Tuesday, July 15, 2014

मन आणि आत्मा - अध्यास | Mind & Soul - Imputation




मन आणि आत्मा यांमध्ये प्रथम संसर्गअध्यास होतो.  म्हणजेच मन हे आत्म्याच्या अत्यंत नजीक, समीप असल्यामुळे कळत-नकळत एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर आरोपित होतात.

शास्त्रातील दृष्टांत -
तप्तायः पिण्डवत् इति |

लोखंडाचा गोळा आणि अग्नि हे एकमेकांच्या संपर्कात आणले तर त्यांच्यामध्ये प्रथम संसर्ग अध्यास होतो म्हणजेच लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नीचे धर्म यायला लागतात आणि अग्नीमध्ये लोखंडाच्या गोळ्याचे गुणधर्म येऊ लागतात आणि नंतर त्यांच्यात तादात्म्यअध्यास होतो.  म्हणजेच लोखंडाचा गोळा आणि अग्नि दोन भिन्न न राहता त्यांच्यामध्ये बेमालूम तादात्म्य होते आणि आपण वाक्यप्रयोग करतो – तप्त लालबुंद लोखंडाचा गोळा.

याप्रमाणेच मन आणि आत्मा यांच्यात संसर्ग अध्यास झाल्यामुळे मनामध्ये आत्म्याचे चेतनत्वादि गुणधर्म येतात आणि आत्म्यामध्ये मनाचे सुख-दुःखादि, शोकमोहदि, सत्वरजतमोगुणादि असे अनेक विकार येतात.  त्यामुळे नकळत तादात्म्य अध्यास होऊन मला मनच चेतनमय भासते आणि मी स्वतः अंतःकरण उपाधीशी इतका तादात्म्य पावतो की, मीच सुखी, दुःखी, संसारी, बिचारा, मर्त्य होतो.  मीच विक्षेपयुक्त, अस्थिर, अस्वस्थ, चंचल होतो.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

No comments:

Post a Comment