Tuesday, February 16, 2016

शोक-मोहातून मुक्तता | Freedom from Grief & Enticement


अहंकार-ममकाराच्या प्रत्ययाने निर्माण झालेला शोक-मोहरूपी संसार प्रत्येक जीवाला अनुभवायला येतो.  तो शोक इंद्रियांना घटादि विषयाप्रमाणे अनुभवायला येत नसून तो प्रत्येकाला आपल्या मनामध्ये प्रचीतीला येतो, कारण तो इंद्रियांचा विषय नसून मनाचा आहे.  या शोकाचे कारण विश्व, बाह्य प्रसंग किंवा विषय नसून मन हेच कारण आहे.

याच मनामध्ये अहंकार असून त्याभोवती आपण स्वतःबद्दलच्या कल्पनांचे वलय निर्माण करतो आणि नंतर ‘मी’ सोडून अन्य व्यक्ति, विषय, स्थावर-जंगम यांच्या अनुषंगाने ममत्व निर्माण करतो.  जेथे जेथे हा ममत्व प्रत्यय निर्माण होईल त्याठिकाणी आपले प्रेम, आसक्ति निर्माण होते आणि आपोआपच अनेक प्रकारच्या अपेक्षा निर्माण होतात.  हाच प्रत्यय सर्वांना बद्ध करतो.  यातुनच मोह आणि शोक म्हणजेच संसार अनुभवायला येतो.

थोडक्यात संसाराला कारण मोह आणि शोक, त्याला कारण अहंकार-ममकार आणि त्याचे मूळ कारण स्वस्वरूपाचे अज्ञान !  म्हणून सर्व संसारच अज्ञानकल्पित आहे.  यामुळे संसारातून मुक्त होणे म्हणजे विषयांचा, लोकांचा, विश्वाचा त्याग करणे नसून सुख-दुःखात्मक असलेल्या द्वन्द्वात्मक कल्पनांमधून मुक्तता होय.  शोकातून मुक्तता म्हणजे मोहातून मुक्तता म्हणजे पर्यायाने अहंकारामधून मुक्तता होय.  अहंकारापासून मुक्तता अज्ञाननिवृत्तीने होते आणि ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होतो व संसाराचा समूळ निरास होतो.

गुरूंच्या उपदेशाने अज्ञानाचा निरास होऊन ज्ञानप्राप्ति होते आणि अज्ञानकल्पित संसाराचा ध्वंस होतो.  म्हणून सर्व शास्त्राचे आणि उपदेशाचे प्रयोजन संसारनिवृत्ति म्हणजेच अज्ञाननिवृत्ति आणि अज्ञाननिवृत्ति म्हणजेच ज्ञानप्राप्ति होय.  थोडक्यात अज्ञानाचा निरास करून संसारनिवृत्ति करणे हेच ज्ञानाचे प्रयोजन आहे.  त्यामुळे ज्ञान हे जरी positive असले तरी त्याचे कार्य अज्ञानकल्पित संसाराचा निरास करणे हेच आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment