Thursday, September 12, 2013

विघ्नहर्ता - अनर्थकारी संसारापासून रक्षण I Protection from Disastrous World




श्रोतारम् | - ‘जो श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने तुझ्या स्वरूपाचे श्रवण करतो, त्या तुझ्या भक्ताचे रक्षण कर. साधकाच्या जीवनामध्ये विषयांना आणि व्यवहाराला खूप महत्व असते आणि अशा अनेक विषयांच्यामध्ये आध्यात्मिक साधनेची लुकलुकणारी इच्छा असते.  त्यामुळे सर्व व्यावहारिक कर्तव्य संपल्यानंतर श्रवणादि साधना करू असे त्याला वाटते.  तो श्रवणाला विशेष महत्व देत नाही.  यासाठी त्याला अंतरिक निश्चयाची आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे.

अनेक प्रकारचे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक संकटे आणि दु:खे एकामागून एक सतत येत असतात.  त्यांच्या प्रचंड आघातामुळे शास्त्रावरील श्रद्धा, परमेश्वरावरील निष्ठा डळमळीत होते. आत्मविश्वास उडून जातो.  जीवनात नैराश्य आणि वैफल्य येते. साधनेमध्ये उत्साह राहत नाही. मनाची एकाग्रता भंग पावते.  अशा वेळी मनुष्य नास्तिकवादाकडे झुकण्याची शक्यता असते.  अशा भक्तांचे मानसिक नैराश्यातून, वैफाल्यामधून रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे रक्षण म्हणजेच संकटकाळामध्ये दु:खांच्या आघातामध्ये ज्यावेळी साधक एकाकी पडेल, त्यावेळी त्याच्या श्रद्धेचे रक्षण झाले पाहिजे.  त्याचा आत्मविश्वास आणि धैर्य न खचता, जिद्दीने आणि धैर्याने, निराश न होता दु:खाच्या प्रसंगाला तोंड देण्याची अंतरिक शक्ति असणे आवश्यक आहे.  म्हणून जीवनामध्ये श्रद्धा ही अशी शक्ति आहे की, ती साधकामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य ढळू न देता उत्साहाने, प्रखर, दुर्दम्य आत्मविश्वासाने साधनेमध्ये, जीवनामध्ये पुढे नेते आणि सतत प्रेरणा देते.

सर्व श्रोत्यांचे रक्षण म्हणजे अशुभ आणि अनर्थकारी संसारापासून रक्षण होय.  हे गणपते !  तूच त्यांना आत्मस्वरूपाचे पारमार्थिक ज्ञान देऊन अनादिअविद्येचा ध्वंस करून मोक्ष प्रदान कर.  तू भक्तांना तुझ्या स्वरूपाप्रमाणे बनव.  थोडक्यात तुझ्या भक्तांना पूर्ण कर, तुप्त कर.  हेच त्यांचे रक्षण आहे.
 

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ
 

1 comment: