Showing posts with label Soul. Show all posts
Showing posts with label Soul. Show all posts

Tuesday, July 29, 2014

ध्यान, मन आणि आत्मा | Meditation, Mind & Soul



ध्यान’ हे आत्म्याचे स्वरूप किंवा अवस्था नसून ‘ध्यान’ ही मनाची अवस्था आहे.  ‘ध्यान’ ही पूर्णतः मानसिक प्रक्रिया आहे.  जशी चंचलता ही मनाची अवस्था आहे, तशीच ध्यानावस्थाही मनाचीच अवस्था आहे.  आत्म्याला कोणतेही ध्यान करण्याची आवश्यकता नाही.  अज्ञानी लोक ज्ञानी पुरुषांना, संतांना प्रश्न विचारतात – “ तुमची ध्यानाची वेळ काय ? तुम्ही कसे व कोणाचे ध्यान करता ? ”

ध्यानावस्था हीदेखील आत्म्यामध्ये कल्पित अवस्था आहे.  मन संकल्पमात्राने विषयापर्यंत जाते.  संकल्पाला सुरुवात व शेवट आहे.  संकल्प म्हणजेच वृत्ति होय.  प्रत्येक वृत्ति मनामध्ये निर्माण होते, क्षणमात्र टिकते आणि लय पावते.  वृत्ति येतात आणि जातात, मन कोठेही येत किंवा जात नाही.  परंतु मला मात्र मनच बाहेर जाताना भासते आणि या अशा या मनाचे आत्मा जणु काही अनुसरण करतो. म्हणजेच तादात्म्य अध्यासाने मनाच्या उपाधीशी तादात्म्य पावतो.

यामुळेच आत्माही गतिमान झाल्यासारखा भासतो.  आत्मा बाहेर जातो, विषयांना व्याप्त करतो, तसेच आत्मा हा मनापेक्षाही गतिमान आहे.  क्रमाने पाहिले तर स्थूल शरीरापेक्षा मन गतिमान आहे आणि मनापेक्षाही आत्मा गतिमान आहे.  माझ्या शरीराच्या पुढे पुढे माझे मन धावत असते.  परंतु मन ज्यावेळी एखाद्या विषयपर्यंत पोहोचते, त्यावेळी त्या मनालाच जाणीव होते की, माझ्यापूर्वीच येथे आत्मचैतन्य जाऊन पोहोचले आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, July 15, 2014

मन आणि आत्मा - अध्यास | Mind & Soul - Imputation




मन आणि आत्मा यांमध्ये प्रथम संसर्गअध्यास होतो.  म्हणजेच मन हे आत्म्याच्या अत्यंत नजीक, समीप असल्यामुळे कळत-नकळत एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर आरोपित होतात.

शास्त्रातील दृष्टांत -
तप्तायः पिण्डवत् इति |

लोखंडाचा गोळा आणि अग्नि हे एकमेकांच्या संपर्कात आणले तर त्यांच्यामध्ये प्रथम संसर्ग अध्यास होतो म्हणजेच लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नीचे धर्म यायला लागतात आणि अग्नीमध्ये लोखंडाच्या गोळ्याचे गुणधर्म येऊ लागतात आणि नंतर त्यांच्यात तादात्म्यअध्यास होतो.  म्हणजेच लोखंडाचा गोळा आणि अग्नि दोन भिन्न न राहता त्यांच्यामध्ये बेमालूम तादात्म्य होते आणि आपण वाक्यप्रयोग करतो – तप्त लालबुंद लोखंडाचा गोळा.

याप्रमाणेच मन आणि आत्मा यांच्यात संसर्ग अध्यास झाल्यामुळे मनामध्ये आत्म्याचे चेतनत्वादि गुणधर्म येतात आणि आत्म्यामध्ये मनाचे सुख-दुःखादि, शोकमोहदि, सत्वरजतमोगुणादि असे अनेक विकार येतात.  त्यामुळे नकळत तादात्म्य अध्यास होऊन मला मनच चेतनमय भासते आणि मी स्वतः अंतःकरण उपाधीशी इतका तादात्म्य पावतो की, मीच सुखी, दुःखी, संसारी, बिचारा, मर्त्य होतो.  मीच विक्षेपयुक्त, अस्थिर, अस्वस्थ, चंचल होतो.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, June 17, 2014

आत्म्याचा नाश होतो का ? | Can “Soul” be Destroyed ?


विश्व हे ब्रह्माचे कार्य होऊ शकत नाही, कारण निर्गुण, निराकार, निर्विकार ब्रह्म सगुण, साकार, विकारयुक्त विश्वाला कधीही निर्माण करू शकत नाही. विश्व हे ब्रह्मामध्ये अज्ञानाने निर्माण केलेला भास आहे. त्यामुळे ब्रह्म आणि विश्व किंवा शरीर यांच्यामध्ये कार्य-कारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे.

शास्त्रामध्ये रज्जु आणि सर्पाची उपमा प्रचलित आहे. अंधारामुळे रज्जुमध्ये सर्पाचा भास होतो. रज्जु हे सर्पाचे कारण असेल तर सर्पाचा नाश केला की, रज्जुचाही नाश होईल. परंतु वास्तविक स्वरूपाने रज्जूने सर्प कधीच निर्माण केलेला नाही. त्यामुळे रज्जूसर्पामध्ये तंतूपटाप्रमाणे कार्यकारणाचा संबंध कधीच निर्माण होत नाही.

मग रज्जूमधून सर्पाची निर्मिती का झाली ? तर सर्प हा रज्जूच्या अज्ञानामधून निर्माण झालेला असल्यामुळे तो अज्ञानकल्पित आहे. तो रज्जूमध्ये झालेला भास आहे. त्यामुळे रज्जु आणि सर्पामध्ये कार्यकारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे. सर्प हा कल्पित असून रज्जु हे अधिष्ठान आहे. कल्पित वस्तूने अधिष्ठान कधीही स्पर्शित होत नाही. त्याच्यात कोणताही परिणाम होत नाही. या न्यायानुसार सर्प निर्माण झाला किंवा नाश झाला तरीही रज्जूमध्ये कोणताही विकार होत नाही.

म्हणून विश्वाचा, शरीराचा नाश केला की, ब्रह्माचा नाश होत नाही. नाश फक्त सावयव वस्तूचा होतो. त्याप्रमाणे विश्वाचा किंवा शरीराचा नाश शक्य आहे. परंतु आत्मा – ब्रह्म निरवयव असल्यामुळे तो हननक्रियेचा विषय होऊ शकत नाही. म्हणून त्याचा नाश शक्य नाही. इतकेच नव्हे तर, परमेश्वर सुद्धा नाश करू शकत नाही.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ