हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ? प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी
कर्तृत्वभावना निर्माण करतो. त्यामुळे तो
चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो. यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या
जीवाला प्राप्त होते. तेव्हा जीवाला वाटते
की, मला सुख-दुःख झाले. ही भोक्तृत्वभावना
त्याच्यामध्ये निर्माण होते. याप्रकारे
जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त
होतो. म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण
असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.
भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते | (गीता अ. ३-२७)
अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता
म्हणवून घेतो. अशा या कर्तृत्व व
भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले
आहे. कर्तृत्वभावना हा हेतु-कारण
असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे. जीव या
हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.
वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप,
शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे. परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या
हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते. कशी ? आचार्य
सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते | ज्याप्रमाणे
शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते,
त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच
कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.
एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की,
त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते. आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी
मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी
क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि
अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, December 2016
- हरी ॐ–

