Tuesday, July 29, 2014

ध्यान, मन आणि आत्मा | Meditation, Mind & Soul



ध्यान’ हे आत्म्याचे स्वरूप किंवा अवस्था नसून ‘ध्यान’ ही मनाची अवस्था आहे.  ‘ध्यान’ ही पूर्णतः मानसिक प्रक्रिया आहे.  जशी चंचलता ही मनाची अवस्था आहे, तशीच ध्यानावस्थाही मनाचीच अवस्था आहे.  आत्म्याला कोणतेही ध्यान करण्याची आवश्यकता नाही.  अज्ञानी लोक ज्ञानी पुरुषांना, संतांना प्रश्न विचारतात – “ तुमची ध्यानाची वेळ काय ? तुम्ही कसे व कोणाचे ध्यान करता ? ”

ध्यानावस्था हीदेखील आत्म्यामध्ये कल्पित अवस्था आहे.  मन संकल्पमात्राने विषयापर्यंत जाते.  संकल्पाला सुरुवात व शेवट आहे.  संकल्प म्हणजेच वृत्ति होय.  प्रत्येक वृत्ति मनामध्ये निर्माण होते, क्षणमात्र टिकते आणि लय पावते.  वृत्ति येतात आणि जातात, मन कोठेही येत किंवा जात नाही.  परंतु मला मात्र मनच बाहेर जाताना भासते आणि या अशा या मनाचे आत्मा जणु काही अनुसरण करतो. म्हणजेच तादात्म्य अध्यासाने मनाच्या उपाधीशी तादात्म्य पावतो.

यामुळेच आत्माही गतिमान झाल्यासारखा भासतो.  आत्मा बाहेर जातो, विषयांना व्याप्त करतो, तसेच आत्मा हा मनापेक्षाही गतिमान आहे.  क्रमाने पाहिले तर स्थूल शरीरापेक्षा मन गतिमान आहे आणि मनापेक्षाही आत्मा गतिमान आहे.  माझ्या शरीराच्या पुढे पुढे माझे मन धावत असते.  परंतु मन ज्यावेळी एखाद्या विषयपर्यंत पोहोचते, त्यावेळी त्या मनालाच जाणीव होते की, माझ्यापूर्वीच येथे आत्मचैतन्य जाऊन पोहोचले आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment