Showing posts with label Yearning. Show all posts
Showing posts with label Yearning. Show all posts

Tuesday, September 24, 2013

दैन्य भाव | The Attitude of Destitution



धर्मपारायण जीवन जगत असताना संतांच्या जीवनामध्येही अनेक चांगले-वाईट प्रसंग येतात.  प्रतिकूल - वाईट प्रसंगांच्यामध्ये संकटांच्यामध्येच साधकामधील दैवीगुणांची, श्रद्धेची परीक्षा होते.  चांगली परिस्थिति असताना ईश्वरावर कोणीही श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा संकटे येतात, तेव्हा मनुष्य अधिक व्याकूळ व अगतिक होतो.  त्याच्या मनामध्ये दीनतेचा, शरणागतीचा भाव निर्माण होऊन तो भगवंताला अनन्य भावाने प्रार्थना करतो.  त्यावेळी तो भगवंताच्या अधिक जवळ जातो.  

परमेश्वराविषयी असा भाव सहजासहजी निर्माण होत नाही.  वर्षानुवर्षे जप, तप, श्रवण करूनही मनामध्ये ईश्वराविषयी उत्कट भक्ति अनुभवायला येत नाही.  व्याकुळता निर्माण होत नाही.

याचे कारण एकच !  आणि ते म्हणजे आजपर्यंत जरी आपण श्रद्धावान असू, साधना करीत असू, सदाचाराचे जीवन जगत असू, तरीही अन्तःकरणामध्ये कर्तृत्वबुद्धि, अहंकार, अभिमान असतो व जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत भगवत्प्राप्ति अशक्य आहे, कारण भगवान नारदमहर्षि म्हणतात – दैन्यप्रियत्वात् अभिमानद्वेषित्वात् |    (नारदभक्तिसूत्र)

परमेश्वरला भक्तामधील दैन्यभाव म्हणजे समर्पण भाव प्रिय आहे.  परमेश्वर भक्तामधील अभिमानाचा तिरस्कार करतो.  दैन्यभाव याचा अर्थ दुबळेपणा नव्हे.  तर दैन्यभाव म्हणजेच परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणे होय.  स्वतःच्या कर्तृत्वाच्या मर्यादा बुद्धीला समजल्या की, आपोआपच मनुष्य परमेश्वरासमोर नतमस्तक होतो.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ
 

Tuesday, July 30, 2013

भक्तीमधील व्याकुळता | Yearning in Devotion




स्त्री, पुत्र, देहादीमध्ये ज्याप्रमाणे ममता असते, त्याप्रमाणे केवळ परमेश्वरामध्ये ममता असून त्यामध्ये प्रियत्व असेल, तर तीच “भक्ति” होय, असे भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारदादि भागवताचार्य म्हणतात.

अशी ही अनन्य भक्ति प्राप्त करण्यासाठी काय करावे ?  आपल्यासमोर अनेक आकर्षक वस्तु, विषय आहेत.  आपली इंद्रिये, मन सतत बाह्य विषयांच्यामध्येच रममाण झालेले आहे.  त्यामुळे विषयांचेच संस्कार होऊन मनामध्ये विषयांच्याच वृत्ति निर्माण होतात.  विषयांच्यासाठीच मन व्याकूळ होते.  उपभोगांच्यासाठी शरीर, इंद्रिये आतुर होतात.  आपण स्वत:ला भक्त म्हणवून घेत असलो, वर्षानुवर्ष परमेश्वराची पूजा केली तरी परमेश्वराच्या भेटीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी मात्र कधीही व्याकूळ होत नाही.  म्हणून आपण अजुनही विषयांचेच भक्त आहोत.

जीवनामध्ये आपण सर्वांच्यासाठी रडतो. एखादी प्रिय व्यक्ति भेटली नाही, एखादा विषय उपभोगण्यास मिळाला नाही, साधा चहा मिळाला नाही तरी आपण अत्यंत व्याकूळ होतो.  त्यासाठी तळमळतो. व्याकुळतेशिवाय व्यवहारातील एखादी क्षुल्लक गोष्टही मिळत नसेल तर तीव्र तळमळ निर्माण झाल्याशिवाय सर्वोत्कृष्ट, विश्वकर्त्या परमेश्वराची तरी प्राप्ति कशी बरे होईल?

भक्त प्रल्हाद परमेश्वराला प्रार्थना करतो,
य प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी |
त्वामनुस्मरत: सा मे हृदयान्मापसपर्तु ||                (विष्णुपुराण)             

“ हे भगवन्ता, ज्याप्रमाणे हे सर्व सामान्य, विषय लंपट, कामुक जीव विषयांच्या प्राप्तीसाठी रात्रन्दिवस तळमळतात.  त्यांना ध्यास लागतो.  त्यासाठी ते वेडे होतात.  विषयासक्तीमुळे विषयांच्याशिवाय एक क्षणही ते जगू शकत नाहीत.  त्याप्रमाणेच माझे मन तुझ्यामध्ये – परमेश्वरामध्ये पूर्णपणे आसक्त होऊ दे.  तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या अंत:करणात तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होऊ दे.  हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 
- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ