Tuesday, September 24, 2013

दैन्य भाव | The Attitude of Destitution



धर्मपारायण जीवन जगत असताना संतांच्या जीवनामध्येही अनेक चांगले-वाईट प्रसंग येतात.  प्रतिकूल - वाईट प्रसंगांच्यामध्ये संकटांच्यामध्येच साधकामधील दैवीगुणांची, श्रद्धेची परीक्षा होते.  चांगली परिस्थिति असताना ईश्वरावर कोणीही श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा संकटे येतात, तेव्हा मनुष्य अधिक व्याकूळ व अगतिक होतो.  त्याच्या मनामध्ये दीनतेचा, शरणागतीचा भाव निर्माण होऊन तो भगवंताला अनन्य भावाने प्रार्थना करतो.  त्यावेळी तो भगवंताच्या अधिक जवळ जातो.  

परमेश्वराविषयी असा भाव सहजासहजी निर्माण होत नाही.  वर्षानुवर्षे जप, तप, श्रवण करूनही मनामध्ये ईश्वराविषयी उत्कट भक्ति अनुभवायला येत नाही.  व्याकुळता निर्माण होत नाही.

याचे कारण एकच !  आणि ते म्हणजे आजपर्यंत जरी आपण श्रद्धावान असू, साधना करीत असू, सदाचाराचे जीवन जगत असू, तरीही अन्तःकरणामध्ये कर्तृत्वबुद्धि, अहंकार, अभिमान असतो व जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत भगवत्प्राप्ति अशक्य आहे, कारण भगवान नारदमहर्षि म्हणतात – दैन्यप्रियत्वात् अभिमानद्वेषित्वात् |    (नारदभक्तिसूत्र)

परमेश्वरला भक्तामधील दैन्यभाव म्हणजे समर्पण भाव प्रिय आहे.  परमेश्वर भक्तामधील अभिमानाचा तिरस्कार करतो.  दैन्यभाव याचा अर्थ दुबळेपणा नव्हे.  तर दैन्यभाव म्हणजेच परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणे होय.  स्वतःच्या कर्तृत्वाच्या मर्यादा बुद्धीला समजल्या की, आपोआपच मनुष्य परमेश्वरासमोर नतमस्तक होतो.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ
 

No comments:

Post a Comment