Showing posts with label Consciousness. Show all posts
Showing posts with label Consciousness. Show all posts

Tuesday, January 20, 2026

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग २ | Expressions Of Consciousness Part 2

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       स्मृति: “मी ही वस्तु पूर्वी पाहिली की नाही” असा विचार करता करता “मी ही वस्तु पूर्वी निश्चितपणे पाहिली आहे” अशा निर्णयात्मक वृत्तीला ‘स्मृति’ असे म्हणतात.

·       वासना: ज्या पदार्थांचा व त्यांच्या शक्तींचा उपभोग घेतलेला असतो, त्या पदार्थांची पुन्हा तीव्र भावना उत्पन्न होऊन त्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही इच्छा उत्पन्न न होणे.

·       विद्या: “आत्मतत्त्व हे अत्यंत विमल, शुद्ध, मायारहित असून त्याव्यतिरिक्त असणारी द्वैतात्मक दृष्टि ही अस्तित्वातच नाही” याची जी जाणीव होते.

·       विस्मृति: जिला परमपदाचे विस्मरण होते, आत्मविनाशासाठीच जी स्फुरण पावते.

·       इंद्रिय: जी संवित् ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, उपभोगणे, गंधग्रहण करणे, विचार करणे वगैरेदि क्रिया करून आपल्या इंद्राला म्हणजे इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या जीवाला आनंद देते.

·       प्रकृति: ज्या तत्त्वाचा कशानेही निर्देश करता येत नाही, अशा अलक्षित परमात्मस्वरूपामध्ये जी सर्व दृश्य पदार्थांना प्रकर्षाने उत्पन्न करते.

·       माया: जिच्यामुळे वस्तु सत् आहे की असत् आहे, याचा निश्चय बोध होत नाही, जी सहजपणे सत् ला असत् रूपाने दाखविते तर असत् ला सत् रूपाने दाखविते.

·       क्रिया: पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, रसग्रहण करणे, गंधग्रहण करणे, या कर्मांच्यामधून जी कार्यकारण रूप व्यवहाराला प्राप्त होते.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, December 23, 2025

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग १ | Expressions Of Consciousness Part 1

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       मन: अविद्येमुळे चैतन्यस्वरूप कलंकित-विकारयुक्त झाल्यासारखे वाटते व त्यामधून अनेक कल्पना उत्पन्न होतात.  त्या कल्पनांच्यामधून पुढे अनेक उन्मेष म्हणजे “हे योग्य की ते योग्य ?” “हे करावे की ते करावे ?” याप्रकारचे असंख्य प्रश्न निर्माण होतात.  संकल्प-विकल्पयुक्त असणाऱ्या चैतन्याच्या या अविद्याकल्पित स्थितीला ‘मन’ असे म्हणतात.

·       बुद्धि: या संकल्प विकल्पांच्यामधून कोणतीतरी एक निश्चित व निर्णयात्मक वृत्ति उदयाला येते.  त्या वृत्तीमध्ये निर्णय घेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे तिला इयत्ताग्रहणक्षमा असे म्हटले जाते. तिचेच ‘बुद्धि’ असे नाव आहे.

·       अहंकार: ज्यामध्ये मिथ्या अभिमान उत्पन्न होऊन स्वतःच्या स्वतंत्र सत्तेची कल्पना केली जाते, त्या बुद्धीला ‘अहंकार’ अशी संज्ञा आहे.

·       चित्त: जी वृत्ति एखाद्या लहान बालकाप्रमाणे एक विषय सोडून दुसरा, दुसरा विषय सोडून तिसरा याप्रमाणे एकामागून एक भिन्न भिन्न विषयांचे स्मरण, अनुसंधान करीत राहते.

·       कर्म: चैतन्याची जी वृत्ति जीवाकडून असत् स्वरूपाचे स्पंदन करवून घेते, तसेच जी त्या क्रियेच्या फळामागे धावते, स्पंदन हाच जिचा धर्म आहे.

·       कल्पना: काकतालीय न्यायाप्रमाणे जी आपल्या स्वस्वरूपाच्या निश्चयाचा त्याग करून म्हणजे स्वस्वरूपाला विसरून दृश्य विषयाची भावना करू लागते, ती चैतन्याची वृत्ति.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, January 3, 2023

चैतन्याचे आकारमान | Gauging the Consciousness

 



चैतन्य सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.  चैतन्य हे विश्वामध्ये जे सूक्ष्म पदार्थ सांगितले जातात, त्या सर्वांपेक्षाही सूक्ष्म आहे.  या विश्वामध्ये सर्व पदार्थांच्यामध्ये अणु-रेणु हा अत्यंत लहान, सूक्ष्म आहे.  त्यापेक्षाही परमाणु, प्रोटॉन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन हे अत्यंत सूक्ष्म आहेत.  पण चैतन्य हे त्या सर्वांच्यापेक्षाही सूक्ष्म आहे.  ते स्वरूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म आणि स्थूलाहूनही स्थूल आहे.  तेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठे आहे.  

श्रुति म्हणते – अणोरणीयान्महतो महीयान् |  (कठ. उप. १-२-२०)

असे ते स्वरूप सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आणि स्थूलापेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  संत तुकाराम महाराज म्हणतात – अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा ||

 

जे अत्यंत सूक्ष्म असते, तेच अत्यंत स्थूल असू शकते.  सर्वसाधारणपणे विश्वामध्ये आकाश हे सर्वात सूक्ष्म पंचमहाभूत मानले जाते.  चैतन्य हे आकाशपेक्षाही सूक्ष्म आणि पृथ्वीपेक्षाही अत्यंत स्थूल आहे.  चैतन्यस्वरूपामध्ये भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्य, हे सप्तलोक म्हणजेच हे सर्व ब्रह्मांड अस्तित्वामध्ये आहे.  सर्व मनुष्यादि जीव, सर्व सृष्टि, सर्व ब्रह्मांड असे हे ऊर्ध्व लोक आणि अधोलोक, मनुष्यलोक, हे सर्वच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.  त्या लोकामध्ये जे जे निवास करतात, ते सर्व देवदेवता, ब्रह्माजी, विष्णूजी, सर्व देवदेवता त्याच्यामध्येच आहेत.  नंतर मनुष्ययोनि आणि तिर्यकयोनि म्हणजेच पशुपक्ष्यादि अधोयोनि सुद्धा याच्यामध्येच आश्रित आहे.  चैतन्य हे सर्वांचे अधिष्ठान आहे.  

 

व्यष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये असणारा प्राण, मन आणि वाणी तेच चैतन्य आहे.  यामधून काय सूचित केले ?  प्राणामधून पंचप्राण – प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे सांगितले.  मन या शब्दामधून अंतःकरणचतुष्टय म्हणजेच मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे सांगितले आणि वाणी यामधून सर्व इंद्रिये – पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये सांगितली.  थोडक्यात, संपूर्ण कार्यकारणसंघात चैतन्यामध्येच आश्रित आहे.  संपूर्ण स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराला चैतन्याचीच सत्ता आहे.  चैतन्याशिवाय कोणीही कोणताही व्यवहार करू शकत नाही.  ते चैतन्य प्राणादींच्याही आत असून तेच प्राणाला किंवा सर्व इंद्रियांना सत्तास्फूर्ति प्रदान करते.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, March 10, 2020

आत्म्याची चतुष्पाद कल्पना | 4-Parts Consciousness Model




साधकाला साध्य प्राप्त करावयाचे असेल तर योग्य साधनाची आवश्यकता आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  साधनाशिवाय साध्याची प्राप्ति होत नाही.  असा न्याय आहे.  म्हणून प्रत्येक साधकाला आपल्याला काय मिळवायचे आहे, ते साध्य प्रथम स्पष्टपणे समजले पाहिजे.  तसेच, आपले इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य साधन काय आहे, हेही समजले पाहिजे.  हे साध्य व साधन सांगण्यासाठीच श्रुति येथे आत्म्याचे चार चरण सांगत आहे.  

आत्मस्वरूपाच्या चार पायांपैकी पहिले – विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन पाय उपायभूत साधन असून चवथा पाय तुरीय पाद हा उपेयभूत म्हणजेच साध्य आहे.  साधन हे साध्यानुरूपच असले पाहिजे.  म्हणुनच तीन पाद हे साधन व चतुर्थ पाद हा साध्य आत्मा अशी चतुष्पादांची कल्पना श्रुतीने केली.  म्हणून विश्व – तैजस् – प्राज्ञ हे साधन झाले व तुरीय आत्मा हा साध्य झाला.  त्यांच्यामध्ये साधन-साध्य किंवा उपाय-उपेय भाव निर्माण झाला.  

वास्तविक पाहता आत्मा हे कोणत्याही साधनांचे साध्य होऊ शकत नाही, कारण हा स्वतःच स्वयंसिद्ध आहे.  आत्मा हा आपले स्वतःचेच स्वरूप, प्रत्यगात्म स्वरूप असल्यामुळे त्याला प्राप्त करणेही शक्य नाही किंवा त्याचा त्याग करणेही शक्य नाही.  ‘मी’ ‘मी’ ला प्राप्त करू शकत नाही किंवा ‘मी’ ‘मी’ चा त्यागही करू शकत नाही.  म्हणुनच श्रुति अन्य ठिकाणी सांगते – आत्मा न हेयं न उपादेयम् इति |  ‘मी’ व ‘आत्मस्वरूप’ एकच असल्यामुळे आत्म्याचे ग्रहण किंवा आत्म्याचा त्याग होऊ शकत नाही.  

परंतु तरीही श्रुति अज्ञानी जीवांच्या दृष्टीने सांगते की – आत्मा विजिज्ञासितव्यः |  आत्मस्वरूपाचे ज्ञान घ्यावे.  आत्मप्राप्ति होणे किंवा आत्मज्ञान होणे ही सुद्धा कल्पनाच आहे.  तरीही अज्ञानी जीवांना हे सांगणे योग्य व आवश्यकच आहे.  म्हणूनच येथे श्रुतीने सांगितले की, आत्मा हा उपेय-साध्य आहे व तीन पाद हे उपेय-साधनभूत आहेत.  म्हणून श्रुतीने केलेली ही चतुष्पादाची कल्पना विरुद्ध किंवा अयोग्य नाही.  चतुष्पादाच्या कल्पनेमुळे आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकार, परिणाम होत नाही.  तर आत्मस्वरूप हे नित्य, शुद्ध, अलिप्त-अस्पर्शित-अपरिणामी, साध्य-साधनरहित, उपेय-उपायरहित, निर्विकार स्वरूपाने राहते.



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ


Tuesday, March 3, 2020

आत्म्याच्या चतुष्पादाची आवश्यकता | Need of 4-Parts Consciousness Model






श्रुतीने आत्म्यामध्ये चार पायांची कल्पना केलेली आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आत्म्यामध्ये ही अध्यस्त चतुष्पादाची कल्पना करणे आवश्यक आहे, कारण आत्मज्ञान घेणारा जिज्ञासु साधक हा अज्ञानी जीव आहे.  तो संसाराने बद्ध आहे.  यत् दृश्यं तत् सत्यम् |  जे दिसते तेच सत्य, अशी त्याच्या बुद्धीची धारणा आहे.  दृष्यालाच सत्य म्हणण्याची त्याला वर्षानुवर्षे सवय लागली आहे.  असा हा अज्ञानी मनुष्य खरे तर स्वस्वरूपाच्या दृष्टीने, तत्त्वाच्या दृष्टीने स्वतःच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे.  परंतु त्याच्या बुद्धीवर आत्मअज्ञानाचे आवरण आल्यामुळे त्याला ते स्वरूप आकलन होत नाही.  स्वस्वरूपाची विस्मृति झाल्यामुळे त्याला कधीच आत्मस्वरूपाची अनुभूति सुद्धा येत नाही, कारण ते स्वरूप ग्रहण करण्यासाठी त्याची बुद्धि योग्य, अनुकूल व अधिकारी नाही.  

बहुतांशी जीवांची बुद्धि ही बहिर्मुख असून विषयासक्त, अत्यंत स्थूल–प्राकृत–व्यावहारिक बुद्धि आहे.  विषयांचे, उपभोगांचे चिंतन करण्यातच रममाण झाली आहे.  त्यामुळे त्या बुद्धीला जे दृश्य, सगुण-साकार-सविशेष, नामरूपगुणधर्मांनी युक्त आहे, तेच सहजपणे आकलन होते.  मग अशा अज्ञानी जीवांना एकदम निर्गुण-निर्विशेष स्वरूपाचे ज्ञान ग्रहण करणे शक्य नाही.  त्यांच्यासाठी श्रुति येथे चतुष्पाद आत्म्याची कल्पना करीत आहे.  

श्रुति ही सर्व जीवांची साक्षात् माता आहे.  मातेप्रमाणेच तिला आपल्या मुलांचे हित-अहित समजते.  ही तर श्रुतिमाता आहे.  त्यामुळे ती जीवांच्या परमकल्याणाचा विचार करते.  अज्ञानी, संसारग्रस्त जीव जन्मानुजन्मे असह्य यातना भोगत असतो.  दुःखाने व्याकूळ, अस्वस्थ होतो.  त्रिविध तापांच्यामध्ये होरपळून निघतो.  अशा या भरकटलेल्या, दुःखी जीवांना परमशांतीचा, निरतिशय आनंदाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन तृप्त, परिपूर्ण व कृतकृत्य करावे, अशी श्रुतिमातेची इच्छा आहे.  त्यासाठीच ही दयाळू, कृपावंत श्रुति सर्वसामान्य अज्ञानी मनुष्याला, स्थूल-प्राकृत बुद्धीच्या मनुष्याला समजेल, अशा पद्धतीने आत्मतत्त्वाचे वर्णन करीत आहे.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


Tuesday, October 17, 2017

पूजा का करावी ? | How Worship Helps ?


आज आपल्याला सतत विश्वामधील दृश्य विषय व भोग पाहण्याचीच इंद्रियांना सवय लागलेली आहे.  त्यामुळे मन सतत विषयाभिमुख व बहिर्मुख होते.  मनामध्ये रागद्वेषादि विकार निर्माण होतात.  परंतु पूजेसारख्या साधनांनी मन क्रमाक्रमाने ईश्वराभिमुख होऊ लागते.  मनाने निदान काही काळ तरी ईश्वरचिंतन होऊ लागते.  

श्रीमद्भागवतामध्ये भगवान स्वतःच उद्धवाला मनाच्या शुद्धीसाठी पूजा व पूजेला अनुकूल असणारी अनेक कर्म व साधना यांचे वर्णन करतात.  भगवान उद्धवास मोठ्या प्रेमाने सांगतात की, उद्धवा !  भक्ताने सर्वांना माझ्या अवताराच्या – जन्माच्या व लीलांच्या कथा सांगाव्यात.  माझी जयंती वगैरे उत्सवांच्यामध्ये आनंदाने व उत्साहाने भाग घ्यावा.  गायन, नृत्य, वादन, कथा यांच्या साहाय्याने मंदिराच्यामध्ये माझे उत्सव साजरे करावेत.  वार्षिक पर्वकाळांच्यामध्ये सर्व ठिकाणी तीर्थयात्रा करून विधिपूर्वक पूजा कराव्यात.  

वेदविहित व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्याप्रमाणे मत्परायण होऊन व्रतांचे अनुष्ठान करावे.  माझ्या मूर्तिस्थापनेमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवावी.  स्वतः तसेच सर्वांनी मिळून उद्याने व माझ्या सुंदर मंदिरांचे निर्माण करावे, तसेच माझ्या मंदिरातील केर काढावा, सडा घालावा, जमीन गोमयाने सारवून घ्यावी, त्यावर सुंदर रांगोळी घालावी.  अशा प्रकारे एखाद्या दासाप्रमाणे, सेवकाप्रमाणे माझ्या गृहाची – मंदिराची निष्कपट भावाने सेवा करावी.  

ही सर्व कर्मे भक्तिभावाने करणारे भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय होतात.  अशा पूजेमध्ये मनही तल्लीन होते.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  विश्वाचे भान, विषयांचे भान संपते.  भोगासक्ति कमी होऊन विषयांबद्दल वाटणारे आकर्षण कमी-कमी व्हायला लागते.  मन त्या चैतन्यमय असणाऱ्या सगुण रूपाशी एकरूप होते.  तिथे मी व परमेश्वर इतकेच शिल्लक राहते.  कारण तिथे परमेश्वर म्हणजे केवळ एक विग्रह न राहता तो भक्तासाठी साक्षात चैतन्याचा पुतळा होतो.  ती चैतन्यस्वरूपाचीच पूजा होते.  भक्ताला समोर, बाहेर, आत सर्व ठिकाणी चैतन्यस्वरूपाचे दर्शन होते.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ