Tuesday, June 17, 2014

आत्म्याचा नाश होतो का ? | Can “Soul” be Destroyed ?


विश्व हे ब्रह्माचे कार्य होऊ शकत नाही, कारण निर्गुण, निराकार, निर्विकार ब्रह्म सगुण, साकार, विकारयुक्त विश्वाला कधीही निर्माण करू शकत नाही. विश्व हे ब्रह्मामध्ये अज्ञानाने निर्माण केलेला भास आहे. त्यामुळे ब्रह्म आणि विश्व किंवा शरीर यांच्यामध्ये कार्य-कारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे.

शास्त्रामध्ये रज्जु आणि सर्पाची उपमा प्रचलित आहे. अंधारामुळे रज्जुमध्ये सर्पाचा भास होतो. रज्जु हे सर्पाचे कारण असेल तर सर्पाचा नाश केला की, रज्जुचाही नाश होईल. परंतु वास्तविक स्वरूपाने रज्जूने सर्प कधीच निर्माण केलेला नाही. त्यामुळे रज्जूसर्पामध्ये तंतूपटाप्रमाणे कार्यकारणाचा संबंध कधीच निर्माण होत नाही.

मग रज्जूमधून सर्पाची निर्मिती का झाली ? तर सर्प हा रज्जूच्या अज्ञानामधून निर्माण झालेला असल्यामुळे तो अज्ञानकल्पित आहे. तो रज्जूमध्ये झालेला भास आहे. त्यामुळे रज्जु आणि सर्पामध्ये कार्यकारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे. सर्प हा कल्पित असून रज्जु हे अधिष्ठान आहे. कल्पित वस्तूने अधिष्ठान कधीही स्पर्शित होत नाही. त्याच्यात कोणताही परिणाम होत नाही. या न्यायानुसार सर्प निर्माण झाला किंवा नाश झाला तरीही रज्जूमध्ये कोणताही विकार होत नाही.

म्हणून विश्वाचा, शरीराचा नाश केला की, ब्रह्माचा नाश होत नाही. नाश फक्त सावयव वस्तूचा होतो. त्याप्रमाणे विश्वाचा किंवा शरीराचा नाश शक्य आहे. परंतु आत्मा – ब्रह्म निरवयव असल्यामुळे तो हननक्रियेचा विषय होऊ शकत नाही. म्हणून त्याचा नाश शक्य नाही. इतकेच नव्हे तर, परमेश्वर सुद्धा नाश करू शकत नाही.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment