Showing posts with label Pre-Dispositions. Show all posts
Showing posts with label Pre-Dispositions. Show all posts

Tuesday, September 8, 2015

व्यक्तिगत चातुर्वर्ण्य व्यवस्था | Personal Pre-Dispositions


व्यक्तिगत स्थारावारही चातुर्वर्ण्य व्यवस्था दिसते.  कोणताही मनुष्य चोवीस तास एकच वर्णाचा राहू शकत नाही.  दैनंदिन जीवनातही आपण दिवसाचा काही काळ ब्राह्मण, काही काळ क्षत्रिय तर काही काळ वैश्य आणि शूद्र असतो.  प्रत्येक मनुष्य हा गुणप्राधान्याने या चारही वर्णांचे अनुसरण करतो.

प्रत्येक जण हा स्वभावाला वश असतो.  जन्माने प्राप्त झालेली जात ही मनाची वृत्ति किंवा मनुष्याचे कर्म ठरवीत नाही.  जात किंवा कर्म बदलून माणूस बदलू शकत नाही.  मनुष्य कोणते कर्म करतो यापेक्षा ते कसे करतो, याला अधिक महत्व आहे.  बहिरंगाने श्रेष्ठ असणाऱ्या कर्मामागे राग, द्वेष, अहंकार असेल तर ते निकृष्ठ होईल आणि याउलट झाडू मारण्यासारख्या बहिरंगाने निकृष्ठ असणाऱ्या कार्मामागे सेवेचा, भक्तीचा शुद्ध भाव असेल तर ते कर्म सर्वोत्कृष्ट होऊ शकते.  इतकेच नव्हे, तर ते कर्म साधकाला अंतःकरणाच्या शुद्धीचे साधन होऊन मोक्षाचेही साधन होऊ शकते.  प्रत्यक्ष कोणतेही कर्म हे उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही तर ते कोणत्या भावाने केले जाते, यावरच त्या कर्माची श्रेष्ठता अवलंबून आहे.

सर्व संत हे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांच्या कर्मांनी, गुणांनी ते श्रेष्ठ ठरले.  म्हणूनच प्रत्येकाने तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  म्हणजेच, शूद्रापासून क्रमाने ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थच प्रत्येक मनुष्य – मग तो कोणत्याही वर्णाचा, जातीचा, पंथाचा असो, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब कोणताही असो, तो गुणवृत्तीने ब्राह्मण होऊ शकतो.  प्रत्येक मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

यावरून सिद्ध होत की, चातुर्वर्ण्य हा वस्तुतः समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी अथवा समाजाच्या अधःपतनासाठी सांगितलेला नसून प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी सांगितलेला आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ

Tuesday, September 1, 2015

चातुर्वर्ण्य | Four Pre-Dispositions


चातुर्वर्ण्य वेदाला मान्य आहे. चातुर्वर्ण्य हा केवळ हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही.  चातुर्वर्ण्य हा मानवजातीमध्ये भेद पाडण्यासाठी सांगितलेला नसून मानवजातीच्या विकासासाठी सांगितला आहे.  विभाजनासाठी नसून उत्कर्षासाठी सांगितला आहे.  यामुळे मनुष्य अत्यंत निकृष्ठ अवस्थेपासून उत्कृष्ठ अवस्थेपर्यंत जाऊ शकतो.  हे भेद जन्मानुसार केलेले नाहीत.  जन्माने सर्वच जीव शूद्र, कनिष्ठ आहेत.  उपनयन संस्कारामुळे जीवाला द्विजत्व प्राप्त होते.  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण केवळ जन्माने ठरत नसून मनुष्याच्या गुणवृत्तीने ठरतात.

ब्राह्मण म्हणजे केवळ ब्राह्मण कुळात जन्मलेला नव्हे.  जीवनामध्ये आचारसंहिता अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मनुष्यावर आई, वडील आणि गुरु यांचे संस्कार झाले पाहिजेत.  अशा सुसंस्कृत मनुष्यामध्येच ब्राह्मणत्वाचा आविष्कार दिसतो.  केवळ यज्ञोपवीत धारण केलेला अथवा पूजाअर्चा करणारा ब्राह्मण होऊ शकत नाही.  जो अर्वाच्य भाषण, दुसऱ्याचे चारित्र्यहनन, अभक्ष्य भक्षण, अपेय पान करतो, तो शूद्रापेक्षाही शूद्र आहे.  जो वेदांचे पठन, अध्ययन करेल, जो पूर्वोक्त अमानित्वादि गुणांनी युक्त असेल, तो ब्राह्मण आहे.

बाहूचे असणारे गुण म्हणजेच वीर्य, शक्ति आहेत.  क्षत्रियामध्ये धैर्य, त्याग, आत्मविश्वास, निष्ठा, समर्पण हे गुण असतात.  वैश्य हा मध्यम गुणांचा अधिकारी असतो.  तो कृषिवाणिज्यादि व्यापार करणारा असतो.  शूद्र हा बुद्धीने मंद, जड असतो.  तो स्वतःची बुद्धि मुळीच वापरत नाही.  तो पोटासाठी दुसऱ्यांची नोकरी करतो.  तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो.  उदरभरण एवढेच त्याचे ध्येय असते.  तो परिचर्या, शिल्पकलादि कलांच्यामध्ये निपुण असतो.  उदरभरण, प्रजोत्पत्ति यापेक्षा आयुष्यात दुसरा काही पुरुषार्थ आहे, याची त्याला सुतराम कल्पना, जाणीवच नसते.

अशा प्रकारे, सत्वरजतम या त्रिगुणांच्यामधून हे चार वर्ण निर्माण झाले.  हे चार वर्ण नसून मनुष्याच्या चार वृत्ति आहेत.  समाजामध्ये समन्वय, सुसूत्रता, सुसंगति निर्माण होण्यासाठी या चारही वर्णांची आवश्यकता आहे.

- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006


- हरी ॐ