Showing posts with label Sadhana. Show all posts
Showing posts with label Sadhana. Show all posts

Tuesday, September 12, 2023

मौन साधना | The Practice of Silence

 



शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी असणारी मौनसाधना सांगितली जाते.  भगवान श्रीरमणमहर्षींनी वर्षानुवर्षे मौन साधना केली, आत्मपरीक्षण केले.  जीवनभर साधकांना मौनाचाच उपदेश केला.  मौन याचा अर्थ केवळ न बोलणे नव्हे.  कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकारचे मौन आहे.  व्यवहारामध्ये आपण खरोखरच जे बोलायला पाहिजे, ते कधीच बोलत नाही आणि जे कधीही बोलायला नको, तेच बोलतो.  साधकाचे आणखी एक महत्वाचे ब्रीद आहे आणि ते म्हणजे जीवनामध्ये कोणावरही comments करू नयेत.  दुसऱ्याचे चारित्र्यहनन करू नये.

 

भगवान वाचिक तपस् सांगतात – अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |       (गीता अ. १७-२५)

साधकाने दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक वचन बोलावे.  जे जे आपण अध्ययन करतो, जे जे मी श्रवण करतो, त्यावरच बोलावे.  व्यवहारामध्ये आपण अन्य विषय, व्यक्ति, प्रसंग, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार याबद्दलच अधिक बोलतो.  व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांशी जितके बोलाल, एकमेकांच्या जवळ याल, दुर्दैवाने बोलता-बोलता एकमेकांच्यामधील राग आणि द्वेष उफाळून बाहेर पडतात.  मनुष्य विकारांच्या आहारी जातो.  साधकाचे मन विक्षिप्त, कलुषित होते.

 

तसेच, साधकाच्या दृष्टीने पाहिले तर या सर्व चर्चांचा, त्याला साधनेमध्ये काहीही उपयोग होत नाही.  उलट प्रतिबंधच होतो.  म्हणजे त्याचे मन अधिकाधिक बहिर्मुख, विषयाभिमुख होते.  म्हणूनच श्रुतीने याठिकाणी साधना सांगितलेली आहे की – अन्या वाचा विमुञ्चथ |  हे शिष्या !  तू अन्य वाचेचा त्याग कर आणि मौनाचा अभ्यास कर.  जितके कमी बोलता येईल, तितके कमी बोलावे.  हा अभ्यास करावा.  असा मौनाचा जर अभ्यास केला, तर मन शांत, अंतर्मुख होऊन तेच मन या साधनेसाठी योग्य, अनुकूल आणि अधिकारी होऊ शकते.  अन्य लोक, विश्व, व्यक्ति, प्रसंग याविषयी बोलण्यापेक्षा साधकाने आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, April 25, 2023

बहिरंग-अंतरंग साधना – पूरकता | External-Internal Sadhana - Complementary

 




वस्तुसिद्धि विचारेण न किंचित् कर्मकोटीभिः |

पाकस्य वन्हिवत् ज्ञानं विना मोक्षो न सिध्यति ||               (विवेकचूडामणि)

आत्मवस्तूची प्राप्ति केवळ आत्मविचारानेच होते.  कोट्यवधी कर्मे करूनही आत्मप्राप्ति होत नाही.  जसे अग्नीशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही, तसे ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ति होणे केवळ अशक्य आहे.  म्हणूनच भगवान म्हणतात –

नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्यया |

शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ||                      (गीता. अ. ११-५३)

हे अर्जुना !  केवळ वेदाध्ययन, तपश्चर्या, दानयज्ञादि कर्मे, यांच्या साहाय्याने माझे दर्शन शक्य नाही.  

 

या सर्व श्रुतिस्मृतींच्यावरून सिद्ध होते की, ज्ञान हेच मोक्षाचे साक्षात साधन आहे.  त्यामुळे बहिरंगाने केवळ गंगासागरावर गेलो, मोठमोठ्या तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली, दानधर्म केला तरीही अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीशिवाय हे सर्व व्यर्थ आहे.  या सर्व साधना केवळ चित्ताच्या शुद्धीसाठी व एकाग्रतेसाठी सांगितलेल्या आहेत.  त्यामुळे साधकाने या सर्व बहिरंग साधना तर केल्याच पाहिजेत.  यांच्या साहाय्याने चित्त शुद्ध झाले, अंतरंग एकाग्र झाले की, मगच आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंना अनन्यभावाने शरण जावे.  त्यानंतरच श्रवणादि ज्ञानसाधना म्हणजेच अंतरंग साधना करावी.  तपादि बहिरंग साधना ही अंतरंग साधनेला पूरक व साहाय्यकारी साधना आहे.  म्हणून आचार्यांनी या साधनेचा इथे निषेध केलेला नाही किंवा साधकाने दानव्रतादि साधना करूच नये, असे कुठेही सांगितलेले नाही.  मात्र केवळ दानव्रतादि साधना साधकाला मोक्ष देऊ शकत नाहीत.

 

अद्वैत ज्ञानाशिवाय केवळ व्यावहारिक अन्य कार्मांप्रमाणेच या सर्व साधना साधक वर्षानुवर्षे यंत्रवत करीत राहिला, परंतु त्यामध्ये भक्तिभाव निर्माण झाला नाही, क्रमाने चित्तशुद्धि, स्थिर होऊन चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय झाला नाही तर शेकडो जन्मही मुक्ति मिळू शकत नाही.  म्हणूनच आचार्य इथे आदेश देतात – भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |  हे मनुष्या !  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तू गोविंदाला म्हणजेच गुरूंना अनन्य भक्तिभावाने शरण जा.  त्यांच्या चरणांशी बसूनच हे गुह्य ज्ञान प्राप्त करून घे.  हाच तुझा पुरुषार्थ आहे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ



Tuesday, January 31, 2023

बहिरंग आणि अंतरंग साधना | External & Internal Practice

 



सर्व साधनांचे प्रामुख्याने बहिरंग साधना व अंतरंग साधना असे दोन प्रकार पडतात.  यापैकी बहिरंग साधना ही मनावर केंद्रीभूत असून अंतरंग साधना आत्मस्वरूपावर केंद्रीभूत आहे.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रथम मनावर केंद्रीभूत असणारी बहिरंग साधना करणे आवश्यक आहे.  मनामध्ये स्वभावतःच मल, विक्षेप व आवरण असे तीन प्रकारचे दोष आहेत.  मल म्हणजेच रागद्वेषादि अशुद्धता होय.  विक्षेप म्हणजेच मनाची चंचलता किंवा अस्थिरता होय.

 

आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने आपल्या मनालाच अनुकूल करून घेतले पाहिजे.  याचे कारण आपले मन हेच आत्मज्ञानप्राप्तीचे साधन व स्थान आहे.  आत्मज्ञानप्राप्तीचे साधन शरीर नाही.  इंद्रिये नाहीत.  तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनामध्येच आत्मशांति अनुभवायची आहे.  यामुळे निरतिशय शांति व पूर्ण तृप्ति अनुभवायची असेल तर आपले मन निदान काही प्रमाणात तरी शांत व प्रसन्न असले पाहिजे.  यासाठीच मल व विक्षेप हे दोष कमी होऊन चित्ताची शुद्धता व स्थिरता प्राप्त केली पाहिजे.  यासाठीच शास्त्रामध्ये ज्या ज्या साधना सांगितल्या जातात त्यांना बहिरंग साधना असे म्हणतात.  या चित्ताच्या शुद्धीसाठी व एकाग्रतेसाठीच सांगितल्या जातात.  रजोगुण व तमोगुण यांचे विकार कमी करून सत्त्वगुणाचा उत्कर्ष करणे हेच सर्व साधनांचे प्रयोजन आहे.

 

सर्व दृश्य अनुभवयोग्य आहे.  Entire creation is an object of my knowledge.  मी मात्र या सगळ्याचा द्रष्टा व ज्ञाता आहे.  म्हणून मी subject आहे व हे संपूर्ण विश्व object आहे.  सर्वसामान्यतेने आपण जीवनभर, नव्हे जन्मानुजन्मे object चेच ज्ञान घेतो.  परंतु मला subject चे म्हणजेच ‘मी’ चे अज्ञान आहे.  मी कोण ?  हे मला माहीत नाही.  म्हणून या subject चे, ‘मी’ चे म्हणजेच स्वरूपाचे ज्ञान होणे हेच प्रत्येक मनुष्याचे खरे कर्तव्य आहे.

 

परमेश्वर आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सन्निविष्ट आहे.  परंतु अंतःकरणामध्ये अज्ञानरूपी अंधाराचे आवरण असल्याने परमेश्वर असूनही दिसत नाही, आपल्याला अनुभवायला येत नाही.  म्हणून आनंदस्वरूप परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आत्मज्ञानरूपी प्रकाश उदयाला आला पाहिजे.  त्यासाठी आत्मज्ञानाचीच नितांत आवश्यकता आहे.  हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेलाच अंतरंग साधना असे म्हणतात.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ




Tuesday, October 15, 2013

ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ? | Who should search the Supreme?

 
विषयांची जिज्ञासा निर्माण करून त्यांची प्राप्ति करणे, हे मनुष्याचे परम कर्तव्य नाही.  उलट प्रत्येकाने आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करावी व आत्माच जाणावा.
 
ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ?  अशा साधकाने, अशा गुणविशिष्ट जिज्ञासूने आत्मेच्छा किंवा ब्रह्मजिज्ञासा करावी –
 
१. ‘अस्मिन् जन्मनि वा परजन्मनि’, या जन्मात किंवा मागील अनेक जन्मात सेवावृत्तीने, ईश्वरार्पण बुद्धीने, निष्काम कर्मयोग करून अंतःकरण शुद्ध केले आहे;
२. विषयांच्या सर्व मर्यादा समजावून घेऊन विषयांचे वैराग्य प्राप्त केले आहे;
३. ऐहिक व पारलौकिक भोगप्राप्तीची इच्छा पूर्णपणे गळून पडली आहे;
४. अशी ही विवेकयुक्त वैराग्याची अंतःकरणाची अवस्था प्राप्त झाली आहे;
 
परंतु “ मला काहीही नको ” ही भावना एखाद्या निराश, हताश झालेल्या मनुष्याच्या मनातही असू शकेल.  मानसिक धक्का, संकट किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू यामुळे त्याला वैफल्यातून “ मला काही नको ” असे वाटेल.  पण ते वैराग्य तात्कालिक असते.  त्यात विवेकाचा पूर्ण अभाव असतो.
 
व्यक्ति त्यावेळी भावनावश झालेली असते.  त्यामुळे ते खरे वैराग्य नव्हे.  अशा मनाने त्याला शास्त्राचे आकलन होणार नाही, कारण त्याची ती जिज्ञासु मनाची अवस्था नाही.  नैराश्याने ग्रासलेली व्यक्ति जिज्ञासु होऊ शकत नाही.
 
विवेकयुक्त वैराग्याने हळुहळू दीर्घ कालावधीनंतरच जिज्ञासूला कायमस्वरूपाची मनाची परिपक्वता येते.  त्यामुळे त्या जिज्ञासूला “ पुढे काय ” ही उत्सुकता सतत असते.  या जिज्ञासु साधकाने ऐहिक किंवा पारलौकिकाची इच्छा न करता केवळ आत्मेछाच करावी.
 
 "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
 
 
- हरी ॐ
 

Saturday, June 15, 2013

Inner Peace through Meditation



शांति - Peace or silence is not one of the objects of the world. Mind has to discover the silence within oneself.  Silence is not like any other object in the world, but it is a state of relaxation of the mind wherein it is free from agitations, conflicts and all types of stress and strain.  The means to attain that silence is neither external objects nor pleasures.  It is at mental level, not at the physical level.  With the help of the mind alone we have to discover that silence within ourselves.

An example that can be cited here is of an ocean.  We see lots of lashing waves on the surface.  They appear one after the other and disappear - creating disturbance on the surface.  If we go deep down in the ocean, we find there is no disturbance at all.  There is only an undisturbed stillness.  So, the superficial disturbance of the waves is only on the surface and there is quietude and stillness at the bottom.

Similarly, we have continuous projections of thoughts that create conflicts and tossing of mind at the superficial level.  They are like lashing waves – they appear, exist and disappear.  They create lot of disturbance in the mind.  Since we live at this level of the mind, we are tossed by these thoughts and become restless all the time.  There is not a single moment when we are free from tossing and agitations.

But if we go deep down in the mind, with the help of the mind, then all superficial projections, conflicts and agitations are resolved.  There we find, slowly, growing relaxation within ourselves.  Hence, the purpose of meditation is to discover that silence or quietude within oneself.





- Reference: "Meditation" CD by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati



A residential course “Meditation and Tension free life” will be organized on 29and 30th June 2013 at Shrutisagar Ashram. It is a 2 days course in English by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati. It is especially designed for busy working and business professionals or anybody with stressful work and life. Unlike many modified meditation techniques, the purest and the most original form of Meditation and Pranayam based on Vedic tradition is being offered. Shrutisagar Ashram is 26 kms from Pune Station in picturesque location on the banks of Bhima, Bhama and Indrayani. Brochure and registration form for this course are available on the ashram website http://www.ShrutisagarAshram.org, or you can click on these links:

Meditation Course Brochure
Meditation Course Registration Form

-हरी ॐ

Tuesday, April 2, 2013

जगद्गुरूचा खरा अर्थ (Real meaning of the Supreme Guru)

एकदा एका माणसाने श्रीमद्शंकराचार्यांना प्रश्न विचारला, “तुम्ही कसे काय साऱ्या जगाचे गुरु? ‘जगद्गुरू’ हे पद काय म्हणून लावता? यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले,  “कोण म्हणतो मी जगाचा गुरु आहे?  मी सर्व जगाचा गुरु नाही.  जगद्गुरू म्हणजे ‘जगत् एव गुरुः यस्य सः |’  संपूर्ण जग ज्याचे गुरु आहे असा जगद्गुरू !  सर्व विश्व माझे गुरु आहे.

सर्व काही या विश्वातून शिकावे.  नदी व सागराच्या एकरूपतेतून अद्वैत शिकावे.  हंस या पक्ष्याकडून सारासार विवेक घ्यावा, कारण दूध व पाणी एकत्र मिसळल्यावर हा पक्षी दूध व पाणी वेगळे करून त्यातील फक्त सारभूत दूध घेतो व निःसत्व पाणी टाकून देतो.

आपल्याभोवती चांगले वा वाईट सर्वच आहेत.  विषय, प्रसंग व माणसे यांचे सद्गुण हेरून ते अंगी आणणे हे महत्वाचे आहे.  सतत जागरूक राहून नीरक्षीरविवेक माणसाने ठेवावा.  तसेच दुसऱ्यांच्या दुर्गुणांपासून आपण योग्य तो बोध घेऊन, ते आपल्याला चिकटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  त्याचप्रमाणे सदैव गुणग्राहकवृत्ति ठेवावी.  आपल्यापेक्षा सद्गुणांचा पूर्णपणे अभाव असलेल्या किंवा आपल्यापेक्षा जास्त वरचढ असलेल्या गुणी व्यक्तीचा निष्कारण मत्सर करण्याचे कटाक्षाने टाळावे.

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले ते एवढ्यासाठीच.  पर्वत, वृक्ष, नाग, वेश्या ई. त्यांना गुरुस्थानी होते.  त्यांच्यासारख्या महात्म्याचे विचार व अज्ञ माणसाचे विचार यात मूलतःच जमीन अस्मानाचा फरक असतो.  अशी उथळ स्वरूपाची विचारसरणी साधकाने ठेवू नये.

साधुसारखे विशाल मन करण्यासाठी, नव्हे, घडविण्यासाठी ही फार मोठी खडतर तपश्चर्या व त्याग आहे हे क्षणोक्षणी मनात रुजवावे.  पुस्तके वाचून किंवा अभ्यास करून हे सद्गुण आत्मसात होत नाहीत.



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून,  तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

- हरी ॐ