाही.  दैनंदिन जीवनातही आपण दिवसाचा काही काळ ब्राह्मण, काही काळ क्षत्रिय तर काही काळ वैश्य आणि शूद्र असतो.  प्रत्येक मनुष्य हा गुणप्राधान्याने या चारही वर्णांचे अनुसरण करतो.

प्रत्येक जण हा स्वभावाला वश असतो.  जन्माने प्राप्त झालेली जात ही मनाची वृत्ति किंवा मनुष्याचे कर्म ठरवीत नाही.  जात किंवा कर्म बदलून माणूस बदलू शकत नाही.  मनुष्य कोणते कर्म करतो यापेक्षा ते कसे करतो, याला अधिक महत्व आहे.  बहिरंगाने श्रेष्ठ असणाऱ्या कर्मामागे राग, द्वेष, अहंकार असेल तर ते निकृष्ठ होईल आणि याउलट झाडू मारण्यासारख्या बहिरंगाने निकृष्ठ असणाऱ्या कार्मामागे सेवेचा, भक्तीचा शुद्ध भाव असेल तर ते कर्म सर्वोत्कृष्ट होऊ शकते.  इतकेच नव्हे, तर ते कर्म साधकाला अंतःकरणाच्या शुद्धीचे साधन होऊन मोक्षाचेही साधन होऊ शकते.  प्रत्यक्ष कोणतेही कर्म हे उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही तर ते कोणत्या भावाने केले जाते, यावरच त्या कर्माची श्रेष्ठता अवलंबून आहे.

सर्व संत हे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांच्या कर्मांनी, गुणांनी ते श्रेष्ठ ठरले.  म्हणूनच प्रत्येकाने तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  म्हणजेच, शूद्रापासून क्रमाने ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थच प्रत्येक मनुष्य – मग तो कोणत्याही वर्णाचा, जातीचा, पंथाचा असो, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब कोणताही असो, तो गुणवृत्तीने ब्राह्मण होऊ शकतो.  प्रत्येक मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

यावरून सिद्ध होत की, चातुर्वर्ण्य हा वस्तुतः समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी अथवा समाजाच्या अधःपतनासाठी सांगितलेला नसून प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी सांगितलेला आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

No comments:

Post a Comment