Showing posts with label Blessing. Show all posts
Showing posts with label Blessing. Show all posts

Tuesday, June 11, 2019

गुरुकृपा अपरिहार्य आहे | Guru’s Blessing is Indispensible




आत्मस्वरूपाचा बोध करणे म्हणजे केवळ प्रवचन देणे नव्हे.  प्रोफेसर भरपूर आहेत.  प्रवचनकार भरपूर आहेत.  परंतु आत्मस्वरूप शिष्याच्या अंतःकरणात प्रकट करणे अत्यंत कठीण आहे.  म्हणून ज्ञान देणे म्हणजे शिकविणे किंवा प्रचार करणे नसून ते श्रोत्यांच्या हृदयामध्ये प्रकट करणे होय.  जसे, एखाद्या गुलाबाच्या कळीला सूर्यकिरणाचा स्पर्श होऊन ते हळूवारपणे उमलते व क्रमाने पूर्ण विकसित होते.  तसेच हे आत्मज्ञान अन्तःकरणात प्रकट झाले पाहिजे.  

शिष्याने उपदेश व उपदेशग्रहण यामध्ये अत्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  कारण साधक अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी, विश्व, परमेश्वर, आत्मा, गुरु, शास्त्र, साधना या सर्वांच्याविषयी अनंत कल्पना निर्माण करून मनामध्ये कल्पनांचे जंजाळ करतो.  तसेच, अध्यात्मशास्त्रावरील अनेक पुस्तके गोळा करून त्यांचा तौलनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो.  वेगवेगळ्या महाराजांकडे जाऊन भिन्न-भिन्न साधना करतो.  थोड्या काळात अनुभव आला नाही तर महाराज बदलतो.  अशा शिष्याला आत्मबोध करणे खरोखरच अत्यंत अवघड आहे.  

काही साधक स्वविचाराने, स्वबुद्धीने आत्मानुभव करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधक टी. व्ही. वर पाहून, काही इंटरनेटवरून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.  काही साधकांना मोबाईल फोनवरून आत्मज्ञान हवे असते.  ही सर्व साधने अत्यंत प्रगत असतील व एकविसाव्या शतकात नव्हे, आणखी कोणत्या युगात जरी मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी उपनिषदांच्यामध्ये श्रुतीने आदेश दिलेला आहे –
तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् |    (मुण्ड. उप. १-२-१२)

आत्मतत्त्वाचे यथार्थ व सम्यक् ज्ञान प्राप्त करण्यासाठी जिज्ञासु साधकाने हातामध्ये समिधा घेऊन, सर्वसंगपरित्याग करून म्हणजेच मन विषयासक्तरहित करून त्याने श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच शरण जावे.  गुरूंना अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय गुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे शक्य नाही आणि गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ज्ञानाची प्राप्ति होणे शक्य नाही.  केवळ विद्वत्ता, बुद्धि व तर्काच्या जोरावर ज्ञाननिष्ठा मिळत नाही.  या मार्गात गुरुकृपेशिवाय पर्याय नाही.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


Monday, September 16, 2013

श्रीगणेश – मोह पाशांपासून मुक्ति I Shree Ganesh – Reliever from Bondages



आसक्ति मनुष्याला बद्ध करते.  हा मोहरूपी पाश आहे.  या मोहरूपी पाशामुळे विवेकबुद्धि भ्रष्ट होऊन मनुष्य अविवेकी होतो आणि अनेक प्रकारच्या मोहांना बळी पडतो.  भक्तांच्या या मोहरूपी पशांचा नाश करण्यासाठी श्रीगणेशाने हातात पाश धारण केलेला आहे.

विषयभोगतृष्णारूपी मोह तसेच स्रक्चंदनवनितादि यांनी निर्देशित केलेला मानसन्मान यश, कीर्ति, प्रतिष्ठा वगैरेंचा मोह, शारीरिक आणि इंद्रियोपभोग, सत्तेचा, धनाचा आणि स्त्रीचा या सर्व मोहांचा श्रीगणेश नाश करतो.

त्या भक्ताचे लक्ष पूर्ण विषयासक्त असते ते परमेश्वराकडे वळवितो.  त्याच्या मनात आस्तिक्य बुद्धि निर्माण करून परमेश्वराच्या पूजन, भजन, कीर्तनामध्ये प्रीति निर्माण करतो.  त्यामुळे तो परमेश्वराच्या कर्मानुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो.  याचा परिणाम म्हणजे त्याची परमेश्वरामध्ये अधिक श्रद्धा, निष्ठा निर्माण होते.  त्यामाधुनच ईश्वराविषयीची तळमळ तीव्र होते.  त्याचे मन सहजपणे भजनपूजानामध्ये एकाग्र होते.  तन्मय होते.  म्हणजेच विषयांच्यामधून निवृत्त होऊन अंतर्मुख होतो.  त्यामध्ये त्याला खूप आनंद व समाधान मिळते.

परमेश्वराच्या कृपेने त्याच्या मनात सत्संगाची इच्छा निर्माण होते.  सत्संगाच्या दृढ संस्कारामुळे आणि आचार्यांनी केलेल्या शास्त्रोपदेशामुळे विचारप्रवृत्त होऊन विषयदोषदर्शनामुळे विषयांचे खरे स्वरूप – अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं आणि मिथ्यात्वं – समजते.

श्रीगणेश अज्ञानी जीवांच्याप्रमाणे पाशाने बद्ध नसून तो मुक्त आहे.  यामुळेच तो भक्तांचा पाश नष्ट करणारा आहे.  बंधनातून मुक्त करणारा आहे.  म्हणून गणपतिसहस्त्रनामात ‘पाशविमोचक’ असे गणपतीस संबोधिले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

Friday, September 13, 2013

श्रीगणेश – विश्व तुझी प्रचीती I World is your Manifestation



सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति |
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |

नानाविध रूपांनी प्रचीतीला येणारे, सावयव, देशकालवस्तूने परिच्छिन्न असलेले, विकारयुक्त, अनित्य विश्व परब्रम्हस्वरूप गणेशामधून निर्माण झाले, त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये लय पावते.  हे गणपते ! तूच हे विश्वस्वरूप असल्यामुळे तुझ्या स्वरूपामध्येच विश्वाची प्रचीति येते.

ज्याप्रमाणे लाटा – तरंग – बुडबुडे वगैरे पाण्यातुनच निर्माण झाले असल्यामुळे पाण्यातच अस्तित्वात आहेत.  त्यामुळे स्थितिकाळामध्ये त्यांची प्रचीति पाण्यामध्येच येते.  एवढेच नव्हे तर पाण्याशिवाय तरंगबुडबुडयांचा अनुभवच येत नाही.  म्हणून जेथे जेथे तरंगांचा अनुभव येतो तेथे तेथे पाण्याचा अनुभव येतो, कारण पाणी हे तरंगांचे अधिष्ठान आहे.  त्यामुळे तरंगबुडबुडयाच्या रूपाने पाण्याचीच प्रचीति येते किंवा अलंकारांच्या रूपाने सोन्याची प्रचीति येते.

त्याचप्रमाणे हे गणपते, तूच मायेच्या साहाय्याने नानाविध रुपाला प्राप्त होऊन, ब्रह्म होऊन, द्रष्टा आणि दृश्य रूपाने प्रचीतीला येतोस.  म्हणून तूच विश्वात्मक झालेला विराटस्वरूप आहेस.

भक्तांच्यावर कृपा आणि अनुग्रह करण्यासाठी तू सगुण, साकार रुपाला प्राप्त होतोस.  म्हणून हे सर्व विश्व तुझी विभूति किंवा महिमा आहे.  त्यामुळे माझे म्हणण्यासारखे या विश्वात काहीच नाही.  सर्व तुझे आहे.  इतकेच नवे तर हे शरीर सुद्धा माझे नाही.  ते तुझेच रूप आहे.  प्रत्येक ठिकाणी तुझीच प्रचीति येते.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ