Wednesday, September 11, 2013

विघ्नहर्ता - प्रतिबंधांच्यापासून रक्षण I Protection from Barriers

अव त्वं माम् |
 
श्रीगणेशाचा उपासक सर्व संकटांच्यापासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे, कारण साधनेतील सर्व प्रतिबंध संकटांच्याप्रमाणेच असतात.  हे प्रतिबंध मनामध्ये साधनेच्या प्रतिकूल वृत्ति निर्माण करून सन्मार्गापासून परावृत्त करतात.  श्रद्धा व निष्ठा डळमळीत करतात.  त्यामुळे साधनेतील सातत्य नाहीसे होते.  म्हणून ही प्रार्थना आहे.  साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात
 
पहिला प्रतिबंधबाह्य विषय मोह निर्माण करतात.  त्यामुळे सारासार विवेक नाहीसा होऊन मनुष्यामध्ये विषयांची कामना निर्माण होते.  मन बहिर्मुख होते.  विषयाची व्याकुळता, विक्षेप निर्माण होतात.  मनाची अत्यंत तडफड होते आणि मनुष्य विषय उपभोगण्यासाठी वेडा होतो.
 
दुसरा प्रतिबंध – आपले शरीर व इंद्रिये.  इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती पुन्हा पुन्हा शरीराला अस्वस्थ करून व्याकूळ करतात.  पुन्हा पुन्हा वैषयिक उपभोगामध्ये प्रवृत्त करतात.
 
तिसरा प्रतिबंध – अनेक जन्मांच्यामध्ये मनावर झालेले विषयांचे संस्कार इतके प्रभावी असतात की, शास्त्राचे श्रवण, मनन करीत असताना, अनेक प्रसंगांच्या अनुषंगाने विषयांच्या वृत्ति पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून येतात.  मन विक्षेपयुक्त, द्वन्द्वात्मक होऊन क्षुब्ध होते.  मनाचा तोल जातो.  विवेक नाहीसा होतो.  दैवीगुणसंपत्तीचा तात्कालिक नाश झाल्यासारखा दिसतो.
 
चवथा प्रतिबंध – अहंकार मनुष्याला कधीही संपूर्ण समर्पण होऊ देत नाही.  उपासना करताना किंवा ज्ञानसाधना करताना अहंकाराची सतत जाणीव होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.
 
म्हणून तत्त्वजिज्ञासु साधक, उपासक विघ्नहर्त्या श्रीगणेशाला या सर्व प्रतिबंधांच्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे.  तसेच ज्ञाननिष्ठेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानवैराग्यप्राप्तीसाठी व अंतःकरणशुद्धीसाठी प्रार्थना करतो.

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010
 
 
 
 
- हरी ॐ

 

1 comment: